Wednesday 30 December 2015

चिंतन

तसं बघायला गेलं तर मला सख्खी बहिण नाही. त्यामुळे माझ्या बालपणी मी आणि माझा भाऊ. ज्या गावात माझं लहानपण गेलं, म्हणजे यवतमाळ, औरंगाबाद आणि नाशिक, तिथेही आजूबाजूला मुली नव्हत्या. घरात कधी चुलत किंवा मावस बहिणी वैगेरेे असायच्या पण त्या काही दिवसांसाठी. भेटलो की जेव्हा चुलत मावस भावांशी लवकर कनेक्ट व्हायचो तेवढा बहिणींशी नाही व्हायचो. आणि मग मैत्री व्हायच्या आत, किंवा ती दृढ व्हायच्या आत सुट्टी संपायची. साधारणपणे अशी माणसं अशा वातावरणात मोठी होतात ती स्त्रीबद्दल दोन भावना बाळगतात, एक तर ती भोग्य आहे नाहीतर पूजनीय आहे. मी ही त्याला अपवाद नाही. नाही म्हणायला सहावी ते दहावी को एड मधे शिक्षण झालं पण साधारणत: त्या वयात मुलींबद्दल दोन भावना, एकतर राखी बांधायची नाही तर लाईन मारायची. निखळ मैत्री, निरालस भावनांपासून मी कोसो दूर होतो. तसंही भिन्न लिंगी व्यक्तिबद्दल आकर्षण नाही असं म्हणणं दांभिकपणा झाला. पण समाजाला बांधून ठेवणारे संस्कार, भिती, आदर, निर्व्याज प्रेम या आकर्षणावर मात करतात आणि संबंध मैत्रीपूर्ण रहाण्यात मदत होते.

माझी या भावनांशी ओळख झाली ती बीजे मेडिकलला. तिथले पोरं पोरी टाळ्या काय द्यायचे, पाठीत काय मारायचे, बाईकवर बसून फिरायचे. आधीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि औबादच्या मुलींचा दुष्काळ असलेल्या कॉलेजमधून आलेला मी विस्मयचकित होऊन जायचो. पण माझं मन काही प्रगल्भ झालं नाही दोन अडीच वर्षातच फुलत असलेल्या सुंदर मैत्रीच्या नात्याला तिलांजली दिली आणि प्रेमाकर्षणात बद्ध झालो. पुढे तिच्याशीच लग्न झालं आणि आता आम्ही मित्र मैत्रिणीसारखे राहतो हे म्हणणं म्हणजे त्यावेळेसच्या उथळ विचारांवर पांघरूण घालणं झालं.

अशी नाती कशी असतात याचा खर्या अर्थाने अनुभव घेतला तो लग्नानंतर. वैभवीला एक सख्खी बहिण, आणि सख्ख्याइतकंच घट्ट नातं असलेल्या तिच्या मामे आणि मावस अशा चार बहिणी. या सगळ्यांच्या सहवासात मला भिन्नलिंगी व्यक्तिंशी निखळ मैत्री म्हणजे काय याचा अनुभव आला. या सर्व मुलींशी, म्हणजे आता बायका झाल्यात त्या, माझे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत.  त्यामुळे "साली आधी घरवाली" हा डायलॉग विनोद म्हणून बरा वाटला तरीही पंचवीशित मिळालेल्या या निरपेक्ष नात्याला धक्का पोहोचतो म्हणून मी तो कटाक्षाने टाळतो. बाकी माझी पत्नी याबद्दल माझ्यापेक्षा फारच संतुलित आहे. मुलगी, बहिण, सून  किंवा आई म्हणून तिने जपलेली नाती ही  माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित सांभाळली आहेत. मागे एकदा लिहिल्याप्रमाणे, "समाज सापेक्ष रूढार्थाने कमी कर्तृत्ववान असलेल्या माझ्या पत्नीच्या मागे तिच्यात दडलेली एक अत्यंत यशस्वी आई आहे, आणि तथाकथित कर्तृत्ववान असलेल्या माझ्या मागे माझ्यातला तितकाच अयशस्वी बाप आहे."

अगदी थोडक्यात सांगायचं तर  निखालस मैत्री करण्याचा गुण उपजत माझ्यात नव्हता तर आयुष्याच्या तरुण ते गृहस्थ या कालावधीत  हा मी अक्षरश: कमावला आहे. आता तर पन्नाशी आली आणि त्यात अशा मैत्रीपूर्ण नात्याला मी व्यवस्थित जोपासलं आहे. त्यामुळे परवा एकाने पोस्ट टाकली "बायकोच्या भावाला भाऊ म्हणतो, तर बायकोच्या मैत्रिणीला बायको का म्हणू नये" माझ्या कडून पटकन लिहिलं गेलं "कारण  बायको तुमच्या मित्राला नवरा म्हणत नाही"

असो.  खूप तारे तोडले. एक लास्ट कन्फेशन. जर सख्खी बहीण घरात असती किंवा मला मुलगी असती तर आता आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त सेन्सिबल आणि रिस्पोन्सिबल माणूस असलो असतो.

(सदर पोस्ट हे गुरुविंदर सिंग यांच्या पोस्ट वर आधारित प्रकट चिंतन आहे. त्यात फेसबुकवरील इनबॉक्स Chatting वरून काही वाद, संवाद, प्रतिवाद होतात, यातून तयार झालेली thought प्रोसेस आहे. अगदीच सांगायचं झालं  तर माणूस हा मुळात चांगला असतो, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तो कदाचित चुकीचं वागू शकतो या जुन्या धारणेवर विश्वास ठेवावा) 

No comments:

Post a Comment