Friday 8 January 2016

विभक्त कुटुंब पद्धती

फार लाडका होतो मी त्या कुटुंबाचा. राजा, राजेश दादा अशा हाकांनी मला बोलावलं जायचं. मला आवडणार्या गोष्टी बनल्या की बाजूला वाटीत ठेवलं जायचं. मोठी माणसं प्रेमवर्षाव करायचे तर घरातल्या लहान मुली माझ्या अंगा खांद्यावर खेळायच्या.

सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला मला बोलावलं नव्हतं. पण योगायोगाने त्यादिवशी मी त्याच हॉटेल मध्ये जेवायला गेलो. माझ्या अत्यंत जिवलग नात्यातल्या मंडळींची मांदियाळी बघितल्यावर मला काही सुधारलं नाही. जेव्हा लक्षात आलं  की आपल्याला या कार्यक्रमाला बोलावलं नाही तेव्हा खूप वाईट वाटलं. माझा विश्वास बसत नव्हता पण असं घडलं होतं खरं.

नात्यांची घट्ट बांधलेली वीण आता उसवत चालली आहे याचा अनुभव पहिल्यांदा आला.

नंतर मात्र सवय झाली. पुण्यात आता कित्येक पुतण्या आहेत, भाच्या आहेत, चुलत बहिणी आहेत अगदी माहेरचं आडनाव मंडलिक असलेल्या, मावस भाऊ आहेत. कुणी फार एकमेकांना फोन करत नाहीत. मदत मागत नाहीत. माझ्याच लक्षात आलं की अरे इथं आपण यांच्या उपयोगाला येऊ शकतो तर मग शक्य ती मदत करतो. एका जवळच्या  भावाला भाड्याचं घर सोडायला सांगितलं. त्याला सांगावं वाटलं नाही "अरे हा प्रॉब्लेम झाला आहे." काही निमित्ताने मी त्याच्या घरी गेलो. कळलं. दुसर्या दिवशी त्याला घर मिळवून दिलं. तेव्हापासून आज पर्यंत कामाशिवाय पठ्ठ्या कधी भेटला नाही.

काम सरल्यानंतर  ते ही विसरून जातात, मी ही विसरतो. कधी समोरासमोर गाठभेट झालीच तर बेमालूम पणे "अरे, काय बरेच दिवसात भेट नाही झाली. फोन नाही." वैगेरे सोपस्कार होतात. आपण कसे बिझी आहोत, फोन करायला ही सुचत नाही असे डायलॉग एकमेकांना ऐकवतो. कुणी सांगतं वानवडी तून जातो पण वेळच नसतो. कुणी तोंडदेखलं कंपनी बघायची म्हणतात, खडकवासल्याला मक्याचं कणीस खायला येतात, पण २०० मीटर कार वळत नाही.  काहीना मदत हवी असते, पण डायरेक्ट मागत नाहीत. कंपनी बघायच्या निमित्ताने येतात आणि म्हणतात "बघ, झालं नाही तरी ठीक, पण हे काम होतंय का सांग, तसं व्हायलाच पाहिजे असं काही नाही". काही लोकांची वेगळीच तऱ्हा.  भेटल्यावर समोरच्याचं काय चालू आहे याचं सोयर सुतक नाही. आमची पोरं, त्यांच्या फॉरेन च्या ट्रिपा, त्यांच्या बायका/जावई, इतक्या गाडया, salary package, पुण्यात flat, त्याच्या वाढलेल्या किमती आणि मग बाय.

मुळात आपण सगळे आत्ममग्न झालो आहोत. मी आणि माझं जग यात मश्गुल आहोत. अगदी मी ही. आर्थिक स्वायत्तता आली आहे. पैसे दिले की गोष्टी मिळतात, कुणाची मदत कशाला हवी? मदत करायला नको म्हणून मग घ्यायला नको. स्वत:च्या गावात हॉटेल मध्ये राहायची पाळी यावी, यातच सगळं आलं. हे वाईट की चांगलं हा मुद्दा वेगळा पण हे घडतं आहे हे खरं.

आणि हे असंच होत जाणार. त्याबद्दल गळे काढण्यात काही मतलब नाही. पोराचं लग्न झालं की तो त्याची वेगळी चूल मांडणार. शक्य झाल्यास आई वडिलांना भेटणार. अन हेच योग्य. माय स्पेस सांभाळायच्या नादात कुणाला डोकं टेकवण्यासाठी खांदा दयायची गरज वाटत नाही.  पंधरा वीस वर्षांनी, म्हणजे आमची पिढी म्हातारी झाल्यावर एकतर एकटी उडणार नाही तर आश्रमात. अमेरिकेत होतंच आहे की. आमचा जेफ म्हणतोच की "I can not imagine my son staying at my home after his marriage" किंवा तो सांगायचा "I tell my ailing father to stay with us. But he (his father) used to say "My sons, I love you all..........but not more than 3 days". शेवटी त्याचे वडील गेले ९२ व्या वर्षी कम्युनिटी सेंटर मधेच. ते जाताना कुटुंबाचा गोतावळा बरोबर होता हेच काय ते नशीब. Close knit family, you know.

गपगुमान म्हातारपणाची सोय करून ठेवावी. पोरांना शिक्षणरूपी वाहन द्यावं मग ते कार म्हणून वापरायचं, की विमान करायचं, की  बैलगाडी हे त्यांचं त्याने ठरवायचं. व्यावहारिक राहायचं. आमचा इंग्लंड च्या स्टीव्ह ने त्याच्या पोरीला सांगितलं की "You will need at least GBP 600 if you stay alone. Instead, you stay with us and pay GBP 300 per month. Mutual benefit." कटकट नाही.

इंग्रजी In Law शब्द मस्त आहे नाही. Father in law, mother in law, son in law, daughter in law. तुम्ही माना अथवा न माना कायद्याने तो तुमचा सासरा, सून, जावई, सासू आहे. कायद्यात राहून फायद्यात राहायचं.

असो. मध्ये कुणी तरी पोस्ट टाकली होती की विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारावी का? तेव्हापासून हे लिहायचं  होतं. तर आता ते तुमच्या हातात नाही आहे. ती स्वीकारावी हेच शहाणपणाचं लक्षण आहे. 

No comments:

Post a Comment