Friday 18 December 2015

नेते अभिनेते

माझे एक ओळखीचे पुढारी आहेत. म्हणजे आता मला ओळखणार नाहीत पण एक काळ होता जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो. मित्राचे वडीलच तसे ते. एकदम साधा सरळ माणूस वाटायचा मला. आणि बोलतानासुद्धा आपल्या सगळ्यांचे वडील जसे मायेने, पोराच्याबद्दल काळजीने बोलतात, तसेच बोलायचे. जोक्सही मारायचे.

पुढे जाऊन कळलं की त्यांनी एका बँकेचं लोन घेऊन बँकेला गंडवलं. मला प्रश्न पडला की यांच्या रेल्वेनं कुठं आणि कधी पटरी सोडली असेल.

शरद पवार साहेब, लालूप्रसाद यादव किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही मंडळी सुद्धा तरूणपणी ध्येयवादी असावीत. या सगळ्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल की यांच्या प्रत्येक कृतीवर उत्तरआयुष्यात प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. ज्यांचं नाव लिहायला पण लाज वाटते असे आजचे राष्ट्रवादीचे नेते, जे एकेकाळी शिवसेनेचे होते, भ्रष्टाचाराच्या दलदलीत आज आकंठ बुडले आहेत तेसुद्धा नव्वदीच्या अगोदर तडफदार म्हणून प्रसिद्धच होते की!

राममनोहर लोहियांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले लालूप्रसाद यांचा चारा घोटाळा हा आपल्याला अचंबित करून टाकतो. त्यांनी रेल्वेची खरंतर वाट लावली, हावर्डमधे भाषण दिले हे खोटं लिहीलं, मिसाबद्दलही काही प्रवाद निर्माण केले. बिहारच्या जनतेने त्यांच्या पारड्यात मत दिलं हे ठीक आहे पण महाराष्ट्रात त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर सोशल मिडीयात कौतुक केलं जातं हे मात्र आश्चर्यकारक आहे. असो. मला स्वत:ला मात्र लालूप्रसाद अजिबात झेपत नाहीत. नाही नाही, त्यांच्या तथाकथित गावंढळपणाचं अजिबात हसू येत नाही. आपण भाजपविरोधक आहोत म्हणून लालूप्रसाद यांच्यासारख्या भ्रष्ट माणसाचं कौतुक करायला आमची बुद्धी भ्रष्ट नाही.

बाकी वर उल्लेख केलेले मान्यवर नेते हे कलासक्त आहेत, सुजाण आहेत पण तरीही सत्तेचा प्रश्न आला की विलासरावांना शिवसेना जवळ करावी लागली. सत्ता हातात आली की महाजनांनी रिलायन्स बरोबर साटलोटं जुळवलं. महाजनांचं कर्तृत्व अन वक्तृत्व वादातीत होतं. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण ते असले असते तर भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत त़्यांचं नाव बरच वर असलं असतं.  पुण्यातल्या कुठल्याही बिल्डरचं नाव घ्या, मग ते लवासा असो, पंचशील असो, मगर असो की काकडे असो, पवार साहेबांचं नाव जोडलंच जातं. मुंडे साहेबांच्या अपघाती निधनानंतर वाद प्रवाद झालेच होते. या सगळ्या प्रकारात शतप्रतिशत तथ्य नसलं तरी धूर निघतो म्हणजे आग तर लागली असेलच की कुठेतरी. पुन्हा एकदा असो.

पण या सगळ्यांच्या आयुष्यात एक पॉईंट असा नक्कीच येत असेल की जिथे आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत पाय घसरला आणि मग सत्ता, त्यासाठी पैसा कमावण्यासाठी वाटाघाटी आणि तडजोडी चालू झाल्या असतील.

अभिनेते अन खेळाडू यांच्या बाबतीत ही होतं हे. कधी पैशाच्या बाबतीत तर कधी ते तारे तोडतात तर कधी अजून कुठल्या गोष्टीसाठी. परवा गिरीश कर्नाड बकले, ओम पुरी डोमेस्टिक व्हायोलन्स साठी प्रसिद्ध आहेत, अझर जडेजा ने पैसे खाऊन तोंड काळं केलं. शायनी अहुजा ने मोलकरणीवर बलात्कार केला तर संजय दत्त ने या प्रकारातला कहर केला. देशद्रोहाचा गुन्हा केला. मेरूमणीच तो.

तर असो. पाय सगळ्यांचा घसरतो, पण नेते जेव्हा भरकटतात तेव्हा सामान्य माणसांच्या जगण्याशी त्यांचा संबंध येतो. म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्याचा मोह होतो.

No comments:

Post a Comment