Wednesday, 31 March 2021

असा मी

 मी जे लिहिणार आहे त्यावर फारसा कुणाचा विश्वास बसेल का याबद्दल मी साशंक आहे. एका मित्राच्या पोस्टवरून हे लिहावसं वाटलं. कदाचित मामाच्या मृत्यू मुळे मी थोडा कातर ही झालो असेल. 

का कुणास ठाऊक, पण गेल्या काही वर्षात माझ्या मनात कुणाबद्दल कटुता किंवा तिरस्कार राहत नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की माझ्याबरोबर सगळं छान घडलं आहे. काही लोकांनी फसवलं आहे, दगा दिला आहे, काहींनी पैशाला टोपी लावली आहे, काहींनी मानसिक त्रास दिला आहे, एकाने तर मी मरावं अशी जाहीर इच्छा प्रकट केली आहे. पण या कुणाच्याही बद्दल माझ्या मनात तिरस्काराची भावना नाही आहे. मी या सगळ्यांशी व्यवस्थित बोलतो, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतो. 

काही लोकांचा चॉईस आहे की त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं आहे, ते माझा फोन उचलत नाहीत, किंवा मला बोलणं टाळतात, त्यामुळे आणि फक्त त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण कधी काळी ते माझ्याशी बोललेच तर जुनं सगळं विसरून परत त्यांच्याशी बोलण्याची मानसिकता तयार झाली आहे. यामध्ये सर्व कॅटेगरी आहेत. काही मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, नातेवाईक आहेत. 

आयुष्यात काही घटना घडल्या आहेत, ज्याने हा अंतर्बाह्य बदल घडून आला आहे. त्यात सगळ्यात जास्त फरक ७ जुलै २०१९ ला अपघातात जे चार सहकारी निधन पावले त्याने पडला आहे. ६ जुलै ला ज्या लोकांबरोबर संध्यकाळी हसी मजाक करत होतो, ते बरोबर अकरा तासांनी या जगात नव्हते हा धक्का फार जबर होता. आणि मग "जिवंत आहेस ना, मग सगळे प्रश्न आपण सोडवूं शकतो" ही एक भावना मनात तयार झाली. काही फरक वाचनाने आला आहे तर काही वेगवेगळ्या लोकांना ऐकल्यामुळे झाला आहे. 

इथं फेसबुकवर सुद्धा माझी कुणाला सहन करायची ताकद जबरदस्त आहे. दोन तीन लोकांना मी लिस्ट मधून उडवलं होतं, कारण माझ्या मते फार बालिश वागत होते. काहींनी मला उडवलं होतं, आहेही. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मी त्यांच्याशी एकदम निवांत बोललो आहे. ते जर हे पोस्ट वाचत असतील तर त्यांच्या लक्षात येईल. 

अजून एक महत्वाची जाणीव झाली आहे. काही व्यक्तीबरोबर माझा व्यवहार हा चुकीचा झाला आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांची मी कधी माफी मागू शकेल की  नाही ही शंका आहे. पण त्या सर्वानी, अँड आय मीन  इट, अगदी सगळ्यांनी मला माफ केलं आहे. म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं आहे की मी त्यांच्याशी अक्षम्य व्यवहार केला आहे हे त्यांच्या लक्षात पण नाही आहे. इन फॅक्ट काही त्यातील बऱ्याच व्यक्ती या मला आदर्श मानतात. 

काहींच्या लेखी हे चुकीचं असेल, काही लोक याला आत्मस्तुती म्हणतील, काही लोक खिल्लीही उडवतील. मी असा का झालो, कसा झालो हे माहिती नाही, पण झालोय खरा! जे आहे ते आहे. 


असा मी 


Sunday, 28 March 2021

सुरेश सीतारामपंत पाठक

 तो यायचा परभणीच्या मुक्ताजीन मध्ये, सायकल रिक्षातून. आणि मग आम्ही भाचे मंडळी जाऊन त्याच्या ढेरी वर गुद्दे मारायचो. जी असोशी, जे प्रेम त्याने सत्तर ते ऐंशीच्या दशकात दिलं, त्यात तसूभरही बदल झाला नाही पुढच्या चार दशकात. आणि हे माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येकासाठी. काही लोक अशी असतात की त्याच्या संपर्कातल्या प्रत्येकाला वाटतं की त्याचं आणि माझं नातं जरा स्पेशल आहे. तीन व्यक्ती येऊन गेल्या आयुष्यात, शरद मंडलिक, विलास कुलकर्णी आणि तो, माझा मामा सुरेश सीतारामपंत पाठक. 

सुरेश मामाच्या घरी गेलो की सॉलिड कौतुक ओसंडायचं, त्याच्या शब्दातून, कृतीतून. हक्कानं पाया पडायला लावायचा आणि भरभरून आशीर्वाद द्यायचा. काही लोकांच्या पाया पडायचं म्हणजे मनात फक्त येतं की पाठीला व्यायाम होतोय आणि काही लोकांचे पाय पकडताना पाठीच्या कण्याला वाकायची आज्ञा आपसूक होते. मामा दुसऱ्या कॅटेगरी मधला होता. 

माझ्या आईचा लाडका भाऊ. तसा चुलत, पण सख्ख्याच्या पलीकडे. कारण ती त्या चार भावंडांबरोबर मोठी झाली हैद्राबादला. आमच्या घराबरोबर अजब प्लाटॉनिक प्रेम होतं त्याचं. १८ जून २००९ ला सकाळी त्याला कळलं मी बाबांची तब्येत बरी नाही म्हणून सुट्टी घेतली. तर केवळ मी सुट्टी घेतली म्हणजे प्रकरण सिरीयस आहे हे जाणून साडे तीन तासात, दुपारी दोनच्या सुमारास तो घरी आला. संध्याकाळी पाच वाजता बाबा गेले. 

मला राजा म्हणणाऱ्या फार कमी व्यक्ती, त्यात तो एक. अन तो मला राजा सारखी ट्रीटमेंट पण द्यायचा. ठाण्याला गेलो अन मी श्रीरंग सोसायटीत त्याच्या घरी गेलो नाही असं क्वचित व्हायचं. अगदी चहा बिस्कीट घेण्यासाठी अर्ध्या तासासाठी का होईना मी जाऊन यायचो. त्याला जाम अभिमान होता माझा. सेटको, त्या अनुषंगाने भारतात आणि परदेशात माझं फिरणं, अ.....अभियंत्यांचा पुस्तक, इथे फेसबुकवरील लिखाण ही प्रत्येक गोष्ट त्याने भरभरून एन्जॉय केली. माझ्यासमोर आणि इतर नातेवाईकांसमोर तो बिनदिक्कत माझं या सगळ्यांसाठी बेफाम कौतुक करायचा. 

सगळ्यांवर निरामय प्रेम करणारा एक भाविक, कुणाचाही मृत्यू वेदनादायी असतोच पण सुरेश मामाच्या बाबतीत असं काही लिहायला हात धजावत नाही आहेत. 

दररोज रात्री गादीवर चादर टाकताना तुझी ती एक सुरकुती न पडणारी चादर आठवत राहील, दर गणपतीला तुझी ती आरास आठवत जाईल, कुणाही मोठ्याचा आशीर्वाद घेताना तुझे ते "येत जा रे राजा, बरं वाटतं" हे शब्द कानात गुंजन करतील, कुणाही मोठ्यांची सेवा या हातून घडलीच तर तू आजोबांची जी काळजी घेतली ती बेंचमार्क म्हणून सतत मनात राहील. 

माहिती आहे, आपली भेट आता होणार नाही, कारण तू अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहेस. पण वी ऑल विल नेव्हर मिस यु, Suresh मामा.  कोणत्या ना कोणत्या कारणाने तू आम्हाला सतत आठवत राहशील. मला माहिती आहे, तुला इंग्रजी फार आवडत नाही पण काय करणार घसा दुखत असताना आणि कॉम्प्युटर चा स्क्रीन अंधुक दिसत असताना भावना व्यक्त करण्यासाठी इंग्रजीचा सहारा घ्यावा लागतोय. 

Saturday, 27 March 2021

एक्झिट

२०१५ मध्ये जेव्हा माझी दुसरी प्लास्टी झाली तेव्हा मी स्वतःवर जाम वैतागलो होतो. विचार यायचा, सालं आपण इतकं काम करतोय पण त्यामुळे तब्येत जर खराब होत असेल तर काय उपयोग? मी सेटको बोर्डाला रीतसर सांगून टाकलं की मला या जबाबदारीतून मुक्त करा. अर्थात हे मी निराशेतून लिहिलं होतं. मी जास्त लावून धरलं असतं तर कदाचित मला बोर्डाने सोडलं पण असतं, पण रणछोडदास म्हणून ओळखला गेलो असतो. कारण सेटको वजा राजेश मंडलिक यासाठी काहीच तयारी नव्हती. 

मग माझी मनीष गुप्ता सरांशी ओळख झाली ज्यांनी बिझिनेस करण्याचा स्ट्रक्चर्ड फॉरमॅट शिकवला, ज्यामध्ये सक्सेशन प्लॅनिंग किती गरजेचं आहे याची समज आली. २०१७ पासून त्यावर काम केलं, आणि कंपनीत दुसरी आणि तिसरी फळी तयार केली. आज २०२१ मध्ये परिस्थिती अशी आहे की  जरी मी कंपनीचा निरोप घेतला तरी कंपनी व्यवस्थित चालेल, किंवा कुणास ठाऊक जास्त चांगल्या पद्धतीने चालेल. आणि मुख्य म्हणजे हे निरोप घेणं फार सकारात्मक मोड वर असेल. माझ्या मनात कुठलाही गिल्ट नसेल, आणि एक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान असेल. 

मला असं नेहमीच वाटत आलं आहे की चांगल्या पद्धतीने निरोप घेणं ही पण एक कला आहे. आणि जर हा निरोप निराशा वा वेदना देणारा न देता, पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये झाला तर त्या निर्णयाचा आदर होतो. 

बिझिनेस चालू करण्याच्या अगोदर मी दोन जॉब केले, एक एस के एफ आणि दुसरा रॊलॉन. दोन्ही जॉब पैशासाठी नव्हे तर काही विशिष्ट कारणासाठी सोडले. आजकालच्या मुलामुलींना हे वाचायला थोडं विचित्र वाटेल पण दोन्ही चेंजओव्हर मध्ये मी आधीपेक्षा कमी पगार घेतला. तर सांगायचं हे की एसकेएफ सोडून २६ वर्षे झाली आणि रॊलॉन सोडून १८, पण आजही तिथले कलिग्ज संपर्कात आहेत. त्याचं कारण हेच की निरोप घेताना कुणाच्याही मनात कटुता नव्हती, आणि नंतरही व्यवसायाची पद्धत अशी ठेवली की कधीही कुणी समोर आलं तर तोंड चुकवून जावं लागणार नाही. 

माझ्या अजून एक लक्षात आलं आहे की आपली गरज इथे संपली आहे हे ताडता यायला हवं आणि ते तर अगदी एक तासाच्या भेटीत सुद्धा लागू होतं. विधात्याकडे मी नेहमी एक प्रार्थना करतो की कुणीही जा म्हणण्याच्या अगोदर मला तिथून निघायचं धैर्य आणि सुबुद्धी द्यावी. 

थोडक्यात काय तर पृथीवरची आपली एक्झिट आपल्या हातात नाही आहे पण ती सोडून प्रत्येक ठिकाणच्या एक्झिट वर आपलं नियंत्रण हवं. 

Monday, 15 March 2021

निर्णयप्रक्रिया

आयुष्याच्या पटावर एव्हाना एक गोष्ट कळून चुकली आहे की यशस्वीतेचा ठप्पा एखादा निर्णय बरोबर घेतला तर लागत नाही. त्यासाठी अनेक निर्णय हे योग्य घ्यावे लागतात. त्याप्रति येण्याची प्रोसेस ही शिकण्याची गोष्ट आहे. बरेचदा ज्यांचे निर्णय बरोबर येतात, "त्यांना नशीब साथ देतं" अशी एक पासिंग बाय प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या क्षमतेचं, त्यांनी भूतकाळात चुकीच्या निर्णयातून काही शिकून त्या प्रोसेसला समजून घेण्यात आणि त्यावर अंमलबजावणी करण्यात जी मॉडेस्टी आणि हुशारी दाखवली असते, त्याची अक्षरश: बोळवण करून टाकतो. 

एखाद्यावर अपयशी असा ठप्पा लावण्याची कुणी घाई करत नाही. पण काही लोक त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतात. त्यावर काम करण्यासाठी नियती अनेक संधीही देते, पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत, आपल्या मेंदूची कवाडं काही तरी विचित्र मान्यतांवर आधारित घट्ट बंद करून ठेवतात. त्याच्या बिजागिरीना आता गंज चढलेला असतो. पण आपण काही त्यावर काम करत नाही आणि मग एका चुकीमुळे छोटा तयार केलेला खड्डा हळूहळू मोठा होत जातो. "नशीब साथ देत नाही" असं आपल्याच नाकर्तेपणाचं सार काढून त्या खड्ड्यात सपशेल शरणागती पत्करतो. 

वाईट वाटतं, कधी कधी रागही येतो. आत्ममग्नतेचं भूत यांच्या मानगुटीवर इतकं भीषण सवार असतं की त्याला आव्हान देण्याची सुद्धा समोरच्याला भीती वाटावी. काळाच्या कसोटीवर या लोकांची झालेली अधोगती बघवत नाही. त्यांच्या क्षुद्र मानसिकतेवर आता चीड येत नाही, आता त्यांच्यावर दया येते. 

Give, as if you are going to die tomorrow.....Take, as if you are left with many years to live इतकं सोपं गणित आहे आयुष्याचं. हे खरंतर असं असताना ग्रीड हा प्रकार त्याला आपण इतकं अवघड करून टाकतो की समीकरण सुटता सुटत नाही. 

म्हंटलं तर फार अवघड नाही आहे. पण सुर्याखालील सर्व गोष्टीची मला माहिती आहे या भ्रमात माणूस गेला की त्या गैरसमजूतीला छेद देणं हे दुरापास्त होतं. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको याचा खरा अर्थ निर्णयप्रक्रिया आत्मसात करण्याविषयी आहे. त्याची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती समजून घेण्याविषयी आहे. जो जिता वोही सिकंदर यातील सिकंदर बनण्याची आहे. 


#चिंतनातून 



Friday, 12 March 2021

गैरसमज

गैरसमज  

एखादा अपघात होऊन रस्त्यावर काचा पडल्या असतील तर गाडी चालवताना त्या काचा टाळण्यासाठी उगाच त्याला वळसा घालून गाडी चालवू नये. अशा काचांवरून गाडी नेली तर टायर पंक्चर होत नाही. 

कारचा ए सी बंद चालू करून गाडी चालवली तर ऍव्हरेज चांगलं मिळतं हा एक मोठा गैरसमज आहे. कारचा ए सी एकतर कायम चालू ठेवा नाहीतर कायम बंद ठेवा. फारतर त्याचं तापमान कमी जास्त करू शकता. 

शॉवर ने अंघोळ केली असता बदलीपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं याचं मला फार अपराधी वाटायचं. 

एअरहोस्टेस याचं मराठी भाषांतर हवाईसुंदरी चूक आहे. तिला फारतर हवाई यजमानीण किंवा हवाई परिचारिका किंवा हवाईसेविका म्हणू शकतो. 

लिफ्ट ने खाली जायचं असेल तर डाऊन ऍरो दाबावा. अप ऍरो दाबून आत गेल्यावर जर वरच्या मजल्यावर कुणी लिफ्ट कॉल केली असेल तर आश्चर्य व्यक्त करू नये. 😊
हॉर्न न वाजवता गाडी चालवणं हे जितकं वाटतं तितकं अवघड नाही आहे.
क्रेडिट कार्डचे बिल आल्यावर दुसऱ्या दिवशी भरलं आणि शेवटच्या दिवशी भरलं काय, फरक काहीच पडत नाही. शेवटच्या दिवशी भरलं म्हणून खूप फायदा झाला असं होतं नाही. चुकून जर हे बिल एक दिवस उशिरा भरलं तर नुकसान जबर होतं मात्र. 😊
उन्हाळ्यामध्ये टाकी फुल करू नये. जास्त तापमानामुळे पेट्रोल उडतं आणि एव्हरेज कमी मिळतं हा एक मोठा गैरसमज आहे. 😊😊


Sunday, 28 February 2021

विचाराचं क्षितिज

 

भारतातल्या अनेक मोठ्या व्यवसायाने एव्हाना दाखवून दिलं आहे की त्यांनी व्यवसायाचा आर्थिक उद्देश जरी नफा कमावणे असा ठेवला तरी त्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या लोकांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विचार केला. हे केल्यामुळे ते व्यवसाय तर मोठे झालेच पण एका मोठ्या प्रवर्गाचा आर्थिक स्तर त्याने उंचावला. 

मोठ्या व्यावसायिकांची ही विचारधारा छोट्या व्यावसायिकांनी अंगिकरण्याची कधी नव्हे इतकी निकड जाणवते आहे. एम एस एम इ क्षेत्रातल्या लोकांनी आता स्वतःचा आर्थिक स्तर उंचावण्यापेक्षा त्यांच्या लोकांना त्यांची आर्थिक उन्नती तसेच एक जबाबदार नागरिक होण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं हे गरजेचं आहे. अन्यथा लोकांचं भलं करण्याच्या नावाखाली त्यांना वापरून घेणारी जमात म्हणजे भांडवलदार या व्याख्येचे आपण दुर्दैवी वाहक असू. 

जर तुम्हाला व्यावसायिक म्हणून घडवायचं असेल तर स्वतः पलीकडे जाऊन विचार करण्याची मानसिकता ठेवणं अपरिहार्य आहे. तुमच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या व्यवसायाची आर्थिक पत आणि स्तर कसा वाढवता येईल हे लक्षात ठेवून जर व्यवसाय वाढवला तर आणि तरच तुम्ही संपन्न, श्रीमंत नव्हे,  आणि तुम्ही ज्या प्रवर्गाबरोबर काम करता तो सशक्त बनण्याची शक्यता आहे. 

हे करण्यासाठी वृद्धीधिष्ठित मानसिकता ठेवणं हे भविष्यात सगळ्यांना फलदयी ठरणार आहे. थोडक्यात व्यवसायाचं प्रारूप असं ठेवायचं की कधीतरी तुम्हाला तो विकायचा आहे. भले तो तुम्ही विकू नका पण व्यवसायाला एक प्रॉडक्ट समजून असं सजवा की ती विक्रीला आहे. मग जसं आपण एखादा प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवला की त्याचं आयुष्य चांगलं असावं, तो प्रॉडक्ट चांगला दिसावा म्हणून डिझाइन करतो, त्याला मेंटेन करता यावं म्हणून काही सुविधा ठेवतो, त्या मानसिकतेने व्यवसायाकडे बघतो. समाधानी कर्मचारी वर्ग, सिस्टम आणि प्रोसेसेस, काम करण्याची जागा स्वच्छ असणे, इन्कम टॅक्स वा सेल्स टॅक्स न चुकवण्याची आर्थिक शिस्त ठेवणे, तुमच्या पेक्षा हुशार लोक व्यवसायात आणणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या निर्णयक्षमतेचे खुल्या मनाने स्वागत करणे,  या काही गोष्टी व्यवसायाला सशक्त बनवतात.

बऱ्याचदा आणि बऱ्याच जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की व्यवसाय मोठे असतात म्हणून वर नमूद केलं तसं वागतात. खरंतर ते तसं वागतात म्हणून मोठे झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांनी आता त्यांच्या आकार उकाराबद्दल जास्त विचार न करता आपल्या विचाराचं क्षितिज विस्तारणं, हे जास्त संयुक्तिक असणार आहे. जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण त्या संधीला सामोरे जाताना आपली सनातनी प्रवृत्ती वापरली तर शॉर्ट टर्म फायदा होईलही कदाचित पण शाश्वत व्यवसाय उभे राहणार नाही आणि आज देशाच्या उन्नतीचे आपण जे दिवास्वप्न पाहतो आहे, ते काही दशकांनंतर सुद्धा वास्तव होण्याची शक्यता नाही. 

Saturday, 13 February 2021

४ फेब्रुवारी

 नासिकला सीडीओ मेरी ची वसाहत आहे. त्याच्या अलीकडे आमचं विद्युत नगर. मी सीडीओ मेरीच्या शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे सर्वजण तिथले मित्र. पर्यायाने मित्रांचे आई वडील म्हणजे माझे काका काकू. काही जण मला राजेश म्हणून हाक मारतात तर काहीजण मित्रांसारखे मंडल्या म्हणून बोलावतात. नितीन कुलकर्णी किंवा राजेश गोडबोले ची आई मला न चुकता मंडल्या म्हणून बोलावते. कानाला अन मनाला फार गोड वाटतं  ते. (पॉलिटेक्निक चा मित्र मंगेश पाठक ची आई पण मंडल्या बोलावते). 

पुण्यात माझ्या शाळेतले आम्ही पाच सहा जण आहोत. भेट होत असते अधून मधून. थोडं काका काकूंबद्दल विचारतो. कधी त्यांचीही भेट झाली तर ते मला माझी, वैभवीची ख्याली खुशाली विचारतात. 

मनात विचार आला की या काका काकूंचं एक छोटं गेट टूगेदर करावं. कोविड मुळे जमत नव्हतं. आता जरा भीती कमी झाली म्हणून मग घाट घातला. कंपनीचं आवार मोठं असल्यामुळे गेट टूगेदर  तिथं ठरवलं. त्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद पण लाभतील हा एक स्वार्थ होताच. 

४ फेब्रुवारी वैभवीचा वाढदिवस. मग दिवस तोच निवडला. यावेळेस औक्षण करायला झुंबड उडाली होती. सगळे सत्तरीत, आणि काही तर ८०+ असल्यामुळे, बफे ऐवजी पंगत ठरवली. जेवणाला पण अगदी मराठी मेन्यू ठेवला. 

सगळा कार्यक्रम झाल्यावर पुढील आयुष्यभर पुरतील इतकी आशीर्वादाची शिदोरी जमा झाली. घरी आल्यावर वैभवीने विचारलं "तू सगळ्यांसमोर काही बोलला नाही". काय आणि कसं बोलणार. घशात आवंढा असताना अवघड असतं बोलणं. 

संध्याकाळ एकंदरीत हृदयगंम होती.