Wednesday 31 March 2021

असा मी

 मी जे लिहिणार आहे त्यावर फारसा कुणाचा विश्वास बसेल का याबद्दल मी साशंक आहे. एका मित्राच्या पोस्टवरून हे लिहावसं वाटलं. कदाचित मामाच्या मृत्यू मुळे मी थोडा कातर ही झालो असेल. 

का कुणास ठाऊक, पण गेल्या काही वर्षात माझ्या मनात कुणाबद्दल कटुता किंवा तिरस्कार राहत नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की माझ्याबरोबर सगळं छान घडलं आहे. काही लोकांनी फसवलं आहे, दगा दिला आहे, काहींनी पैशाला टोपी लावली आहे, काहींनी मानसिक त्रास दिला आहे, एकाने तर मी मरावं अशी जाहीर इच्छा प्रकट केली आहे. पण या कुणाच्याही बद्दल माझ्या मनात तिरस्काराची भावना नाही आहे. मी या सगळ्यांशी व्यवस्थित बोलतो, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतो. 

काही लोकांचा चॉईस आहे की त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं आहे, ते माझा फोन उचलत नाहीत, किंवा मला बोलणं टाळतात, त्यामुळे आणि फक्त त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण कधी काळी ते माझ्याशी बोललेच तर जुनं सगळं विसरून परत त्यांच्याशी बोलण्याची मानसिकता तयार झाली आहे. यामध्ये सर्व कॅटेगरी आहेत. काही मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, नातेवाईक आहेत. 

आयुष्यात काही घटना घडल्या आहेत, ज्याने हा अंतर्बाह्य बदल घडून आला आहे. त्यात सगळ्यात जास्त फरक ७ जुलै २०१९ ला अपघातात जे चार सहकारी निधन पावले त्याने पडला आहे. ६ जुलै ला ज्या लोकांबरोबर संध्यकाळी हसी मजाक करत होतो, ते बरोबर अकरा तासांनी या जगात नव्हते हा धक्का फार जबर होता. आणि मग "जिवंत आहेस ना, मग सगळे प्रश्न आपण सोडवूं शकतो" ही एक भावना मनात तयार झाली. काही फरक वाचनाने आला आहे तर काही वेगवेगळ्या लोकांना ऐकल्यामुळे झाला आहे. 

इथं फेसबुकवर सुद्धा माझी कुणाला सहन करायची ताकद जबरदस्त आहे. दोन तीन लोकांना मी लिस्ट मधून उडवलं होतं, कारण माझ्या मते फार बालिश वागत होते. काहींनी मला उडवलं होतं, आहेही. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मी त्यांच्याशी एकदम निवांत बोललो आहे. ते जर हे पोस्ट वाचत असतील तर त्यांच्या लक्षात येईल. 

अजून एक महत्वाची जाणीव झाली आहे. काही व्यक्तीबरोबर माझा व्यवहार हा चुकीचा झाला आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांची मी कधी माफी मागू शकेल की  नाही ही शंका आहे. पण त्या सर्वानी, अँड आय मीन  इट, अगदी सगळ्यांनी मला माफ केलं आहे. म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं आहे की मी त्यांच्याशी अक्षम्य व्यवहार केला आहे हे त्यांच्या लक्षात पण नाही आहे. इन फॅक्ट काही त्यातील बऱ्याच व्यक्ती या मला आदर्श मानतात. 

काहींच्या लेखी हे चुकीचं असेल, काही लोक याला आत्मस्तुती म्हणतील, काही लोक खिल्लीही उडवतील. मी असा का झालो, कसा झालो हे माहिती नाही, पण झालोय खरा! जे आहे ते आहे. 


असा मी 


No comments:

Post a Comment