माझे वय सध्या ८२ चालू आहे. आतापर्यंत कधीही तब्येतीची तक्रार नव्हती. पण हल्ली सर्दी, खोकल्यामुळे बेचैन होते. लवंग, मध, वाफ घेणे या घरगुती उपायांचा काही उपयोग होत नाही. तसं झालं की माझी इच्छा नसताना राजेश मला दवाखान्यात स्पेशालिस्ट डॉक्टर कडे नेतो. तिथे मग सी टी स्कॅन वगैरे मनात धडकी भरवणार्या मशीन मध्ये तपासणी होते. तिथं एक विचित्र मानसिक दडपण असतं ज्यामुळे घाबरायला होतं. मग नको तो दवाखाना अशी भावना मनात बळावते. ज्या आजारांशी मी घरातच सामना केला त्यासाठी ते हॉस्पिटल, ती मशिन्स, इंजेक्शन्स आणि मुख्य म्हणजे त्याला लागणारे भरमसाठ पैसे हे नको वाटतं.
या सगळ्या मागे अजून एक गोष्ट. राजेश चे वडील एम एस इ बी त होते. तिथे पेन्शन नव्हती. त्यामुळे त्यांच्यानंतर जी शिल्लक आहे त्यावरच माझी सगळी भिस्त आहे. मुलं खर्चाला नाही म्हणत नाहीत, पण मलाच असं वाटत राहतं की आपल्या तब्येतीचा भार त्यांच्यावर पडायला नको. त्याच भावनेतून ते औषधांवर पैसे खर्च करणं जीवावर येतं.
घरात दोन मुलाकडे मिळून पाच गाड्या आहेत भल्यामोठ्या. राजेश सांगतो तो हिशोब मी ऐकून घेते खरं, पण आयुष्यभर पी एम टी अन रिक्षा च्या मीटर कडे बघत प्रवास केलेल्या मला आयुष्याच्या उत्तरार्धात पोरांच्या गाडीमध्ये राणी सारखं इकडे तिकडे फिरायचं समाधान वेगळंच असतं हे कुणाला काय कळणार? मला नाही वाटत या माझ्या विचारधारेत काही चूक आहे. तुम्हाला वाटतं का माझं काही चुकतंय म्हणून?
No comments:
Post a Comment