बाकी उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योग व्यवसायापेक्षा प्रमाण कमी असलं तरी आमच्याकडे लोक सोडून जातात. त्यातले काही लोक जाताना काहीतरी विचित्र भावना असते. विचित्र म्हणजे काय तर त्यांचा जेव्हा निरोप समारंभ असतो तेव्हा तिथं जावंसं पण वाटत नाही आणि गेलोच तर फारसं बोलावंसं पण वाटत नाही. काहींना तर जबरदस्तीचा राम राम करावा लागतो. पण काही लोक असतात जे कंपनी मध्ये भले काहीच वर्षे काम करतात पण ते करताना त्यांनी १००% रिटर्न्स कामाला दिले असतात. म्हणजे त्यांनी स्वतःचा एक स्लॉट कंपनीत तयार केला असतो. ते जेव्हा सुट्टी घेतात तेव्हा उगाच चुकल्यासारखं वाटतं आणि सोडून जातात तेव्हा त्यांनी जो कंपनीत काळ व्यतीत केला त्याबद्दल एक सुखावह भावना मनात रुंजी घालत असते.
असाच आमचा एक एम्प्लॉयी, त्याचं नाव बाबू. खरं नाव परशुराम राऊत. १७ वर्षे कंपनीत काम केल्यावर त्याने ती सोडण्याचा निर्णय घेतला. तो कंपनीत हेल्पर म्हणून जॉईन झाला आणि हेल्पर म्हणूनच कंपनी सोडली. पण ज्या कामाचा आपल्या इको सिस्टम मध्ये मोबदला सगळ्यात कमी मिळतो, त्या कामात बाबूने मनापासून काम केलं. आमची कंपनी जॉईन करण्याअगोदर अक्षरश: पोती वाहणाऱ्या बाबूने, आमच्या इथे कॉम्पोनंट क्लीन करणे, पॅकिंग करणे, झाडलोट करणे, पाणी भरणे, गाड्या धुणे अशी सर्व कामं केली. मध्ये करोना काळात कँटीन चे इश्यू होते तेव्हा सेकंड शिफ्ट मध्ये पोरांना डबे दिले. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर पोस्ट लिहिली तेव्हा कुणीतरी असं लिहिलं होतं की असा खराच माणूस आहे का, की माझ्या आदर्शवादाच्या सोसातून तो काल्पनिक तयार केला आहे.
गेली काही वर्षे त्याला कमी अंगमेहनतीचं म्हणजे ऑफिस मधील पॅन्ट्री सांभाळण्याचं काम दिलं होतं. त्यामुळे माझ्या कडे कुणी पाहुणे आले तर त्यांचं सरबराई करायचं काम बांबूचं. माझी केबिन मध्ये जर काही एक्स्ट्रा कागदपत्रे दिसली की माझ्या मागे लागून तो गरज नसलेल्या गोष्टी फेकायला लावायचा. जी कामं करण्याची एस ओ पी वगैरे लिहून लोकांना त्याची सवय लावायला लागते ती एस ओ पी बाबूच्या रक्तात भिनलेली होती. कॉमन सेन्स वापरून तो सांगितलेल्या कामात व्हॅल्यू ऍडिशन करून +१ काम करायचा. बाकी त्याची अजून काही वैशिष्ट्य आधीच्या पोस्ट मध्ये सांगितली होती, त्याची लिंक खाली देत आहे.
आता तब्येत फारशी साथ देत नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं त्याला झोपूयो मध्ये फ्लॅट घर मिळाल्यामुळे त्याने हडपसर बाजूला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तिकडून कंपनीत ये जा करणं हे अवघडच होतं.
परवा त्याचा निरोप समारंभ झाला. लोक अगदी उत्स्फूर्त पणे त्याच्या बद्दल बोलले. मी पण बोललो, अर्थातच. त्यात कुठलाही कृत्रिम पणा नव्हता, निगेटिव्ह भावनेची थोडीपण भनक नव्हती. व्यावहारिक पातळीवर त्याने कंपनीला शंभर+ टक्के दिलं. पण त्याही पेक्षा त्याचा कंपनीतील वावर हा कंपनीतील सकारात्मकता वाढवणारा होता. आमच्या इथे आल्यावर या पॉझिटिव्ह वाईब्ज चा अनेक जण उल्लेख करतात. बाबू सारखे जे अनेक लोक आमच्या कडे कार्यरत आहेत त्याने ते शक्य होतं. बाबूवर लिंक्ड इन वर पोस्ट टाकली त्यानंतर त्या पोस्टवरच्या कमीच कॉमेंट्स आहेत पण वाचण्यासारख्या आहेत. आणि तीन जणांनी मला फोन करून बाबूचं कौतुक केलं आणि तो सोडून गेला याबद्दल हळहळ व्यक्त केली. यातच त्याच्या कामाबद्दल कल्पना येते.
बाबूचं पुढील आयुष्य हे आरोग्यदायी रहावं याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment