Sunday 15 December 2013

स्नेहालय-एक अनुभव

आणि यादवबाबा मंदिरात माझी गिरीश सर सगळ्यांशी ओळख करून देत होते "हे राजेश मंडलिक, माझे मित्र". मित्राची ओळख किती जुनी तर दहाएक मेल ची देवाणघेवाण. बस. त्या पहिल्या भेटीनेच गिरीश सरांनी मला खिशात टाकले होते. राळेगण सिद्धी गावाला चक्कर मारून माझ्या गाडीने नगर कडे निघालो. आणि त्या प्रवासात उलगडला गिरीश सरांचा आणि पर्यायाने "स्नेहालय" चा प्रवास. हो तेच गिरीश कुलकर्णी, "स्नेहालय" वाले.

लहानग्या गिरीश ला लहानपणी रेड लाईट भागातून क्लास चा जावं लागायचं. वेळ वाचवा म्हणून short cut. पण ह्याच मार्गाने त्यांचा आयुष्याचा मार्ग बदलला . १३-१४ वर्षे ते ७० च्या वेश्या आणि त्यांचे जीवन बघून गिरीश विचार करायला लागला कि कसे असेल यांचे आयुष्य. त्यांची लहान पोरं तिथेच खेळत असायची. आणि मग वयाच्या २० व्या वर्षी गिरीश कुलकर्णी या युवकाने ठरवून टाकले कि या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचे. आणि साकारली एक अद्भुत चित्तरकथा.

६ ची  ६० मुलं झाली आणि राहते घर अपुरे पडायला लागले. "मुलांना आज आपण laptop घेऊन देतो, माझ्या वडिलांनी मला घरात वडिलांनी वेश्या ठेवण्याची परवनगी दिली, पुनर्वसनासाठी" गिरीश सहज पणे सांगून जातात. MIDC च्या माळरानावर एक जमिनीचा तुकडा दिला मुथा परिवाराने. आणि सुरु झाले "स्नेहालय". गिरीश सरांची एकनिष्ठता बघून जास्त जमीन मिळत गेली आणि १० एकराच्या परिसरात आज स्नेहालय उभे राहिले आहे. जवळपास ४०० मुलं मुली (बहुतांशी वेश्यांची) तिथे सांभाळली जात आहेत. यातील निम्य्याहून अधिक HIV positive  आहेत. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. सिप्ला foundation तर्फे शाळेची नितांत सुंदर इमारत उभी आहे. सुसज्ज असे कॅन्टीन आहे. जवळपास २० बेडचे हॉस्पिटल आहे. आणि इथे ३rd  स्टेज च्या hiv पेशंटची ट्रीटमेंट दिली जाते अगदी मोफत. अंबादास चव्हाण सारखे कार्यकर्ते गिरीश सरांची वर्षानुवर्षे साथ देत आहेत. आणि त्यांच्या मुलांच्या एकएक कहाण्या ऐकल्या तर माणूस थरारल्या शिवाय राहत नाही. मग ते बलात्काराच्या केस मध्ये मास जन्मठेप घडवून आणणारा साक्षीदार असो, कि सिंगापूर मध्ये एक लाख पगाराची मिळवणारा विद्यार्थी असो, कि श्रीगोन्द्याला फासेपार्धींची मुले सांभाळणारा असो. संस्थेतून कित्येक मुलींचे संसार उभे झाले आहेत. (हो तुम्ही समजताय तसंच, वेश्यांच्या hiv positive मुलींचेच संसार).

"women empowerment" हा शब्द पुष्कळदा ऐकला होता. त्याचा अर्थ गिरीश सरांचा २५ एकरातील  "हिम्मतग्राम' प्रकल्प सांगून जातो. वेश्यांचे पूर्ण पुनर्वसन. पहिले व्यसनमुक्त करायचे, त्यांना व्यवसाय द्यायचा पर्यायी आणि वेश्या व्यवसायापासून परावृत्त करायचे. २५ वर्षापासून चाललेल्या या प्रयत्नांचे दूरगामी परिणाम दिसायला लागले आहेत. नगर जिल्ह्यात आता १८ वर्षाखालील वेश्या नाहीत. पूर्वी नगर जिल्हा, सांगलीच्या मागोमाग वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आणि आता नगर पार तळाला. पूर्वी ९०० वेश्या धंद्याला उभ्या आता उण्यापुर्या २००. वेश्यांच्या मुली हा व्यवसाय सोडून साधे जिणे जगत आहेत आणि मुलं दलालीचा घाणेरडा प्रकार सोडून कंपनी त काम करून अभिमानाचे जिणे जगत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार आणि कुमारी माता यांना मदत म्हणून "भारत माता" प्रकल्प. स्त्रियांवर होणारे अत्याचार ऐकले तर अक्षरश: थरकाप उडतो. पण गिरीश सर आणि त्यांची टीम लिगल matters पासून ते प्रकरण तडीला नेईपर्यंत सगळी मदत करतात.

आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे "स्नेहांकुर" प्रकल्प. २-३ दिवसांपासून ते ३ वर्षापर्यंत लहान मुलं मुली बघताना जीव गलबलून जातो. पण तिथे सुद्धा अतिशय सुंदर काळजी. विविध कारणांनी आई बापानी सोडलेल्या लहानग्यांचे इथले असंख्य स्वयंसेवक पालक झाले आहेत. मुलीदेखत वडिलांनी आईचा केलेला खून, बलात्कारातून mentally challenged बाईला झालेला मुलगा, किती आणि कशा केसेस. पण या सगळ्यांची पालनपोषणाची जबाबदारी उत्कटतेने पार पाडली जाते.

मागेच ९०. ४ FM स्वतःचे radio station. समाजप्रबोधन पार संदेश दिला जातो. कमीतकमी २% मतदार मतदानासाठी प्रवृत्त करायचे ही धारणा.

आणि हे सगळे सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही, आपण काही समाजासाठी करतो आहे अशी भावना नाही. सगळे कसे अगदी सरधोपट पद्धतीने. मग ते आमिरखान च्या सत्यमेव जयते मधून मिळालेली देणगी असो, सिप्ला foundation ने केलेली भरघोस मदत असो, कि Thermax च्या अनु आगा madam ची मदत असो. एवढ्या मोठमोठ्या व्यक्तिशी ओळख असलेले गिरीश सर माझ्याशी तेवढेच समरसतेने सांगत होते. बरं एवढं करून ह्या गृहस्थाची ओळख आता स्नेहालायाचे founder member म्हणूनच आहे. legally ते न तिथले अध्यक्ष आहेत ना सेक्रेटरी आहेत. निरपेक्ष स्वयंसेवक. स्वत: उभ्या केलेल्या संस्थेपासून एवढं detach होऊन पण attach असणे अवघडच. पण गिरीश सर सहजतेने करतात. आपण निकराने आवंढे गिळत असताना गिरीश सर एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे विविध विचार सहजपणे सांगत जातात.सच्च्या विचारांना लोकांची जोड मिळत जाते तशी सरांच्या कार्याला असंख्य लोकांचे हातभार लागले आहेत. 

गिरीश सर, तुमच्यासारखे लोकं जगात आहेत म्हणूनच हे चाक फिरते आहे, अव्याहत.

स्नेहालय-एक अनुभव

No comments:

Post a Comment