Monday 3 February 2014

काय फरक पडतो

आज सकाळी सिंहगडला गेलो होतो, नेहमीचा साथीदार वैभव बरोबर. पाण्याच्या बाटल्या इतस्तत: पडलेल्या बघून मी त्याला म्हणालो "पुढच्या रविवारी मोठ्या disposable bags आणू आणि या बाटल्या घेऊन जाऊ" (एका रविवारी हा उपक्रम बघितला होता) 

तेव्हढ्यात वैभवला एक कुटुंब दिसलं, ते सर्वंच मोठी बॅग घेऊन बाटल्या गोळा करत होते. मी त्यांना म्हणालो " आम्हाला पण द्या दोन बॅग्ज."

मग काय दोघेही बाटल्या पिशवीत भरत उतरू लागलो. समोर रिकामी बाटली दिसली की चक्क आनंद व्हायला लागला. 

असं करत दोघांच्याही बॅग्ज तुडुंब भरल्या. समोर रिकामी बाटली दिसत होती, पण उचलता येत नव्हती. उगाचच चरफडंत होतो. 

मनात आलं त्या रिकाम्या बाटल्यांशी आपला काही संबंध नाही तरी त्याबद्दल आनंद किंवा राग येत होता. ज्यांचं पोट या रिकाम्या बाटल्यांवर आहे त्यांच्या मनाची अवस्था कशी होत असेल नाही?

विचित्रंच!!

(सौ मंडलीक काॅमेंट लिहीत नाहीत, नाहीतर त्यांनी लिहलंच असतं "घर आवरलं होतं का कधी, आलाय मोठा सिंहगड आवरणारा" पण काय करणार "जे आहे ते आहे")

"तु असा वागलास, किंवा तु हे केलंस तर काय फरक पडणार आहे" हा सल्ला मला माझ्या आई वडिलांनी, जवळच्या मित्रांनी, अनोळखी लोकांनी अनेकवार दिला आहे. अाता या virtual world च्या काही सुहृदांनी पण दिला. 

पण असं म्हणून कसं चालेल. "काय फरक पडणार आहे" असा विचार मनात आला कि चांगले काम करण्याच्या इच्छेला तुम्ही तिथल्या तिथे मूठमाती देता. उद्या असं  होईल कि "आपलं घर किंवा स्नेहालय" सारख्या संस्थाना पैशाची गरज आहे आणि तुम्ही म्हणाल कि माझ्या तुटपुंज्या contribution नि काय होणार आहे. किंवा मी contribution नाही दिले तर संस्था काही बंद तर नाही पडणार.  झालं, तुम्ही इच्छेला मारणार. तुम्ही देवाला जाता. करोडो लोक जातात, तुम्ही असा विचार करता का माझ्या वाटेला कधी आशीर्वाद येईल. तिथे तुम्हाला वाटते कि देवाची शक्ती अमर्याद आहे. चांगल्या कामासाठी माणसाची शक्ती अमर्याद आहे. देव माणसात बघावा म्हणत असतील ते यामुळेच. "त्याने काय फरक पडेल" असा विचार येण्या ऐवजी "करून तर बघू, फरक पडला तर ठीकच, नाही पडला तर काय फरक पडतो" असा विचार करा, आणि बघा मग फरक पडतो कि नाही ते. 

No comments:

Post a Comment