Friday 19 February 2016

असा मी, कसा मी

साधारण ७८-७९ ची गोष्ट असेल . बाबा एम एस इ बी त असताना कामानिमित्त बाभळेश्वर ला जायचे. एकदा मी तिथून त्यांच्याबरोबर शिर्डीला गेलो. समोर साईबाबांची धीर गंभीर मूर्ती आणि त्या अख्ख्या मांडपात ८-१० लोकं. दहा एक वय असेल माझं. पण हरखून गेलो होतो. पुढे मग ९१-९२ ला मी थेउर ला गेलो होतो. त्या मंदिरातली शांतता पाहून मी अक्षरश: ट्रान्स मध्ये जायचो. अगदी टोटल ब्लीस.

साधारणपणे माझ्यासारख्या साध्या माणसाच्या श्रद्धेचा धंदा झालेला पहिल्यांदा जाणवलं ते ९८-९९ च्या सुमारास. मी, वैभवी आणि यश पंढरपूर ला गेलो होतो. रांगेत उभं असताना एका पुजार्याने मला एका पूजेबद्दल सांगितलं आणि म्हणाला "रु १५१ होतील" मी तयार झालो. रांगेतून बाहेर काढलं. पुजेसारखं काहीतरी सांगितलं आणि नंतर रांग मोडून गाभाऱ्यात नेलं. तिथल्या पुजाऱ्याने बाकी लोकांना थांबवलं, जी बहुतांश आजूबाजूच्या गावातील गरीब जनता होती. यश ला त्या विठ्ठलाच्या पायावर लोळवलं. ३-४ मिनिटे आम्ही तिथंच गाभाऱ्यात होतो. बाहेर आलो आणि बघतो तर पुजारी एकेकाचा हात धरून ढकलून सेकंदात बाहेर काढत होता. १५१ रुपयांनी भलतीच कमाल दाखवली होती.

त्याआधी कधीतरी  शनि शिंगणापूर ला गेलो. सध्या बरंच काही घडतंय या मंदिरावरून. त्यावेळी गुलशन कुमारने नुकतंच या मंदिराला फ़ेमस करून टाकलं होतं. त्या मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण हे ढोंगीपणाच आणि दांभिकतेच कळस होतं. तिथल्या आंघोळीची नाटकं, ते तेल वाहणं, स्त्रियांना प्रवेश नसणं हे अंगावर येऊ लागलं. तिथे जाण्याचं तेव्हा जे मी नाव टाकलं ते आजतागायत.

 शिर्डी, तिरुपती, तुळजापूर, पंढरपूर याठिकाणी नंतर गेलोही. पण देवाचं आणि माझं कनेक्शन मात्र तिथल्या अनेक घटकांनी तोडलं. अष्टविनायक या धंदेवाईक प्रकारापासून लांब होतं. पण सध्या तिथेही बजबजपुरी मांडली आहे.

सत्यनारायण पूजा हा एक अनाकलनीय विषय. लहानपणी ते कलावती, राजा, व्यापारी यांच्या कथा ऐकून कळायचं नाही, हे कसं शक्य आहे? पण विचारणार कुणाला. आई इतकं भक्ती भावान करायची की गप्प बसायचो. काही वर्षापूर्वी, म्हणजे आई च्या भाषेत मला शिंगं फुटल्यावर, मी हळूहळू तो प्रकार बंद केला. कुणास ठाव ते पाच अध्याय न ठेवता नुसतं मम, आत्मन:, श्रुतिस्मृती, पुराणोक्त हे इतकंच राहिलं असतं तर कदाचित आज ही वर्षातून एकदा का होईना ती पूजा केली असती.

त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या घरावर मजले चढवणाऱ्या नारायण नागबळी ची कथा पण काही वेगळी नाही. अतिशय नियोजनबद्ध मार्केटिंग चालतं त्याचं.

२००४ साली मानसिक स्थिती खराब होती किंवा अगदी सप्टेंबर मध्ये Angioplasty झाल्यावर आई म्हणाली "आज काल तू देवाधर्माचं काही करत नाहीस. मग हे असलं काही तरी होतं. जा एकदा पाया पडून ये." गेलो खरा, पण माझ्या कमकुवत झालेल्या मनाचा वापर करून पूजेचा बाजार मांडणारे सौदागर पाहून, आता काही या श्रद्धेचा भाव लावण्याच्या पद्धतीपुढे आपला काही निभाव लागणार नाही हे लक्षात आलं.

ही चराचर सृष्टी ज्याने बनवली त्या विधात्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवेल ही, पण त्याच्या असण्यावरून माझ्या जगण्यातील कृतींवर जर नियम लागू होत असतील तर तो माझ्या मानसिकतेचा पराभव असेल.

तर दोस्तानो, आहे हे असं  आहे. या मधल्या दलालांनी, तो जो कोणी विधाता आहे, त्याच्यात आणि माझ्यात प्रेमभाव उत्पन्न करण्याऐवजी भीतीची भावना रुजवली. देवळात जाणं म्हणजे, एखाद्या नातेवाईकाच्या कौलारू घरातला एकेकाळचा  सहज वावर, त्यानेच बांधलेल्या पंचतारांकित घरात संभ्रमित, भांबावलेला असा झाला आहे. त्यामुळे "देव आपणात आहे, शीर झुकोवनिया पाहे" असं  म्हणत मी घरातल्या आरशासमोर उभा राहून राहून नमस्कार करण्यात आजकाल धन्यता मानतो आहे.

असा मी, कसा मी 

No comments:

Post a Comment