Tuesday 15 October 2013

नमन

विजय बरोबर आर श्रीनिवासन साहेबांकडे जायचे ठरले होते . विजय माझा जवळचा मित्र. एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा मालक . आर श्रीनिवासन (लोकं त्यांना श्रीनि सर या नावानी ओळखतात) १ २ ० ० कोटी रुपयाच्या श्रीनिवासन ग्रुप चे अध्यक्ष. विजयची आणि त्यांची ओळख गेल्या ३ वर्षांची. विजयचा हरहुन्नरी पणा श्रीनि सरांनी बरोबर जोखला होता. एका नवीन प्रोजेक्ट मध्ये श्रीनि सरांनी  त्याला भागीदार करून घेतले होते.

जेव्हा जेव्हा विजय मला अशात भेटायचा, श्रीनि सरांबद्दल भरभरून बोलायचा. श्रीनि सर असे साधे आहेत, मुलगा BMW मध्ये फिरतो पण श्रीनि सर कसे Indica मधेच फिरतात, त्यांचे decision making किती फास्ट आणि कसे योग्य.  . श्रीनि सर कसे दक्षिण भारतातून जॉब साठी पुण्यात आले. शिक्षण नाही, खिशात दमडी नाही, पडेल ते काम केलं. शून्यातून विश्व निर्माण केलं. आज १ २ ० ० कोटीचा कसा मालक  आहे. मला म्हणायचा तू एकदा त्यांना भेटायला पाहिजे मी म्हणायचो "अरे एवढा मोठा माणूस तो. मला भेटण्यात त्यांना काय इंटरेस्ट" मला म्हणाला "तुला त्यांना भेटण्यात इंटरेस्ट आहे ना, चल मग".

मंगळवारची संध्याकाळी ५ वाजताची वेळ ठरली. मनावर थोडे दडपण होते. विजय आणि मी श्रीनि group च्या त्या अलिशान office मध्ये शिरलो . आत जाताना विजय नि मला सांगितलं की गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडायचं. ते साधारण सत्तरीचे आहेत हे माहिती होतं, पण तरीही हे पाया का पडायचं ते काही मला उमगलं नव्हतं. मी विचारलं "का", तर म्हणाला "अशी पद्धत आहे आणि ती का आहे हे विचारण्याच्या फंदात मी काही पडलो नाही, तुला awkward वाटत असेल तर तू पाया पडू नकोस." मी हो हि म्हणालो नाही आणि नाही पण. थोडं विचित्र वाटलं हे खरं.

ऑफिस सुंदरच होतं, म्हणजे कुठेही झकपक पणा नव्हता पण एक grace होती प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि गोष्टी म्हणाल तर जिथल्या तिथे. रंगसंगती अतिशय सुरेख. एक सुरेल instrumental CD चालू होती background ला. एकंदरीत वातावरण मस्तच होते. कामं पण व्यवस्थित चालू होती, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. सगळे जण शांतपणे आपापलं काम करत होते , जे फोन वर बोलत होते त्यांच्या आवाजाची पट्टी खालची होती. एकंदरीत काहीतरी वेगळं होतं या ऑफिस मध्ये एवढं नक्की जाणवलं.

विजयचा तिथे रोजचाच राबता होता. मला म्हणाला "सरांचा निरोप आहे, ५ मिनिटे थांबावे लागेल." तो कुणालातरी भेटायला एका केबिन मध्ये गेला. मऊशार सोफ्यावर बसून
मी इकडचे तिकडचे observation करत होतो. ५ मिनिटात विजय आलाच आणि म्हणाला "चल, आपल्याला बोलावलंय".

श्रीनि सर केबिन च्या बाहेर आले. विजय शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या पाया पडला. मी पाया पडावं कि नाही या संभ्रमात असताना वाकल्यासारखे केले आणि आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो . मी श्रीनि सरांचे निरीक्षण करू लागलो. साधारण सवापाच फुट उंची, सावळा रंग, डोक्यावर अर्ध्यापेक्षा जास्त टक्कल, परीटघडीचा पांढरा शर्ट असं एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व. कुठल्याही बाजूने हा गृहस्थ १ २ ० ० कोटीची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक वाटत नव्हता. "कसा आहेस" मला विचारले . साधारण दक्षिणात्य माणसाचे जसे मराठी असते तसेच त्यांचेही होते. संभाषण चालू होता होताच त्यांचा ऑफिस बॉय टक टक करून आत आला आणि म्हणाला "निघतो". सर म्हणाले "अरे रवि, थांब रे ५ मिनिटे बाहेर"

तो बाहेर गेल्यानंतर मला म्हणाले "हा मुलगा माझ्याकडे आहे १ २ वर्षांपासून. बायको गेली आहे बाळंतपणाला गावी. हा चालला आहे भेटायला. याच्या घरी म्हातारे आई वडील आहेत. खुळा आहे, घरी जाताना काही नेणार नाही. म्हणून मीच पाठवले आहे चितळे कडे एकाला, बाकरवडी, फरसाण आणि काजू कतली आणायला. येईलच एवढ्यात." मी अवाक होऊन ऐकत होतो, एवढा मोठा माणूस आपल्या ऑफिस बॉय बद्दल इतका विचार करत होता.

इतक्यात ते सगळे जिन्नस घेऊन तो बाहेर गेलेला माणूस आला. श्रीनि सरांनी हाक मारली "रवि ये रे, हे घेऊन जा सगळे गावी. दे सगळ्यांना. माझा नमस्कार सांग तुझ्या आई वडिलांना. बायकोला धीर दे सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आणि हे घे पैसे" असं म्हणून ३ - ४ हजार रुपये देऊ लागले. रवि म्हणाला "अहो सर, राहू द्या आधीच advance आहे." सर म्हणाले "अरे तो ऑफिस चा, हे माझ्याकडून. आणि हे बघ" मिश्किलपणे म्हणाले "एक box इथे वाट काजू कतलीचा" रवि त्यांच्या पाया पडला आणि डोळे पुसत म्हणाला "येतो सर".

आणि मग माझी विचारपूस चालू केली. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो पण माझ्या मनात तो रवि, त्याच्याबद्दल असणारी श्रीनि सरांची तळमळ, त्याच्या आई वडिलांना सांगितलेला नमस्कार हेच चालू होतं. माणसाचे मोठे पण म्हणजे काय याचा मी अनुभव घेतला होता. तो काही माझ्या डोक्यातून जाता जात नव्हता.

"ठीक आहे मग, येत जा अधून मधून. गप्पा मारू यात. आणि काही चांगला product असेल तर सांग, प्रोजेक्ट करू." श्रीनि सर म्हणाले. मी म्हणालो "येतो सर." आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला, मनोभावे…………या वेळेस विजयला ते मला सांगण्याची आवश्यकता नव्हती.

(या गोष्टीतील नावं आणि व्यवसाय काल्पनिक आहेत. पण घटना एकदम अस्सल आहे, अगदी स्वतः अनुभवलेली. त्यातूनही कुणी  अशीच माणसे आणि असाच प्रसंग अनुभवला असेल तर तो योगायोग समजू नये. कारण जीवनाला अर्थ देणारी अशी लोकं असतात यावर माझा दृढ विश्वास आहे)

No comments:

Post a Comment