Saturday 4 April 2015

रिक्षा

खर्चाच्या बाबतीत मी असा फार काटकसरी वैगेरे नाही आहे. किंबहुना जरा माझा हात ढिल्ला च आहे. पण तरीही कुठलीही गोष्ट विकत घेताना किंवा उपभोग घेताना मला जर माझ्या अपेक्षेपेक्षा चांगलं मिळालं तर मी खूप खुश होतो. हे प्रवासाच्या साधनाबद्दल हि लागू होतं. रेल्वे माझं फेवरीट. मला नेहमीच वाटत आलं कि आपण जे तिकीट काढतो त्या मानाने रेल्वे खूप जास्त देते. बस प्रवासात KSRTC चा मी फ्यान आहे. तिकीट, त्यांची स्वच्छता, त्यांचं टायमिंग, बस चे stop यात KSRTC सगळ्यात बेस्ट आहे. पण MSRTC मला नाही झेपत. मुंबई पुणे मुंबई या निळ्या रंगाच्या कॅब मस्त आहेत. तितकाच काही प्रायवेट कॅब सर्विस चा मी तिरस्कार करतो. गेली २१ वर्ष मी कुठल्या न कुठल्या चाकावर फिरतो आहे.

या सगळ्या प्रवासात जर मला कुठल्या वाहनाचा मनापासून तिरस्कार करत असेल तर तो रिक्षा या प्रकाराचा. रिक्शाचं तकलादू डिझाईन, मी ज्या ज्या वेळी रिक्षात बसलो त्यावेळी असलेली त्यांची अवस्था, कुठल्याही ऋतूत तुमचं कुठल्याही प्रकारे रक्षण न करू शकेल अशी विचित्र आसन व्यवस्था आणि या सगळ्यावर कडी करणारी रिक्षा चालावणार्याची माजोरडी वृत्ती. या सगळ्या गोष्टीमुळे इतर सर्व वाहनांवर विलक्षण प्रेम करणारा मी रिक्षा आणि रिक्षावाला याचा मी मनस्वी तिरस्कार करतो. 

आणि हि भावना एका रात्रीत आलेली नाही. वर्षानुवर्षे सतत च्या अनुभवामुळे वयाच्या ४७ व्या वर्षी या निष्कर्षाला मी पोहोचलो आहे. अपघात झाला तर रिक्षा जी चोळामोळा होते त्यावरून त्याच्या डिझायनर ची हे असलं बनवण्याची काय प्रेरणा आहे हे अभ्यासणं खरंच उद्बोधक ठरेल. ते Piaggio कंपनीच्या रिक्षा म्हणजे ऑटोमोबाईल डिझाईन चं सगळ्यात घाणेरडं रूप आहे हे माझं स्पष्ट मत आहे. हे आत्ता रियर इंजिन वाल्या रिक्षा आल्या म्हणून ठीक तरी आहे, पण ९६ साली मी अहमदाबाद ला पुढे इंजिन असलेल्या रिक्षात बसल्यावर अशी हालत झाली कि २० व्या किमी ला मी म्हणालो "भाऊ, हे तुझे २२० रु. मी जातो परत कसंही. पण तुझ्या रिक्षातून नाही". पावसाळ्यात माणूस भिजतो, हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात गरम हवा लागते आणि प्रदूषण असेल तर डोळे चुरचुरतात अशी विचित्र बसण्याची जागा बनवणाऱ्या ला माझा कोपर्यापासून नमस्कार. 

आणि ह्या वरचा कहर म्हणजे उद्दाम वृत्ती. आतापर्यंतच्या शेकडो रिक्षा प्रवासात मला एकही रिक्षावाला धड मिळू नये हे नवलच नव्हे काय. पार माझ्या आजोबांपासून ते थेट माझ्यापर्यंत घरातल्या प्रत्येकाचं रिक्षावाल्याबारोबर पैशावरून भांडण झालं आहे. मागच्या आठवड्याची गोष्ट. स्वारगेट वरून MH १२ AU ३८८ या रिक्शाचं रात्री तीन वाजत माझ्या घरापर्यंत मीटर वर १२६ रु झाले. इनमिन ५ किमी अंतर. ४० रु पेक्षा किमी ला भाव. अरे, कुणाला येडं बनवता राव. बरं इतकं करून तुम्ही एकाच्या दोन अन दोनच्या चार रिक्षा करता का? मी असा फसवून गरीब होत नाही पण तुम्ही हि श्रीमंत होत नाही. तुमच्या गाडीत बसल्यावर भरधाव वेगाने चालवता, अन गाडीत गिऱ्हाईक नसेल तर रस्त्याच्या मधून १०-२० च्या स्पीड ने चालवून पूर्ण ट्राफिक चा खेळ खंडोबा करता. ऐन मोक्याच्या ठिकाणी रिक्षाचा मागचा भाग बाहेर काढून उभे राहता. ट्राफिक मध्ये अडकाअडकी झाली अन आपण समोरून आलो कि हे बरोबर उलटया बाजूने येणार अन आपल्याकडे बघणारच नाही. सगळ्यात हॉरिबल प्रकार म्हणजे रात्री बेरात्री बाहेर गावाहून आलो कि ते जे अपमानित करून बोलवतात. डोक्यात जातात. "ओ चष्मेवाले" "ए निळा शर्ट वाला आपला" "लाल छडी आपल्याकडे" एकदा शिवाजीनगर ला एक खेड्यातला माणूस आपल्या सुस्वरूप तरुण मुलीबरोबर आला होता. दोन चार रिक्षावाले उभे होते. त्यातला एक मुद्दामून "चला, मामा सोडू का कुठे?" आणि मग खिदळत एकमेकांना टाळी. एकदा मुसळधार पावसात एयरपोर्ट ला एक रिक्षावाला घरी सोडायला तयार नव्हता. शेवटी एका मित्राला बोलावून येरवडा ला सोडायला लावलं आणि मग तिथून गेलो.

योग्य ते पैसे घ्या हो. नाही म्हणत नाही मी पण त्या पैशाचा योग्य मोबदला तर दया. आणि तसा दिला तर राजीखुशीने एक्स्ट्रा पैसे देतोच आम्ही. मग आता ओला कॅब  किंवा मेरु आली कि कसली पळता भुई थोडी झाली. लहान पोरासारखं रडता आहात आता. यांना धंदा करू नका देऊ म्हणून, त्यांच्या ड्रायवर लोकांना मारता. अरे काय राव. दम असेल तर करा कि दोन हात इमानऐतबारे.

या देशात मुळातच पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही आहे. अन त्यामुळे तुम्ही धंदा करू शकता. तुमच्या इतक्या वर्षीच्या बेदरकार स्वभावामुळे आता तुमच्या धंद्यावर आच आली आहे.

पब्लिक ट्रान्स पोर्ट बद्दल सुंदर वाक्य आहे "विकसित देश तो नाही कि जिथे गरीब लोक कार घेण्याचं स्वप्न बघतात तर विकसित देश तो आहे जिथे श्रीमंत लोक फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करतात"

विचार करा, हे असं होईल तेव्हा काय होईल ते. देव तुम्हाला सद्बुद्धि देवो. अजून काय लिहू.

No comments:

Post a Comment