Thursday 23 April 2015

काय करणार मग

आतापर्यंतच्या आयुष्यात मला ५-६ जण असे मित्र मैत्रिणी भेटले की जे कारण नसताना माझा अपमान करत असतात. म्हणजे मी त्यांच्या अध्यात नसतो, मध्यात हि नसतो. जो काही माझा आणि त्यांच्यातला संवाद असतो तो, मग ती टिंगल टवाळी असो, कि एखाद्या सिरियस विषयावर डिस्कशन असो, माझ्यातर्फे त्या व्यक्तीचा आब राखून आणि त्याच्या माझ्या मैत्रीची योग्य ती जाण ठेवून होत असतो. अर्थात असा माझा समज आहे.  ह्यातील काही समवयीन आहेत, काही मोठे आहेत, काही वयाने लहानही आहेत. समवयीन मित्रांना "छोड दो, दोस्त हि तो है" तर मोठ्यांना "जाऊ दे बा, वयाने मोठे आहेत" तर लहानांना "जाऊ दे चल, लहान आहे अजून माझ्यापेक्षा" असं म्हणून मी माझ्यापुरता तो विषय बंद करतो. अर्थात संवाद चालू राहतो. पण त्यात मजा नसते, आपुलकी नसते. त्या मित्रांना हि जाणवतं ते. मग ते मधेच कधीतरी मऊसुत बोलतात कि मी हि झालेला अपमान विसरून जातो आणि मैत्रीचा झरा परत खळाळत राहतो.

पण हे असं पुन्हा पुन्हा होत राहतं.

साधारण पणे माझ्या मनाच्या हंडयात एका मित्राने केलेले २५ एक अपमान मावू शकतात. ते झाले कि मग मात्र मी त्या व्यक्तीला फाट्यावर मारतो.

अर्थात मी त्यांच्याशी बोलणं थांबवत नाही. म्हणजे  त्यांना हाकलून देत नाही तर मीच त्यांच्यापासून दूर पळून जातो. अगदी कोसो दूर. कधीही आता ते मला भेटू नयेत हि इच्छा ठेवून. आता त्या व्यक्तीची आठवण माझ्या मनात एक मानवी पुतळा म्हणून राहते. ममता, प्रेम, मैत्री, आदर, जिव्हाळा या भावना आटून गेलेल्या असतात. कधी चुकून माकून समोर आलेच तर हाय- Hello, तोंड देखलं हसू अगदी बेमालूम पणे करतो. मादाम तुसाद मध्ये कसं आपण एखाद्या पुतळ्याशेजारी उसनं हसू आणत उभं राहतो तसंच.

माझ्या तोंडावर हसू असलं तरीही मी मनातून त्या माणसाला फाट्यावर च मारलेले असते.

काय करणार मग  

No comments:

Post a Comment