Tuesday 20 February 2024

महाराष्ट्र देशा

 बरेच दिवसांपासून लिहावंसं वाटत होतं, पण मग वाटायचं जाऊ द्या, कशाला लिहायचं आणि मुख्य म्हणजे लिहून काही फायदा होणार आहे का, की नुसतंच वांझोटे रडगाणे होणार आहे. पण आता जेव्हा दुसऱ्या राज्यात माझ्या महाराष्ट्राची इज्जत निघाली तेव्हा मग वाटलं की भडास काढून टाकावी. 

तर समस्त महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनो, तुम्ही हा जो खेळ लावला आहे ना या राज्यात, त्याला थांबवा यार. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपल्या राज्याची जनता भरडली जात आहे. 

एक काळ होता, महाराष्ट्रात राहतो आहे हे म्हंटल्यावर समोरचा माणूस आदराने बघायचा. इतकंच नाही, तर माझा एक मित्र हेमंत गुजरात मधून काही वर्षांपूर्वी पुण्यातील कंपनीत जॉब करण्यासाठी आला. तेव्हा हेमंत म्हणाला "काय टॅलेंटेड लोक आहेत राव इथे आणि कसली कष्टाळू". अशा हुशार आणि कष्ट करणाऱ्या राज्यात खरंतर किती औद्योगिक प्रोजेक्ट्स यायला हवे होते? पण जरा स्क्रोल करा आणि सांगा की ज्यामुळे रोजगार निर्मिती असे किती प्रोजेक्ट गेल्या काही वर्षात आले. ज्या टाटा ने जमशेदपूरला आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि नंतरचा मोठा प्लांट पुण्यात टाकला त्या टाटाने आपले सर्व एक्स्पान्शन प्लॅन्स महाराष्ट्राबाहेर केले आहेत. टाटा नॅनो आली तेव्हा ते सिंगूरला गेले. तिथे ममता बॅनर्जीने वाटाण्याच्या अक्षता दिल्यावर चान्स होता की तो प्लांट महाराष्ट्रात येईल. पण तो गेला सानंद गुजरात मध्ये. आज त्याच सानंद मध्ये टाटा दिमाखात इ व्ही बनवत आहे. इतकंच नाही तर बाजूच्या फोर्डने गाशा गुंडाळल्यावर त्यांच्या साडे चारशे एकर पैकी ३०० एकर टाटा ने जागा घेतली आणि भविष्यातील इ व्ही सेक्टर मधील मोठी फॅसिलिटी बनवत आहे. मिहान मध्ये टाटा एरोस्पेस ची फॅक्टरी असताना सुद्धा टाटा एअरबस प्रोजेक्ट वडोदराला गेला. 

ज्या मुंबईवर डॅनिश इंजिनियर हालसेक लार्सन आणि सोरेन टुब्रो तीसच्या दशकात फिदा झाले होते आणि त्यांनी एक प्रचंड व्यावसायिक लार्सन अँड टुब्रो वसवली आणि फुलवली, त्या एल अँड टी ने सगळे मोठे प्रोजेक्ट्स महाराष्ट्राबाहेर नेले. आज हझिरा मधील एल अँड टी ची एस्टॅब्लिशमेंट बघितली तर डोळे दिपतात. बाकी सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांनी बंगलोर आणि चेन्नई मध्ये केली. 

धीरूभाईंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत केली आणि पाताळगंगा मध्ये प्लांट टाकला. पण जिथं मोठ्या स्केल मध्ये रोजगारनिर्मिंती होते त्यातील एक प्लांट आला हाझीरा मध्ये तर दुसरा जामनगर मध्ये. 

एरोस्पेस या सनराईज इंडस्ट्री मधील सारे प्लांट्स हे हैद्राबाद, बेळगाव, कोलार, बंगलोर या एरियात येत आहेत. 

मोबाईल उत्पादक फॉक्सकॉन तळेगाव मध्ये प्लांट टाकणार, २५००० कोटी रुपयाची गुंतवणूक होणार अशी वाजतगाजत घोषणा केली गेली. पण आपल्या राजकारणाच्या नाकाखालून ती होसूर ला गेली, इतकेच नव्हे तर फॉक्सकॉन बरोबर टाटा इलेक्ट्रॉनिक्स, रायझिंग स्टार, सालकॉम्प, डिक्सन टेक्नॉलॉजीज, विस्ट्रॉनअसे अनेक मोबाईल उत्पादक नुसते आलेच नाहीत तर पी एल आय स्कीम खाली मोबाईलचं दणकावुन उत्पादन चालू झालं पण. लाखो लोकांना रोजगार मिळाला. किया मोटर्स चा प्लांट अनंतपूर जवळ तर ओला, एथर चे अनुक्रमे बंगलोर आणि होसूर मध्ये. रेल्वे मध्ये इतकं प्रचंड काम चालू आहे. लातूर मध्ये एक प्लांट आल्याचं ऐकवात आहे, वंदे भारत साठी पण बाकी सगळी डेव्हलपमेंट दुसऱ्या अनेक राज्यात. वरती उल्लेख केलेल्या तळेगाव मध्ये जनरल मोटर्स बंद पडून दोन वर्षे झाली आहेत आणि मोठा प्लॅन घेऊन जीएम टेकओव्हर केलेल्या ह्युंदाई अनेक अडचणी फेस करत आहे. 

महाराष्ट्रातील जनतेला आणि पर्यायाने राजकारण्यांना कळत नाही आहे की आपली प्रॉडक्टिव्ह विचारधारा ही अत्यंत अन प्रॉडक्टिव्ह कामात, विचारात अडकवली जात आहे. गावांची नावं बदलायची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती अहमदाबाद पासून, पण तिथं आय आय टी, आय आय एम आणली जाते, मारुती सुझुकीचा, होंडा मोटारसायकल चा प्लांट आणला जातो, तिथं भौतिक आणि बौद्धिक संपदेची निर्मिती केली जाते आणि आम्ही एकेकाळचे उद्यमशील लोक गावाचे नाव बदलले म्हणून म्हणून खोट्या आनंदात मश्गुल तर होतोच, वर परत दुसरे सरकार त्या नावाचं एक्स्टेंशन करून पाठ थोपटून घेतं. बिहारमधील औरंगाबाद त्यांच्या खिजगणतीत नसतं पण उस्मानाबाद बरोबर ध्यानात राहतं. जिथला राजकीय नेता पॉवरफुल तिथं सगळ्या सोयी. अरे, ज्या पुण्यातून राज्यात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू तयार होतो तिथली मेट्रो वर्षानुवर्षे होत नाही आणि जिथं फक्त थोडाफार ट्रेड होतो तिथली मेट्रो चार वर्षांपूर्वी तयार पण होते अन बिन प्रवाशाची धावत असते. त्याच पुण्याच्या विमानतळाची गेले दीड दशक चर्चा चालू आहे, तितक्या वेळात बंगलोर चं अद्यावत विमानतळ तर झालंच परत वर दुसरं टर्मिनल कार्यन्वित झालं. खेड एस इ झेड सारखा एखाद दुसरा प्रोजेक्ट सोडला तर फार काही इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन काम करताना दिसत नाही आणि बंगलोर जवळ तुमकूर इथे  इंडस्ट्रियल मशीन टूल पार्क, जापनीज इंडस्ट्रियल पार्क ची जवळपास बाराशे एकराची डेव्हलपमेंट चालू आहे.  

रस्त्याबाबत तर वाईट वाटतं. एक काळ होता महाराष्ट्रातील रस्ते सगळ्यात भारी होते. आता त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती आहे. 

राजकीय परिस्थिती तर सगळ्याच राज्याची बेकार आहे हो. पण आपल्या राजकारणी लोकांनी जी वाट लावून ठेवली आहे ती हास्यास्पद आहे. त्याचा राग येत नाही, लाज वाटते. आणि याला एकच राजकीय पक्ष किंवा आजच्याच काळातील राजकीय नेते कारणीभूत आहेत असं नाही आहे तर याचं डिग्रेडेशन गेले दोन अडीच दशकांपासून चालू आहे. संकुचित मनोवृत्ती, भ्रष्टाचार, जातीय दलदलीत खोलवर बुडालेली आपल्यातूनच निवडून आलेली  नेते मंडळी,  या सगळ्यांच्या तालावर नाचणारी भोंगळ नोकरशाही, या सर्वांच्या मनमानी कारभाराचं जोखड वागवणारी, जातीय आणि धार्मिक भावना अणकुचीदार झालेली आम्ही जनता असा काहीतरी विचित्र प्रकार आपल्या आवडत्या महाराष्ट्राच्या नशिबी आला आहे.  

वेळ अजूनही गेली नाही आहे. आजही जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त काँट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे, सगळ्यात जास्त जि एस टी महाराष्ट्रातून गोळा केला जातो. स्वतःच्या भौतिक, अभौतिक, सांपत्तिक प्रगतीबद्दल उदासीनता आपल्या कामातून झिडकारली तर पुन्हा एकदा देशगौरवासाठी असं अभिमानास्पद काम इथे घडेल की या मंगल आणि पवित्र महाराष्ट्र देशा प्रति नतमस्तक राहू, त्याला प्रणाम करू अशी आशा तर नक्कीच ठेवू शकतो. 

No comments:

Post a Comment