Saturday, 30 January 2021

Be an employee.....be an employer.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाला समाधानी कधी वाटू शकतं?

आत्मसमाधानी वाटण्याच्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे तब्येत चांगली असणे आणि दुसरं म्हणजे एखाद्या नोबल कामातून आत्मिक समाधान मिळणे. 

फिजिकल आरोग्य चांगलं असेल तर प्रत्येकाला भारी वाटतंच. (इथे अजून एक गंमत आहे. चांगल्या तब्येतीचं महत्व आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आजाराला सामोरे जाऊन बरे झालो असतो. माझ्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य चांगलं असणं काय याची मला जाणीव आहे). गल्लत होते ती अर्थपूर्ण काम समजून घेण्यात. अर्थपूर्ण काम म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्यातून अर्थार्जन होतं ते. ज्यातून अर्थार्जन होतं ती म्हणजे नोकरी. नोबल काम करणे आणि नोकरी करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. किंवा स्वर्ग आणि नरकाचा फरक आहे असं म्हणू यात. त्यामुळेच कदाचित नोकरी करणे हे कंटाळवाणे काम होऊ शकते. 

एखादं अर्थपूर्ण किंवा नोबल काम करणे म्हणजे नोकरी करणे असं नसतं. झोकून काम केलं तर ते आपल्याला उत्साहित करतं, आणि नोकरी समजून काम केलं तर ते निरुत्साही करतं. अर्थपूर्ण काम करण्यासाठी तन आणि मनाने झोकून द्यावं लागतं, नोकरी मध्ये मात्र आपण धनाची अपेक्षा करत असतो. एखादं मिनिंगफ़ुल काम करताना त्याचा ताण जाणवत नाही, नोकरी म्हणून काही काम केलं तर आपण प्रचंड तणावात असतो. म्ह्णून नोकरी करणारे लोक वीक एन्ड कधी होतो याची वाट पाहत असतात आणि सोमवारी त्यांना कामावर जाण्यासाठी पायांना ओढावं लागतं. काम एन्जॉय करणारे लोक सोमवारी सकाळी उत्साहाने मुसमुसत असतात. नोकरी करणे ही आर्थिक गरज आहे पण अर्थपूर्ण काम हे उदात्त उद्देशातून केलं जातं. 

नीतिमूल्याना जागत जेव्हा कुणी काम करण्याची वृत्ती ठेवते, ती व्यक्ती आयुष्याच्या शेवटापर्यंत निवृत्त होत नाहीत. (उदा: ए पी जे अब्दुल कलाम, नुकतेच ८२ व्या वर्षी निर्वतलेले प्रगती ऍटोमेशन चे साठे सर, किंवा नव्वदाव्या वर्षी निधन पावलेले एन आर बी कंपनीचे चेअरमन त्रिलोचनसिंग सहानी). नोकरी तुम्हाला श्रीमंत करेलही  पण अर्थपूर्ण काम हे तुमचं आयुष्य संपन्न करतं. 

मी नोकरी करू नका असं म्हणत नाही आहे पण ती नोकरी नीतिमूल्यांना जागत, अर्थपूर्ण पद्धतीने केली तर आकाशाला कवेत घेण्याची ताकद तुमच्यात येईल आणि मग कदाचित नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला निरुत्साही वाटणार नाही. त्यामुळे नोकरी बदलताना पे राईज घ्या पण त्यापेक्षा जास्त महत्व तुमच्या नीतिमूल्यांचा, मूळ सिद्धांताचा मुक्तहस्ते वापर करण्याची तुम्हाला मुभा मिळणार आहे का याबद्दल शोध घ्या असं माझं नम्र आवाहन आहे. 

Be an employee.....be an employer. 

(पॅशन या शब्दाबद्दल बरेच गैरसमज आहेत. काम इतकं झोकून करायचं की त्यातून मिळणाऱ्या रिटर्न्स चा ही विसर पडावा. जगातील सगळी अचाट कामं हे पॅशन, काम झोकून देणं, या वृत्तीतून झाली आहेत)


 

 

Sunday, 24 January 2021

वसुधैव कुटुंबकम"

गेल्या दहा महिन्यातील उलथापालथ अभूतपूर्व आहे. मार्च २०२० मध्ये न्यूयॉर्क मधील एका मासिकाने भारतात करोनमुळे भयानक परिस्थिती निर्माण होईल असे भविष्य वर्तवले होते. त्यांनतर चारच महिन्यात बोस्टन मध्ये भारताच्या करोना परिस्थिती हाताळण्यावर मानवीय अपयश असे संबोधले गेले. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेत वैज्ञानिक भारताला करोनाचं गांभीर्य कळलं नाही असा आरोप करत होते. लगोलग बीबीसी ने बातमी दिली की दिल्लीतील करोना व्हायरस ची परिस्थिती भयावह आहे. तेरा महिन्यापूर्वी वुहानमध्ये करोना व्हायरस चा उदय झाला हे सर्वज्ञात आहे. आणि एक वर्षापूर्वी चीन बाहेरील देशात पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला. भारतातील पहिला रुग्ण २९ जानेवारीला केरळ मध्ये सापडला जी वुहान मधून परतलेली मेडिकलची विद्यार्थिनी होती. 

आज परिस्थिती अशी झाली आहे की इंग्लंड मध्ये दररोज पंधराशेवर लोक करोनमुळे बळी पडत आहेत. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये रुग्णालयांना युद्धभूमीचं रूप आलं आहे. रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. अमेरिकेत जवळपास अडीच कोटी लोक करोनाबाधित झाले आहेत जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ८% तर जागतिक रुग्णसंख्येच्या तब्बल २५% आहे. अमेरिकेत अनेक राज्यातील हॉस्पिटलवर प्रचंड वैद्यकीय भार आहे. कॅलिफोर्निया हे करोनाचे नवीन केंद्र बनले आहे. एकुणात प्रगतीशील अशा पाश्चात्य देशात परिस्थितीवर नियंत्रण अजून दृष्टीक्षेपात नाही आहे. 

आशियाचा विचार केला तर सगळ्यात जास्त त्रास भारताला झाला. त्यामागील कारणे अनेक आहेत. त्या पार्शवभूमीवर आज भारताचा विचार केला तर दररोजची रुग्णसंख्या ही एक लाखांपासून आता दहा हजाराच्या घरात आहे. आणि मुळात एकूण पीडित रुग्णांची संख्या दोन लाखाच्या आत आहे. हे सगळं घडत असताना भारताने लसीकरण प्रकल्पात विस्मयकारी गती पकडली आहेत. भारतातील १३० कोटी लोकांना लशीकरण करायचा मानस असणाऱ्या भारतात पंधरा लाखावर लोकांना लस टोचण्यात आली आहे. जुलै २०२१ पर्यंत भारतातील ३० कोटी लोकांना लस दिली जाईल असा अंदाज आहे. जवळपास २ लाख लोकांना लस देण्याचं प्रशिक्षण आतापर्यंत देण्यात आलं आहे. भारतात जवळपास २९००० शीतकरण सेंटर्स उभारले गेले आहेत जिथं लस स्टोअर करता येतील. 

या पलीकडे जाऊन जगाला आश्चर्य वाटेल अशी मदत भारताने अनेक देशांना केली आहे. मग कुणी त्याला वॅक्सीन डिप्लोमसी म्हणोत वा कुणी राजकारण पाहोत. पण वस्तुस्थिती आहे की भारताने भूतानला दीड लाख, एक लाख कोविशील्ड डोस मालदीव ला, दहा लाख लशी नेपाळला, आणि कहर म्हणजे ज्या बांग्ला देशाने सतत भारताला त्रास दिला तिथे तब्बल वीस लाख डोसेस पाठवले, रोहिंग्यांचा प्रश्न ज्या म्यानमार मुळे उभा झाला तिथे पंधरा लाख लशी, तसेच सेशल्स आणि मॉरिशस ला भारताने लशी पाठवल्या. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि आफ्रिकेतील मोरोक्को मध्ये मेड  इन इंडिया लशी पोहचल्या. यातील काही व्यापारी तत्वावर तर गरीब देशांना मदत म्हणून पाठवल्या गेल्या. श्रीलंका आणि अफगाणिस्तानला काही दिवसात लस पोहोचवली जाईल. जगभरात एक  कोटी लस पाठवण्याचा मानस आहे ज्यायोगे या देशात करोनाविरुद्ध लढणाऱ्या अनेक लोकांना लस देण्यात येईल. 

भारतातील परिस्थिती वर नियंत्रण मिळवताना भारताने इतर देशाला केलेली मदत अद्भुत आहे. सार्क देशाशिवाय इतर अनेक खंडातील देशांना भारताने वॅक्सीन पुरवले आहे. काही देशाचे प्रीमियर भारताला दुवा देत आहेत तर काही लस पुरवण्याचं आवाहन करत आहेत. याची काही कारणं आहेत, एक तर त्यांची किंमत स्वस्त आहे. ३० डॉलर प्रति डोस अमेरिकन कंपनीची किंमत आहेत तर रशियन वा युरोपियन डोस ची किंमत १० डॉलर आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिरम वा भारत बायोटेक लसीची किंमत ६ डॉलर आहे. इतर वेळेस भारतीय फार्मा उत्पदकांच्या नावाने शिमगा करणाऱ्या पाश्चात्य देशांना अचानक भारतातील फार्मा उत्पादन जागतिक दर्जाचं असण्याचा साक्षात्कार झाला आहे. सिरम, भारत बायोटेक, सिप्ला, डॉ रेडीज,  कॅडीला, पॅनिशिया बायोटेक, सिंजेन, इंटास, वोखार्ड या जगासाठी लस उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या आहेत. आजमितीला जगातील एकूण लसींपैकी ५०% लशी भारतात तयार होतात असा अंदाज आहे. या सगळ्यात पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ही या उद्योगातील शिरोमणी आहे हे निःसंशय. वर्षाकाठी दीडशे कोटी विविध लस  बनवणारी ही कंपनी जगात या क्षेत्रात नंबर एकला आहे. 

भारताची ही कोविड डिप्लोमसी मुळे देशाची प्रतिमा उजळणार यात शंका नाही. जगभरातल्या उद्योजकांनी भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. करोनामुळे ज्या बिल गेट्स वर अश्लाघ्य आरोप करण्यात आले ते त्यांनी ट्विट केलं "“It’s great to see India’s leadership in scientific innovation and vaccine manufacturing capability as the world works to end the COVID-19 pandemic.” ज्यांचं वक्तव्य नेहमी वादग्रस्त होतं ते who चे प्रेसिडेंट म्हणाले 'Thank you India and PM Narendra Modi for your continued support to the global COVID-19 response. only if we #ACTogether, including sharing of knowledge, can we stop this virus and save lives and livelihoods." भूतानचे, मालदीवचे, वर्षांपूर्वी ज्याने भारताची खोडी काढली त्या नेपाळचे, बांगला देशाचे, प्रेसिडेंट भारताची स्तुती करताना थकत नाही आहेत. भारताशिवाय जगात पुरेसे वॅक्सीन तयार होणे हे केवळ अशक्यप्राय आहे, हे पीटर पियॉट, जे लंडन स्कुल ऑफ हायजिनचे प्रमुख आहेत,  यांचं वक्तव्य भारताचं काँट्रीब्युशन अधोरेखित करण्यात पुरेसं आहे. 

ज्या देशात या व्हायरस चा जन्म झाला त्या चीनच्या वागण्याच्या पार्श्वभूमीवर भारताचं वागणं हे नक्कीच मानवी मूल्यांचा अंगीकार करणारं आहे यात शंका नाही. जगाला संकटाच्या खाईत लोटून स्वतः नामानिराळे राहण्याचा आणि त्यावर काही देशांना वॅक्सीन पुरवताना आर्थिक गळा घोटण्याचा चीनचा पवित्रा हा भारताच्या पथ्यावर पडला आहे. या सगळ्यांचा परिपाक म्हणून भारतीय उद्योगजगताला न भूतो न भविष्यती अशा संधी उपलब्ध होत आहेत. फार्मा व्यतिरिक्त मशीन टूल, ऑटोमोबाईल, हेवी इंडस्ट्रीज या सगळ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ट्रॅक्टर प्रोडक्शन जोमात चालू आहे. दरवर्षी शेअर मार्केट घोडदौड करू लागलं की  तो बबल आहे, कधीतरी फुटेल अशा वावड्या उठत असतात. यावर्षीही उठल्या. पण ही तेजी भविष्यातील भारताला उत्पादन क्षेत्रातील संधी यास अनुसरून असावी असा एक अंदाज आहे. एक दोन महिने सोडता, पुढील किमान एक वर्ष मार्केट तेजीत राहील असा अंदाज वर्तवण्यात काही धोका नसावा. 

फक्त या करोनाने परत आता डोकं वर काढायला नको...... बास 


(इंटरनेट वरील काही बातम्या तसेच व्हिडीओ वर आधारित)






जॅक मा

 जागतिक पटलावर करोना लस आणि अमेरिकेची निवडणुकीची धामधूम याची घमासान चर्चा चालू असताना अजून एका बातमीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे जॅक मा हे गेले दोन अडीच महिन्यापासून विजनवासात आहेत. त्यांना कदाचित तुरुंगात टाकलं असेल किंवा त्यांना चायनीज शासनाने आयुष्यातून संपवलं असेल अशा विविध बातम्या सोशल मीडिया च्या पटलावर चर्चिल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आणि अनेक गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. अलीबाबा चा शेअर ८% ने हॉंगकॉंगच्या मार्केट मध्ये वरच्या बाजूला उडी घेतली. 

जॅक मा यांची कहाणी एक दंतकथा बनावी इतकी उत्कंठावर्धक आहे. भांडवलशाहीचे माहेरघर असणाऱ्या अमेरिकेत ऍमेझॉन चे जेफ बेझॉ, मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स, ऍपल चे स्टीव्ह जॉब्ज, किंवा ज्यांच्या नावाचा सध्या बोलबाला आहे ते एलोन मस्क यांच्या कहाण्या सांगितल्या जातात पण साम्यवादाची पोलादी पकड असलेल्या चीन मध्ये जॅक मा यांचा उदय आणि नंतरच्या काळात त्यांनी मिळवलेलं स्थान हे विस्मयचकित करणारं आहे यात शंका नाही. 

१९६४ साली संगीत शिक्षित दांपत्याच्या पोटी जॅक मा यांचा जन्म झाला. हँगझाऊ या गावात. त्यांचं चायनीज नाव मा युन.  या काळात चीनमध्ये इंग्रजी चं वारं गंधाला पण नव्हतं त्या काळात जॅकला इंग्रजी भाषेची आवड कुठून आणि कशी निर्माण झाली हे एक कोडंच आहे. आपलं इंग्रजी सुधारावं या उद्देशानं जॅक लहानपणी दररोज एका हॉटेल च्या बाहेर उभा राहायचा. सौदा सोपा असायचा. तिथं येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जॅक टूर गाईड म्हणून फिरवायचा आणि त्याबदलात पर्यटकांकडून इंग्रजी शिकायचा. त्यातल्या एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्त्याने त्याचं जॅक हे नामकरण केलं. शालेय शिक्षण संपल्यावर कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठाने त्यांना प्रवेश नाकारला कारण त्यांचा गणित हा विषय कच्चा होता आणि त्यात ते दोनवेळा अनुत्तीर्ण व्हायचे. शेवटी कसेबसे ३८% मार्क्स गुणांनी पास झाल्यावर जॅकने कमी प्रसिद्ध असणाऱ्या शिक्षकांच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. आणि १९८८ मध्ये ते इंग्रजी विषय घेऊन बी ए पस झाले. बी ए इंग्रजी झालेल्या जॅक ला शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून नोकरी लागली. तो पर्यंत जॅकने असंख्य वेळा अपयशाचा सामना केला. कित्येक इयत्तेत ते अनुत्तीर्ण झाले, अनेक विद्यापीठांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि असंख्य वेळा नोकरीसाठी मुलाखतीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यात अगदी के एफ सी किंवा लोकल पोलीस डिपार्टमेंट चा समावेश होतो. पुढील पंचवीस वर्षाच्या काळात अक्षरश: करोडो लोकांसाठी रोजगार निर्माण केला आणि जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठांनी त्यांना डी लिट पदवी प्रदान केली हा त्यांच्याच भूतकाळाबरोबर झालेला काव्यगत न्याय होता. 

 

इंग्रजी शिक्षकांची नोकरी करण्याबरोबर ते मँडरिन भाषेचं इंग्रजी भाषांतर करू लागले. आणि त्याचा साईड व्यवसाय चालू केला. १९९५ साली याच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना अमेरिकेला जायची संधी मिळाली आणि तिथं त्यांना इंटरनेट या त्याकाळी नवीनच प्रचलित झालेल्या माहितीच्या महासागराची ओळख झाली. तरुण जॅक ला लक्षात आलं की चीन मध्ये इंटरनेट चा गंध पण नाही आहे. आणि हा सगळा प्रकार चीनमध्ये रुजवायचा या कल्पनेनं जॅक च्या मनात ठिणगी पेटवली. पुढं या ठिणगीचं रूपांतर दिव्यात आणि मग मशालीत झालं हे सर्वज्ञात आहे. कदाचित एक लक्षात येईल की चीनमध्ये इंटरनेट चा उदय भारताच्या मानाने जरा उशीराच झाला. पण पुढे चीन ने केलेली प्रगती ही आश्चर्यचकित करणारी आहे. 

नव्वदीत जे उद्योगक्षेत्रात कार्यरत होते त्यांना येलो पेजेस हा प्रकार आठवत असेल. टाटा येलो पेजेस तसं अगदी जिल्ह्यावार त्या काळात वेगवेगळ्या कंपन्यांचे येलो पेजेस हे त्या काळात प्रचलित होते, त्याच धर्तीवर जॅक मा यांनी चायना येलो पेजेस नावाचा व्यवसाय चालू केला आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले. अर्थात हे सगळं करत असताना इंटरनेट नावाचं भूत त्यांच्या डोक्यातून काही जात नव्हतं. त्या काळात या सद्गृहस्थाने त्याच्या गावी हॅन्गझाऊ या गावात मोजक्या व्यावसायिकांना वेबसाईटचं महत्व पटवून दिलं. ते स्वतः या व्यवसायांची माहिती गोळा करायचे आणि इंग्रजीत भाषांतर करून त्यांच्या अमेरिकेतील मित्रांना पाठवायचे. तिथून मग त्या व्यवसायांची वेबसाईट बनवून ते त्या व्यावसायिकांना दाखवायचे. जॅक यांचा या कल्पनेवर इतका दृढ विश्वास होता की हा अत्यंत नवखा प्रकार त्यांनी स्वतःच्या सेल्स स्किल वर त्या गावात विकला आणि स्वतःचं एक छोटं व्यवसायाचं बीज रोवलं. 

हे सगळं करत असताना १९९९ साल उजाडलं आणि गणित, संगणक प्रणालीचे बेसिक ज्ञान नसणाऱ्या जॅक मा यांनी आपल्या सतरा मित्रांना त्यांच्या उद्योगाच्या कल्पनेत उडी मारायला प्रवृत्त केलं आणि त्याच साली मग अलीबाबा या अजूबा व्यवसायाचा उदय झाला. जॅकच्या छोट्या घरात या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जॅक स्वतः या कल्पनेबद्दल इतके दृढ होते की पुढे अलीबाबा चा गौरवशाली इतिहास लिहिता यावा म्हणून त्यांनी या प्रसंगाचे फोटो त्याच वेळी काढून ठेवले. त्यांचा आत्मविश्वास इतका पराकोटीचा होता की काही महिन्यात एका चायनीज पत्रकाराने त्यांचा व्यवसाय कव्हर केला तेव्हा त्यांनी पत्रकाराला सांगितलं की अलीबाबा ही चीनमध्येच नाही तर जगात प्रथम क्रमांकाची कंपनी बनेल. पुढील अनेक वर्षात त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं, जगभरात प्रसिद्ध असलेल्या अलीबाबा आणि चाळीस चोर या अरेबिक कहाणीतील अलीबाबाला जसा गुहेतील खजिना मिळतो त्याच प्रमाणे माहितीच्या खजिन्यावर एक महाकाय व्यवसाय उभ्या करणाऱ्या जॅक मा यांचं वेगळेपण अलीबाबा या नावापासून दिसून येतं. 

अनेक यशस्वी उद्योगांची सुरुवात ही अंतःप्रेरणेतून झालेली आहे हे एव्हाना सर्वज्ञात आहे. मग ते अमेझॉन असो वा फेसबुक, मायक्रोसॉफ्ट असो वा इ बे, या लोकांकडे अंकाच्या कसरती करणारे बिझिनेस प्लॅन नव्हते तर स्वतःच्या कल्पनेवर दृढ विश्वास होता. अलीबाबा सुद्धा त्याला काही अपवाद नाही. फक्त या विश्वासाच्या जोरावर जॅक मा यांनी गोल्डमन सॅश कडून ५० लाख अमेरिकन डॉलरची तर जपानच्या सॉफ्ट बँक कडून २ कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आणि मग कल्पक व्यवस्थापनेच्या जोरावर एका अद्भुत कंपनीचा जगड्व्याळ असा विस्तार केला. जॅक मा किंवा तत्कालीन साऱ्या उद्योजकांची कहाणी ऐकल्यावर एक गोष्ट पक्की होते की व्यावसायिक शहाणपण हे अनुभवातून येतं पण त्यासाठी सतत पाठपुरावा आणि नाविन्याची आस हा स्वभावाचा स्थायीभाव असायला हवा. 

याच अंगभूत गुणांच्या जोरावर बी टू बी बिझिनेस मॉडेल असणाऱ्या अलीबाबा शिवाय बी टू  सी असा इ कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओ या कंपनीच्या रूपात जॅक मा यांनी चीन मध्ये रुजवला. चायनीज समाजाची आणि शासकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या जॅक यांचा झंझावात इतका जोरात होता की त्यांच्या पेक्षा कित्येक पट ताकदवर असणाऱ्या इ बे ला चीन मधून आपला गाशा गुंडाळावा लागला. लागोलाग जॅक यांनी अली पे नावाने इ पेमेंट कंपनी चालू केली. 

२०१४ साली अलीबाबा ने इतिहास घडवला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज न भूतो न भविष्यती असा २५०० कोटी अमेरिकन डॉलर्स चा आयपीओ काढला आणि गुंतवणूकदारांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ६८डॉलर प्रति शेअर असा त्याला भाव आला आणि जॅक मा जगातल्या पहिल्या वीस श्रीमंत व्यक्तीच्या पंगतीत गेले. (२०१९ साली सौदी अरामको या कंपनीने २९४० कोटी अमेरिकन डॉलर्सचा आयपीओ काढून जगातला सर्वात श्रीमंत आयपीओ चं बिरुद मिरवलं )

अलीबाबा आज जगातील अग्रगण्य कंपनीपैकी एक गणली जाते. चीन मध्ये इंटरनेट, इ कॉमर्स, इ पेमेंट या सर्व संज्ञेचे शिल्पकार जॅक मा आहेत यात शंका नाही. स्वतःला १००% मेड  इन चायना म्हणवणाऱ्या तसेच अनेक समाजोपयोगी योजना जॅक मा राबवतात. अत्यंत संवेदनशील मन असलेले जॅक आता स्वतःचा वेळ शिक्षण आणि हेल्दकेअर यासाठी व्यतीत करण्याचा मानस ठेवून आहेत. जगभरातील युवकांचे ते रोल मॉडेल आहेत. 

असं सगळं असलं तरीही चायनीज शासनाच्या मनात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. पण हे तेथील साम्यवादी परंपरेला धरून आहे. जॅक मा यांनी कायमच भांडवलशाहीचा पुरस्कार केला आहे. चीन ची नेत्रदीपक प्रगती सुद्धा भांडवलशाही ला अनुसरून झाली आहे. पण तेथील साम्यवादाची पोलादी पकड ही  इतर कुठल्याही इझम ला डोकं वर काढू देत नाही. त्याविरुद्ध जर कुणी आवाज उठवला अन तो कितीही सौम्य असला तरी तो चिरडला जातो हा चीनचा काळा इतिहास आहे. २४ ऑक्टोबर २०२० रोजी जॅक मा यांनी हलका आवाज उठवला, चीनच्या बँकिंग पद्धतीविषयी. ते फक्त म्हणाले की "चीनमधील बँक हे जुन्याकाळातील सावकारी सारखं काम करतात. काहीतरी तारण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाही. ही पद्धत बदलायला हवी. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक कल्पक प्रोजेक्ट उद्योजक प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत." 

इतर कुठल्याही देशात हे वाक्य ऐकून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या असत्या आणि प्रकरण थांबलं असतं. पण आडमुठ्या चीन शासनाला नाकापेक्षा मोती जड अशी जॅक मा वाटले आणि आर्थिक शिस्तीच्या नावाखाली जॅक मा यांना त्रास द्यायला सुरुवात झाली. अली पे या कंपनीची घोडदौड ही विस्मयकारी आहे. तब्बल शंभर कोटीपेक्षा लोक अली पे ऍप वापरतात आणि त्यापैकी जवळपास ७३ कोटी ग्राहक त्याचा सातत्याने वापर करत असतात. इतका मोठा ग्राहकांचा विश्वास संपादल्यावर जॅक मा यांनी याच क्षेत्रात पुढचं पाऊल टाकण्यासाठी अँट ग्रुप नावाने कंपनी बनवली आणि ती मायक्रो फायनान्स, इन्शुरन्स, वेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रात उडी मारेल असे ठरवले. आणि तब्बल ३७०० कोटी अमेरिकन डॉलर्स चा आयपीओ घोषित केला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो लिस्ट होणार त्याच्या दोन आठवडे आधी जॅक मा ते शासनाच्या दृष्टीने कुप्रसिद्ध वाक्य म्हणाले आणि फिनान्शियल रेग्युलेटरी बॉडी ने त्यांना समन्स धाडलं. आणि त्या चर्चेनंतर या आय पी ओ वर रोख आणला गेला. त्या दरवाजाआड काय बोलणी झाली हे बाहेरच्या जगाला कळणं केवळ दुरापास्त आहे. त्याबरोबर अलिबाबाची शेअर किंमत उतरंडीला लागली आणि दोन महिन्यात जॅक मा यांची संपत्ती ३०० कोटी अमेरिकन डॉलरने खालावली. त्यानंतर जॅक मा हे पूर्णपणे अज्ञातवासात गेले. त्यांचा विजनवास हा इतका कडक होता की  आफ्रिकन बिझिनेस टॅलेंट शो मध्ये जज म्हणून फायनल ला जॅक दिसलेच नाही तर त्यांनी पुरस्कृत केलेल्या या शोच्या जाहिरातीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं. अलीबाबा ची ती उतरंड थांबली गेल्या आठवड्यात जेव्हा जॅक मा हे एका व्हिडिओ द्वारे अवतीर्ण झाले. असं असलं तरीही त्यांच्या अस्तित्वाच्या शक्याशक्यतेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. २०१९ साली कुणी तरी भविष्य केलं होतं की एक तर जॅक मा यांना या पृथ्वीवरून नाहीसे केलं जाईल किंवा ते तुरुंगात तरी असतील. दुर्दैवाने हे भविष्य काही अंशी खरं ठरलंय. 

एक सजग वैश्विक नागरिक म्हणून आपण फक्त जॅक मा यांच्या सुरक्षिततेबद्दल आपल्या हातात फक्त प्रार्थना करू शकतो. पोलादी पकड असलेल्या निष्ठुर चीन शासनाच्या कानावर बाकी कुठलाही आवाज पोहोचणं हे निव्वळ अशक्य आहे. चीनच्या डोळे दिपवणाऱ्या परिस्थिती ला असणारी ही काळी किनार दिवसेंदिवस ठळक होत चालली आहे हे निःसंशय.

(लेख हा इंटरनेट वरील विविध साईटद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर लिहिला आहे)

 

 

 

 

 

 

Monday, 30 November 2020

शुभंकर क्षण

दिवस १: 

सुरेखा नर्सच्या इंटरव्ह्यू साठी आली. कामात परफेक्ट वाटत होती. इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलं की तिचा घटस्फोट झाला आहे. दोन लहान मुली आणि ती असे सगळे सुरेखाच्या आईवडिलांकडे राहतात. 


दिवस २: 

संगीता हॉस्पिटल मध्ये मावशीचं काम मागायला आली होती. लग्न झालं होतं. पण नवरा दुसऱ्या कुणा बाईचा हात पकडून चार वर्षांपूर्वी पळून गेला होता अन गेल्या चार वर्षात त्याने ने बायकोचं तोंड पाहिलं अन दोन लहान पोरीचं. अशिक्षित असल्यामुळे घटस्फोट वगैरे माहितीच नाही. आणि ही सगळी माहिती अगदी स्थितप्रज्ञपणे. कुठं आक्रस्ताळेपणा नाही, चिडचिड नाही.

आम्ही संगीताला विचारलं की पुण्यात राहते कुठे, तर ती म्हणाली सुरेखा कडे. आम्ही विचारलं, मग इथं आली कशी? तर म्हणे काका घेऊन आले, म्हणजे सुरेखाचे वडील. 

दिवस २, पुढचा सीन. 

तांबे साहेब, सुरेखाचे वडील केबिन मध्ये आले. वय ६०-६२ च्या आसपास. एका पायाला पोलिओ. 

सुरेखा आणि तिच्या दोन मुली तर सांभाळतात कारण सुरेखा तर त्यांची सख्खी मुलगी. 

संगीता त्यांच्या दुकानात कधी काळी हेल्पर म्हणून कामाला होती. अनेक वर्षे काम केलं. लग्न करून नवऱ्याबरोबर गेली, पण नवऱ्याने टाकली म्हणून मग तांबे साहेबानी तिला घरीच आसरा दिला. 

आम्ही विचारलं "सुरेखा, तिच्या दोन मुली. संगीता अन तिच्या दोन मुली. आणि तुम्ही श्री व सौ तांबे. आठ जण घरात. खर्च कसा भागवता?"

तर स्टोरी अशी की, श्री व सौ तांबेंचा दिवस पहाटे साडेतीन ला सुरु होतो. दररोजचं शंभर लिटर दूध विकतात. साडेसहा-सात पर्यंत काम संपतं. आणि मग नऊ वाजता दुकान. ते रात्री आठ वाजेपर्यंत. दररोज १७-१८ तास काम, साठीतले नवरा बायको करतात. 

हे सगळं सांगताना कुठला अभिनिवेश नाही, नशिबाला दूषणं नाही, विधात्याबद्दल तक्रार नाही. 

माझ्यासारखे लोक काही भौतिकते मध्ये आनंद शोधतात आणि देवाला धन्यवाद देतात. तांबे काका सारखे लोक हे मुळात जीवनाप्रति कृतज्ञ असतात आणि अभौतिक आनंदाचे निधान असतात. 

फाळणीकरांनी सुरेखा ला नर्स चं आणि संगीताला मावशीचं काम हॉस्पिटल मध्ये काम दिलं. आणि त्यांच्या चारही मुलींना आपलं घर मध्ये सामावून घेतलं. 

फाळणीकरांनी हा निर्णय मला सांगितला तो एक शुभंकर क्षण होता. 




 

Sunday, 25 October 2020

सुनील कानवडे

काही लोकांच्या शब्दकोशात "नाही" हा शब्दच नसतो. त्यांच्यासमोर आव्हान उभं करायचं, मग त्यासाठी नियतीची मदत घ्या की मानवनिर्मित असू द्या, त्याच्याशी दोन हात करायला माणूस सदैव तत्पर. अहमदनगरचे उद्योजक श्री सुनील कानवडे हे याच प्रकारात मोडणारे. 

बँक ऑफ बडोदा मध्ये सुनील चे वडील कर्मचारी आणि त्यांची पत्नी गृहिणी, अशा मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीलचा जन्म झाला. दहावी पर्यंतचे शिक्षण त्याचं अहमदनगर ला झालं. आणि त्यानंतर १९८३ साली तो शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे यांत्रिकी पदविका पूर्ण करण्यासाठी रुजू झाला. याच कॉलेज मध्ये मीही त्याचा सहाध्यायी होतो. पहिल्या वर्षापासूनच सुनीलने अभ्यासात सुनीलने आपली छाप पाडली. अर्थात तो अभ्यासही तुफान करायचा. १९८६ ला जेव्हा आम्ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा शेवटच्या वर्षी सुनील आमच्या वर्गात पहिला आला. का कुणास ठाऊक पण आम्हा औरंगाबादच्या मुलांना पश्चिम महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक मधील मुलांपेक्षा त्या काळात गुण कमी पडायचे. त्यामुळे प्रथम क्रमांक येऊनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्या काळात सुनीलला प्रवेश नाही मिळाला. आणि नुकत्याच चालू झालेल्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची सुनीलची इच्छा नव्हती. त्यामुळे सुनीलने सरळ बजाज ऑटो मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. १९८३ च्या सुमारास चालू झालेल्या बजाज ऑटो औरंगाबाद मध्ये अभियंत्याची गरज होती आणि आमच्या औरंगाबादच्या कॉलेज ची मोठी बॅच तिथे ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करू लागली. 

सुनीलच्या अंगभूत हुशारीला आता मेहनतीची जोड मिळाली आणि अगदी थोड्या काळात तो बजाज ऑटो मध्ये एक हुशार आणि डायनॅमिक मेंटेनन्स इंजिनियर म्हणून ओळखला जाऊ लागला. डिप्लोमा नंतर त्याला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला नव्हता हे सुनीलच्या मनात ठसठसत होतं. प्रचंड शारीरिक श्रम करणाऱ्या सुनीलने अजून कमर कसली आणि मग केवळ तीन वर्षात म्हणजे १९८९ साली त्याने एएमआयई ची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. कदाचित त्याच सुमारास त्याच्या मनात आपला उद्योग असावा असे विचार फेर घालू लागले होते. उद्योजक बनायचं असेल तर कॉमर्स चं ज्ञान हवं म्हणून मग एएमआयई बरोबर तो बीकॉम च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. बजाज ऑटो मध्ये सुनीलचा पोर्टफोलिओ हा मेन्टनन्स चा होता. मग त्यात अजून प्राविण्य मिळावं म्हणून म्हणून मग १९९२ साली त्याने मेंटेनन्स ची अभियांत्रिकी पदविका मिळवली. आणि १९९४ साली त्याने आपल्या शैक्षणिक पदव्या मध्ये एक मानाचा तुरा रोवला. त्यावर्षी त्याने डिझाईन हा अवघड विषय घेऊन एम टेक पूर्ण केलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं करत असताना त्याची बजाज ऑटो मधील कारकीर्द ही पूर्ण भरात होती. तिथे काम करताना त्याचं शिक्षण कधी आड येत नव्हतं. परीक्षा सोडल्या तर सुनील ने सुट्ट्या कधी घेतल्या नाहीत. 

बजाज ऑटो मध्ये काम करत असतानाच सुनील मधील उद्योजक हा सतत डोकं बाहेर काढत होता. १९९६ साली सुनील ने नोकरीचा राजीनामा दिला आणि श्रीराम उद्योगाची स्थापना केली. दहा वर्षे त्याने मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये जीवतोड मेहनत केली होती अन त्याचाच धागा पकडून सुनील मशीन शिफ्टिंग च्या व्यवसायाने आपल्या उद्योगविश्वाची मुहूर्तमेढ रोवली. हे काम तसं अवघड. वेगवेगळे रिसोर्सेस लागतात. शिवाय प्रचंड मेहनत. पण सुनील ने या क्षेत्रात एक विश्वासार्ह कंपनी म्हणून नाव कमावलं. पुढे हेच काम करताना त्याची एक्सईड बॅटरी त ओळख झाली आणि त्यांचे "लेड" मटेरियल मधून पार्टस बनवण्याची संधी सुनीलला मिळाली. 

आज जवळपास अडीच दशकांच्या अथक मेहनतीतून, आपल्या हुशारीच्या जोरावर श्रीराम उद्योगाचं रोपट्याने चांगलंच मूळ धरलं आहे. पुढे सुनीलने सिद्धी स्टॅम्पिंग, अस्पायर मोल्डिंग, सिद्धी इंडस्ट्रीज अशा उद्योगांची स्थापना केली आणि आज हे सर्व उद्योग यशस्वी रित्या घोडदौड करत आहेत. सिद्धी स्टॅम्पिंग मध्ये लार्सन अँड टुब्रो या प्रसिद्ध कंपनीच्या एका स्टार्टर चं कॉन्ट्रॅक्ट उत्पादन होतं. म्हणजे या कंपनीतच लार्सन अँड टुब्रो चा शिक्का बसून पॅकिंग होतं आणि ग्राहकाला सप्लाय केलं जातं. अस्पायर मध्ये स्पेशल टुलिंगची निर्मिती केली जाते. नुकताच सुनील ने प्रेशर कुकर बनवण्याचा एक प्रोजेक्ट जन्माला घातला आहे आणि ते प्रॉडक्ट लवकरच बाहेर पडेल. 

अशा धडपड्या सुनीलच्या उद्योजकतेचा कळसाध्याय मात्र या करोना काळात गाठला गेला. करोनाची साथ सुरु झाली आणि मार्च च्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधानांनी आवाहन केलं की मास्क जरूर वापरा आणि काही कारणाने तो उपलब्ध नसेल तर कमीत कमी "गमचा" (मोठा रुमाल) तरी वापरा. या आवाहनामागे असलेली कळकळ आणि संधी सुनील ने ताडली आणि त्याने मास्क बनवण्याची मशिनरी बसवून मास्क चं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. काम जोखमीचं होतं कारण करोना मुळे जगभर व्यवहार ठप्प होते आणि मशीन तर आयात करायची होती. आर्थिक गुंतवणूक होती. पण सुनील आपली सारी व्यावसायिक कौशल्ये वापरून त्या अवघड काळात वेगाने पहिली पूर्ण स्वयंचलित मास्क बनवण्याची लाईन विक्रमी वेळात टाकली आणि उच्च गुणवत्तेच्या मास्कची निर्मिती अहमदनगर मध्ये चालू झाली. इतकी वर्षे व्यवसायात असल्यामुळे सुनीलचे जगभरात ग्राहक आणि सप्लायर्स आहेत. त्याच नेटवर्किंग मधून त्याला मास्क निर्यात करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. आणि जेव्हा हे मास्क देशात आणि परदेशात अत्यंत वाजवी दरात पुरवू शकतो हे लक्षात आल्यावर सुनीलने लगेच उत्पादन वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. एका स्वयंचलित उत्पादन लाईनच्या पहिल्यांदा पाच आणि त्या पुढच्या दोन महिन्यात अजून पाच अशा एकूण अकरा मास्क उत्पादनाच्या स्वयंचलित लाईन्स चालू केल्या. आज अहमदनगर मध्ये सुनील कानवडे यांच्या फॅक्टरीत दिवसाला दहा लाख मास्क बनतात आणि त्या देशातल्या जनतेला करोनापासून दूर राहण्यासाठी मदत करतात. हे करत असतानाच निर्यातीमुळे परकीय चलन हे देशात येतं. 

आज सुनील कानवडे सारखे उद्योजक हे देशाच्या उत्पादन क्षेत्राचा महत्वाचा कणा आहे. सगळ्यात जास्त प्रगतीशील आणि रोजगार निर्माण तयार करणाऱ्या एसएमई क्षेत्राचा सुनील प्रतिनिधी आहे. अत्यंत कमी वेळात, ज्या प्रॉडक्ट बद्दल आधी काहीही माहिती नाही, त्याच्या उपयुक्ततेचा अभ्यास करून, मार्केट शोधून त्याच्या उत्पदनाचं तांत्रिकी ज्ञान मिळवून लोकोपयोगी असं मास्क सारखं प्रॉडक्ट बनवण्याच्या सुनील कानवडे च्या कल्पक उद्योजकतेला सलाम. 

 

 


Wednesday, 23 September 2020

भांडवल आणि नफ्याची सायकल

 या सर्व काळात एक मुद्दा फार चवीने चर्चिला जातो आणि तो म्हणजे इतके दिवस नफा कमावला तर आता कामगारांची काळजी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?

इथे तुम्हाला मी भांडवल आणि नफ्याची सायकल सांगतो. 

व्यवसाय करत असताना नफा साधारण एका टक्केवारीत होतो. हा नफा म्हणजे सगळे खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे. यात बिझिनेस ओनरचा पगार पण आला. हो, व्यवसायात असताना सुद्धा बिझिनेस ओनरने पगार घेणंच अपेक्षित असतं. 

आता हा जो नफा उरतो तो गुणोत्तर प्रमाणात खूप जास्त असेल तर बिझिनेस ओनर नफ्यातील काही भाग  डिव्हीडंड म्हणून पगाराव्यतिरिक्त घेऊ शकतो. उरलेला भाग हा बिझिनेस मध्येच रोल केला जातो, जो शक्यतो व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो. 

आता छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना हा डिव्हीडंड प्रकार व्यवसाय चालू केल्यावर अनेक वर्षे घेता येत नाही. कारण व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना पैसे व्यवसायातच ठेवावे लागतात. त्यामुळे व्यावसायिकांकडे आडमाप एक्सेस पैसे असतात ही अंधश्रद्धा आहे. 

दुसरा महत्वाचा कळीचा मुद्दा इथे येतो आणि तो म्हणजे कॅश ची उपलब्धता. छोटे व्यावसायिक हे मोठ्या उद्योगांना माल सप्लाय करत असतात. त्याचे पैसे वेळेत देणे म्हणजे पाप आहे असा एक समज आपल्या व्यवसाय जगतात आहे. त्यामुळे व्यवसाय नफा जरी दाखवत असतील, की जो नोशनल असतो, त्यांच्याकडे कॅश ची वानवा असते. 

या सगळ्या वरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की धंदा पूर्ण बंद असताना एखाद दोन महिन्यापलीकडे व्यावसायिक फिक्स्ड एक्स्पेन्सेस सहन करू शकत नाही. 

मी स्वतःवरून दोन गोष्टी सांगतो. 

मी गेले अठरा वर्षे व्यवसायात आहे, पण एकही वर्ष डिव्हीडंड घेतला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे, जर आमच्या भारतभरातील ग्राहकांनी आमची सर्व देणी परत दिली तर शून्य बिझिनेस झाला तरी मी सर्व लोकांना किमान एक वर्ष पगार देऊ शकतो. 

टीप: 

१. मी हे जे लिहिलं आहे ते ग्रोथ माइंडसेट ठेवणाऱ्या आणि लेजिटिमेट पद्धतीने बिझिनेस करणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय मनात ठेवून लिहिलं आहे. उत्पादन क्षेत्रातील छोटे व्यावसायिक जे गडगंज दिसतात ते एकतर सॉलिड प्रॉफिट मेकिंग असतात किंवा त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे दुसरे मार्ग असतात. 

२. आता आलेली परिस्थिती भविष्यात आली तर तिला तोंड देण्यासाठी, सोसायटीला जसा सिंकिंग फंड असतो तसा फंड कंपन्यांनी तयार करणं गरजेचं आहे. 

३. असंच असेल तर मग नोकरी करणं काय वाईट आहे असं वाटू शकतं. पण आहे हे असं आहे. एथिकल आणि लेजिटिमेट पद्धतीने व्यवसाय करणे हे एक तप आहे. पैसेच कमवायचे असतील तर नोकरी करण्यासारखा चांगला मार्ग नाही. व्यवसाय करायचा असेल तर पैसे कमावण्यापलीकडे जाऊन खूप विचार करावा लागतो. 

Monday, 31 August 2020

कार्मिकतेची गरज

 ज्या देशातील बहुसंख्य कर्मचारीवर्ग दोन महिने तंगड्या वर करून घरात बसले असताना परत धार्मिकतेचा पगडा असणाऱ्या सणवारांसाठी सुट्ट्या घेतो, ज्या देशातील बहुसंख्य उद्योजक आणि टॉप मॅनेजमेंट ला आपला उद्योग परत जागेवर कसा यावा यासाठी विचार करण्याची तसदी पण घ्यावी वाटत नाही, ज्या देशातील राजकीय मंडळी सामान्य जनतेचे जीवनमान सुधरवणऱ्या उद्योगांबरोबर चर्चा न करता मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करतात, ज्या देशातील राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी देवाकडे चमत्काराचा धावा करतात, ज्या देशाचे अर्थमंत्री आपल्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ऍक्ट ऑफ गॉड म्हणून बोळवण करतात, ज्या देशातील जनता अर्थव्यवस्थेची काळजी न करता राममंदिर झालं म्हणून उन्माद करते आणि आपला बहुसंख्य वेळ हा कुठल्या सेलेब्रिटीच्या आत्महत्या का आणि कशी झाली याची वांझोटी चर्चा करत वाया घालवते,  धार्मिकतेचा पाश जगातील ज्या दोन देशाभोवती आवळला जात आहे त्यापैकी एक आपला देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था डबघाईला जाणार हे सांगण्यासाठी कुठल्या विद्वानांची गरज नाही, 

या देशातील जनतेला समजलं पाहिजे की आपण जो मार्ग निवडला आहे त्याला धार्मिक नव्हे तर कार्मिकतेची गरज आहे. उत्पादकतेचा एल्गार करा नाहीतर फक्त अर्थव्यवस्था कशी डबघाईला गेली आहे याचे मेसेजेस फॉरवर्ड करण्याशिवाय तुमच्या हातात काही उरणार नाही.