Monday, 4 October 2021

एअर इंडिया

टाटा- एअर इंडिया वरून काही पोस्ट वाचायला मिळाल्या, म्हणून जरा लिहावंसं वाटलं.  

एव्हाना सगळ्यांना हे माहिती आहेच की भारतातील पहिले कमर्शियल विमान पायलट आहेत जे आर डी  टाटा. आपल्या कल्पक उद्योजकतेवर जेआरडी यांनी १९३२ साली भारतात एअरलाईन सर्व्हिस ची मुहूर्तमेढ रोवली. कराची ते मुंबई अशी फ्लाईट, नंतर पुढे चेन्नई पर्यंत सेवा देऊ लागली. नाव होतं त्याचं, टाटा एअरलाईन्स. 

१९४६ साली जेव्हा स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले, त्यावेळी जेआरडी  यांनी कंपनीचं नाव बदललं आणि ती झाली एअर इंडिया. त्याच वेळेस तिचे शेअर पण विक्रीला आले. 

१९५२ साली राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शासनाने एअर इंडिया टेक ओव्हर केली. नेहरू आणि जे आर डी खरंतर एकमेकांचे मित्र. भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नतीसाठी उपयोग करणाऱ्या जे आर डी यांनी जेव्हा नफ्याबद्दलचा उल्लेख केला, तेव्हा नेहरूंनी त्यांना सुनावलं "माझ्याशी बोलताना नफा या शब्दाचा उल्लेख करू नका. फार घाणेरडा शब्द आहे तो". त्या काळात सुद्धा जेआरडीनी नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, एअरलाईन चालवणं हे शासनाला जमणार नाही. नोकरशाही ची कीड लागली तर साऱ्या बिझिनेस वर उदासीनतेचं मळभ येईल. पण नेहरूंनी तो सल्ला सपशेल धुडकावून लावला आणि एअर इंडिया शासनाचा अंगीकृत व्यवसाय झाला. नाही म्हणायला डॅमेज कंट्रोल म्हणून जेआरडीना एअर इंडिया चं अध्यक्षपद दिलं. पुढच्या २५ वर्षात जेआरडींच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने जगभरात एक जबरदस्त एअरलाईन म्हणून नाव कमावलं. 

जेआरडीनी एअर इंडिया मध्ये प्रचंड कष्ट केले, आणि ती नावारूपाला आणली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सेट केल्या. पूर्ण एशिया मध्ये पहिलं बोईंग ७०७ आणण्याचं श्रेय एअर इंडिया चं. गौरीशंकर नाव दिलं होतं त्याला. साऊथ ईस्ट आशिया मध्ये एअर इंडियाचा चांगलाच दबदबा होता. कॅथे पॅसिफिक किंवा सिंगापूर एअरलाईन्स, इंडस्ट्री स्टँडर्डचा बेंचमार्क म्हणून त्या काळात एअर इंडिया कडे पहायच्या. आपल्या पाच पन्नास उद्योगाच्या रगाड्यात आपला ५०% वेळ जेआरडी एअर इंडिया साठी द्यायचे. नानी पालखीवाला, रुसी मोदी, जेजे इराणी, अजित केसकर, दरबारी सेठ, डी आर पेंडसे अशी बाकी व्यवसायासाठी फौज बनवणाऱ्या जेआरडी नी एअर इंडिया ची धुरा स्वतः सांभाळली, यात काय ते समजून घ्या. आर्थिक परतावा शून्य असताना सुद्धा. जेआरडी असेपर्यंत जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन मध्ये एअर इंडिया चं स्थान अग्रणी होतं. 

प्रोग्रेसिव्ह भांडवलशाहीला आपला दुश्मन समजण्याची ही जुनी खोड १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अजून जोरकस दामटली. २१३ लोक एअर इंडिया च्या अपघातात मरण पावले. झालं ते वाईट पण मोरारजी भाईंनी त्याचा वापर केला तो जेआरडी सारख्या धुरंधर माणसाला एअर इंडिया तून अतिशय अपमानास्पद रीतीने काढण्यासाठी. कधी वेळ मिळाला तर त्याच्या दुर्दैवी कहाण्या अनेक ठिकाणी वाचायला मिळतात, त्या नक्की वाचा. जेआरडी सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कूपमंडूक वृत्तीच्या राजकारण्यांनी दिलेली वागणूक ही भारतीय उद्योगातील अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे, असं मला वाटतं. जेआरडी यांना पायउतार व्हावं लागलं. ही बातमी देताना लंडन मधील एका न्यूजपेपर मध्ये मथळा होता "Unpaid Air India Chief is sacked by Desai". आपलं मूल कुणी हिसकावून घेतलं अशी त्या काळात जेआरडी ची भावना होती. 

पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी जेआरडीना परत एअर इंडियाच्या बोर्डवर आणलं. मेंबर म्हणून, चेअरमन म्हणून नाही. १९८२ साली जेआरडीनी आपल्या पहिल्या कराची मुंबई या विमानप्रवासाची गोल्डन ज्युबिली साजरी केली, तोच प्रवास करत. ते ही  एकट्याने. प्रवास पूर्ण झाल्यावर मार्क टुली या पत्रकाराने विचारलं "शंभरावा वाढदिवस असाच साजरा करणार का?" क्षणभराचा वेळ न दवडता तो ७८ वर्षाचा  तरुण पायलट म्हणाला "का नाही, नक्कीच करणार. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे." 

कुणास ठाऊक २०३२ साली, भारतातील पहिल्या विमानप्रवासाची शताब्दी एअर इंडियाचं बोर्ड टाटांच्या नेतृत्वाखाली साजरी करत असेल हा काव्यगत न्याय असेल. आता भले भारत सरकार, एअर इंडिया टाटांच्या पंखाखाली देणार की नाही याबाबत उलटसुलट तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण पूर्ण डबघाईला आलेल्या एअर इंडिया चा जुना दैदिप्यमान इतिहास परत अनुभवायचा असेल तर टाटा या उद्योगातील मेरूमणीच्या हातात त्याची धुरा देणं हे अत्यंत संयुक्तिक धोरण असणार याबाबत शंका नाही. 

जाता जाता: जेआरडींचा अपमान केला म्हणून आता एअर इंडिया काहीही करून घ्यायचीच असं काही नसणार आहे. शेवटी हा अनेक वर्षे चालवायचा व्यवसाय आहे. त्यात आर्थिक गणितं सुटत असतील तरच त्यात टाटा गुंतवणूक करतील, हा साधा सरळ हिशोब आहे. 

राजेश मंडलिक 

(सदर लेखक हे लघुउद्योजक असून प्रोग्रेसिव्ह भांडवलशाही चे मायक्रो प्रतिनिधी आहेत. राजकीय किंवा एअरलाईन उद्योगाचे अभ्यासक अथवा विश्लेषक नाही आहेत)


संदर्भ: शशांक शहा, हरीश भट, आर एम लाला, गिरीश कुबेर यांची टाटा ग्रुप बद्दलची पुस्तके. 


Monday, 6 September 2021

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

खरंतर या विषयावर लिहिणार नव्हतो. पण राहवलं नाही, लिहून टाकतो. 

एका एकवीस वर्षाच्या तरुणाला भेटलो आणि जर त्याला मी तरुणाईचा प्रतिनिधी मानलं तर या सोशल मीडियाच्या ओव्हरडोस पायी अनेकांचं वारू भरकटलं आहे की काय अशी शंका मनाला चाटून गेली. दोन प्रॉब्लेम वाटले. एकतर हे ऑनलाईन जोश टॉक्स वगैरेचं प्रमाण जास्त झालं की काय असं वाटून गेलं. टेड टॉक, जोश, स्वयंम वगैरे गोष्टी ऐकायला छान आहेत, पण सर्वच यशस्वी माणसं आयुष्यात काहीतरी अतरंगी निर्णय घेऊनच वर आली आहेत असा एक बेकार गैरसमज तरुणांमध्ये पसरला आहे का, हे तपासायला हवं. आयुष्य खरंतर सोपं आहे. अगदी दोन अधिक दोन चार इतकं. पण काही जण दो और दो पाच करण्याच्या भानगडीत पडतात आणि काही जण तर जिथं बेरीज करायला हवी तिथं आकडे तेच घेऊन गुणाकार करायला जातात आणि फसतात. इन्कम मल्टिप्लाय करायला पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स हवेत वगैरे गोष्टी बोलायला सोप्या आहेत. पण प्रत्यक्षात आणणं अवघड. आणि मुख्य म्हणजे या गोष्टी तुम्ही विशीत काय बोलताय? या मार्केट मध्ये उभं राहण्यासाठी नॉलेज बेस तर बनवा. हा नॉलेज बेस तुम्ही यु ट्यूब अन फेसबुकवरून जर बनवत असाल तर बेसिक मध्ये घोळ झाला आहे. 

एक निर्वाणीची गोष्ट सांगतो, बॉस. 

ते भले "You should work smart and not hard" वगैरे टाळ्याखाऊ वाक्य म्हणून ठीक आहे. पण इथं घासावी लागते. ओल्ड स्कुल ऑफ थॉट वाटेल, पण कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे ब्रीदवाक्य कपाळी कोरून ठेवा. कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, पण ती जर परिश्रमाला पर्याय म्हणून तुम्ही वापरात असाल तर एक मोठा खड्डा खणत आहात हे ध्यानात असू द्या. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. व्यवसाय असो की नोकरी, त्याचे बारकावे काय आहेत हे जाणून घ्यावं लागतात. आज जर तुम्ही कालच्यापेक्षा गुणवत्तेमध्ये सुधारला नसाल तर तुमचा उद्याचा काळ धोक्यात आहे हे सांगायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

"Find out the job that you love and you dont have to work for a day in your life" या सारखं भंपक वाक्य नाही दुसरं. ते थ्री इडियट मध्ये पहायला आणि ऐकायला बरं आहे. पण वास्तव असं नसतं. तुम्हाला असं मिळालं तर स्वतःला लकी समजा. पण याउलट जे काम मिळालं त्यावर प्रेम करत आयुष्य बनवलं तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. 

अजून एक च्युत्या वाक्य सांगतो. "Why to work for others when you can work for your own". व्यावसायिक बना हो, पण ते होण्यामागे जर हे वाक्य तुमची प्रेरणा असेल तर गंडला आहात तुम्ही. व्यवसायामध्ये अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. कस्टमर, सप्लायर, लोक, बँकर, इन्व्हेस्टर. ही सगळी लोक आपल्याला लागत असतात. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा हे सर्व पाठीशी उभे राहण्यासाठी खूप पुण्याई कमवावी लागते. जेव्हा सगळं तुमच्या फेवर मध्ये असतं तेव्हा एथिक्स चा एपिटोम गाठावा लागतो. तो जर नसेल आणि तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम तयार झाले तर हिवाळ्यात छत्री ऑफर करणारे लोक धो धो पाऊस असताना सुद्धा छत्री हिसकावून गायब होतात. 

तेव्हा भावड्यानो, सोशल मीडिया काही चांगलं चुंगलं वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्कीच आहे. पण उगाच तिथल्या कहाण्या ऐकून स्वतःचं करिअर प्लॅन करू नका. त्याची सत्यासत्यता पडताळून घ्या. जरी आम्ही पन्नाशीतले लोक येडे वाटलो तरी त्यांच्यातल्या चार लोकांशी बोला. ते सांगतात त्यावर स्वतःचं डोकं वापरा. नांगरे पाटील सर, तांदळे सर, कथळे मॅडम यांच्या स्टोरीज भारी आहेत पण त्याच्या मागे काही खंबीर थॉट प्रोसेस असते. कुणी गावभर हिप्पी सारखं उंडारतं म्हणून तुम्ही पण बोंबलत फिरू नका. त्यांच्या आजच्या स्टेटसला भुलू नका तर त्या प्रोसेस वर काम करा रे बाबांनो.  

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. 





 

Saturday, 21 August 2021

कैफियत

समीरने आमच्या कंपनीत राजीनामा दिला. एक्झिट इंटरव्ह्यू च्या वेळेस तो माझ्यासमोर बसला. आणि पार डोळ्यात पाणी वगैरे आणून आमच्या कंपनीतले प्रॉब्लेम सांगू लागला. मी त्याला थांबवलं आणि म्हणालो "पहिले ते डोळ्यातून पाणी येणं थांबव. तू चालला आहेस, तर आणि काही प्रॉब्लेम असेल तर राग येऊन सांग. पण कुठल्याही प्रकारचं गिल्ट फिलिंग मला येईल असं बोलू नको. कारण तुझे ग्रीव्हन्सेस असतील किंवा डिसऍग्रिमेंट पण असतील. आमचीही काही चूक झाली असेल ते मान्य आहे. पण तुझ्या डोळ्यातून पाणी यावं इतका काही मी वाईट वागत नाही."

असं बऱ्याचदा होतं, नाही? एखादा/दी, आपणावर विनाकारण इमोशनल अत्याचार करत अशी काही स्टोरी बनवतं की आपण काही फार मोठा गुन्हा केला आहे. आपल्याला काही कारण नसताना दोषी ठरवून पाश्चातापाच्या कटघर्यात उभं राहायला भाग पडतात आणि अत्यंत काहीतरी पुचाट कैफियत हिरीरीने मांडत असतात. 

झालं आहे असं की स्वतःवर काम करता करता स्वतःच्या वागण्याबद्दलची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर झाली आहे की कुठल्याही संबंधाला, मग ते एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असो, की कस्टमर-सप्लायर हे प्रोफेशनल रिलेशन्स अथवा मैत्रीचं, नात्यातील (अगदी आई मुलाचं) हे पर्सनल रिलेशन्स , सांभाळताना माझ्याकडून पूर्ण न्याय माझ्या बाजूने दिला जाईल अशी जीवनप्रणाली बनली आहे. 

थोडक्यात सांगायचं आहे की आता पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स मेंटेन करत मी सुद्धा ३०/३२ वर्षे व्यतीत केली आहेत. कळत्या वयापासून हटवादीपणा, मानापमान, तिरस्कार,  स्वार्थ या सगळ्यांपासून दूर राहायचा प्रयत्न केला आहे. या तीन दशकात कुणाला पैशाला फसवलं नाही, जाणून बुजून कुणाला थर्ड लावला नाही, एखादं काम अंगावर घेतलं तर त्याच्या रिटर्न्स ची फारशी अपेक्षा न ठेवता ते पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, कुणाचा ठरवून अपमान केला नाही, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून फारसं कधी खोटं बोललो नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पर्यंत लोकांच्या कैफयतीना मी सिरियसली घ्यायचो आणि बिनकामाच्या गिल्टपायी विनाकारण तळमळत बसायचो. 

आता मात्र गेल्या पाच वर्षात बराच बदललो आहे. फॉर गुड. एव्हाना खात्री आहे की आपली बाजू खणखणीत आहे. हे मानण्यात माज नव्हे तर स्वतःवरचा विश्वास आहे. आतापर्यंत जो जगण्याचा मार्ग निवडला आहे त्याचं ते फलित आहे. या सगळ्यांचा, गर्व नव्हे, पण अभिमान नक्की आहे. 


a1

Tuesday, 3 August 2021

भारी रविवार

 लाईफ पण सध्या इतकं धाकड झालं आहे की चांगलं वाटून घ्यायला आजकाल फार लांब जावं लागत नाही. ही मंडळी आजूबाजूला बागडत असतात. 

काल रविवारी, राहुल करूरकरांबरोबर तरुणाईच्या संवादाचं शेवटचं सेशन होतं. कंपनीतूनच ऑनलाईन बोलत होतो. नवीन काम अथवा व्यवसाय चालू करताना इंडस्ट्रीच्या अपेक्षा काय असतात यावर बोलत होतो. पहिलाच मुद्दा होता, घेतलेल्या कामाची १००% जबाबदारी घेणे. त्याचं उदाहरण द्यायला मला फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीतील मनीषा ढमाले एकटी रविवार असून कंपनीत काम करत होती. तिच्याकडे कंपनी एमआयएस अपडेट करायचं काम आहे. ३१ जुलै ला शेवटचा दिवस असल्यामुळे तिला वेळ मिळाला नव्हता. तिला कुणीही न सांगता, ती एकटी फक्त ते काम पूर्ण करायला आली होती. 

"Leave legacy at workplace" हा बोलण्याचा मुद्दा होता. कामाच्या ठिकाणी आपली छाप सोडणे हे फक्त टॉप मॅनेजमेंट च्या लोकांचं काम आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. आमच्या इथे मॅनेजमेन्ट टीम चांगली तयार होतेच आहे, पण अशी छाप कुणी अगदी हेल्पर पण पाडू शकतो. हे शोधण्यासाठी मला परत फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीत सध्या कुणी अशी छाप पाडत असेल तर तो म्हणजे आमचा हेल्पर बाबू. काल तो ही कंपनीत आला होता आणि त्याची जी कामं नव्हती ती पण कुणीही न सांगता करण्यासाठी तो रविवारी आला होता. त्याचीही ओळख तरुणाईला करून दिली. 

सेमिनार संपवून घरी आलो. तर व्हाट्स अप वर प्रियांका डंक कुलकर्णी ची स्टोरी होती. प्रियांका म्हणजे माझी सख्खी मामेबहिण. तिच्या खडतर प्रवासाचा मी पण साक्षीदार आहे. हा लेख तिच्या इंजिनियरिंग च्या सरांनी लिहिला आहे. त्याआधी मी का नाही लिहिला याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की वाचा. 

लेखाची लिंक 

https://www.ravindrajoshi.com/2021/07/blog-post_31.html?m=1

आणि शेवटचा फोटो आहे, कलाम सरांनी पत्राची पोच दिल्याचा. त्यांची पुण्यतिथी होती त्यादिवशी तो फोटो मेमरीत दिसला. लिंक्ड इन वर टाकला. तिथलं अल्गोरिदम कळत नाही. ३ लाख लोकांनी ते पत्र पाहिलं. हजारो लोकांनी प्रोफाइल व्ह्यू केलं. प्रोफेशनल मीडिया नीट वापरला तर कंपनीचा ब्रँड कसा तयार होतो त्याची झलक. 

(दुसर्याबद्दल लिहिता लिहिता शेवटी मंडलिकांनी स्वतःची लाल केलीच असं जर कुणाला वाटत असेल तर..........ते बरोबर आहे. त्याबाबत आपण हयगय करत नाही) 

Thursday, 29 July 2021

जेफ

जेफ २००७ साली संपर्कात आला. नंतर २०१२ साली सामंजस्य करार झाला, सेटको आणि आमच्या अल्ट्रा प्रिसिजन मध्ये. तो घडवून आणण्यात जेफचा मोठा वाटा. तेव्हापासून जेफ आणि मी सातत्याने बोलत आलो. कधी प्रत्यक्ष भेटीत तर कधी फोन कॉल वर. आज जे काही आम्ही आहोत त्याचा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता जेफ आहे. उत्साहाचा धबधबा म्हणजे जेफ. गेल्या ९ वर्षात मी त्याला कधीतरी थोडं दडपणाखाली पाहिलं पण त्याचा मूड नेहमी अप बीट असायचा. 

माझ्यात धोका पत्करण्याची क्षमता कमी आहे असं मला सारखं वाटतं. पण जेफ मध्ये ती माझ्यापेक्षा कमी आहे असं मला अनेक महिने वाटायचं. पण माझ्या लक्षात आलं की एखादी कल्पना पूर्ण समजून घेण्यात तो खूप वेळ घेतो. पण एकदा त्याला पटली की तो मनापासून पूर्ण पाठिंबा द्यायचा आणि ती कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वाटेल ती मदत करायचा. 

सेटको अमेरिकेच्या अनेक लोकांनी अमेरिकन लोकांच्या स्वभावाच्या माझ्या अनेक समजाला सुरुंग लावले. पण जेफने त्या सगळ्यांवर कडी केली. मी बुसाक शामबान नावाचा एक अमेरिकन प्रॉडक्ट १९९४ ते २००२ खूप विकला. त्यावेळेस खूप अमेरिकन लोकांबरोबर मी भारतभर फिरलो. त्यांच्या कंजुषीपणाच्या कथा मला आठवल्या तर आजही हसायला येतं. याउलट जेफ इतका सढळ हात असणारा अमेरिकन माझ्या पाहण्यात नाही. हे पाश्चात्य लोक बाहेर आपल्याशी लाख चांगलं बोलतील पण पाहुणचार करायला घरी नेणं वगैरे अगदी दुरापास्त, असा माझा समज होता. पण जेफने दोन वर्षांपूर्वी मला आणि यशला त्याच्या टेनेसीतल्या फार्महाउस ला तीन दिवस नेलं आणि तुफान बडदास्त ठेवली. 

माझा मुलगा यश अमेरिकेत शिक्षण घेत होता. त्याचं करिअर मार्गाला लागतं आहे की नाही याची काळजी माझ्यापेक्षा जेफला जास्त असायची. माझ्याशी आणि यश बरोबर कायम त्या विषयावर बोलायचा. यश किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर ची मुलगी, सेटको मध्ये यावी ही त्याची आंतरिक इच्छा. पण यशने त्याबद्दल जेव्हा फार काही इंटरेस्ट दाखवला नाही तेव्हा माझ्याइतकं जेफला पण वाईट वाटलं. इतकं होऊनही जेव्हा नुकताच यशला जॉब लागला, तो रेफरन्स जेफनेच दिला. आता आम्ही दोघे बिझिनेस पार्टनरची मुलगी सेटको ला जॉईन होते का याची आतुरतेने वाट पाहतोय. 

तर असा हा जेफ ३० जून २०२१ ला निवृत्त झाला. याची तयारी त्याने किती आधीपासून चालू केली असेल, असं तुम्हाला वाटतंय. तर तब्बल आठ वर्षे. त्याने त्याचा सक्सेसर आणला, आमच्याशी तो या विषयावर बिनदिक्कत बोलायचा, एक्झिट प्लॅन वर चर्चा करायचा. आणि ती घडवून पण अशी आणायचा की जणू काही एखादा महत्वाचा बिझिनेस प्लॅन डिस्कस करतोय. म्हणजे त्यात पूर्ण व्यावसायिकता असायची आणि जणू एखादी मशीन आणणं हे ग्रोथ साठी जसं महत्वाचं आहे तसं मी सेटको सोडणं हे पण ग्रोथ साठी गरजेचं आहे असा सूर असायचा. जोर का झटका धीरेसे लगे या न्यायाने त्याने मला डायरेक्टर बोर्ड वरून पण पायउतार होतो आहे असंही सांगितलं. थोडक्यात त्याने हे सगळ्या जबाबदारीतून मुक्त होणं याचा माझ्यासारख्या इमोशनल माणसाला त्रास होणार नाही  अशा पद्धतीने घडवून आणलं. एखाद्या जबाबदारीला ग्रेसफुली कसा निरोप द्यायचा याचा त्याने वस्तुपाठ घालून दिला. समाधानाची बाब इतकीच आहे की आहे की तो अजूनही आमच्या ऍडव्हायजर बोर्ड वर आहे. 

आजही माझ्या अमेरिकन बोर्डबरोबर झूम मिटिंग होतात. पण सध्यातरी जेफ त्या मीटिंगमध्ये नसतो. मिटिंग संपते. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ऍडव्हायजर बोर्ड वर असल्यामुळे तो परत येईल ही आशा आहेच. तो पर्यंत वाट पाहणं इतकंच माझ्या हातात आहे. त्याचा निरोपसमारंभ करण्यापेक्षा ही वाट पाहणे बरा पर्याय आहे. 

Saturday, 3 July 2021

"पैसा"

एका प्रोग्रॅमच्या तयारीसाठी "पैसा" या विषयावर मला विचार करायला सांगितलं. 

खरंच, पैसा म्हणजे एक आयटम आहे. भले भले त्याच्या चुंगळ मध्ये येऊन फसतात. कुणाच्या नादी लागल्यावर कसं आपलं आयुष्य आपण पणाला लावतो. पैशाचा पण असाच नादखुळा असतो. त्या नादामुळे कितीदाही ठासली गेली तरी कळत नाही. बरं, तिथं लागलीच दुखत पण नाही. दुखलेलं दिसत पण नाही. बऱ्याच काळाने कळतं की आपला कार्यक्रम झाला आहे. 

पूर्वी मला अशा लोकांचा राग यायचा. आजही असंख्य लोक या व्यसनापायी देशोधडीला लागलेली मी पाहतो. कधी कधी ते व्यसन कुणाचं सुटल्यासारखं वाटतं, पण दिखाऊपणाचा मुखवटा गळल्यावर मनाचा जेव्हा तळ दिसतो, तेव्हा पैशाच्या मोहाचा अमीबा तिथं वळवळताना दिसतो. आता मला त्यांचा राग येत नाही, कीव वाटते, दया येते. अनुभवातून शहाणपण घेण्याची अक्कल आपण ठेवत नाही आणि ग्रीड नावाच्या कीड ला घट्ट कवटाळून बसतो. पुन्हा पुन्हा त्या पैसा नामक मोहाच्या भोवऱ्यात गरागरा फिरत राहतो. आणि ही वावटळ साधीसुधी नसते. तुमच्या बरोबर अनेक लोकांचं आयुष्य बरबाद करते. 

त्यापेक्षा चोर उचक्के परवडतात. मला काही लोक माहित आहेत. खुलेआम भ्रष्टाचाराचं समर्थन करतात आणि अमाप पैसे खातात आणि उडवतात. कुणी त्यांचं झाट वाकडं करू शकत नाहीत. पण तोंडात हरिनाम आणि प्रत्यक्षात मात्र शेण खायचं, लफडं या मंडळींचं होतं. 

याउलट, काही लोकांना मात्र पैशाला किती आणि कुठवर महत्व द्यायचं याचं चांगलं शहाणपण असतं. लौकिक जगात भले त्यांना येडे समजत असतील, पण असल मध्ये पैसा त्यांच्या घरी पाणी भरत असतो. ते पैशाच्या तालावर नाचत नाहीत. पैशाचा विनियोग कसा करायचा याची कला त्यांनी आत्मसात केली असते. पैसा त्यांच्याकडे आकर्षित होईल इतके हे लोक काळाच्या ओघात स्मार्ट बनत जातात. या लोकांना त्यांच्या खिशात किंवा बँकेत किती पैसे आहेत याची पडलेली नसते. ते जर कामात असतील आणि पैसा दारावर टकटक करत असेल, तर ते पैशाला बाहेर उभा रहा म्हणून सांगतात. त्यांचं काम ही इतकं उदात्त असतं की पैसा सुद्धा त्यांनी दार उघडेपर्यंत वाट पाहत थांबतो. 

What is enough money या प्रश्नाचं उत्तर सापडणं गरजेचं आहे. काहींना हे उत्तर लवकर सापडतं, काहींना उशीरा. पण जेव्हा सापडतं, तो क्षण राजहंस होण्याचा असतो. काही दुर्दैवी बदकांना मात्र मरेपर्यंत याचं उत्तर सापडत नाही. काही लोकांना कागदाच्या तुकड्यावरील गव्हर्नर च्या सहीचं महत्व माहिती असतं, तर काहींची नजर ही फक्त १००, २००, ५००, २००० हा आकड्याभोवती फिरत राहते, मग भले तो कागदाचा तुकडा कितीही चुरगळलेला असू द्या. 

आपल्याकडे दोन पर्याय आहेत. 

सुखासीनतेवर भक्ती करत, स्वार्थ हा जगण्याचा सिद्धांत मानत पैशाच्या मागे पळायचं की एक चांगला उद्देश ठेवून आपलं अस्तित्व हे जगण्यालायक बनवत इतकं सशक्त व्हायचं की पैसा तुमच्या मागे पळत आला पाहिजे. 

(जो प्रोग्रॅम डिझाईन होतो आहे तो १४-२० वयोगटासाठी आहे, पण त्यांच्यासमोर ही भाषा बोलू शकणार नाही म्ह्णून इथे लिहून टाकलं)


Thursday, 17 June 2021

तिसरा लेख

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी फेमस शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे त्यांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. 

नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी, मूळ सिद्धांत काय हवेत हे थोडं स्वानुभवावरून सांगतो. माझीच केस स्टडी यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. काही मुद्दे मांडतो, बघा तुम्हाला पटतं का ते!. आणि तुम्हाला काही सांगण्याचा अविर्भाव न ठेवता एक स्वगत म्हणून माझे विचार फक्त मांडतो. 

१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी फॅन्सी प्रकार आहे असं कधीही ठेवलं नाही. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत"  असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू केला नाही. बहुतेक  व्यवसाय हे अक्षरश: नशिबाने चालू झाले आहेत. माझ्याही ध्यानी मनी नसताना व्यवसाय चालू झाला, तो रुजला आणि फुलला. व्यवसाय उभे राहतात ते नाविन्यपूर्ण कल्पनेवर किंवा नावीन्यपूर्ण पद्धतीवर. 

२. व्यवसायात यशस्वी कुठलाही प्रस्थापित फॉर्म्युला नाही आहे. बरं एका यशस्वी बिझिनेसचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची गॅरंटी नाही. पण गाईडलाईन्स नक्की आहेत. त्या जर फॉलो केल्या तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. The best university to learn business is to do business. 

३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा सुविचार शाळेत वाचल्यावर आपण विसरतो. व्यवसायात आलो आणि हा सुविचार ठळक अक्षरात, दररोज दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवला. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे. "मला सगळं कळतं" किंवा "मी जे करतो तेच बरोबर" या करोनाला ६ फूट दूर ठेवलं. या डोक्यावर कुठलीही हॅट नाही आहे. कुठलीही कल्पना ऐकण्यासाठी, स्वीकारू की नाही हा पुढचा प्रश्न, हा मेंदू रिकामा आहे.

४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. ते बरोबर की चूक यावर विचार नाही केला. विश्वास ठेवा, बऱ्याचदा चूक निर्णय हे निर्णय न घेण्यापेक्षा फायदेशीर असतात. निर्णय घेणं उद्यावर ढकलले नाही. एकदा तुम्ही वेळेत निर्णय घ्यायला शिकला की मग क्रिझवर मांड ठोकल्यावर प्रत्येक बॉल जसा बॅटच्या मधोमध बसतो तसा दरवेळी निर्णय योग्य घेतला जातो असा माझा अनुभव आहे. 

५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.

६. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की त्याचा पूर्ण कार्यक्रम करून टाकायचा. आर या पार. 

७. दिवसा स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवला. आज १९ वर्षे झालीत. आजही स्वप्नं बघणे चालूच आहे. आणि अजून एक जाणवलं इतक्या वर्षात. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत. 😊 

वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यवसायात येण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो

1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination 
3. Action
4. Perseverance
5. Dream. 

वि स खांडेकरांच्या अमृतवेल मधील भारी वाक्य उद्धृत करतो आणि आवरतो. 

भग्न स्वप्नांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं  वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत यावं म्हणून धडपडणं, या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो तो यामुळेच.

तिसरा लेख