Tuesday, 26 October 2021

टिकली

 करोना मुळे माझा आणि समीरचा बिझिनेस स्लो डाऊन मध्ये आला. एक दिवशी असाच कटिंग चहा पीत असताना, समीर म्हणाला "आजकाल फूड इंडस्ट्रीला बरे दिवस आहेत. माझ्याकडे लाडू बनवणारा एक चांगला रिसोर्स आहे. लाडू बनवायचा व्यवसाय चालू करू यात. तू थोडे पैसे टाक, मी थोडे टाकतो."

मलाही फार काही रिस्क वाटली नाही. समीरच्या रिसोर्स डेव्हलप करायच्या स्किलमध्ये मला काही शंका नव्हती. व्यवसाय चालू झाला आणि हळूहळू चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या. लाडू एकदम चांगल्या चवीचे होते यात काही वादच नव्हता. 

सणवाराचे दिवस चालू झाले आणि ऑर्डर्स वाढल्या. गेल्या दोन महिन्यापासून जवळपास ५०० किलो महिन्याला लाडू ची ऑर्डर करत होतो. समीर सगळं सांभाळत होता. मी नेटवर्किंग करत काही रेफरन्स पाठवत होतो.

कालच्या रविवारी मी आमच्या किचनवर व्यवसाय कसा चालू आहे ते बघावं म्हणून धडकलो. असंच अकौंटस वगैरे बघत असताना एक स्त्री तिथं आली. म्हणाली "आम्हाला काही समाजसेवी संस्थांसाठी वाटायला २५० किलो लाडू लागणार आहेत. तुम्ही बनवून देऊ शकता का?" समीर तिथं जवळच होता. धावत आला आणि बाईंशी चर्चा करू लागला. कधी लाडू लागणार, पॅकिंग कसं हवं, प्रति किलो रेंट किती वगैरे.

पंधरा दिवसाचं काम एकाच दिवसात मिळणार होतं. मीही जरा उत्साहात होतो. 

इतक्यात घात झाला. लक्षात आलं की बाईंनी कपाळावर टिकली लावलीच नाही आहे. मी समीरला म्हणालो "थांब, नो बिंदी नो बिझिनेस". 

सम्या माझ्याकडे बघून ओरडला "आर यु आउट ऑफ युअर माईंड?". मी त्याला टेबलपासून लांब घेऊन गेलो आणि म्हणालो "नियम म्हणजे नियम. ज्यांनी टिकली लावली नाही त्यांच्याकडून काही घेणार नाही अन त्यांना काही विकणार नाही. ठरलं म्हणजे ठरलं". 

समीर मला खाऊ की गिळू नजरेने पाहत म्हणाला "लगा, पंधरा दिवसांची ऑर्डर आहे अन तू ती घेणार नाही म्हणतोस." 

मी माझ्या मतावर ठाम राहिलो. बाईंच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्या म्हणाल्या "विचित्र कारणासाठी तुम्ही घरात आलेली लक्ष्मी परत पाठवताय. ठीक आहे, तुमची मर्जी." आणि त्या धाडकन निघून गेल्या.

समीर माझ्यावर सॉलिड भडकला अन त्यानं माझा हिशोब करून त्या किचन मधून हाकलून दिलं. 

मी समीर ला ब्लॉक करू की नुसतं अन फ्रेंड करू हा विचार करत बसलोय. तेवढ्यात समीरचा मला मेसेज आला "फेसबुकवर आपली मैत्री झाली, आणि तिथल्या हॅश टॅग मुळे तुटली." असो. 


Friday, 15 October 2021

फळणीकर

त्यांची आणि माझी ओळख तशी २०१३-१४ पासून. इंडस्ट्रीच्या लोकांची समाजसेवेची व्याख्या चेक फिलॉन्थरोपी ला येऊन संपते. त्या न्यायान मी त्यांच्या सानिध्यात आलो. त्यांच्या म्हणजे विजय फळणीकर, आपलं घर या संस्थेचे सर्वेसर्वा, ज्यांनी मला समाजासाठी चेक नाही तर टाइम फिलॉन्थरोपी जी जास्त गरज आहे हे ठसवलं. 

मला काही अवलिया म्हणावे असे लोक भेटले आहेत. फळणीकर त्या संज्ञेला पूरपेर जागतात. एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगलेला हा माणूस. त्यांच्या पराजय नव्हे विजय या पुस्तकात त्याबद्दलची माहिती आलीच आहे. त्यांचं खडतर बालपण, मग बेफाट तारुण्य, मुलाच्या मृत्यूपुढे हतबल पिता आणि नंतरची आपलं घर ची वाटचाल. हे सगळं कमाल  आहे. त्यापलीकडे जाऊन फळणीकर मला भावतात ते म्हणजे झपाट्याने कामाचा उरक असणारा माणूस. त्यांच्या शब्दकोषात "नाही" हा शब्दच नाही. आणि मुख्य म्हणजे एकदा काम हातात घेतलं कि ते संपल्याशिवाय हे गृहस्थ जीवाला उसंत म्हणून देत नाही. अक्षरश: अर्जुनाला जसा फक्त डोळा दिसतो त्याप्रमाणे त्यांना फक्त आणि फक्त हातात घेतलेलं काम दिसतं. 

गेल्या काही वर्षात अशा अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. ब्रेस्ट कँसर सर्जरीचं युनिट आपलं घर मध्ये चालू करायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. आल्यापासून नेट ४३ दिवसात त्यांनी ते छोटेखानी सुसज्ज ओटी आणि तिथं लागणाऱ्या अद्यावत उपकरणासह त्यांनी उभं केलं. पॅथॉलॉजी लॅब चालू करायचं असं त्यांनी ठरवलं. कुठून ती रेडी टू युज शेड मागवली, सकाळी शेड आली, संध्यकाळी सहा वाजता लॅब सुरु. होस्टेलच्या प्रांगणात अँफी थिएटर सुरु करायचं त्यांच्या मनात आलं. काही नाही, दिवस रात्र त्याचाच ध्यास. बरं ही माझी खाज, म्हणून संस्थेकडून काही किमती इक्विपमेंटचा खर्च न करता तो त्यांनी स्वतः केला, पण सुसज्ज असं छोटं थिएटर उभं केलं. करोना काळात २० ग्रोसरी किट्स बनवू म्हणून मी त्यांना विनंती केली. ती तर त्यांनी पूर्ण केलीच. पण पुढं जवळपास सातशे किट्स गरिबांना वाटली. सांगली पूर, आताचा चिपळूण पूर अशा काही नैसर्गिक आपत्तीनंतर नेहमी पुढे. आतासुद्धा त्यांनी आपलं घर मध्ये २८ बेड चं हॉस्पिटल उभं करण्याचं ठरवलं. ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता देमार काम करत आहेत. परत हे सगळं एकहाती. आपलं घर मध्ये विश्वस्त मंडळ आहे, पण सगळ्यांचे छोटे मोठे उद्योग. त्यामुळे सर्व गाडा काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते एकटे ओढतात. मी तर त्यांना नेहमी म्हणत असतो की ते जर आमच्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये काही व्यवसाय करत असते तर त्यांनी धुव्वाधार काम करत तो व्यवसाय कुठल्या कुठं नेला असता. अर्थात आपलं घर चं स्थान पण वादातीत आहे. 

आपलं घर म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्य आहे. वाहून घेतलं आहे त्यांनी. कुठलाही रेफरन्स त्यांना द्या, शेवटी ते गाडी बरोबर आपलं घर शी संबंधित एखादया मुद्द्यावर चर्चेची गाडी आणून ठेवतात. एकेक क्षण ते संस्थेसाठी वेचतात. कधी कधी वाईटही वाटतं. कारण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा झालेला भ्रमनिरस पण कळतो. एव्हाना मला एक कळलं की एकवेळ नफा करणारी कंपनी चालवणं सोपं, पण इमानेइतबारे समाजसेवी संस्था चालवणं अवघड. एक दोन वर्षाची पोरं येतात, त्यांचं आयुष्य तुम्ही घडवता आणि काहीजण नंतर संस्थेकडे पाठ फिरवून जातात, ते पुन्हा कधी परत न येण्यासाठी. फार अवघड फिलिंग असतं ते. तसा माणूस शौकिया मिजाजचा. पण संस्थेसाठी त्यांनी स्वतःला अंतर्बाह्य बदललं. स्वतःचे छंद, मौजमजा हे बंद कपाटात कुलूप लावून ठेवले आहेत. फळणीकरांचे अनुभव पाहून माझे आयुष्याबद्दलचे अनेक दृष्टिकोन बदलले. 

पराकोटीची पारदर्शकता, म्हंटलं तर त्यांचा गुण आणि म्हंटलं तर अवगुण. पण गुणावगुणांची बेरीज वजाबाकी केली तर फळणीकर जिंकले आहेत. आज फळणीकरांनी प्रोजेक्ट तयार केला आणि तो पैशासाठी अडला असं सहसा होत नाही. विप्रो मेडिकेअर सारख्या कडक ऑडिट करणाऱ्या चॅरिटेबल संस्थेनी आपलं घर च्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात काही पैशाचा विनियोग करायचा ठरवलं यातच सगळं काय ते आलं. 

गेले पाच एक वर्षे झालीत, फळणीकरांनी मला आपलं घर चं ट्रस्टी म्हणून काम करायची संधी दिली. मी काम म्हणजे काय हो, ते जे काम करतात, तेव्हा त्यांच्या हाताला हात लावून मम् म्हणायचं. नाही म्हणायला, करोना काळात, पुण्यात असल्यामुळे थोडं काम करू शकलो. पण लॉक डाऊन उठल्यावर माझी भ्रमंती चालू झाली त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यात मनोजगतं आपलं घर मध्ये जाऊ नाही शकलो. पण कुणास ठाऊक, याच आयुष्यात फळणीकरांच्या खांद्याला खांदा लावून एखादा तुफानी प्रोजेक्ट आपल्या हातून व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. 

फळणीकर सर, तुमचं काम प्रेरणादायी आहे वगैरे फॉर्मल शब्द वापरत नाही. एकच सांगतो, तुम्ही मला मित्र समजता हे एक माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. 

तर अशा या वादळी आयुष्याचा आज हिरकमहोत्सवी वाढदिवस. त्यांना एकदम दिलसे शुभेच्छा. 


Thursday, 14 October 2021

टाटा ग्रुप

 एअर इंडिया ची टाटा ग्रुप मध्ये घरवापसी या घटनेबद्दल एव्हाना बरंच काही बोलून झालं आहे. १९३२ मध्ये जे आर डी नी स्थापन केलेली टाटा एअरलाईन्स, १९४६ च्या सुमारास झालेलं तिचं एअर इंडिया हे नामकरण, १९५२ साली राष्ट्रीयीकरण करत भारत सरकारने तिचे केलेलं टेक ओव्हर, १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अयोग्य पद्धतीने जेआरडी ना केलेले पदमुक्त, १९८० साली इंदिरा गांधींनी परत जेआरडींना परत बोर्ड वर आणणे या गोष्टी या निमित्ताने खूप चर्वितचर्वण झाल्या. 

यावर्षी जेव्हा एअर इंडिया टाटा ग्रुप ने भारत सरकारकडून परत विकत घेतली तेव्हा प्रथेप्रमाणे या कराराबद्दल अनेक वाद उत्पन्न झाले. अगदी गेले दीडशे वर्ष भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नती साठी उपयोग करणाऱ्या टाटा ग्रुपच्या उद्देशावर पण शंका उत्पन्न केल्या गेल्या. काही राजकीय पक्षांनी आपल्या विचारधारेला जागत "शासनाने टाटा ग्रुप ला फुकटात एअरलाईन दिली" अशी टीका पण केली. 

एअर इंडियाचं खाजगीकरण करावं लागेल याची जाणीव २००० च्या सुमारास झाली. नव्वदच्या दशकात भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आणि जेट एअरवेजचा उदय झाला. राष्ट्रीय एअरलाईन असणाऱ्या एअर इंडियाच्या डोमेस्टिक एअरलाईन, जी इंडियन एअरलाईन्स च्या नावाने ओळखली जायची तिला एक जबरदस्त आव्हान जेटच्या रूपाने उभं राहिलं. जो पर्यंत शासनाचा वरदहस्त होता तोपर्यंत एअर इंडिया अगदी जोमात होती. एअरलाईन चालवणे हे शासनाचे काम नाही हे नेहरूंना सुनवणाऱ्या जेआरडींच्या सल्ल्याची आठवण २००० साली अटलबिहारी वाजपेयी यांना झाली असावी आणि त्यांनी एअर इंडियाच्या ४०% शेअर खाजगी कंपन्यांना विकण्याचा ठराव मांडला.

त्यावेळेसही टाटा ग्रुप शिवाय लुफ्तानसा, सिंगापूर एअरलाईन्स सारख्या आंतरराष्ट्रीय विमाणकंपन्यांनी बोली लावली होती. पण शासनाकडे ६०% शेअर्स आणि त्यायोगे निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग आणि त्याकाळी असणाऱ्या ट्रेड युनियन चा असणारा खाजगीकरणाला विरोध या कारणामुळे प्रकरण बारगळलं. पुढे २००३ मध्ये एअर डेक्कन चा उदय आला आणि भारतात लो कॉस्ट एअरलाईनची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यापाठोपाठ इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट, सहारा सारखे लो कॉस्ट एअरलाईन तर जेट बरोबर किंगफिशर फुल सर्व्हिस एअरलाइन्स ने भारतीय आकाश गजबजून गेले.

एकेकाळी पूर्ण मार्केट शेअर असणाऱ्या एअर इंडिया चा जेट च्या उदयानंतर ३०% च्या खाली आणि नो फ्रिल च्या एअरलाईनच्या शिरकवानंतर १५% च्या खाली आला. त्यात २००७ मध्ये केवळ आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी आणि थोड्याफार नफ्यात चालणारी एअर इंडिया आणि तोट्यात चालणारी इंडियन एअरलाईन्स याचं एकत्रीकरण केलं आणि या शासन अंगीकृत व्यवसायाची घरघर चालू झाली.

त्यांचा तोटा वर्षागणिक वाढू लागला. आताच्या व्यवहारात ₹ ४०००० कोटी चं उत्तरदायित्व सरकारने घेतलं यासाठी आरडाओरड करणाऱ्या लोकांनी एक लक्षात घ्यायला हवं की २००७ पासून आतापर्यंत एअर इंडियाचा एकत्रित तोटा हा ₹ ११०००० कोटी इतका आहे आणि हे नुकसान कारदात्यांचं झालं आहे.  नाही म्हणायला २००४ ते २०१४ या युपीए शासनाच्या काळात खाजगिकरणावर फारशी चर्चा झाली नाही पण फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग प्लॅन बनवला पण त्यात कुणाचा फायनान्स रिस्ट्रक्चर झाला हे सर्वज्ञात आहे. 

२०१४ नंतर एकुणात तोट्यात असणाऱ्या शासनाचे अंगीकृत व्यवसायात निर्गुंतवणूक करण्याची विचारधारा जोर पकडू लागली. २०१७ साली एअर इंडिया मधील मॅजोरीटी स्टेक खाजगी कंपनीला देण्यासाठी निविदा उघडली गेली पण त्यात पूर्ण पारदर्शकता नसल्यामुळे आणि त्या संबधित काही उद्योगावर शासनाचे नियंत्रण असल्यामुळे कुणाही खाजगी कंपनीने निविदेत सहभाग नोंदवला नाही आणि ती योजना पूर्ण बारगळली. 

२०२० नंतर या निर्गुंतवणूकच्या विचारांनी जोर पकडला. एव्हाना एअर इंडिया चा तोटा दिवसाला ₹ २० कोटी या वेगाने वाढत होता. तिला खाजगी कंपनीकडे सुपूर्त करणे किंवा बंद करणे या शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. एकूण तोटा साधारण ₹ ६१००० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. 

या आधीच्या खाजगीकरणाच्या योजनेत ज्या कारणाने अडथळा निर्माण झाला त्यावर बारकाईने काम करण्यात आलं. हे करण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती लागते ती सद्य सरकारातील मंत्री मंडळाने दाखवली आणि एक एअर इंडिया चा खाजगीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

टाटा सन्स ने टालास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एअर इंडिया घेण्यावर ₹ १८००० कोटींची बोली लावली. त्यापैकी ₹ १५३०० कोटी कंपनीची देणी देण्यासाठी वापरले जातील तर भारत सरकारला ₹ २७००  कोटी मिळतील. ₹ ४३००० कोटी रुपयांचं उत्तरदायित्व अजून शासनाकडे आहे. त्यासाठी ₹ १४००० कोटी हे एअर इंडियाच्या स्थावर मालमत्तेची विक्री करून उभे केले जातील तर बाकी सोवेरीयन बॉण्ड्स मधून. पुढील एक वर्षासाठी एअर इंडिया च्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार नाही. त्यांनंतर मात्र टाटा ग्रुप निर्णय घेतील त्याप्रमाणे मॅनेजमेंट ची संरचना करण्यात येईल.

टाटा ग्रुप ने हा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतला असं वाटण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्यायला हवे की टाटा ग्रुप भांडवलशाही आणि समजोन्नती याचा सुवर्णमध्य साधत असतील तरीही ते कसलेले उद्योजक आहेत. येणाऱ्या काळात जर त्यांना फायदा दिसत नसेल तर त्यांनी एअर इंडिया पदरात पाडून घेण्यासाठी बिड केलंच नसतं. इतके मोठे निर्णय हे भावनेच्या आहारी न जाता व्यवसायिक गणितं जर कंपनीच्या हितासाठी सुटत असतील तर त्या पद्धतीने प्रपोजल दिलं असणार यात काही शंका नाही. टाटा ग्रुप कडे याद्वारे एअर इंडियातील सर्व म्हणजे ११७ विमानांची मालकी येईल. त्याबरोबरच ४००० राष्ट्रीय आणि १८०० आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग त्यांच्यासाठी खुले होतील, 

अजून एक महत्वाचा फायदा टाटा ग्रुपला होणार आहे आणि तो म्हणजे त्यांच्या अनेक व्यवसायाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या व्यावसायिक वाढ होणार आहे. टीसीएस, टाटा मोटर्स, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स या आणि यासारख्या अजून काही कंपन्यांना एअरलाईनच्या अनुषंगाने व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टाटा ग्रुप ने एअर लाईन व्यवसायातील त्यांची इच्छा कधीही लपवून ठेवली नाही. आणि का त्यांनी त्या व्यवसायात उतरू नये? त्यांच्या रक्तात तो व्यवसाय आहे. एअर इंडिया आपल्या पदराखाली घेण्याआधी टाटा ग्रुप ने एअर एशिया या टोनी फर्नांडीस या मलेशिया स्थित उद्योगपती प्रणित कंपनीत मेजोरीटी स्टेक घेतला तर सिंगापूर एअरलाईन्स बरोबर एअर विस्तारा चालू केली. आज एअर इंडिया, एअर एशिया आणि एअर विस्तारा या तिघांचा प्रवासी शेअर एकत्र केला तर २८% होईल आणि इंडिगो ला एक आव्हान उभे राहील. अर्थात एअर इंडियाचा आंतराष्ट्रीय उड्डाणाचा अनुभव खूप जास्त. दुबई, सिंगापूर सारख्या कमी अंतराशिवाय लांब पल्ल्याच्या टाटा ग्रुप एअर इंडिया आणि विस्तारा च्या साहाय्याने अधिराज्य गाजवणार यात शंका नाही.  एअर इंडिया चा  विमानांचा ताफा आणि १३००० लोकांची अत्यंत ताकदवर टेक्निकल टीम याद्वारे एअर इंडियाचा हरवलेला दैदिप्यमान इतिहास टाटा ग्रुप आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर परत आणू शकतील याबद्दल सामान्य जनमानसात शंका नाही.

Monday, 4 October 2021

एअर इंडिया

टाटा- एअर इंडिया वरून काही पोस्ट वाचायला मिळाल्या, म्हणून जरा लिहावंसं वाटलं.  

एव्हाना सगळ्यांना हे माहिती आहेच की भारतातील पहिले कमर्शियल विमान पायलट आहेत जे आर डी  टाटा. आपल्या कल्पक उद्योजकतेवर जेआरडी यांनी १९३२ साली भारतात एअरलाईन सर्व्हिस ची मुहूर्तमेढ रोवली. कराची ते मुंबई अशी फ्लाईट, नंतर पुढे चेन्नई पर्यंत सेवा देऊ लागली. नाव होतं त्याचं, टाटा एअरलाईन्स. 

१९४६ साली जेव्हा स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले, त्यावेळी जेआरडी  यांनी कंपनीचं नाव बदललं आणि ती झाली एअर इंडिया. त्याच वेळेस तिचे शेअर पण विक्रीला आले. 

१९५२ साली राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शासनाने एअर इंडिया टेक ओव्हर केली. नेहरू आणि जे आर डी खरंतर एकमेकांचे मित्र. भांडवलशाहीचा राष्ट्रोन्नतीसाठी उपयोग करणाऱ्या जे आर डी यांनी जेव्हा नफ्याबद्दलचा उल्लेख केला, तेव्हा नेहरूंनी त्यांना सुनावलं "माझ्याशी बोलताना नफा या शब्दाचा उल्लेख करू नका. फार घाणेरडा शब्द आहे तो". त्या काळात सुद्धा जेआरडीनी नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं की, एअरलाईन चालवणं हे शासनाला जमणार नाही. नोकरशाही ची कीड लागली तर साऱ्या बिझिनेस वर उदासीनतेचं मळभ येईल. पण नेहरूंनी तो सल्ला सपशेल धुडकावून लावला आणि एअर इंडिया शासनाचा अंगीकृत व्यवसाय झाला. नाही म्हणायला डॅमेज कंट्रोल म्हणून जेआरडीना एअर इंडिया चं अध्यक्षपद दिलं. पुढच्या २५ वर्षात जेआरडींच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने जगभरात एक जबरदस्त एअरलाईन म्हणून नाव कमावलं. 

जेआरडीनी एअर इंडिया मध्ये प्रचंड कष्ट केले, आणि ती नावारूपाला आणली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सेट केल्या. पूर्ण एशिया मध्ये पहिलं बोईंग ७०७ आणण्याचं श्रेय एअर इंडिया चं. गौरीशंकर नाव दिलं होतं त्याला. साऊथ ईस्ट आशिया मध्ये एअर इंडियाचा चांगलाच दबदबा होता. कॅथे पॅसिफिक किंवा सिंगापूर एअरलाईन्स, इंडस्ट्री स्टँडर्डचा बेंचमार्क म्हणून त्या काळात एअर इंडिया कडे पहायच्या. आपल्या पाच पन्नास उद्योगाच्या रगाड्यात आपला ५०% वेळ जेआरडी एअर इंडिया साठी द्यायचे. नानी पालखीवाला, रुसी मोदी, जेजे इराणी, अजित केसकर, दरबारी सेठ, डी आर पेंडसे अशी बाकी व्यवसायासाठी फौज बनवणाऱ्या जेआरडी नी एअर इंडिया ची धुरा स्वतः सांभाळली, यात काय ते समजून घ्या. आर्थिक परतावा शून्य असताना सुद्धा. जेआरडी असेपर्यंत जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन मध्ये एअर इंडिया चं स्थान अग्रणी होतं. 

प्रोग्रेसिव्ह भांडवलशाहीला आपला दुश्मन समजण्याची ही जुनी खोड १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी अजून जोरकस दामटली. २१३ लोक एअर इंडिया च्या अपघातात मरण पावले. झालं ते वाईट पण मोरारजी भाईंनी त्याचा वापर केला तो जेआरडी सारख्या धुरंधर माणसाला एअर इंडिया तून अतिशय अपमानास्पद रीतीने काढण्यासाठी. कधी वेळ मिळाला तर त्याच्या दुर्दैवी कहाण्या अनेक ठिकाणी वाचायला मिळतात, त्या नक्की वाचा. जेआरडी सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कूपमंडूक वृत्तीच्या राजकारण्यांनी दिलेली वागणूक ही भारतीय उद्योगातील अत्यंत लांच्छनास्पद घटना आहे, असं मला वाटतं. जेआरडी यांना पायउतार व्हावं लागलं. ही बातमी देताना लंडन मधील एका न्यूजपेपर मध्ये मथळा होता "Unpaid Air India Chief is sacked by Desai". आपलं मूल कुणी हिसकावून घेतलं अशी त्या काळात जेआरडी ची भावना होती. 

पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी जेआरडीना परत एअर इंडियाच्या बोर्डवर आणलं. मेंबर म्हणून, चेअरमन म्हणून नाही. १९८२ साली जेआरडीनी आपल्या पहिल्या कराची मुंबई या विमानप्रवासाची गोल्डन ज्युबिली साजरी केली, तोच प्रवास करत. ते ही  एकट्याने. प्रवास पूर्ण झाल्यावर मार्क टुली या पत्रकाराने विचारलं "शंभरावा वाढदिवस असाच साजरा करणार का?" क्षणभराचा वेळ न दवडता तो ७८ वर्षाचा  तरुण पायलट म्हणाला "का नाही, नक्कीच करणार. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे." 

कुणास ठाऊक २०३२ साली, भारतातील पहिल्या विमानप्रवासाची शताब्दी एअर इंडियाचं बोर्ड टाटांच्या नेतृत्वाखाली साजरी करत असेल हा काव्यगत न्याय असेल. आता भले भारत सरकार, एअर इंडिया टाटांच्या पंखाखाली देणार की नाही याबाबत उलटसुलट तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण पूर्ण डबघाईला आलेल्या एअर इंडिया चा जुना दैदिप्यमान इतिहास परत अनुभवायचा असेल तर टाटा या उद्योगातील मेरूमणीच्या हातात त्याची धुरा देणं हे अत्यंत संयुक्तिक धोरण असणार याबाबत शंका नाही. 

जाता जाता: जेआरडींचा अपमान केला म्हणून आता एअर इंडिया काहीही करून घ्यायचीच असं काही नसणार आहे. शेवटी हा अनेक वर्षे चालवायचा व्यवसाय आहे. त्यात आर्थिक गणितं सुटत असतील तरच त्यात टाटा गुंतवणूक करतील, हा साधा सरळ हिशोब आहे. 

राजेश मंडलिक 

(सदर लेखक हे लघुउद्योजक असून प्रोग्रेसिव्ह भांडवलशाही चे मायक्रो प्रतिनिधी आहेत. राजकीय किंवा एअरलाईन उद्योगाचे अभ्यासक अथवा विश्लेषक नाही आहेत)


संदर्भ: शशांक शहा, हरीश भट, आर एम लाला, गिरीश कुबेर यांची टाटा ग्रुप बद्दलची पुस्तके. 


Monday, 6 September 2021

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

खरंतर या विषयावर लिहिणार नव्हतो. पण राहवलं नाही, लिहून टाकतो. 

एका एकवीस वर्षाच्या तरुणाला भेटलो आणि जर त्याला मी तरुणाईचा प्रतिनिधी मानलं तर या सोशल मीडियाच्या ओव्हरडोस पायी अनेकांचं वारू भरकटलं आहे की काय अशी शंका मनाला चाटून गेली. दोन प्रॉब्लेम वाटले. एकतर हे ऑनलाईन जोश टॉक्स वगैरेचं प्रमाण जास्त झालं की काय असं वाटून गेलं. टेड टॉक, जोश, स्वयंम वगैरे गोष्टी ऐकायला छान आहेत, पण सर्वच यशस्वी माणसं आयुष्यात काहीतरी अतरंगी निर्णय घेऊनच वर आली आहेत असा एक बेकार गैरसमज तरुणांमध्ये पसरला आहे का, हे तपासायला हवं. आयुष्य खरंतर सोपं आहे. अगदी दोन अधिक दोन चार इतकं. पण काही जण दो और दो पाच करण्याच्या भानगडीत पडतात आणि काही जण तर जिथं बेरीज करायला हवी तिथं आकडे तेच घेऊन गुणाकार करायला जातात आणि फसतात. इन्कम मल्टिप्लाय करायला पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स हवेत वगैरे गोष्टी बोलायला सोप्या आहेत. पण प्रत्यक्षात आणणं अवघड. आणि मुख्य म्हणजे या गोष्टी तुम्ही विशीत काय बोलताय? या मार्केट मध्ये उभं राहण्यासाठी नॉलेज बेस तर बनवा. हा नॉलेज बेस तुम्ही यु ट्यूब अन फेसबुकवरून जर बनवत असाल तर बेसिक मध्ये घोळ झाला आहे. 

एक निर्वाणीची गोष्ट सांगतो, बॉस. 

ते भले "You should work smart and not hard" वगैरे टाळ्याखाऊ वाक्य म्हणून ठीक आहे. पण इथं घासावी लागते. ओल्ड स्कुल ऑफ थॉट वाटेल, पण कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे ब्रीदवाक्य कपाळी कोरून ठेवा. कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, पण ती जर परिश्रमाला पर्याय म्हणून तुम्ही वापरात असाल तर एक मोठा खड्डा खणत आहात हे ध्यानात असू द्या. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. व्यवसाय असो की नोकरी, त्याचे बारकावे काय आहेत हे जाणून घ्यावं लागतात. आज जर तुम्ही कालच्यापेक्षा गुणवत्तेमध्ये सुधारला नसाल तर तुमचा उद्याचा काळ धोक्यात आहे हे सांगायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

"Find out the job that you love and you dont have to work for a day in your life" या सारखं भंपक वाक्य नाही दुसरं. ते थ्री इडियट मध्ये पहायला आणि ऐकायला बरं आहे. पण वास्तव असं नसतं. तुम्हाला असं मिळालं तर स्वतःला लकी समजा. पण याउलट जे काम मिळालं त्यावर प्रेम करत आयुष्य बनवलं तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. 

अजून एक च्युत्या वाक्य सांगतो. "Why to work for others when you can work for your own". व्यावसायिक बना हो, पण ते होण्यामागे जर हे वाक्य तुमची प्रेरणा असेल तर गंडला आहात तुम्ही. व्यवसायामध्ये अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. कस्टमर, सप्लायर, लोक, बँकर, इन्व्हेस्टर. ही सगळी लोक आपल्याला लागत असतात. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा हे सर्व पाठीशी उभे राहण्यासाठी खूप पुण्याई कमवावी लागते. जेव्हा सगळं तुमच्या फेवर मध्ये असतं तेव्हा एथिक्स चा एपिटोम गाठावा लागतो. तो जर नसेल आणि तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम तयार झाले तर हिवाळ्यात छत्री ऑफर करणारे लोक धो धो पाऊस असताना सुद्धा छत्री हिसकावून गायब होतात. 

तेव्हा भावड्यानो, सोशल मीडिया काही चांगलं चुंगलं वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्कीच आहे. पण उगाच तिथल्या कहाण्या ऐकून स्वतःचं करिअर प्लॅन करू नका. त्याची सत्यासत्यता पडताळून घ्या. जरी आम्ही पन्नाशीतले लोक येडे वाटलो तरी त्यांच्यातल्या चार लोकांशी बोला. ते सांगतात त्यावर स्वतःचं डोकं वापरा. नांगरे पाटील सर, तांदळे सर, कथळे मॅडम यांच्या स्टोरीज भारी आहेत पण त्याच्या मागे काही खंबीर थॉट प्रोसेस असते. कुणी गावभर हिप्पी सारखं उंडारतं म्हणून तुम्ही पण बोंबलत फिरू नका. त्यांच्या आजच्या स्टेटसला भुलू नका तर त्या प्रोसेस वर काम करा रे बाबांनो.  

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. 





 

Saturday, 21 August 2021

कैफियत

समीरने आमच्या कंपनीत राजीनामा दिला. एक्झिट इंटरव्ह्यू च्या वेळेस तो माझ्यासमोर बसला. आणि पार डोळ्यात पाणी वगैरे आणून आमच्या कंपनीतले प्रॉब्लेम सांगू लागला. मी त्याला थांबवलं आणि म्हणालो "पहिले ते डोळ्यातून पाणी येणं थांबव. तू चालला आहेस, तर आणि काही प्रॉब्लेम असेल तर राग येऊन सांग. पण कुठल्याही प्रकारचं गिल्ट फिलिंग मला येईल असं बोलू नको. कारण तुझे ग्रीव्हन्सेस असतील किंवा डिसऍग्रिमेंट पण असतील. आमचीही काही चूक झाली असेल ते मान्य आहे. पण तुझ्या डोळ्यातून पाणी यावं इतका काही मी वाईट वागत नाही."

असं बऱ्याचदा होतं, नाही? एखादा/दी, आपणावर विनाकारण इमोशनल अत्याचार करत अशी काही स्टोरी बनवतं की आपण काही फार मोठा गुन्हा केला आहे. आपल्याला काही कारण नसताना दोषी ठरवून पाश्चातापाच्या कटघर्यात उभं राहायला भाग पडतात आणि अत्यंत काहीतरी पुचाट कैफियत हिरीरीने मांडत असतात. 

झालं आहे असं की स्वतःवर काम करता करता स्वतःच्या वागण्याबद्दलची थॉट प्रोसेस इतकी क्लिअर झाली आहे की कुठल्याही संबंधाला, मग ते एम्प्लॉयर-एम्प्लॉयी असो, की कस्टमर-सप्लायर हे प्रोफेशनल रिलेशन्स अथवा मैत्रीचं, नात्यातील (अगदी आई मुलाचं) हे पर्सनल रिलेशन्स , सांभाळताना माझ्याकडून पूर्ण न्याय माझ्या बाजूने दिला जाईल अशी जीवनप्रणाली बनली आहे. 

थोडक्यात सांगायचं आहे की आता पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स मेंटेन करत मी सुद्धा ३०/३२ वर्षे व्यतीत केली आहेत. कळत्या वयापासून हटवादीपणा, मानापमान, तिरस्कार,  स्वार्थ या सगळ्यांपासून दूर राहायचा प्रयत्न केला आहे. या तीन दशकात कुणाला पैशाला फसवलं नाही, जाणून बुजून कुणाला थर्ड लावला नाही, एखादं काम अंगावर घेतलं तर त्याच्या रिटर्न्स ची फारशी अपेक्षा न ठेवता ते पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, कुणाचा ठरवून अपमान केला नाही, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून फारसं कधी खोटं बोललो नाही. असं असताना काही वर्षांपूर्वी पर्यंत लोकांच्या कैफयतीना मी सिरियसली घ्यायचो आणि बिनकामाच्या गिल्टपायी विनाकारण तळमळत बसायचो. 

आता मात्र गेल्या पाच वर्षात बराच बदललो आहे. फॉर गुड. एव्हाना खात्री आहे की आपली बाजू खणखणीत आहे. हे मानण्यात माज नव्हे तर स्वतःवरचा विश्वास आहे. आतापर्यंत जो जगण्याचा मार्ग निवडला आहे त्याचं ते फलित आहे. या सगळ्यांचा, गर्व नव्हे, पण अभिमान नक्की आहे. 


a1

Tuesday, 3 August 2021

भारी रविवार

 लाईफ पण सध्या इतकं धाकड झालं आहे की चांगलं वाटून घ्यायला आजकाल फार लांब जावं लागत नाही. ही मंडळी आजूबाजूला बागडत असतात. 

काल रविवारी, राहुल करूरकरांबरोबर तरुणाईच्या संवादाचं शेवटचं सेशन होतं. कंपनीतूनच ऑनलाईन बोलत होतो. नवीन काम अथवा व्यवसाय चालू करताना इंडस्ट्रीच्या अपेक्षा काय असतात यावर बोलत होतो. पहिलाच मुद्दा होता, घेतलेल्या कामाची १००% जबाबदारी घेणे. त्याचं उदाहरण द्यायला मला फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीतील मनीषा ढमाले एकटी रविवार असून कंपनीत काम करत होती. तिच्याकडे कंपनी एमआयएस अपडेट करायचं काम आहे. ३१ जुलै ला शेवटचा दिवस असल्यामुळे तिला वेळ मिळाला नव्हता. तिला कुणीही न सांगता, ती एकटी फक्त ते काम पूर्ण करायला आली होती. 

"Leave legacy at workplace" हा बोलण्याचा मुद्दा होता. कामाच्या ठिकाणी आपली छाप सोडणे हे फक्त टॉप मॅनेजमेंट च्या लोकांचं काम आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. आमच्या इथे मॅनेजमेन्ट टीम चांगली तयार होतेच आहे, पण अशी छाप कुणी अगदी हेल्पर पण पाडू शकतो. हे शोधण्यासाठी मला परत फार लांब जावं लागलं नाही. आमच्या कंपनीत सध्या कुणी अशी छाप पाडत असेल तर तो म्हणजे आमचा हेल्पर बाबू. काल तो ही कंपनीत आला होता आणि त्याची जी कामं नव्हती ती पण कुणीही न सांगता करण्यासाठी तो रविवारी आला होता. त्याचीही ओळख तरुणाईला करून दिली. 

सेमिनार संपवून घरी आलो. तर व्हाट्स अप वर प्रियांका डंक कुलकर्णी ची स्टोरी होती. प्रियांका म्हणजे माझी सख्खी मामेबहिण. तिच्या खडतर प्रवासाचा मी पण साक्षीदार आहे. हा लेख तिच्या इंजिनियरिंग च्या सरांनी लिहिला आहे. त्याआधी मी का नाही लिहिला याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की वाचा. 

लेखाची लिंक 

https://www.ravindrajoshi.com/2021/07/blog-post_31.html?m=1

आणि शेवटचा फोटो आहे, कलाम सरांनी पत्राची पोच दिल्याचा. त्यांची पुण्यतिथी होती त्यादिवशी तो फोटो मेमरीत दिसला. लिंक्ड इन वर टाकला. तिथलं अल्गोरिदम कळत नाही. ३ लाख लोकांनी ते पत्र पाहिलं. हजारो लोकांनी प्रोफाइल व्ह्यू केलं. प्रोफेशनल मीडिया नीट वापरला तर कंपनीचा ब्रँड कसा तयार होतो त्याची झलक. 

(दुसर्याबद्दल लिहिता लिहिता शेवटी मंडलिकांनी स्वतःची लाल केलीच असं जर कुणाला वाटत असेल तर..........ते बरोबर आहे. त्याबाबत आपण हयगय करत नाही)