Thursday 25 September 2014

मंगळ यानाच्या निमित्ताने

भावांनो, आधीच सांगतो ते मंगळावर यान गेल्यावर काय मिळणार, त्याचा फायदा काय याबाबतीत आपल्याला काही म्हणजे काहीच माहित नाही. पण विज्ञानाच्या दृष्टीने काहीतरी भन्नाट झालंय हे नक्की. मुलभूत संशोधनाला पण महत्व प्राप्त झाले हे पाहून, ऐकून आनंद झाला.

पण आपण असे भारी कि तिथंही वाद प्रतिवाद झाले. काहींच्या तर वाटेला न जाण्या इतके तकलादू मुद्दे होते, पण एक वाद वाचला. एक ज्येष्ठ फेसबुक मित्र यांनी टाटा अंबानी याचं नाव घेऊन विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल लिहिलं. झालं, एकमेकांची अक्कल निघाली, शेलक्या शिव्या झाल्या. काहींना टाटा नाव लिहिलं म्हणून मिरच्या लागल्या तर अंबानींच नाव लिहिलं म्हणून उकळ्या फुटल्या. माझ्या मते त्यांना संशोधनाबद्दल म्हणायचं होतं. तर मला नाही वाटत आपल्या इथे कुठल्याही गोष्टीवर मुलभूत संशोधन होतं म्हणून. अर्थात अपवाद असतात. पण जगाच्या मानाने एकंदरीत कमीच. आणि ही आजची गोष्ट नाही हो. सांगा बरं गेल्या ६००-७०० वर्षात भारतात काय शोध लागले हो. तर आठवावे लागतील. "विज्ञान जिथे संपते, तिथे अध्यात्म सुरु होते" असलं काहीतरी वाक्य टाकून विज्ञानाधिष्ठित ज्ञानाची बोळवण आपण कित्येक शतकं करत आलो आहे. विज्ञान किंवा संशोधन हा विषय निघाला कि आपण लागलीच ४-५ हजार वर्ष मागे जाऊन "पुष्पक विमान" "बाण म्हणजे क्षेपणास्त्र" "शुन्य आम्ही दिला जगाला" असली काहीतरी इतिहासाला कुरवाळणारी वाक्यं फेकत असतो. मध्ये तर सॉलिड ऐकलं "ते वानारसेनेचा फुगलेलं तोंड म्हणजे oxygen चा मास्क आहे आणि मागचा बाणाचा भाता म्हणजे सिलिंडर" शिशुपालाच्या मागे लागलेलं सुदर्शन चक्र म्हणजे drone attack. मेलो हसून. ते बत्रा काय बकले "कौरवांचा जन्म stem cell technology तून झाला म्हणे. मेडिकल विषय निघाला कि आपली गाडी थेट चरक, सुश्रुत नाही तर भृगु ऋषीपर्यंत जाऊन थांबते. नाही म्हणजे असेलही कदाचित पण त्याचं किती कौतुक. आत्ता काय ते बोला ना दादा. च्यायला १५० वर्षापूर्वीच्या आपल्या खापर पणजोबाचा नाव नाही आठवत आपल्याला आणि कुठे या ५००० वर्षापूर्वीच्या गोष्टींची ऐट झोडायची.

हि ISRO, NCL, TIFR, TISS, IIT, Dr Reddy किंवा Ranbaxy आणि काही बोटावर मोजण्या इतक्या संस्थेत संशोधन चालतं हो. बाकी आनंद आहे. कुठेतरी develop झालेल्या गोष्टी एकत्र करून त्याला commercial apply करून लोकाभिमुख करणे हे उद्योजकाचं काम. आणि ते टाटा, अंबानी, बिर्ला आणि अनंत उदयोजक इमाने ऐतबारे करत आले आहेत. आणि त्यात काही चुकीचं नाही आहे. ते लागणारच. हो, नुसतं संशोधन करत बसले आणि त्याचा मानवजातीला काही उपयोग नाही तर काय चाटायच ते संशोधन. अहो हि छाती दडपवणारी श्रीमंती दाखवणारी आणि वीस बावीस वर्षाच्या पोरात २५००० रु खूळखूळवणारी भारतातली  IT Industry, काय basic research होतं हो तिथे. Microsoft, Intel, Google, Cisco, Oracle   सारख्या कंपन्या संशोधनाचं काम करत असाव्यात आणि ते जगापुढे आणण्याचा काम Infosys, TCS, Wipro करत असाव्यात असं मला पामराला वाटतं.

जर्मनीत एक Fraunhofer Institute म्हणून भन्नाट प्रकार आहे. Private industry आणि जर्मन govt मिळून basic research तिथे sponsor होतं. लागलीच आठवेल तर MP ३ कि pendrive त्याचं बाळ आहे. आमच्या मशीन टूल मधील तर अनेक development तिथे होतात आणि मग जी sponsor कंपनी आहे ती commercialize करते. उगाच नाही जर्मन मशिन्स बघून आपण तोंडात बोटं घालत. इनमिन महाराष्ट्रा एवढया देशात तब्बल २६ Fraunhofer Institutes आहेत.

२०१० ला मिशिगन युनिवर्सिटी त जायचा सुदैवी योग आला होता. प्रोफ मुझुमदार यांना भेटलो होतो. ते additive manufacturing या विषयावर संशोधन करत होते. म्हणजे थोडक्यात सांगतो. आपण बहुतेक machined पार्टस हे material removal पद्धतीने बनवतो. बार असतो, त्याला turning, मिलिंग असे ऑपरेशन करून पार्ट तयार होतो. त्या ऐवजी इथे direct मटेरीअल add करत जायचं लेसर सोर्स नि आणि पार्ट तयार करायचा. सांगायची गम्मत म्हणजे युनिवर्सिटी ने त्यांना परवानगी दिली होती कि बाहेर कंपनी काढा आणि या संशोधनाचं commercialization करा म्हणून.

Research आणि तिथंच त्याचं commercial application अशी उदाहरणं आपल्या देशात असतीलही कदाचित पण जरा विरळ.

तेव्हा मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनाला लोकाभिमुख स्वरूप देण्याचं काम उदयोजक करतो आणि ते भारतात उदंड आहेत, ते मग काही ठिकाणी विकत घेतात, कधी मिळालेल्या संशोधनाला expand करतात तर कधी reverse engineering (याला प्राकृत भाषेत चोरी म्हणतात) करतात. पण मुलभूत संशोधक मात्र जगाच्या मानाने कमी. पण त्यात वाईट वाटण्यासारख काही नाही कारण ती कित्येक शतकाची pathology आहे. तेव्हा ह्या rare जमातीपैकी काहींनी मिळून मंगळ यान पोहोचवलंय तेव्हा त्यांचं खुल्या मनानं अभिनंदन करू यात. त्याच्यावर कुठे वाद घालायचे. वाद घालण्यासाठी आपले आवडते विषय आहेत कि, जात आहे, धर्म आहे, राजकारण आहे. "नाहीतर लिहितो "सावरकर हे द्रष्टे नेते होते" चला, चघळू कि ते मजेत.

(सदर लेखाचे लेखक हे अतिशय झिन्गुर असे  उदयोजक आहेत आणि त्यांनी हा लेख अभ्यास न करता फक्त स्वानुभवावर लिहिला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. उद्योजकांना संशोधक संबोधून त्यांच्या पोटावर पाय देण्याचा आणि संशोधकांच्या मेंदूला हीन लेखण्याचा प्रयत्न त्यांना सहन न झाल्यामुळे पोटतिडकी पायी हा लेख पडला आहे. चूभू देघे)



 मंगळ यानाच्या निमित्ताने

No comments:

Post a Comment