Tuesday 3 February 2015

फिरता फिरता

खरंतर एक डिप्लोमा सोडला, तर माझ्या आयुष्यातील पुढची प्रत्येक गोष्ट अपघातानेच झाली आहे. बी ई होणं, मग एसकेएफ ची नोकरी, धंद्यात पडणं. त्या न्यायाने सामनाचा स्तंभलेखक ही अपघातानेच झालो. तन्वीरभाई ने ब्लॉग वाचणे आणि प्रसाद पोतदारांना कळवणे, मग फोन आणि मग केले सात महिने शनिवारी लेख. निव्वळ स्वप्नातीत. कारण लौकिकार्थाने मी काही लेखक नाही. किंबहुना दोन वर्षापूर्वी जर कुणी मला म्हणाला असता की २०१४ साली तुझे लेख पेपरमधे छापून येणार आहेत, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. एका मुंबईवारीत अनाहूत पणे मी एक लेख लिहीतो काय, आणि मग तो सिलसिला चालू झाला. सुदैवाने प्रसादसरांना ते छापण्यायोग्य वाटले हे नशीब. कारण त्या लिहीण्याचं साहित्यिकमूल्य काय याबद्दल मी साशंक होतो, आणि होतो का, आजही आहे.

मला बरेच जणं विचारतात की तु का लिहीतोस? (का आमच्या डोक्याला ताप देतोस). तुला प्रसिद्ध व्हायचं का, असाही प्रश्न आला. तर नाही मित्रांनो, मला प्रसिद्ध करायला माझा धंदा पुरेसा आहे. माझ्या कंपनीचं नाव भारतात काना कोपर्यात पोहोचलं आहे. आत्मप्रौढी वाटेल, पण जगात पोहोचलं आहे अन पर्यायाने त्यामुळे माझंही. पण मग हा बिझीनेस करताना येणारे ताणतणाव, यातून सुटका तर व्हायला पाहिजे. सगळे प्रयत्न केले. स्विमींग, वाचन, ट्रेकिंग, कविता पाठ करणे, चित्रपट पहाणे, इत्यादि. त्या विचारांने रात्रभर तळमळायचो. मानसिक त्रास व्हायचा अन काय काय. पण कंपनीतले प्रॉब्लेम्स मला विसरायला लावले ते या ब्लॉग लिहीण्याच्या सवयीने. आणि या ब्लॉग ला मोठा कँनव्हास दिला सामनाने. एक सुहृद तर मला म्हणालेही "या लिखाणावर तुमचा प्रपंच चालत नाही" रूढार्थाने चालत नसेलही तो. पण जर लिहीणं ही सवय जर मला माझ्या भौतिक जगापासून दुर नेऊन आत्मिक समाधान देत असेल तर माझा प्रपंच चालवण्यात ते मदत करतं असं मला वाटतं.

आणि दुसरं असं की बिझीनेसमधे पडलेली आमच्या कुटुंबाची पहिली जनरेशन. अगदी खिशात काही पैसे नसताना धंदा चालू केला. यात काही फार कौतुक नाही. बर्याच बिझीनेस ची मूहुर्तमेढ अशीच होते. पण जी नवीन मंडळी बिझीनेस मधे जाऊ इच्छितात, त्यांच्या हे लक्षात येईल की ही एकदम नॉर्मल प्रोसेस आहे अन त्यामुळे पैसे नाहीत म्हणून धंद्यात पडायचं नाही किंवा प्रॉब्लेम आले तर धंदाच बंद करायचा असं करू नये अशी एक प्रामाणिक इच्छा होती. आणि हो, मागे एका लेखात लिहील्याप्रमाणे नोकरी करणार्या लोकांबद्दलही माझ्या मनात अतीव आदर आहे. माणसाची उद्यमशीलता ही नोकरीतही क़ायम राहू शकते आणि त्यातूनही अचाट कर्तृत्व घडतात यावर माझा दृढ़ विश्वास आहे.

हे माझे जे काही तुटकेफुटके अनुभव आहेत, त्यामुळे एखाद्याला उमेद मिळत असेल तर त्याच्या इतका आनंदाचा क्षण दुसरा नाही. वानगीदाखल एक मेसेज देतो

 " मी लहानसा software व्यावसायिक आहे. गेल्या दहा वर्षात प्रचंड चढ उतार अनुभवलेत . रू ८ कोटी वार्षिक उलाढाल पर्यंत पोहचून परत प्रचंड  अपयश हि पाहतोय. अनेक professional motivation आणि managment सेमीनार्स ,पुस्तके , चिंतन , psychiatrist  सगळे झाले. पण तुमच्या साध्या सरळ अनुभव सिध्द लिखाणाने जितक बळ मिळालं तितक कशानेच नाही मिळाल ! धन्यवाद ! नाही तर शेतकरया सारखी उद्योकाकाची आत्महत्या का असू  नये ..असे  विचार भुंगा करीत डोके कुरतडत असतात. अर्थातच मी इतका दुर्बल नाहीच !पण थकतो हे मात्र खर !
कुठल्याही व्यावसायिक ,अथवा आर्थिक लालसे शिवाय एकदा तुम्हाला भेटुन  , बोलून स्वतः ला अधिक channelised करता येईल असे वाटतंय. कारण आज सर्वाधिक गरज आहे ती एका freind, philosopher आणि guide ची . आपण थोडा वेळ दिलात तर आनंद होईल. धन्यवाद !"

आता थांबतो. कोणताही निरोप घेताना मी कातर होतो, तसाच आताही झालो आहे. अनेक अनुभव तुमच्याबरोबर शेयर केले, तुम्हाला आवडले. मजा आली. कुणीतरी ढकललं म्हणून यात पडलो. आता परत काठाने चालत राहिल. कुणी सांगावं, परत कुणी तन्वीरभाई येईल, प्रसाद येईल अन ढकलेलही पुन्हा एकदा भेटण्यासाठी............फिरता फिरता

No comments:

Post a Comment