Sunday 8 February 2015

संभ्रमिष्ट


परवा माझे एक जवळचे मित्र म्हणाले  की या स्पिंडलवाल्याकडे काही अजेंडा नाही. बहुधा राजकीय विषयावरचा लिहायला विसरले ते. कारण माझ्या जगण्याचा अजेंडा स्पिंडलवाला या नावातच दडलेला आहे. स्पिंडल. हां, राजकीय मतावर अजेंडा नाही हे मात्र खरं बर का! तिथे म्हणजे फुल तो संभ्रमित. हो, म्हणजे का असू नये संभ्रमित.

 ज्या निधर्मीवादाची कास कॉंग्रेसने धरली त्याला सर्वधर्मसमभाव असं गोंडस च्युत्या नाव देऊन पुर्ण संकल्पनेला तिलांजली दिली. गेल्या दशकात मनमोहनसिंग सारखा मोहरा घराणेशाही पायी वाया घालवला. देशाची प्रगती हाडकवली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी. त्याचे सर्वेसर्वा एकेकाळी प्रोग्रेसिव्ह विचाराचे. पण साठी आली आणि पक्षाची बुद्धी नाठी झाली. अनिर्बंध भ्रष्टाचार केला. गुंडगिरी केली. या दोघांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली जातीपातीचे अन धर्माचे राजकारण केले. कटूता वाढवली.

त्यानंतर आला भाजप. हिंदूधर्माचे पुरस्कर्ते. मोदींचा उदय होण्यापूर्वी काय हास्यास्पद पद्धती त्यांची. मोदींनी ओळखलं की हे राममंदिर वैगेरे काही कामाचं नाही भो. त्यांनी स्वत: विकासाचा नारा दिला अन बाकीची मंडळी सोडली बडबड करायला. कामात Surgical precision असलेला संघ सरकारच्या आडून बाण सोडू लागले. शंकराचार्यांना अचानक वाचा फुटली. कुणी चार काढा बोललं तर कुणी दहा. विकासाचं वेष्टन गुंडाळलेल्या बाटलीत धर्मांधता ठासून भरलेली नाही आहे असा विश्वास देण्यात ते तरी अपयशी ठरले आहेत. खरंतर सर्व विकसित देश एकधर्मांकित आहेत हे वास्तव असलं तरी ते आपलं नाही ही मानसिकता या लोकांच्या मनात नाही आहे.  ज्या माथेफिरूने महात्म्याच्या केलेल्या  खुनामुळे कलंक लागला, राजकारणाची उलथापालथ झाली त्याचं स्मारक पुलाच्या रुपाने राजस्थानात उभं राहतंय हे कशाचं द्योतक आहे.

आणि राहता राहिला आप, ज्याचा उल्लेख केल्यामुळे माझा अजेंडा निघाला. Rise- fall- rise of Kejriwal. केवळ वर्षापूर्वी अपरिपक्वतेचं दर्शन करत स्वत:चं हसं करून घेतलेला आयआयटीयन. कँप्टन गोपीनाथपासून ते मेधा पाटकर पर्यंत ४२३ लोकांचं डिपॉझिट जप्त करवलेला, पाण्याची खोली दोन्ही पायाने चेक करण्याची महाचूक करत गंटांगाळ्या खाणारा. पण उभा राहिला सगळ्यांना टक्कर देत. महा संभ्रमित.

प्रश्न हा आहे कि कॉंग्रेस, बीजेपी सारख्या पक्षाचं आंधळं समर्थन किंवा विरोध करायचा  कि आप सारख्या पक्षाकडे आस लावून संभ्रमिष्ट व्हायचं. अवघड choice आहे. पण आप पक्षाची बांधणी ही भ्रष्टाचार हा शिष्टाचार  न मानणाऱ्या लोकांनी केली आहे हा एक भाग. जातीपातीपासून अजून तरी दूर आहे. बाकी राहिले संत, महंत, बाबा, धर्म, अधर्म हे आप च्या आजू बाजूलाही फिरकत नाही आहे. त्यांच्या झेंड्याला रंग नाही आहे, किंबहुना तिरंग्याशिवाय त्यांचा झेंडाच नाही आहे.

आप चं हे संभ्रमित स्टेटस च माझ्यासारख्या ला त्यांच्याकडे आकर्षित करत असावं.





No comments:

Post a Comment