Saturday 10 October 2015

साध्या माणसाची साधी प्रेमकहाणी भाग 2

धडधडतं हृदय सांभाळत राम लेडीज हॉस्टेल ला पोहोचला. लाजत, मुरकत चंदेरी उभीच होती. खाली मान घालून ती हळूच "हो" म्हणाली. राम्याच्या मनात उधाण माजलं.

आणि मग तो प्रेमाचा सिलसिला चालू झाला. सारस बाग, चतुश्रुंगी, पाषाण लेक, बनेश्वर, युनिवर्सिटी अशा अनेक जागा त्यांच्यातील गुजगोष्टीच्या साक्षीदार झाल्या. नाही म्हणायला दोघे फिरायचे, पण रमायचे ग्रुप मध्ये. एकतर बीजे ची मंडळी नाही तर शाळेची ग्यांग.

दोघे असतील तेव्हा अशी हॉटेलं निवडून काढायचे की जिथे शांतता असेल. गप्पा छाटता येतील. अशा हॉटेल मधील वेटर पण ओळखीचे झाले होते. Law कॉलेज रोड ला आशियाना नावाचं हॉटेल होतं. तिथल्या वेटर ला ऑर्डर ही दयावी लागायची नाही. न सांगता तो प्रत्येक गोष्ट उशीरा आणायचा. बिल ही. बाय म्हणताना हसायचा.

८९ ला रामचं बजाज औरंगाबाद ला सिलेक्शन झालं होतं. १३ जण जॉईन व्हायला गेले. १२ जण सिलेक्ट झाले, राम्याची दांडी उडाली, मेडिकल मध्ये. हाय बीपी. आयला वयाच्या २१ व्या वर्षी हाय बीपी?. रम्याला पुण्यात नोकरी मिळाली. इकडे चंदेरी pathology मध्ये गचकली. तो दुसर्यांदा दिल्यामुळे एमडी ती patho मधेच झाली. बहुतेक विधिलिखित असावं. राम्याने पुण्यात रहावं असं चंदेरीला मनातून वाटत असावं अन अभियंता असलेल्या राम्याला क्लिनिकल ब्रांच असलेली साथी झेपली नसती असं देवाला वाटलं असावं.

राम आणि चंदेरी आता खूप फिरू लागले. वेगवेगळे ट्रेक, शिरूर च्या पी एच सी ला जा. तळेगावला चंदेरीची इंटर्नशिप होती. राम लोकल ने जायचा. रात्री बेरात्री परत यायचा. हे असं सगळं असल्यावर घरी तर कुणकुण लागणारच. राम्याने तर घरात खडा टाकून ठेवला होता.

थोडी गडबड उडाली चंदेरीच्या घरी. म्हणजे जेवताना चुकून  हिरवी मिरची खाल्ल्यावर पाणी पिण्यासाठी जितकी उडते तितकीच. टापटिपीच्या चंदेरीने अजागळ अशा राम्याला जीवनसाथी म्हणून निवडलं होतं. प्रेम आंधळं असतं या म्हणीचा चंदेरीच्या घरच्यांना प्रत्यय आला.

१८ ऑगस्ट ९१ ला राम आणि चंदेरीचा साखरपुडा झाला. अन २१ ऑगस्ट ला, राम्याच्या ध्यानी मनी नसताना कंपनीत कन्फर्मेशन चं लेटर मिळालं. त्याच्या प्रस्तावित तारखेपेक्षा १३ महिने आधी. चंदेरी सारख्या गुणी आणि सालस मुलीच्या गळ्यात धोंडा पडताना तिच्या आयुष्यात थोडा उजेड असावा याची विधात्याने तरतूद केली.

२ डिसेंबर १९९१ ला राम आणि चंदेरी बंधनात अडकले. "लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या आ आ " हे गाणं जणू त्याच्यासाठी बनवलं असं रामला वाटू लागलं. अजूनही वाटतं.

 राम आणि चंदेरी गेली २४ वर्ष दररोजच्या आयुष्यात नवनवीन प्रेमकहाण्या रचत आहेत.

चंदेरी जणू रामचं वैभव आहे


No comments:

Post a Comment