Tuesday 6 October 2015

गोवा

कुटुंबाबरोबर फिरायला गेलो की बोलताना ज्या गमती जमती होतात, त्या नंतर ही कधी आठवल्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलल्याशिवाय राहत नाही.

मला दोन मुलं. एक यश आणि नील. यश अबोल तर नील बोलबच्चन. मूड असेल तर यश बोलतोही. त्यातल्या त्यात नील नाही तर मग वैभवी असेल तर पठ्या खुलतो. नील मात्र कधीही सुटलेला असतो.

३ ऑक्टोबर ला असंच आम्ही चौघेही निघालो. परत तीच कथा. मागे वैभवी अन दोन पोरं. दंगा घालताहेत. अन समोर मी ड्रायव्हर च्या शेजारी. तोंड थिजवून बसलेला. जणू काही सगळ्या जगाचं ओझं माझ्याच डोक्यावर आहे. डोक्यात नाना तऱ्हेचे विचार पण कान मात्र मागच्या सीटवर. आश्चर्य करत बसलेलो, वैभवी इतकं छोटया गोष्टीत मी का आनंदी राहू नाही शकत. असो. ते जाऊ दया. नेहमीचं रडगाणं आहे ते.

तर सांगत होतो की, गोव्याचा विषय निघाला. कोण कितीवेळा गेलं आहे ते. नील म्हणाला "मी तीन वेळा गेलो आहे." यश म्हणाला "हो मी बहुतेक तीन वेळा गेलो" वैभवी म्हणाली "मी पाच वेळा गेले आहे. आणि पप्पा तर किती वेळा गेलेत काय माहित?"

हे ऐकल्यावर नील म्हणाला "मम्मी, पण माझ्यापेक्षा दोन वेळा जास्त तु कधी गेलीस?"

"अरे एकदा तु बॉर्न नव्हता झालास"

"अच्छा, आणि अजून एकदा कधी"

"तेव्हा मी आणि पप्पा दोघेच गेलो होतो. तु आणि दादू दोघंही बॉर्न नव्हते झाले" इति वैभवी.

दोन सेकंदातच, डोळ्यातील बुब्बुळं गरागरा फिरवत चेहर्यावर मिश्कील भाव आणत नील वदला

"ओहो, म्हणजे तुम्ही दोघेजण हनीमूनला गोव्याला गेला होता का?"

हो, असं वैभवी म्हणाली.

इथे मात्र थिजलेला मी सावध झालो आणि सोलापूर रस्त्यावरची शेती, उस याबद्दलची माहिती नीलला सांगू लागलो. नाहीतर विषय चालू राहिला असता आणि हे आमचे कनिष्ठ चिरंजीव वदले असते

"मग त्यावेळेस तुम्ही दोघं गोव्यात फिरले की नाही. की रूममधेच होते चारही दिवस"

आजकालच्या पोरांचं काही सांगता येत नाही हो. चापलूस लेकाचे.

No comments:

Post a Comment