Sunday 25 October 2015

Insatiable People

लोकांना खुश ठेवणं ही एक अवघड कला आहे. मागणं, मग ते जास्त किंवा कमी, हे प्रत्येकाच्या स्वभावात असतं. त्यातला त्यात काही मंडळी अशी असतात की त्यांना सतत आपल्याकडून काहीतरी हवे असते. ते कधीही खुश नसतात.

कोण आहेत अशी लोकं? तर ग्राहक, साहेब किंवा मालक, पालक म्हणजे आई वडील, शिक्षक आणि शेवटचं, हे म्हणजे जरा controversial आहे, आणि ते म्हणजे पत्नी. 

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, ही  मंडळी तुमच्या कडून सातत्याने अजून चांगलं करण्याची अपेक्षा बाळगून असतात. आणि अपेक्षाच का, तर ते तुम्हाला सतत excellence achieve करण्यासाठी तुमच्या पाठी असतात. स्वत:चा विकास वा,  excellence हे काय साध्य नव्हे तर ते तात्विक आहे. जीवनप्रणाली आहे. कुणीही १००% परफेक्ट असू नाही शकत. त्यामुळे ही मंडळी सतत तुम्हाला तुमच्यातल्या अवगुणांची आणि तुम्ही अजून कसं चांगलं करू शकता याची आठवण करून देत असतात. तुमची हयगय न करता. 

साधारणपणे हे असं घडतं. ही लोकं तुमच्या साठी एक साध्य, म्हणजे goal, ठरवतात. आणि मग ते साध्य गाठण्याची विनंतीवजा आज्ञा देतात. (हे जसेच्या तसे घ्यावे, विनंती वजा आज्ञा. विनंती त्यात नसतेच). तुम्ही पेटून कामाला लागता, आणि आश्चर्यकारक रित्या ते साध्य गाठता. तुम्ही चार बोटं हवेत चालता. आणि त्याचवेळेस हे असमाधानी लोक, तुम्हाला सांगतात "ठीक आहे, हे तुला जमलं, पण हेच काम तू चांगल्या पद्धतीने करू शकत होतास." 

पाठीवर शाबासकी ची थाप पडावी म्हणून मी सारं आयुष्य वाट बघितली. आज माझं वय ५८ आहे, पण अजून वाट बघतोच आहे. These are the people who kept moving the goal posts, further away from me, whenever I reach them.

ग्राहक, हा जो तुम्हाला कामाचा मोबदला देतो तेव्हा तो किंमत मात्र जास्त वसूल करतो. यालाच म्यानेजमेंट च्या भाषेत value for money संबोधित असावेत. त्या value ला काही वरची पातळी असते का? तर नाही. भक्कम, टिकाऊ, जास्त, जोमदार हे सगळं कस्टमर ला हवं असतं, पण ते ही अत्यंत किमती दरात. परत हे सगळं लवकर आणि हा व्यवहार होताना तुम्ही मात्र त्याच्याशी शांत पणे बोलायचं, चिडायचं नाही. गमतीची गोष्ट ही कि कस्टमर ला हा त्याचा हक्क वाटतो.

मालक किंवा साहेब. हे तज्ञ, विद्वान. या मंडळीना पृथ्वीवरच सगळं माहिती असतं. ते पगार देतात तेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या हाताखालचे काम करणारे हे त्यांनी जणू विकत घेतले आहेत. कंपनीतल्या लोकांसमोर नवनवीन आव्हानं ते टाकत असतात त्यामागचं खरं कारण हे असावं की त्यांनाच माहित नसतं, त्यांना काय हवं असतं. यातल्या काही जणांना जन्मत: च लोकांवर हुकुम गाजवणे येत असावे, काही जण हा अवगुण आत्मसात करतात. बरेच मालक लोकं हे खरं तर बावळट असतात पण त्यांच्या हातात सत्ता असते आणि त्यापुढे त्यांचा मूर्खपणा झाकोळला जातो. बऱ्याच ज्युनियर लोकांना त्यांच्या साहेबाबद्दल वाटत असतं "आयला हे बेणं इतकं येडपट आहे तरीही देव याच्यावर इतका मेहेरबान का आहे."

ह्या साहेब मंडळीना रिझल्ट तर दाखवायचा असतो. त्यांच्या पेक्षा हुशार सब ओर्डीनेट मिळाले की यांच्या झोपा उडतात, 'अरे तो आपल्यापेक्षा पुढे जाईल की काय" या विचाराने. नाहीतर मग या मालक मंडळींच्या आजूबाजूला "होयबा" ग्यांग असते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, हे मालक किंवा साहेब नावाची जमात नेहमी कावलेली असते.

(७२% लोकं, साहेब चांगला नसल्यामुळे जॉब बदलतात)

पालक आपली अधुरी स्वप्ने मुलांनी पूर्ण करावीत ही अपेक्षा ठेवून असतात. मुलांवर काही पालक इन्वेस्टमेंट म्हणून खर्च करतात. आणि मग त्यांच्याकडून रिटर्न्सची, मग ते सोशल behavior असो की खरेखुरे आर्थिक रिटर्न्स असो, अपेक्षा ठेवतात.

आई वडील आपल्या मुलांवर इतकं  प्रेम करतात की ते मुलांसाठी काहीही करू शकतात, पण भावना हीच की मुलांनी आपण सांगितलं तसं राहिलं पाहिजे. खलिल जिब्रान चं एक मस्त वाक्य आहे "मुलं भले तुमच्या मुळे जन्माला येत असतील, म्हणून तुमचा त्यांच्यावर हक्क आहे असं समजू नका."

चांगले आणि खराब असे दोन्ही प्रकारचे  शिक्षक असतात. चांगला शिक्षक हा नेहमी असमाधानी असतो. त्यांच्या विद्यार्थाने अजून चांगलं परफॉर्म केलं पाहिजे असं शिक्षकाला सतत वाटत राहतं. मग ते परीक्षेत असो वा  जीवनात. शिक्षकाचे असमाधान मात्र हे पवित्र आणि शुद्ध असते. त्यांचे असमाधानी असणे हे आपल्याला हवेहवेसे वाटते.

शेवटची क्याटेगरी म्हणजे पत्नी. अत्यंत हुशार आणि ग्रेट माणसांना बायकोच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकात दम येतो. बऱ्याचदा बायकोला काय हवं आहे हेच माणसाला कळत नसतं. बऱ्याच वेळा पत्नीला असं वाटत राहतं की आपल्या माणसाने यशस्वी व्हावं. पण त्यासाठी काय पापड बेलावे लागतात हे त्यांना कळत नाही. आणि मग ती सारखं त्याच्या मागे लकडा लावते "हे करा, ते करा. तिचा नवरा असं काम करतो. तुम्हाला काही करायलाच नको. हात पाय हलवायला नको ब्लाह  ब्ला" बऱ्याचदा यातून काही घडत नाही.

मी तर म्हणतो समाजात स्त्रियांपेक्षा जास्त यशस्वी पुरुष दिसतात याचं महत्वाचं एक कारण हे ही असावं की बायकांना पत्नी नसते.

ही  असमाधानी मंडळी आपल्या कडून काम करून घेतात  कधी सकारात्मक तर कधी हात पिरगळून. यांची चूक ही  असते की आपल्यावर हे मालकी हक्क गाजवतात. तुमची एखादया वस्तूवर मालकी असते पण व्यक्तीवर नाही. अगदी गुलामाचं उदाहरण घेतलं तर तुमचे हुकुम त्याचं शरीर पाळत पण त्याच्या मनावर तुम्ही कधीच अधिराज्य गाजवू शकत नाही.

हा असा मालकी हक्क गाजवणं हे समोरच्या माणसाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखं आहे. काळाच्या कसोटीवर अशा माणसांच्या आयुष्यात अपयश दिसते.

याउपर जी लोकं आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास तयार करतात, त्यांच्यातल्या स्व ला ललकारतात त्यांच्याकडून दूरगामी परिणामकारक कार्य होते. Self motivated, proactive आणि contented लोकं ही यशस्वी असतात.

मी बऱ्याचदा या असमाधानी, सदैव मला टोकणार्या लोकांवर वैतागतो. पण खरं सांगू, ह्या लोकांना माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. मी आज जो आहे त्यामध्ये ह्या सगळ्या मंडळीचा हातभार नक्कीच आहे.

- Gurvinder Singh 



No comments:

Post a Comment