Saturday, 6 June 2015

पहिलं मराठी स्फुट

 फेसबुक वर नवीन होतो. मराठी कसं लिहावं हे नुकतंच कळलं होतं. ते कळल्यावर लिहिलेलं पहिलं मराठी स्फुट. दिनांक १६/१२/२०१२

धर्म, जातपात, प्रादेशिकता यांनी भारतीय राजकारण गेल्या काही वर्षापासून व्यापलेले आहे. प्रगती, विकास या शब्दांचे आपल्या राजकारणाला आणि समाजकारणाला जणू वावडेच आहे. रिटेल एफ डी आय ला विरोध आणू उर्जेला विरोध, पाणी पुरवठा सुरळीत करणाऱ्या धरणांना विरोध, असे एकूण विविध विरोधाचे पेवच फुटले आहे. खरं तर हीच धोरणे राबवून प्रगत राष्ट्रांची झलेली भरभराट बघून, आपण तेथील परदेशवारी झाली कि त्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो आणि भारतात परत आलो कि बाह्या सरसावून या धोरणांना विरोध करतो. कुठल्याही पक्षाचे असलेले " निर्नायकी " पण आणि त्यातून उभा राहिलेलं प्रादेशिकतावाद आणि प्रादेशिक पक्षांना निर्माण झालेले महत्व हे प्रगतीसाठी मारकच ठरत आहे. अर्थात यामध्ये राष्ट्रीय पक्षांची धोरणे हीच कारणीभूत आहेत. कॉंग्रेसने नक्कीच विकासाभूत धोरणे राबवली पण त्यावर आपल्या प्रचारात भर देण्यापेक्षा स्वतःच्या निधार्मिवादाची टिमकी वाजवली आणी एक निर्णय न घेणाऱ्या पक्षाची प्रतिमा गेल्या काही वर्षात तयार केली. भा ज प बद्दल तर बोलायलाच नको. वैचारिक व्यासपीठावर विरोध करण्या ऐवजी धार्मिक मुद्द्याला कुरवाळत बसण्यात त्यांनी धन्यता मानली आणि एका मोठ्या मध्यमवर्गाला वेगळ्याच रस्त्यावर नेउन ठेवले. यामध्ये तथाकथित नवश्रीमंत, आपल्याला कुठल्या धोरणामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे हे विसरून राष्ट्राला विकासापासून दूर नेणाऱ्या या पंथावर आपली बुद्धी सांडत राहिले. या दोन्ही पक्षांच्या विचित्र धोरणांमुळे अनेक प्रादेशिक पक्ष आणी हि नवीन आम आदमी पार्टी सारख्या पक्षांचा उदय नंतर भरभराट झाली. आणी भारतीय संविधानाच्या रचनेमुळे या सर्वांची मोट बांधून राज्यकर्त्यांना यु पी ए आणि एन डी ए सारख्या मोळी बांधाव्या लागल्या. पण या रचनेमुळे भारत हे राष्ट्र प्रचंड बौद्धिक क्षमता असूनसुद्धा प्रगती आणी विकासापासून वंचित राहिले. खरं तर जगामध्ये युरोप हे दखल घेण्याजोगे उत्तम उदाहरण आहे. वेगवेगळ्या संस्कृती असलेले २६-२७ देश एकत्र एका चालानाखाली येतात काय, आणि एकमेकांचा डोलारा सांभाळतात काय, सगळेच अनाकलनीय. विचार करा ग्रीस वा स्पेन सारखा देश या आर्थिक पडझडीत, जर्मनी आणि फ्रांस सारखे प्रगत राष्ट्रे नसती, तर पालापाचोळ्यासारखी उडली असती. आपल्या एक एक शहरांएवढी लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार असलेले हे देश, त्यांनी विचार केला कि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि आपल्या इथे संस्कृती एक आहे, एकत्रित बांधणारे संविधान आहे, चलन एक आहे. या ताकदीचा उपयोग करण्या ऐवजी प्रादेशिकता, भाषावाद, धार्मिक वाद यावर आपला वेळ आणी बुद्धी खर्च करून आपली वैचारिक दिवाळखोरी जगापुढे प्रकट करतो. अहो कुठल्या इस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीचा विचार करताय. बदल लेल्या जागतिक परिस्थितीमध्ये कुठलाही देश दुसर्या देशावर अधिसत्ता गाजवू शकत नाही. तसे असते तर आज अफगाणिस्तान, पाकिस्तान आणी इराक वर अमेरिकेची सत्ता नसती? अशा परिस्थितीमध्ये अंतर्देशीय गुंतवणूक होऊन आपल्यादेशाचे जर भले होत असेल, तर आपण गुलामगिरीकडे चाललो आहोत असा कंठशोष आपण का करत आहोत. तरी बरे इस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाकडेच आहे आणि टाटांनी जगात सर्वत्र आपले पाय पसरले आहेत. ज्या चीनची प्रगती आपण सगळेजण अचंबित नजरेने बघत आहोत, त्यामध्ये परकीय गुंतवणुकीचा सिंहाचा वाट हे सगळे जण जाणतात. आपण सगळ्यांनीच धर्माधिष्ठित समाजकारणा पेक्षा विकासाधीष्ठीत समाजकारण केले पाहिजे आणि आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्नच राजकारणाला सुद्धा वेगळे वळण देईल. यातूनच एक दिवस असा येईल कि कॉंग्रेस व भा ज पा सारखे राष्ट्रीय पक्ष आपल्या निधार्मावादाची वा धार्मिक विचारांची कास सोडून प्रगीतिक सामाजिक विचारप्रणालीचे दोर पकडतील आणि आपल्या देशाला विकासाच्या रस्त्यावर आणून ठेवतील अशी अशा वाटते.

ऑफीशियल भाट

चेन्नैत एक गेस्ट हाऊस रेंट आऊट केलं आहे. खरंतर भाड्याने घेतलं आहे असं म्हंटलं असतं तरी काही चुक नाही. पण भाड्या हा आत्मनिंदेंचा इतका कडक अविष्कार लिहायला कसं तरीच वाटलं. (अन गेस्ट हाऊस, हा हा. च्यामायला २५० स्क्वेअर फूटची खोली आहे. दोन पेक्षा जास्त लोकं राहिले तर एकमेकांना अंग घासेल इतकी लहान. लाल करा हो, पण किती?) असो.

पण आहे मात्र अगदी भारी वस्तीत. हो म्हणजे उच्चभ्रू की काय म्हणतात ना तशी. स्वच्छ बिल्डींग. भला मोठा टेरेस आहे बाजूलाच. एका किमीवर मरीना बीच आहे. ज्या गल्लीत आहे तिथे येतानाच मी एक भलं मोठं घर बघितलं, त्याला पुरूषभर उंचीची कंपाऊंड वॉल, बाहेर पोलीसच्या गाड्या. अन अशी समोरासमोर दोन घरं. अन तिथून चार पाच प्लॉट सोडले की आमची बिल्डींग. त्याच संध्याकाळी टेरेसवर भरार वारा खाता खाता मी प्रदीपला विचारलं "Who lives in those big houses?" तर तो म्हणाला "Subramaniam Swamy?" मी चपापलो.

(आता पुढचं संभाषण मराठीत) मी विचारलं "हा वारा आपल्या बिल्डींगकडून स्वामी साहेबांच्या घराकडे जातो की त्यांच्या घराकडून आपल्या घराकडे" तर तो म्हणाला "I don't know. But why are you asking this" मी काही बोललो नाही. आणि काय सांगायचं. हेच ना "आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" मग वार्याची दिशा नको बघायला?

(हे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" ह्या जुन्या प्रचलित किंवा "आधीच तर्कट, त्यात पद्य प्याला" या गजू तायडेंच्या नव प्रसारित म्हणीच्या चालीवर वाचावे)

 "आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" सॉलीड pun. म्हणजे ज्यांना मी येडपट वाटतो तेही खुश अन ज्यांना स्वामी साहेब हुशार वाटत नाहीत तेही खुश. (इतकी आत्मवंचना बरी वाटते.) असो.

अजून एक सांगायचं म्हणजे, तथाकथित उच्चभ्रू वस्तीतल्या कुंड्याही कचर्याने दिवसरात्र ओसंडून वाहत असतात. अगदी स्वच्छ इंडिया कल्पनेच्या उद्गात्यांचे ऑफीशियल भाट त्या गल्लीत राहत असतील तरीही.

million dollar question.

"Is man a blunder created by God or is God a blunder created by man?” - Friedrich Nietzsche.

आता हा फ्रेड्रिक कोण, मला माहित नाही. याचं मी बाकी साहित्य वाचलं का, तर नाही. हा WA चा फॉरवर्ड आहे का, तर नाही. एका मेल वर खाली लिहून आलं होतं. But isn't it million dollar question? असाच एक प्रश्न. Million dollar question. लिहायला पण मजा येते ना, मिलीयन डॉलर.!!

तसा माझा मित्रपरिवार मोठा. म्हणजे नाशिकचे ५-६ जण अन त्यांच्या फँमिली, औरंगाबादचे ८-९ मित्र, SKF चे २-३, वैभवीचे ६-७ मित्र अन त्यांच्या फँमिली, प्रोफेशनल मैत्रीतून झालेले ३-४ जण, शेजारपाजारातले २ जण. बाकी नातेवाईक पण बर्यापैक, १०० एक तरी. म्हणजे ज्याला घट्ट वैगेरे म्हणतो तसे. बाबांच्या तुलनेत हा गोतावळा छोटा पण आजच्या मापनात चांगलाच. असं असताना मी अशात आभासी जगातल्या खूप जणांना भेटलो. खर्डेघाशी गेट टुगेदर, गणेशच्या घरी प्रविण आणि सिंधूला, पंडित पॉटरला, कोल्हापूरात विनयला, पुण्यात मधुराला, बडोद्यात मुकुंदला, परवा पुण्यात संतोष, अतुल अन शिल्पाला.

माझे हे सगळे भेटीचे वृत्तांत ऐकून माझा मोठा मुलगा मला म्हणाला "What is that feeling which drives you to meet your friends of virtual world when you have many friends in real world?" Now that is million dollar question.

का भेटत असू आपण सगळे? आणि इतकं आवर्जून. म्हणजे माझे कित्येक जवळचे नातेवाईक आहेत ज्यांना मी बरेच दिवसात फोनही केला नाही. काही पुण्यात राहतात, त्यांना भेटलो नाही आहे. सासरची मंडळी ऑलरेडी ओरडतात आहे माझ्या नावाने, की हा फक्त लिहीतो, भेटलं तर याच्या तोंडातून शब्द फुटत नाही. मग काय आहे हे? हातचं सोडून पळत्याच्या मागे चाललो आहोत का? की पिकतं तिथे विकत नाही तसं जे आहेत त्यांची किंमत न ठेवता मृगजळाला पाण्याचं तळं समजतो आहे? जसं आपण वागतो तसं बाहेरच्या देशातही लोकं भेटत असतील का? हे आटणार आहे की, असंच चालू राहणार आहे. असच चाललं तर त्याचा अंत कुठे?

Rajesh Mandlik Signing off in 12025 Shatabdi Express.

एकटाच बसलोय. पण हा blunder शब्द बेकार आहे. Million dollar वर उतारा.

असाही प्रवास

४५० किमी चं अंतर. सकाळी ५:३० ला निघालो, पहाटसमयी. सगळेच आंघोळी बिंघोळी करून. पाठीमागे बसले तीनही पोट्टे. यश, नील आणि अभिषेक. शेजारी अर्धं अंग वैभवी. सगळेच एकदम फ्रेश. ड्रायव्हिंग सीटवर अस्मादिक.

 मागे नीलची किलबिल, यशचा अधुनमधुन पडणारा एखादा डायलॉग अन अभीची युरोप टूरची कॉमेंट्री. मग गाणी. पोरं जमतील तशी. तेव्हा वैभवी पोरांच्यात पोर/ त्यांच्याहून जास्त दंगा. मी इतका लहान नाही होऊ शकत. ब्रेकफास्ट नंतर पोरं निद्रेच्या आधीन.

मग सुसाटलेला रस्ता. मी आणि २४ वर्षाची संगत जागी. वैभवी अगदी पट्टीची गायिका वैगेरे नाही आहे. पण गजल तिच्या आवडीची. तिच्या आवाजातून काही अनमोल गाणी. मी सुद्धा माझा भसाडा आवाज तिच्या आवाजात मिसळत. "ये दौलत भी ले लो" "तुम मुझे भुल भी जाओ"" आज जाने की जिद ना करो" "जलते है जिसके लिये" "अभी ना जाओ छोडकर" गाणी पण अशी आहेत की रस्ता कटत जातो, पण गाणी संपत नाहीत.

पोरं उठली. त्यांच्या भन्नाट आईने शिव्यांच्या भेंड्या लावल्या. मी खुदखुदत ऐकत बसलो. त्यातल्या त्यात नीलची प्रगती ऐकून कान धन्य झाले.

आठ तासाने जेवायच्या ठिकाणी थांबलो. नील बोलला "मी नुसता बसून पकलोय, तुम्ही तर कार चालवता इतका वेळ. तुम्हाला किती कंटाळा आला असेल?" मी बोललो "असं जर विश्वच माझ्याबरोबर असेल तर जगातला कुठलाही रस्ता मग तो कितीही लांबीचा असू दे, खड्याखुड्यांचा असू दे, तो तर मला राजमार्गच वाटणार की रे!"

 त्याला काही कळलं नाही बहुधा.

कुटुंबैव वसुधम

पाणी

यावेळेला ठरवलंच. समुद्रकिनार्यावर उभा होतो. समोर अथांग पाणी. करोडो, अब्जो गॅलन. योजना आकार घेऊ लागली. ८ तासाला १०० कोटी लिटर इतकं पाण्याचं desalination करणारा प्लांट टाकायचा. साधारण तीन लाख स्क्वेयर फूट जागा लागेल.

तो लागला की मग त्याच्या आउटपुटला साधारण २५० एच पी चे सहा पंप लावेल. अन मग त्या समुद्र किनार्यावरील प्लांटपासून साधारण ५ फूट अंतर्गत व्यासाचे पाईप पंपाच्या आऊटपूटपासून टाकायला चालू करेल. साधारण ४५० किमी लांबीची पाईपलाईन होईल. या सहा पाईपचं आउटलेट प्रत्येकी दोन असं, जायकवाडी, येलदरी अन मांजरा धरणात सोडेल. साधारण पंधरा दिवस सहाही पंप फुल कॅपॅसिटीने चालवले तर २५ टीएमसी पाणी प्रत्येक धरणात जमा होईन. आणि मग मराठवाड्यातली पोरं एका पाईपने एकमेकांवर रबरी पाईपने पाणी उडवत खेळतील, शेतकरी जमीन नांगरून आल्यावर पारावर बसून गप्पा मारतील (आत्महत्येचं नामोनिशान राहणार नाही).

अऩ मग एके दिवशी तो प्लांट अन पाईपलाईन राष्ट्राला अर्पण केलं जाईन. ----------------------------------------------

ही कल्पना आहे आणि कल्पनाच राहू देऊ. पण नियतीच्या क्रूरतेपुढे हतबल झालं की असले काही तरी तिरसट विचार सुचतात. कुणी म्हणतं जितका पाऊस पडतो त्याच्या पंचवीस टक्के पाऊस पडला अन तो व्यवस्थित जिरवला तरी पुरेसं पाणी आहे. मग अडतं कुठे? का नाही सरकारी मंडळींना कळत? इथं जग वाळवंटात नद्या फिरवताहेत अन आमच्या इथे पाण्यासाठी वणवण करावी लागते.

एका ठिकाणी असं लिहील्यानंतर एक मित्र म्हणाले "किती वांझोटी कल्पना आहे ही" खरंच वांझोटीच. जे प्रत्यक्षात येऊ नाही शकत ती मांडून काय उपयोग. पण येतात विचार असे. आठ दिवसाने पाणी येतं, म्हणून कुणी गंमतीत लिहीतं, पाहुण्याला हात धुवायला झाडाच्या ठिकाणी जायला सांगतं. का तर झाडाला वेगळं पाणी टाकायला नको. सहजतेनं अभिजीत लिगाडे लिहून जातात पण किती भीषणता आहे त्यात!

 जात, धर्म या विषयावर एकमेकांवर चिखल उडवण्यात धन्यता मानतो आपण. रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट यावर चर्चा करणारे ग्रूप दिसत नाहीत सोशल मिडीयावर. असेच चालू राहिले तर एकमेकांवर चिखल उडवण्यासाठी तो तयार व्हायला पाणी मिळणार नाही हे ध्यानात ठेवू यात.

राजेंद्रसिंहांचे पाय धरू यात.

शेवटी जीवनाचा प्रश्न आहे.

Thursday, 4 June 2015

परभणी २

घराच्या दक्षिणेकडे तीन घरं. सोबणे, डांगे अन देशपांडे. फाटकाच्या कोपर्यावर सरू आजी. माजघरात एक मोरी होती. तिचा वापर आम्ही पोरं आंब्याच्या कोयी साठवण्यासाठी करत असू. हो, आंब्याच्या कोयींचा खेळ असायचा. आठ कोयींची एक रांग, परत पुढे आठ कोयींची रांग आणि सगळ्यात पुढे गट्टू. ५ ते ६ फुटावर उभं राहून आम्ही आमच्या कोयीने ढाय उडवायचो. जितक्या उडतील, त्या आमच्या. गट्टू उडवला तर सगळ्या कोयी आपल्या. डांग्यांचा शाम champion होता खेळात. लेफ्टी अन चकण्या, दणादण गट्टू उडवून अख्खी ढाय मारायचा. मी हरलो की त्या ,मोरीत जाऊन कोय कपाळावर आपटून रडायचो. तरी बरं उन्हाळ्यात दररोज आंब्याचा रस घरात होत असल्यामुळे ५०-१०० कोयी जमा व्हायच्या. पण माझा जीव त्या खेळातल्या कोयींमध्ये अडकला असायचा. खेळत शाम्या माझा दुश्मन असला तरी बाकी वेळेत  जानी दोस्त होता.

स्वयंपाकघरात आजी कायम काम करत असायची. जेवणाचं बनलं की एखादी चटणी कुट नाहीतर मुसळीवर मसाला कर, नाहीतर रवी वापरून ताक बनव. आणि ती ४ एक फुटी रवी होती अन तिला फिरवायला जाडजूड दोरी होती. सगळ्यांचं करून सवरून बाकी बायका आडव्या पडून गप्पा मारू लागल्या की आजी एकटीच साधारण २-३ वाजता जेवायची. कायम २५-३० पान वाढणाऱ्या आजीला आयुष्याच्या शेवटी एकटीला करून ११ वाजता एकटीनेच जेवावं लागलं हे तिचं दुर्दैव.

देवघरात पंगत बसायची. वदनी कवळ घेता चा उद्घोष झाला की सगळे गप्पा टप्पा मारत जेवत. पण भंकस नसायची. कुणाची टाप. समोर आजोबा, केशवराव डंक, दस्तुरखुद्द बसले असायचे.

आजोबा, एक दणदणीत व्यक्तिमत्व. कधी कुणावर भडकलेले मी बघितलं नाही. पण जरब च अशी होती की कोण टूरटूर करेल. काळा कोट, आत पांढरा शर्ट, खाली धोतर अन डोक्यावर टोपी. कपाळावर आडवं गंध. हातात छत्री नाहीतर काठी. चालू लागले की त्यांच्या रस्त्यावर चिडीचूप. एकटेच बसले असायचे. कचेरीत. दुपारी त्यांना जेवायला बोलवावं लागायचं. कुणाची टाप नसायची त्यांना बोलवायची. आम्ही नातवंडा पैकी एक कुणीतरी जायचं. मी दारातूनच बोलवायचो, अन तिथंच दाराशी उभा राहयचो. ते उठले की मग हलायचो. पूजा खणखणीत चालयची. पूजेच्या खोलीत मी त्यांना शीर्षासन करताना बघितल्याचे स्मरते. मी कधी अनुभवलं नाही पण आई सांगते, ६-७ भाषा यायच्या त्यांना. शाळा, गोरक्षण संस्था यांच्या विश्वस्त मंडळावर होते ते.

मुक्ताजीन हे अनेकांचे ऋणानुबंध असलेले ठिकाण होते. किती लग्नं, मुंजी त्या आवारात झाल्या याला गणती नाही. आजोबा सगळ्यांना मदत करावयास तत्पर असावेत.

हैदराबाद च्या नाईकांची होती ती मुक्ताजीन. काळाच्या ओघात नाईकांनी त्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्या स्थावर मालमत्ता विकायला काढल्या. त्यात मुक्ताजीनही विकली गेली. साधारण ८२-८३ ची गोष्ट असावी. समद नावाच्या गृहस्थाने विकत घेतली. मालक बदलल्यावर काही वर्षात जीनला अवकळा आली. समदचा मुलगा फ़ज्जु, पंचविशीतला असेल, आजोबांशी हसत बोलायचा, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचे. त्या सगळ्या प्रकारात आजोबांना खूप मनस्ताप झाला असावा असे मला आता वाटते. कदाचित तो मानसिक त्रास त्यांना सहन झाला नसावा. १९८८ साली त्यांचे निधन झाले.

पुढे काळ मोठा निष्ठुर होत गेला. १९९१ साली मामाचे अपघाती निधन झाले. पुढे पुढे मुक्ताजीन ला अवकळा आली. सगळे आपापल्या संसारात रमले. आजी एकटीच त्या घरात राहू लागली. नाही म्हणायला मधु मामा काळजी घ्यायचा. तो मुलखाचा दारुडा. पण आजीवर लक्ष ठेवून होता हेच नशीब. २००० च्या सुमारास डंक कुटुंबाने मुक्ताजीन वर पाणी सोडलं.

फेसबुक च्या परभणीकर ग्रुपच्या ओढीने मी परभणीला गेलो मागच्या वर्षी. आजोळ बघावं म्हणून गेलो तर अक्षरश: खंडहर उभी होती. माझं आजोळ, तो राजमहाल  काळाच्या उदरात गडप झालं होतं. भिरभिरत्या नजरेने मी त्याच्या जवळ एका घराजवळ थांबलो आणि विचारलं की इथे केशवराव डंक यांचं घर होतं, कुठे आहे ते सांगू शकाल का? तर म्हणाले, कोण डंक तो दारुड्या. मला एक जोरात हुंदका आला. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. मी स्कूटर ओढली. तो माणूस, काय झालं, थांबा वैगेरे म्हणू लागला. मी त्याला हातानेच खुण केली, की  बास आता. नजरेला नरक दिसला, अन कानात शिसे ओतले.

मी परत परभणीला गेलो तर, तिकडे नजर ही टाकणार नाही अशी शप्पथ खाल्ली.

क्रमश:

परभणी २

   

Tuesday, 2 June 2015

भेटूच परत

खरं तर अकौंट deactivate करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. २००९ ला मी अकौंट ओपन केलं. तेव्हापासून कधी बंद नव्हतं केलं, आता पहिल्यांदाच करतो आहे,  म्हणून थोडं कौतुक. आता कुणी असंही म्हणू शकतं की इथे येताना विचारून आला होतास का, नाही ना, मग deactivate करताना कशाला ढोल वाजवतोस. पण काय झालं की काही मैत्री अशा घट्ट झाल्या की काहीच न सांगता गुल होणं पण काही झेपलं नाही. अर्थात त्यांच्याशी फोनवर आता संपर्क आहेच. त्यामुळे चिंता नाही.

मजा आली पण. त्यातल्या त्यात सप्टेंबर २०१३ नंतर. rmandlik.blogspot.in यावर लिहितो काय अन ते फेसबुकवर टाकतो काय अन त्यातून यार दोस्त मिळतात काय. साला अजीबोगरीब. एकाशीही वाद नाही. मेसेंजर वर भंकसगिरी नाही. एकदम सरधोपट. नाही म्हणायला दोघींनी उडवलं मला मित्र यादीतून. For no reason. पण ठीक आहे. गिलाशिकवा नाही. मी पण विनाकारण कुणालाही उडवलं नाही. हो, नेत्यांवर हिणकस जोक मारलेल्यांना मात्र उडवलं. बाकी कॉमेंट वर वाद झाला म्हणून तर नाहीच नाही. चुकून एका मैत्रिणीला अन्फ्रेंड केलं. पण ती स्टोरी आहे, कुणालाही न पटेल अशी. त्यामुळे सोडा.

बाकी काही लोकांचच नाव लिहून, त्यांचे आभार मानून वाद निर्माण करायचा नाही. पण संवाद साधता येईल असे किमान दीडएकशे तरी मित्र झालेत. जास्तच, पण कमी नाही.

माझं हरवलेलं अख्खं गाव मिळालं. परभणी.

असो. कोणताही निरोप घेताना मी कातर होतो. आतापर्यंत चार वेळा वाहन विकलं. अन प्रत्येक वेळी चार थेंब डोळ्यातून बाहेर पडलेच. इथे तर मित्रच सगळे. आभासी असले तरी दुसऱ्या बाजूला कुणी संवाद साधतं म्हणून तर मैत्री. त्यामुळे आज ही थोडा का होईना मनातून हललो तर आहेच. बरं यासाठी वाटतंय की reactivate करणं माझ्याच हातात आहे.

अनेक तुटके फुटके अनुभव तुमच्या बरोबर शेयर केले. तुम्हाला आवडले. नियतीने ढकललं म्हणून यात पडलो. आता परत काठावरून चालत राहील. कुणी सांगावं, पुन्हा  पडेलही यात, परत तुम्हाला भेटण्यासाठी……फिरता फिरता

भेटूच परत