Saturday 6 June 2015

पाणी

यावेळेला ठरवलंच. समुद्रकिनार्यावर उभा होतो. समोर अथांग पाणी. करोडो, अब्जो गॅलन. योजना आकार घेऊ लागली. ८ तासाला १०० कोटी लिटर इतकं पाण्याचं desalination करणारा प्लांट टाकायचा. साधारण तीन लाख स्क्वेयर फूट जागा लागेल.

तो लागला की मग त्याच्या आउटपुटला साधारण २५० एच पी चे सहा पंप लावेल. अन मग त्या समुद्र किनार्यावरील प्लांटपासून साधारण ५ फूट अंतर्गत व्यासाचे पाईप पंपाच्या आऊटपूटपासून टाकायला चालू करेल. साधारण ४५० किमी लांबीची पाईपलाईन होईल. या सहा पाईपचं आउटलेट प्रत्येकी दोन असं, जायकवाडी, येलदरी अन मांजरा धरणात सोडेल. साधारण पंधरा दिवस सहाही पंप फुल कॅपॅसिटीने चालवले तर २५ टीएमसी पाणी प्रत्येक धरणात जमा होईन. आणि मग मराठवाड्यातली पोरं एका पाईपने एकमेकांवर रबरी पाईपने पाणी उडवत खेळतील, शेतकरी जमीन नांगरून आल्यावर पारावर बसून गप्पा मारतील (आत्महत्येचं नामोनिशान राहणार नाही).

अऩ मग एके दिवशी तो प्लांट अन पाईपलाईन राष्ट्राला अर्पण केलं जाईन. ----------------------------------------------

ही कल्पना आहे आणि कल्पनाच राहू देऊ. पण नियतीच्या क्रूरतेपुढे हतबल झालं की असले काही तरी तिरसट विचार सुचतात. कुणी म्हणतं जितका पाऊस पडतो त्याच्या पंचवीस टक्के पाऊस पडला अन तो व्यवस्थित जिरवला तरी पुरेसं पाणी आहे. मग अडतं कुठे? का नाही सरकारी मंडळींना कळत? इथं जग वाळवंटात नद्या फिरवताहेत अन आमच्या इथे पाण्यासाठी वणवण करावी लागते.

एका ठिकाणी असं लिहील्यानंतर एक मित्र म्हणाले "किती वांझोटी कल्पना आहे ही" खरंच वांझोटीच. जे प्रत्यक्षात येऊ नाही शकत ती मांडून काय उपयोग. पण येतात विचार असे. आठ दिवसाने पाणी येतं, म्हणून कुणी गंमतीत लिहीतं, पाहुण्याला हात धुवायला झाडाच्या ठिकाणी जायला सांगतं. का तर झाडाला वेगळं पाणी टाकायला नको. सहजतेनं अभिजीत लिगाडे लिहून जातात पण किती भीषणता आहे त्यात!

 जात, धर्म या विषयावर एकमेकांवर चिखल उडवण्यात धन्यता मानतो आपण. रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट यावर चर्चा करणारे ग्रूप दिसत नाहीत सोशल मिडीयावर. असेच चालू राहिले तर एकमेकांवर चिखल उडवण्यासाठी तो तयार व्हायला पाणी मिळणार नाही हे ध्यानात ठेवू यात.

राजेंद्रसिंहांचे पाय धरू यात.

शेवटी जीवनाचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment