Monday 22 June 2015

अजय

अजय लहानपणापासून अभ्यासात हुशारच होता. आणि स्वभावानेही मनमिळाऊ. आपले आईवडील अन दोन भाऊ, असा पाच जणांचा संसार चालू होता. आईवडील, यशवंतराव आणि लता, एकदम देवभोळे. सारख्या पुजा अन व्रतवैकल्य यात गढलेले. अजय चे दोन भाऊ, सुजय आणि हे संजय ही हुशारच. सांपत्तिक स्थिती ठीकठाकच, पण सुखी अन समाधानी.

अजय बारावीला उत्तम मार्कस मिळवून इंजिनियर झाला. करियर घडवण्याच्या प्रयत्नात असतानाच पाठचा भाऊ सुजय ही इंजिनियर होऊन नोकरीला लागला. अजय इकडेतिकडे हातपाय मारत होता, पण म्हणावी तशी घडी बसत नव्हती. एव्हाना सुजयने कंपनीतील, त्याच्या वयापेक्षा मोठी पोरगी पटवली, अन स्वत:चा स्वतंत्र घरोबा बसवला. अन ह्या घटनेचा अजयवर विपरीत परिणाम झाला. आधीच आयुष्यात चाचपडत असलेला अजय अन त्यात लहान भावाने केलेला उदयोग. अजयला वेडाचे झटके येऊ लागले.

पुण्याला त्याला मी कामाला लावलं, पण तो कामावरच जायचा नाही. घरी आल्यावर नुसता बडबड करायचा. एकदा मी त्याला जंगली महाराज च्या मंदिरात घेऊन गेलो. खूप समजावलं. पण काही फरक नाही. एक दिवशी मी खूप धुतला त्याला. शेवटी तो गावी परत गेला.

इकडे तिकडे जॉब करायचा ही तो. अशात त्याचं लग्न ठरलं. नशीब त्याचं दुर्दैव हातात घेऊन फिरत होतं. बायकोने इतका मानसिक त्रास दिला की ज्याचं नाव ते. यशवंतराव आणि लता या देवभोळ्या ज्येष्ठ दाम्पंत्यावर ४९८ अ कलम लावून तुरुंग दाखवला. शेवटी जे व्हायचं तेच झालं. अजयचा घटस्फोट झाला.

घटस्फोटाची प्रोसेस पूर्ण होता होता एक वर्ष गेलं. ते झाल्याबरोबर यशवंतराव अजय च्या मागे लागले, परत लग्न कर म्हणून. अजयला वाटतच होतं, आपलं पण घर वसावं म्हणून. त्याच्या वेडसरपणाची झाक पण औषधामुळे कमी झाली होती. शेवटी मग प्रणिताचा स्थळ आलं. तिलाही मेंटल डिप्रेशन ची गोळी चालू होती. पण तिचा पायगुण चांगला होता. अजय ला चांगली नोकरी मिळाली.

संसारात स्थिरस्थावर होत असतानाच अजय ची मानसिक स्थिती खूप सुधारली, पण याउलट प्रणिताची मात्र अजून बिघडली. त्या दोघांच्या संसारावर फुल उमलले. अनिश नावाचा मुलगा. त्याचा परिणाम अजयवर चांगला तर प्रणिता वर उलटा झाला. सारखं ती मृत्यू बद्दल बोलू लागली. अगोदरच्या बायकोने दिलेला ४९८ चा झटका अजयच्या चांगला लक्षात होता. आता परत या बायकोने काही विचित्र केलं तर त्याला आणि कुटुंबाला कुणीही माफ करणार नव्हतं. प्रचंड टेन्शन मध्ये असायचा, पण सुदैवाने त्याचा मेंदू जागेवर होता.

कंपनीत स्थिरस्थावर झालेल्या अजयने पोस्ट ग्रज्युएशन करायचं ठरवलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत असलेल्या अजयचं मला कौतुक वाटत होतं. वेडसर बायको, तिच्या टांगती धमक्यांची तलवार, लहान मुल आणि २-३ महिने पगार न देणारी कंपनी. तरीही अजय नैय्या हाकत होता.

आणि अशात ती घटना घडली. प्रणिता, अनिश, प्रणिताची आई अन भाऊ हे एका दुर्दैवी घटनेत पाण्यात वाहून गेले. अजयवर आकाश कोसळलं. पण त्यातूनही अजय सावरला. बायको मुलाच्या मृत्युनंतर १२ व्या दिवशी अजयने ME ची परीक्षा दिली आणि पुढे चांगल्या गुणांनी पास ही झाला.

एक वर्ष होतं ना होतं तोच यशवंतराव अजयच्या मागे लागले, परत लग्न कर म्हणून. एव्हाना अजय या सगळ्या प्रकराला उबगला होता. पण यशवंतराव काही ऐकत नव्हते. सारखा लकडा, आमच्यासमोर तुझं घर बसू दे, काय हरकत आहे मुलीला मुल असेल तर, पण लग्न कर.

अजयने मला सांगितलं की दादांना तू समजावून सांग. मी तर सांगून आलो आहे "नियतीने अजयला खूप चटके दिले आहेत. अशा परिस्थितीत त्याला लग्नाला भरीस पाडून तुम्ही मोठी चूक करत आहात. त्याचं आयुष्य आहे, त्याला त्याच्या कलाने जगू दया. त्याचे काही ठोकताळे आहेत, ते मांडू दया" अशाच पद्धतीचं दोन एक तास बकबकत होतो. बघू काय फरक पडतो ते.

अजय, सगळ्यात पहिले, तुला मी मारल्याबद्दल मन:पूर्वक माफी मागतो. कारण मुळात तुझं बिघडलेलं मानसिक संतुलन हा तुझा आजार आहे हेच मला कळलं नव्हतं. आणि दुसरं आता विधात्याला तु टक्कर देत या सगळ्यातून बाहेर पडला आहेस. मला तुझं कौतुक तर आहेस, पण जेव्हाही तु मदतीची हाक देशील, मी एका पायावर येईल, तुझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी.

(सुजय ने घराशी संबध तोडले आहेत अन तो सिंगापूरला स्थायिक झाला आहे. अन संजय घरच्या लोकांशी संबंध ठेऊन आहे, पण गावापासून दूर ४०० किमी वर एका शहरात चांगल्या नोकरीत आहे.)

1 comment:

  1. सुंदर. तुम्हाला माणसांची जाण आहे.

    ReplyDelete