Sunday 14 June 2015

Burnout

आजकाल लोकांकडे तक्रारींचा पाढा  तयार असतो. खर्याची दुनिया नाही राहिली, सगळीकडे दहशतवाद बोकाळलाय, भ्रष्टाचाराने देश पोखरून गेला आहे, शैक्षणिक संस्थेत अनागोंदी माजली आहे वैगेरे वैगेरे. अशा गोष्टी बाष्कळ पद्धतीने चघळून त्याचा कीस पडायचा हा आपला राष्ट्रीय टाईमपास आहे. या प्रकारावर प्रतीआघात एक तर आपण करत नाही किंवा केलाच तर तो तडीला नेत नाही.

लोकं खरं तर सुशिक्षित झाले आहेत, हुशार झाले आहेत, (काही अतिहुशार ही आहेत), आजूबाजूला काय चालू आहे त्याची त्यांना माहिती आहे, कधी चुकीची पण असते ती गोष्ट वेगळी. तरीही आपण अशी गोष्ट आपल्यासमोर घडली की आपण हात खाजवत उभे राहत फक्त बघत बसतो. कुणी दुसरा अवयव खाजावतं. पण कृती शुन्य. आणि हे दुबळ्या मनाचं लक्षण आहे, किंवा आपल्याला काही करायचंच नाही, किंवा क्षमता नाही वैगेरे अशातला भाग नाही आहे. हे त्याच्या पेक्षा विचित्र आहे.  किंबहुना आपल्या हातून पाप घडतं आहे आणि या पापाचं नाव आहे Burnout. (मी याला मराठीत काय म्हणावे यावर पुष्कळ खल केला, पण नाही सापडला शब्द. Burnout is a psychological term that refers to long-term exhaustion and diminished interest in work. निरिच्छता जुळतं थोडं)

कधीकाळी ही साथ काही लोकांपर्यंत पोहोचली होती, त्यांना आपण मानसिक रुग्ण किंवा दुबळे म्हणायचो. पण आता मात्र परिस्थिती उलटी आहे. आपल्यातले बरेच जण या विचित्र रोगाचे शिकार झालो आहोत. समाजातला अगदी छोटा वर्ग याच्या तडाख्यातून सुटला आहे.

आणि हे अगदी सगळ्यांना लागू. एखादा माणूस असो वा संस्था, शासन असो की नागरिक, नोकरदार असो की त्याचा मालक, पालक असू द्या की बालक, शिक्षक की त्याचा विद्यार्थी. थोड्याफार फार फरकाने BurnOut या रोगाचा प्रत्येकजण शिकार झाला आहे.

काय आहे हा प्रकार burnout, निरिच्छता.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अगतिकता, आजूबाजूच्या परिस्थितीत आपल्या वागण्याने काहीही बदल होणार नाही याची खात्री झाल्यामुळे मेंदूला आलेलं जडत्व. त्यामुळे वागण्यात आलेली निष्क्रियता. जे आहे, जे मिळतं, ते स्वीकारा अन गप्प बसा. आपल्याला त्या परिस्थितीला जुळवून घ्या. ती बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. निरिच्छता, जडत्व.

तुम्हाला ती उंदराची गोष्ट आठवत असेलच ना. शास्त्रज्ञ मंडळीनी प्रयोग केला आहे.

दोन पिंजर्यात उंदीर ठेवले जातात. त्या पिंजर्याच्या तळभागात इलेक्ट्रिक करंट सोडला आहे. एका पिंजर्यात वर एक लाल दांडी दिली आहे. काही कारणाने तिला स्पर्श झाला तर करंट वाहणं बंद होतं (अ पिंजरा) आणि दुसऱ्या पिंजऱ्यात असं काही नाही आहे.(ब पिंजरा). दोन्ही पिंजऱ्यात उंदरं ठेवली गेली. करंट पास केल्यामुळे उंदरं उड्या मारू लागली आणि अ पिंजर्यातल्या उंदरांना कळलं, लाल दांडीला स्पर्श केलं असता करंट थांबतो हे लक्षात आलं त्यांच्या. त्यामुळे मृत्युच्या भितीवर विजय कसा मिळवायचा हे कळलं.

याउलट ब पिंजर्यातील उंदरं उड्या मारून थकली अन मग शेवटी मरायची वाट पाहत पडून राहिली.

आता पिंजरे बदलले. अ तील उंदरे ब त. आणि ब ची अ त. तोच प्रयोग. गंमत म्हणजे मृत्यूवर विजय मिळवता येतो हे लक्षात आलेल्या उंदरांनी लाल दांडी नसताना तळभागात असलेली अलुमिनम ची वायर तोडली आणि करंट पास करण्याच्या वायरला कापून तो बंद केला. याउलट दुसर्या पिंजर्यातल्या उंदरांना अन्यायाविरुद्ध निपचित पडून राहायची सवय लागलेली. लाल दांडी पिंजऱ्यात असताना, ती पडून राहिली. परत निपचित. निरिच्छता. जडत्व.

म्हणून मग हत्तीच्या पिल्लाला साखळदंडाने बांधलं की मग त्याला सवय लागते अन तेच पिल्लू मोठं झाल्यावर खुंटीसकट साखळी ओढून नेण्याची ताकद असणारा गजराज निवांत उभा राहतो, माहुताचा भाला टोचवून घेत.

आणि मग अत्यंत धूर्त धार्मिक नेते, मग ते कुठल्याही धर्माचे असोत, आजकाल लहान किंवा तरुण असतानाच अशी शिकवण देतात की प्रश्न न विचारता त्या फतव्याला बळी पडतात. स्वत:ची बुद्धी गहाण ठेवून.

आयुष्यात शाश्वत काय असेल तर तो बदल. आणि जे कोण या बदलाला सामोरं जाऊन मिठीत घेत नाही ते मग या बदलत्या जगात बोझ बनून राहतात. म्हणून मग आयुष्यात निवृत्तीची वेळ येते. कारण अनुभव असला तरी घडणारे बदल आपण स्वीकारत नाही.

त्यामुळे इतिहास साक्षी आहे. जगातल्या क्रांती या फक्त युवकांकडून घडल्या आहेत. कारण त्यांची हृद्य जळत असते, पिचलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी. ह्या मंडळीना नकारात्मक गोष्टीचा गंध ही नसतो अन मग त्यातून काहीतरी अविश्वसनीय त्यांच्या हातून घडतं.

अन असं म्हंटल जातंच की "जगाला वेठीस धरण्यासाठी मुठभर नालायक लोकांची क्रूर वृत्ती कारणीभूत नसते तर खंडीभर चांगल्या लोकांच्या मेंदूला आलेलं जडत्व कारणीभूत असतं"

आणि मग आपल्या लक्षात येतं की या देशाचा नागरिक म्हणून आपण प्रदूषण, भ्रष्टाचार, दहशतवाद, निष्क्रिय शासक या सगळ्या संवेदनशील मुद्द्यावर आपण झापडं बसवून मुग गिळून बसलो आहोत. ही अशी निष्क्रियता आली की आपण जगण्याचा फक्त मुखवटा चढवलेला असतो. आतून खरं तर आपण मृत असतो. अन आपल्या अशा मृतप्राय वागण्यामुळे नराधम, क्रूर, हलकट लोकं समाजात उजळ माथ्याने नुसते वावरत नाहीत तर त्यांचा उदोउदो ही होत असतो. यासारखी दुसरी शोकांतिका नाही.

मला अशी अशा वाटते की तुम्ही या निष्क्रियता, निरिच्छता या रोगाला बळी पडले नाही आहात. आणि जर दुर्दैवाने असं झालं असेल तर देव तुम्हाला यावर विजय मिळवण्यासाठी धैर्य अन बुद्धी देवो.

निरिच्छता  आणि पराभूत मानसिकता ही माणसाला नेहमीच पायदळी तुडवत असते. पण तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेऊ इच्छिणाऱ्या माणसाच्या प्रबळ इच्छाशक्ती बद्दल मी नेहमीच आशावादी आहे.  इच्छाशक्ती पुन्हा जागृत होण्याची असंख्य उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात.


मूळ लेखक: श्री गुरविंदर सिंग

(मराठीत केलेला स्वैर अनुवाद)

No comments:

Post a Comment