Friday 26 June 2015

असंपन्न आणि अपरिपूर्ण.

दोन गोष्टीबद्दल आज काल मी फारच संभ्रमात असतो. अगदी खरं सांगायचं तर बऱ्याच बाबतीत संभ्रमात असतो, पण दोन गोष्टी वैगेरे शब्द लिहिले लोकांना वाटतं, याला बाकी गोष्टी कळतात. असो.

ह तर सांगत होतो दोन गोष्टी. संपन्नता आणि परिपूर्णता. म्हणजे याला काही लिमिट असावी का?

पहिले आपण संपन्नता घेऊ. हो म्हणजे ती अशी लेखात बिखातच  घेऊ शकतो. प्रत्यक्षात आनंद आहे. तर संपन्तेच्या कल्पनेला कुठं मुरड घालावी? किती असलं म्हणजे ते पुरेसं असतं? याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतीलही. संपन्नता आणि याबरोबर येणारी असुरक्षिततेची भावना. पुढच्या पिढीला पण आपणच वारसाहक्काने घर किंवा इतर स्थावर संपत्ती ठेवण्याचा अट्टाहास हा माणसाला ग्रीडी बनवतो असं नाही वाटत का? मुलांना एक शिक्षण दिलं हे इतकं पुरेसं नाही का?

मी आजकाल वयाच्या ५० ते ५५ मध्ये निवृत्त होण्याचा विचार करतो आहे. तो कुणाजवळ बोलून दाखवला तर पहिली प्रतिक्रिया असते "अरे म्हणजे यश ला तुझ्या कंपनीत लावशील ना तो पर्यंत" म्हणजे काय? मी का म्हणून पोराच्या भवितव्याचा इतका विचार करू. तो समर्थ नाही का? तो समर्थ नाही तर मी फक्त त्याला भौतिक सुखच द्यावं का? आणि ह्या स्वत:चे सामर्थ्य, त्रुटी, मग त्यांचा नीट वापर या अभौतिक गोष्टी त्याने कुठून शिकाव्यात. म्हणजे थोडक्यात संपन्नतेच्या ध्यासापायी आपण येणाऱ्या पिढीचे पंख आधीच कापून टाकतोय. मग मला पुरेल इतकाच पैसा हवा असेल तर का मरमर करावी. ७० व्या वर्षी जर मला नैसर्गिकरीत्या मृत्यू गृहीत धरला तर स्मशानाचे भाडे असेल त्यावेळेला ७५०० रु वैगेरे. त्यापेक्षा जास्त कशाला हवेत पैसे.

अन दुसरी परिपूर्णता. खूप जास्त perfectionist असणं, हे मला तापदायक वाटतं. आणि ही परिपूर्णता एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीने केली असता येते म्हणे. आता मला एखादी गोष्ट करण्यामध्ये तोच तोच पणा आला तर मुलखाचा कंटाळा येतो. अहो इतकंच काय, फातिमानगर हून कंपनीत जायला तीन वेगवेगळे रस्ते आहेत. बिबेवाडी-कात्रज वरून, डायस प्लॉट वरून लक्ष्मीनारायण मार्गे, अन स्वारगेट मार्गे. चार दिवस एका रस्त्यावरून गेलं की दुसरा मार्ग लागतो. तीच ब्याग, तोच डब्बा, तेच चष्म्याच कव्हर, त्यांची तीच जागा, तसंच उघडायचं, तसंच ठेवायचं. हे काही आपल्याला  नाही जमणार.

आयुष्यातील गोष्टी त्याच त्याच पद्धतीने केल्या तर आयुष्य नीरस बनतं असं माझं वैयक्तिक मत आहे. मग माझ्यात लौकिकार्थाने जिला परिपूर्णता म्हणतात ती कशी येणार. यांत्रिकी अभियंता असलो तरी रोजच्या जीवनाचं यांत्रिकीकरण झालेलं मला आवडत नाही. मॉर्निंग वॉक एका रस्त्यावरून दररोज घेतलेला चालत नाही. पळवाट समजा.

एखादी गोष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब केल्यास नुकसान होतं कधी तरी पण नाविन्याचा हव्यासच इतका की ते नुकसान खाऊन टाकतो. देवाने हा विचित्र हव्यास पाळण्याची सांपत्तिक स्थिती दिली हे नशीबच म्हणायचं. पण तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट नवीन पद्धतीने करण्याचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे अपयशाची  भिती. Fear of  failure. आणि मग मनात तयार होतं त्या प्रचलित पद्धतीबद्दल गाढव प्रेम. दुसर्या नवीन पद्धतीबद्दल इतका तिटकारा निर्माण होतो की बास!

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिपूर्णतेची भावना मनात आली की माणसाची उतरण चालू होते. आपण जे करतो तेच उत्तम, तेच भारी असं म्हंटल की संपलंच म्हणून समजा. मग डोळ्यावर झापडं लागतात, मेंदू ला गंज चढतो.

असो. ह्या सगळ्या माझ्या थेअर्या आहेत. कुणाला पटेल न पटेल. पण मला असंच आवडेल, असंपन्न आणि अपरिपूर्ण.

जे आहे ते आहे

1 comment:

  1. Great line - सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिपूर्णतेची भावना मनात आली की माणसाची उतरण चालू होते. आपण जे करतो तेच उत्तम, तेच भारी असं म्हंटल की संपलंच म्हणून समजा. मग डोळ्यावर झापडं लागतात, मेंदू ला गंज चढतो.

    ReplyDelete