Monday, 8 July 2024

२०१० ची गोष्ट असेल. माझा एक मित्र आहे समीर. इंडस्ट्रीयल आयटम ट्रेड करतो. ठीक ठाक बिझिनेस

करायचा. मुंबईला नागदेवी स्ट्रीट ला अडीचशे स्क्वेफूट चं ऑफिस. वडिलोपार्जित धंदा. भाऊ मदतीला.

(ऑफिसच्या आकारावर जाऊ नका. नागदेवी स्ट्रीटचा अडीचशे फुटचा गाळा म्हणजे करोडपतीच तो).

सम्या म्हणजे अगदी टिपिकल. कालच्या पोस्ट मध्ये सांगितला तसा. आव आणायचा बिझिनेस वाढवायचा

पण त्यावर ऍक्शन, त्या दृष्टीने घ्यायचा नाही.


एक दिवशी माझ्याकडे आला. म्हणाला "ट्रेडिंग करण्यासाठी अजून एखादा इंडस्ट्रीयल आयटम सांग की".

माझ्याकडे होता, रोटरी जॉईंट. माझ्या लाईनला पूरक प्रॉडक्ट. भारतात कुणी बनवायचं नाही. मी त्याला

म्हणालो "याची जर्मनीतून सप्लाय चेन बनवू आणि इथे विकू यात. काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू यात. माझ्या

कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे. अल्ट्रा. त्या नावाने विकू. सोपं पडेल." समीरला आवडली आयडिया. सहा

आठ महिने काम केलं. जर्मनीत प्रॉडक्ट डेव्हलप केला. डिसेंबर २०१० ला आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करायला

तयार झालो. समीरने प्रॉडक्ट विकायचं. आमचा ब्रँड वापरण्यासाठी अल्ट्रा ला १०% कमिशन द्यायचं ठरलं.

२०११ ला आमचं इमटेक्स प्रदर्शन होतं जानेवारीत. मी सम्याला बोललो "माझा बूथ आहेच. हे प्रॉडक्ट ठेवू

यात तिथे आणि तू ही थांब स्टॉल वर. इन्कवायरीज मिळतील. काम करू" समीरच्या चेहऱ्यावर काळजीचे

भाव दिसले अन पहिलं रडगाणं तो गायला "धंद्यात मंदी आहे. बुथचं काँट्रिब्युशन द्यायला माझ्याकडे पैसे

नाहीत" मी म्हणालो "ठीक आहे यार. अशी किती जागा लागेल तो प्रॉडक्ट डिस्प्ले करायला. अल्ट्रा करेल

सगळा खर्च. तू स्टॉल वर रहा हजर सगळे दिवस"

त्या औद्योगिक प्रदर्शनात धमाल आली. २००९ ची मंदी संपून तेजीला सुरुवात झाली होती. स्पिन्डल, त्याची

रिपेयर सर्व्हिस आणि समीरचा नवीन प्रॉडक्ट रोटरी जॉईंट. (हो, आता तो समीरचा प्रॉडक्ट झाला होता)

सगळ्यांना खुप इन्कवायरीज मिळाल्या. रोटरी जॉईंट कन्झ्युमेबल असल्यामुळे त्यासाठी तर ऑर्डर पण

मिळाल्या.

प्रदर्शन संपल्यावर पहिला महिना समीर रोटरी जॉईंट विकण्यात खूप बिझी झाला. ते चालू असतानाच मी

एकदा मुंबईला समीरला भेटलो आणि सांगितलं "प्रॉडक्ट भारी झालं आहे. याला व्यवस्थित मार्केट करू. काही

टिपिकल मार्केट झोन आहे जिथे हा प्रॉडक्ट खूप खपेल. तू सप्लाय व्यवस्थित सेट कर. त्याचे मॉडेल निवडुन

ऑर्डर करून स्टॉक मध्ये ठेव. आयपीएफ, सर्च सारख्या मॅगेझिन मध्ये त्याची ऍड देऊ. त्याबद्दल आर्टिकल

छापू. तुझीअजून वेबसाईट नाही आहे. ती बनवू आणि हा प्रॉडक्ट तिथेही डिस्प्ले करू. संधी मिळाली आहे तर

तिचा फायदा उठवू" समीरने मान हलवली. पण ती ज्या पद्धतीने हलवली तिथेच माझ्या मनात शंकेची पाल

चुकचुकली.

माझी शंका खरी ठरली. ऑर्डरचा पहिला पूर ओसरल्यावर समीरकडे रोटरी जॉइन्टचा खडखडाक झाला.

स्टॉक ठेवण्यासाठी जे प्लॅंनिंग करावं लागतं ते समीरने केलंच नाही. प्रॉडक्ट चांगलं होऊनही मार्केटिंग न

केल्यामुळे ग्राहकापर्यंत ते पोहोचलं नाही. इंडस्ट्रीयल मॅगेझिन मध्ये ऍड नाही, इमटेक्स नंतर छोट्या प्रदर्शनात

सहभाग नाही. अत्यंत चांगलं आणि उपयोगी प्रॉडक्ट असूनही ते लोकांच्या विस्मरणात गेलं. वर्ष दीड वर्षात

समीरच्या ऑर्डरचा फ्लो घटला. अपेक्षित सेल झाला नाही म्हणून जर्मनीच्या कंपनीने काँट्रॅक्ट नाकारलं.

आज सहा वर्षे झालीत. समीर त्याच ऑफिसमध्ये बसून त्याचे वडिलोपार्जित प्रॉडक्टस विकतो आहे. तोच

रोटरी जॉईंट अहमदाबादच्या मुकुलने त्याच मॅन्युफॅक्चरर कडून डेव्हलप केलाय. हा लेख, मी अहमदाबादच्या

फ्लाईट मध्ये बसून लिहितोय. हो, मी चाललोय मुकुल ला भेटायला, काँट्रॅक्ट साइन करण्यासाठी. दरवर्षी २०

लाखाचे रोटरी जॉइन्ट्स मलाच लागणार आहेत, ते फायनल करायचं आहे.

( असं का झालं याचं थोडं स्पष्टीकरण हवं आणि त्यातून मिळणारा धडा):


हे असं होतं आणि अनेक जणांबाबत होतं. लोकांना व्यवसाय करायचा असतो, पण त्यामागच्या मूलभूत गोष्टींवर काम करायचं नसतं. आणि त्याऊपरही सांगतो की ज्याला आपण वृद्धिधिष्ठित मानसिकता म्हणतो तिचा पूर्ण अभाव असतो. सगळे प्रयत्न हे व्यावसायिक स्वतः श्रीमंत होण्याच्या दृष्टीने करतो, व्यवसाय संपन्न होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. इथे फक्त मेख आहे. स्वतः श्रीमंत होणे हा कुणाचा उद्देश असू शकतो आणि त्या भावनेबद्दल आदरच आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, पण त्याच्याबरोबर येणारे प्रश्न सुद्धा तसेच असतात. त्यांना खुल्या मनाने स्वीकारण्याची तयारी हवी. 

इथे मला ज्या गोष्टीचा मी सारखा उल्लेख करत असतो त्या "व्यवसायाचा मूळ उद्देश" याबद्दल प्रचंड वैचारिक स्पष्टता हवी. आपण हा व्यवसाय का करतो हे मनात पक्कं हवं आणि त्याची व्याप्ती ही फक्त स्वतःपुरती मर्यादित असेल त्याचा समीर होतो. आपल्या व्यवसायामुळे समाजातील किंवा उद्योगातील किती प्रवर्गावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे याचा अभ्यास हवा. आणि एकदा हे लक्षात आलं की हे उत्पादन मार्केट मध्ये स्वीकारार्ह आहे, तर मग व्यवसाय वृद्धीच्या सर्वांगीण वाटा धुंडाळून त्याचा विकास करणं हे शहाणपणाचं ठरतं. 

ते जर केलं नाही तर काय होणार? तर एक मोठी व्यवसायाची संधी वाया जाते. भले मग आपला सामाजिक आर्थिक चालनेमधे आपला खारीचा वाटा असेल, पण तो ही उचलण्यामागे आपण पाठ फिरवतो. बरं या प्रोसेस मध्ये फक्त व्यावसायिकच नुकसानीत जातो असं नाही तर त्याचा ग्राहक सुद्धा एक चांगलं उत्पादन मिळण्यापासून वंचित राहतो. 

मला असं वाटतं, जर तुमच्याकडे उद्योजकीय मानसिकता असेल तर अशा संधी वाया घालवणं हा औद्योगिक आणि सामाजिक गुन्हा आहे. 





Friday, 14 June 2024

 पुणे-मुंबई-पुणे करायचो त्या दिवसाची गोष्ट आहे. त्या दिवशी ठाण्यात काम होतं. ते झालं की मी पाच ची कर्जत लोकल पकडायचो आणि कर्जतला सात च्या सुमारास डेक्कन क्वीन यायची, ती पकडायचो. त्या दिवशी ठाण्याला बसलो. दिवसभर काम करून दमल्याने लोकल मध्ये लागलीच झोप आली. जाग आली तेव्हा अंबरनाथ स्टेशनवर गाडी उभी होती आणि खिडकीतून बघतो तर काय डेक्कन क्वीन सुसाट निघाली होती. आमची लोकल काही कारणाने लेट झाली होती आणि तिला सायडिंग ला टाकून डेक्कन ला पुढे काढलं होतं. कर्जत ला नक्कीच डेक्कन चुकणार होती. भूक लागलेला मी डेक्कन च्या बेक बीन्स-टोस्ट आणि कॉफीच्या भरवशावर होतो. नंतर ची सह्याद्री, घरी पोहोचायला अकरा वगैरे माझ्या डोळ्यासमोर आलं आणि माझ्या तोंडून शब्द पडले "आयची कटकट, गयी भैस पानीमे". लोकल मध्ये शेजारी एक म्हातारे गृहस्थ बसले होते. त्यांनी काय झालं म्हणून विचारलं. मी सांगितलं की माझी डेक्कन चुकणार. ते शांत बसले. खिडकीत पाहत होते. दोन मिनिटाने माझ्याकडे बघत म्हणाले "तुला डेक्कन मिळणार. ही लोकल कर्जतला पोहोचेपर्यंत डेक्कन सुटणार नाही." मी मनात म्हणालो "काका येडं बनवतात आपल्याला". शब्द तोंडात नाही आले पण चेहऱ्यावर दिसलं माझ्या. ते पाहून काका माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले "विश्वास ठेव माझ्यावर, मिळणार डेक्कन तुला". मधल्या कुठल्या स्टेशनवर ते उतरून गेले. मी सह्याद्रीने जायचं असं मनाला समजावलं. 


कर्जत स्टेशनवर लोकल पोहोचली तर आश्चर्य, डेक्कन क्वीन तिथं उभी. बरं योगायोग किती? तर इतर वेळेस एक नंबर प्लॅटफॉर्म वर उभी असणारी डेक्कन आज दोन नंबर वर आणि माझी लोकल तीन नंबर ला. म्हणजे दादरा चढायची पण गरज नाही. आणि त्याही पेक्षा कहर म्हणजे पास होल्डरची चेअर कार माझ्या लोकल डब्याच्या बरोबर समोर. मी उतरलो, डेक्कन मध्ये बसलो, मला सीट पण मिळाली आणि बरोबर दोन मिनिटात डेक्कन सुटली.

आज मी सिनसिनाटी वरून सॅनफ्रान्सिस्को ला चाललो होतो. डॅलस ला स्टॉप ओव्हर होता. माझी सिनसिनाटी- डॅलस फ्लाईट एक तास लेट झाली. पुढची फ्लाईट पकडायला मला वेळ फक्त २० मिनिटांचा असणार होता. तिथली क्रू म्हणाली की फ्लाईट चुकणार तुझी. नेमकी ती शेवटची फ्लाईट होती आणि मला ती म्हणाली की दुसऱ्या दिवशी सकाळी सातची फ्लाईट घ्यावी लागेल. राहायची सोय तुमची तुम्हाला करावी लागेल, फार तर डिस्काउंट देऊ हॉटेल रेंट मध्ये. असं काही व्हायची माझी पहिलीच वेळ. त्या क्रू ला म्हणालो "मला पाच मिनिटे दे". मी खुर्चीवर विचार करत बसलो होतो. शेजारी एक सत्तरीचा माणूस बसला होता ज्याने बहुतेक माझं संभाषण ऐकलं होतं. मला म्हणाला "काळजीत दिसतो आहेस". मी त्याला सांगितलं. तो मला म्हणाला "डोन्ट वरी. तुझी पुढची फ्लाईट पण डिले होणार आहे आणि तू रात्रीच सॅन फ्रान्सिस्को ला पोहोचशील. उद्या सकाळची फ्लाईट वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नको."

मी त्यांना विचारलं "आर यु शुअर?". ते गृहस्थ म्हणाले "बेशक". मी ऐकलं त्यांचं. आणि मनाचा हिय्या करून बसलो. डॅलस ला पोहोचलो आणि मला मेसेज आला की माझं पुढचं फ्लाईट पाऊण तासाने लेट झालं आहे. 


हे असं आहे. प्रवासात असे आशीर्वाद देणारे देवदूत भेटतात आणि डेस्टिनेशनला व्यवस्थित पोहोचतो.

Thursday, 9 May 2024

शरद कुलकर्णी

 तसं त्यांचं आयुष्य सुखासुखी चालू होतं. शरद कुलकर्णी १९८२ चे जेजे चे पदवीधारक. काही वर्षे नोकरी केल्यावर स्वतःचा जाहिरात व्यवसाय.  व्यवसाय पण मुंबईत छान स्थिरस्थावर झालेला. कुटुंबात पत्नी अंजली आणि मुलगा शंतनू. 

सर्व कुटुंबाला शारीरिक तंदुरुस्तीचा छंद लागतो. मग त्यातून मॅरेथॉन पळणं आलं आणि ते करता करता लागली गिर्यारोहणाची आवड. महाराजांच्या प्रेरणेने चालू झाली सह्याद्रीची शिखरे पादाक्रांत करण्याची मालिका. शरद आणि अंजली दाम्पत्य पन्नाशीच्या आसपास पोहोचतं आणि गिर्यारोहणतील अर्ध्वयू श्री सुरेंद्र शेळके यांच्याशी ओळख होते. ते त्यांच्या आवडीला व्यवसायिक प्रशिक्षणाची जोड देऊन त्यांच्या या छंदाचा आवाका वाढवायला सांगतात. 

हे जोडपं पोहोचतं हिमालयातील गिर्यारोहक संस्थेत.  तिथं चाळीस च्या वर वय असेल तर प्रवेश नसतो,  तर ते शारीरिक तंदुरुस्ती ची चाचणी ची मागणी करतात आणि प्रशिक्षण झाल्यावर प्रमाणपत्र पण नको असं लिहून देतात. अतिशय खडतर प्रशिक्षण ते पूर्ण करतात. 

आणि मग केला जातो एक अदिम निर्धार, सात खंडातील सर्वोच्च शिखरांना गवसणी घालण्याचा. रशियातील एलब्रूस, अर्जेंटिना तील अकांकागुआ, अलास्का तील देनाली, आफ्रिकेतील किलीमांजारो,  अंटार्क्टिका तील माउंट विंसन, ऑस्ट्रेलिया तील कोसीयुस्को (काही लोक ओशेनीयतील माउंट पिनकक पण घेतात) आणि अर्थात या सगळ्यांचा सरताज आशियातील माउंट एव्हरेस्ट. यापैकी दोन शिखरे आणि त्या बरोबर हिमालयातील इतर काही गिरिशिखरे सर केल्यावर, ठरतं की आता एव्हरेस्ट ला कवेत घ्यायचं, शरद यांचं वय ५७ तर अंजली ५३. 

सगळी तयारी होते. एव्हरेस्ट सर करायला दोन एक महिन्याचा कालावधी लागतो. दीड एक महिने तर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव करावा लागतो. आणि मग त्यांचा दिवस ठरतो, एव्हरेस्ट काबीज करण्याचा. अनेक जीवघेण्या, आणि या शब्दश:, वाटा आणि निसर्गाशी दोन हात करत शरद आणि अंजली एव्हरेस्ट च्या शेवटच्या टप्प्यात येतात. २२ मे  २०१९, व्हेदर विंडो ची पडताळणी करत आता शेवटचा टप्पा सर करायचा. इतरवेळेस ५ ते ७ दिवस उपलब्ध होणारी व्हेदर विंडो त्यावेळी मात्र उघड होते फक्त दोन दिवसांसाठी. जगभरातील आलेले पाच सहाशे गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी एकच झुंबड करतात. शेवटचा टप्पा हा "डेथ झोन" म्हणूनच ओळखला जातो. त्यात अक्षरश: "ट्राफिक जाम" जगातल्या सर्वोच्च जागेवर. 

एका ठिकाणी शरद आणि अंजली ची ताटातूट होते. शरद समिट पूर्ण करण्यासाठी पुढे जातात पण अंजलीची त्या ट्राफिक जाम मध्ये दमछाक होते. सर्वोच्च जागेवर जाऊन शरद परतीच्या प्रवासाला निघतात आणि पत्नीची भेट होते. त्यांची अवस्था एव्हाना बिकट झाली असते. एकेक मिनिट या ठिकाणी महत्वाचा असतो. शरद सरांचा शेर्पा म्हणतो की जर आपण आता इथून निघालो नाही तर आपल्या दोघांना पण जीव गमवावा लागेल. हृदयावर दगड ठेवून शरद अंजली मॅम ची साथ सोडण्याचा निर्णय घेतात. 

२२ मे २०१९ मध्ये या विचित्र परिस्थितीमुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू होतो. त्यात एक नाव असतं...... अंजली शरद कुलकर्णी. 

शरद परत आल्यावर डिप्रेशनचे शिकार होतात. त्या घटनेचा असा परिणाम होणं हे साहजिक होतं. पाच-सहा महिने जातात.  आणि एके दिवशी शरद ही नैराश्याची झूल फेकून देतात आणि बेफाम होऊन पर्वतावर धावायला लागतात, अगदी शुद्ध हरपेपर्यंत. जेव्हा त्यांचे सर्व सेन्सेस जागेवर आले असतात, तेव्हा त्यांच्या मनावर आलेलं  निराशेचं मळभ हे दूर झालेलं असतं. आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूचं दुःख विसरण्यासाठी ते परत पर्वतराजीला साद देतात. सिंहगड वर रात्री नऊ ला निघून सकाळी सहा वाजेपर्यंत वर खाली करणे, चढावर पंचवीस किलोचं वजन घेऊन कमरेला टायर बांधून स्वतःच्या शरीराला तयार करतात आणि पुढील तीन वर्षात देनाली, माउंट विन्सन, कोसीयूस्को आणि एलब्रुस ही चार खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करतात. आणि एकुलत्या एक मुलाला, शंतनूला, सांगतात की मला तुझ्या आईला श्रद्धांजली व्हायची आहे, ती पण पुन्हा एकदा एव्हरेस्ट वर जाऊन. 

२०२३ मध्ये पुन्हा एकदा मोहीम आखली जाते. ६१ वर्षाचे शरद कुलकर्णी जगभरातील तीस आणि चाळीस वर्षीय गिर्यारोहकांबरोबर पुन्हा एकदा एव्हरेस्ट वर चढाई करू लागतात. अनेक चमत्कारिक घटनांची मालिका घडते. एका ठिकाणी त्यांचा फॉल पण होतो. सेफ्टी इक्विपमेंट म्हणून असलेला दोरखंड जेव्हा त्यांचा फॉल थांबवतो तेव्हा उजवीकडे त्यांचाच एक ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक मित्र तिथे चिरनिद्रा घेत असतो. अशा अनेक "अगेन्स्ट ऑल ऑड्स" परिस्थितीला तोंड देत, शरद २२ मे २०२३ रोजी, ज्या जागेवर अंजलीची साथ त्यांनी साथ सोडलेली असते, तिथेच तिचा फोटो ठेवून तिला श्रद्धांजली वाहतात आणि त्याच दिवशी पहिल्या मोहिमेत त्यांच्याकडून राहिलेलं अजून एक काम पूर्ण करतात...... ते जगातल्या सर्वोच्च ठिकाणी तिरंगा फडकवतात.

अशी ही दुर्दम्य इच्छाशक्तीची चित्तरकथा ऐकताना काल आम्ही दीड एकशे दिग्मूढ झालो होतो. शरद बोलत होते तेव्हा हॉल मध्ये टाचणी पडेल इतकी शांतता होती आणि एक तासांनी जेव्हा शरद थांबले तेव्हा घशात कढ थांबवलेल्या अवस्थेतील दीडशे लोकांच्या टाळ्या मात्र थांबत नव्हत्या. 

कुठलाही अभिनिवेश न ठेवता जगातील सातही खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या ६१ वर्षाच्या तरुणाने आपली कहाणी सांगितली तेव्हा मी तर थिजून गेलो होतो. 

शरद सर, तुमच्या जिद्दीला सलाम आणि भविष्यातील सर्व मोहिमांसाठी हार्दिक शुभेच्छा. 

Friday, 3 May 2024

पार्टनरशीप

गौरीने पार्टनरशीप बद्दल प्रश्न विचारला. इतर अनेक मुद्द्याप्रमाणे इथेही मी माझे अनुभव लिहिणार आहे. माझी भागीदारी ही १९९३ ला चालू झाली आहे, म्हणजे तब्बल ३१ वर्षे मी आणि माझा पार्टनर एकत्र काम करतोय. आता माझे वय ५६ वर्षे आहे आणि पार्टनर चे ६८ वर्षे. म्हणजे दोघेही आता आमच्या व्यावसायिक करिअर च्या पर्यायाने  पार्टनरशिप च्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. म्हणजे त्याला यशस्वी पार्टनरशिप म्हणता येईल. 

सगळ्यात आधी मी एक सांगू इच्छितो की आम्ही दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे होतो. मी ग्रोथ बाबत प्रचंड आग्रही तर तो अगदीच चांगल्या अर्थाने निवांत, मी खूप चिडका तर तो अगदी शांत, मी भिडस्त तर तो स्पष्टवक्ता किंवा अगदी खडूस सुद्धा म्हणता येईल असा, मी वेळ पाळण्याबाबत अत्यंत अजागळ तर तो अगदी वक्तशीर, मी अनेक बाबतीत खूप फ्लेक्सिबल तर तो रिजिड, मी टेक्नॉलॉजी ला जवळ करणारा तर त्याचा रिलेटिव्हली कमी विश्वास, त्याला टेक्निकल स्किल्स वर जास्त विश्वास तर मला बिझिनेस मॅनेजमेंट वर.  असे अनेक गुण अवगुण. 

मग सारख्या क्वालिटीज काय होत्या दोघात? पहिली गोष्ट म्हणजे दोघांनी एकमेकांना जसे आहोत तसे स्वीकारले. एकमेकांना बदलायचा फारसा प्रयत्न केला नाही. गेल्या तीन दशकात दोघेही बदललो आहोत पण ते आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा. वर उल्लेखलेल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत, दोघांच्याही. या गोष्टीचा दोघांनाही मानसिक त्रास झाला. पण एकमेकांना सहन करण्याचं शहाणपण जागतं ठेवलं. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर विश्वास. कमालीचा विश्वास. पैशांचे सगळे व्यवहार मी बघायचो. पण अक्षरशः एकदाही, आय मिन इट, एका पैशाचा सुद्धा अविश्वास माझ्यावर दाखवला नाही. 

तिसरी गोष्ट म्हणजे आमचे अनेक निर्णयाबाबत मतभेद झाले पण एकदा निर्णय झाल्यावर मात्र मनात काहीही किंतु न ठेवता त्याला सपोर्ट केला. आमची भांडणं पण बेकार झालीत. त्यात चूक कुणाचीही असो, आवाज माझाच चढलेला असायचा. पण इतकं होऊनही रात गयी, बात गयी या न्यायाने ते विसरून पुन्हा एकत्र जोमाने काम करण्याचा मोठेपणा दोघांनी दाखवला. 

चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांनीही कंपनीबद्दल असलेल्या एकमेकांच्या एकनिष्ठतेबद्दल कधीही शंका घेतली नाही. व्यवसायापुढे स्वतःच्या भावना ज्या पार्टनरशीप साठी मारक असतात, उदा: इगो, लोभ, हव्यास त्यांना कामाच्या जागेत थारा दिला नाही. 

अर्थात ही पार्टनरशीप शेवटापर्यंत टिकून राहण्यास अजून काही मित्र तसेच गेल्या बारा वर्षांची सेटको बरोबरची साथ ही पण पूरक ठरली हे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. 



Saturday, 20 April 2024

भावनिक गुंतवणूक

 परवा आमच्या कंपनीतल्या एका मुलीच्या लग्नाची पोस्ट टाकली तर त्यावर माझा मित्र सदानंद बेंद्रे याने माझी सहकाऱ्यांबरोबर असणारी भावनिक गुंतवणूक यावर लिहायला सांगितलं. म्हणून ही पोस्ट. 

अगदी खरं सांगायचं तर इतर गुण अवगुणाप्रमाणे कंपनीतल्या सहकार्यांबरोबर ची नाती आणि भावनिक गुंतवणूक ही पण वयोमानाबरोबर इव्हॉल्व्ह होत गेली आहे. जेव्हा कंपनी लहान होती, तेव्हा नैसर्गिक होतं की त्याला मी कुटुंब समजायचो. त्यामुळे माझे सहकारी हे फॅमिली मेंबर प्रमाणे असायचे. त्यांचे प्रश्न हे माझे प्रश्न व्हायचे. त्यांनी ते जर मला सांगितले नाही तरी मला त्यांचा राग यायचा. त्यांना मी मग आउट ऑफ वे जाऊन मदत पण करायचो. पण त्याचा परिणाम असा झाला की मी त्यांच्या बाबतीत भयंकर पझेसिव्ह व्हायला लागलो. त्यांनी कंपनी वगैरे सोडली की खूप डिस्टर्ब व्हायचो. थोडक्यात मी त्यांना जी मदत करायचो आणि त्यांना कौटुंबिक रिलेशन मध्ये बांधायचो, या बदल्यात त्यांच्या कडून मी काही अपेक्षा ठेवायचो. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मला स्वतःला भयंकर मानसिक त्रास व्हायचा अन त्यातून मी कधी आक्रस्ताळेपणा पण करायचो. कदाचित माझ्या वागण्यातून हे प्रतिध्वनीत पण होत असेल की मी हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे. 

जसजसे या मानवी नात्यांचे भरेबुरे अनुभव यायला लागले तसा मी पण कंपनीचा कर्ता म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलो. त्यातून मला जबरदस्त शिकवण मिळाली आणि मी काही धडे घेतले. एकतर न मागता मदत देणं बंद केलं. आणि मुख्य म्हणजे ज्या मदतीतून माझ्या मनात अहंभाव तयार होईल अशी मदत करणं बंद केलं. हे जरी करत गेलो तरीही माझ्या सहकार्याबद्दल असणारं माझं कर्तेपण हे अबाधित राहिलं. फक्त त्यातून येणाऱ्या पझेसिव्ह फिलिंगला तिलांजली दिली. मी सेटको परिवाराचा प्रमुख आहे आणि माझ्या लोकांची काळजी घेणे हे माझं आद्य कर्तव्य आहे ही भावना मनात प्रबळ होत गेली. याची सगळ्यात जबरदस्त अनुभूती लागोपाठच्या दोन घटनांमधून झाली. 

पहिली घटना म्हणजे ७ जुलै २०१९ रोजी झालेला तो भीषण अपघात अन त्यात गमावलेले माझे चार सहकारी. ज्या घटनांमुळे तुझ्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला अशा तीन घटना सांग असं मला कुणी विचारलं तर या अपघाताचा मी उल्लेख करेल. त्या आघातातून सावरताना माझ्या क्रायसिस मॅनेजमेंट ची कसोटी लागली.

आणि दुसरी कसोटी करोना काळात झाली. मला सांगायला आनंद होतो आणि थोडा अभिमान पण वाटतो की त्या काळात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना माझे लोक आणि ते संकट यांच्या मध्ये खंबीर पणे उभा राहिलो. पण हे सगळं करताना मी लोकांसाठी नव्हे तर माझ्या आनंदासाठी मी करतोय हे मनावर सातत्याने बिंबवित राहिलो. 

या सगळ्या प्रोसेस मध्ये हे झालं की माझ्या मनात माझ्या सहकार्याबद्दल प्रेम तर पूर्वीसारखंच आहे पण त्यात एक मलाच हवीहवीशी वाटणारी निरपेक्षता आली. आजही पालकत्वाची भूमिका तशीच आहे पण त्यातून येणाऱ्या मालकी हक्क भावनेला मी हद्दपार करू शकलो. 

या सगळ्याचा फायदा असा झाला की माझ्या मनात एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर या नात्याबाबतीत खूप स्थितप्रज्ञता आली. ज्यांच्या बरोबर माझे सिद्धांत सिंक झाले आहेत त्यांना मी काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतो पण त्याउपरही कुणाला माझं म्हणणं पटलं नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करण्याची मानसिकता मी बाळगून आहे. 

तर असं आहे. थोडं कॉम्प्लेक्स वाटेल कुणाला. पण माझ्या मनात माझ्या सहकार्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्याबदल्यात येणारा विमोह मात्र मी त्यागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मानसिक स्टेटस मी खूप एन्जॉय करतो आहे. 

Monday, 15 April 2024

विरोध

 विनायक पाचलग च्या थिंक बँक वर घेतलेल्या माझ्या मुलाखतीचं कवित्व तसं संपलं होतं. कौतुक पण झालं, मुलाखतीवर यु ट्यूब वर काही विरोधी प्रतिक्रिया पण आल्या "म्हणजे हा काय बडबड करतोय. स्वतः लोकांना किती पगार देतो" वगैरे वगैरे. 

मुलाखत एअर झाल्यावर दहा एक दिवसांनी मला एक फोन आला, माझ्या एका जुन्या मित्राचा. अनेक वर्षात त्याचा अन माझा काही संवाद पण  नाही आहे. भेटणं तर दूर पण फोन कॉल पण नाही. त्याचा फोन आला आणि त्याची सुरुवातच 

"काय अर्धवट ज्ञान घेऊन मुलाखत देणारे तथाकथित विचारवंत" अशी झाली. मी गांगरलोच एकदम. त्यानंतर तो जे काही बोलत होता, त्याची मला काही टोटल लागत नव्हती. सुरुवातीला राग आला, पण नंतर त्याच्या बोलण्याची गंमत वाटायला लागली. कारण मी जरी फार काही कर्तृत्ववान वगैरे नसलो तरी माझ्या या मित्राने आयुष्यात भरीव केल्याचं आठवत नाही. किंबहुना कामाच्या तराजूत माझं वजन किलोभर भरत असेल तर मित्राचं छटाक पण होणार नाही. तरीही मला फटकवायचा त्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा होता. 

माझा एक तर स्वभाव असा आहे की मला एखाद्या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तरीही समोरचा दुप्पट आत्मविश्वासाने जर सांगत असेल "अरे तुला माहिती नाही, मध्य प्रदेश ची राजधानी  लखनौ आहे, भोपाळ नाही" तर मी "असेल बुवा" असं म्हणून मूग गिळून गप्प बसतो. त्या फोन मध्येही मी गप्प बसलो. 

ही अजून एक सोशल मीडियाची देन आहे. दुसर्याने काही मत व्यक्त केलं असेल अन त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी मत व्यक्त करायचं नाही तर "व्यासंग वाढवा", "गेट वेल सून", "कडक गांजा कुठं मिळतो" किंवा माझा मित्र म्हणाला तसा "अर्धवट माहिती घेऊन काहीही बरळू नका" अशी काही दुसऱ्याची खिल्ली उडवणारी दीड शहाणपणाची वाक्यं फेकायची. विरोध व्यक्त करण्याचा आपण वापरतो त्यापेक्षा चांगली पद्धत असते हे लोकांच्या गावीही नसतं. 

असो. माझे बिझिनेस कोच म्हणतात तसं "there is a way of living life.....And there is always better way of living life." विरोध करताना पण हे ध्यानी ठेवावं असं मला वाटतं. अर्थात नेहमीप्रमाणे..... आग्रह नाहीच. 

(पोस्ट लिहिण्यासाठी दोन कारणं झालीत. एका संयमित अकौंट वर व्यासंग वाढवा...बरळू नका अशी एका फेक अकौंट ने दिलेली कॉमेंट पाहिली आणि योगायोगाने पोस्ट त्या गावाहून लिहितो आहे जिथून माझ्या मित्राचा फोन आला होता. जमलं तर त्याला भेटून आज संध्याकाळी कोकम सरबत पिताना त्याच्याशी चर्चा करावी म्हणतोय) 

Friday, 12 April 2024

मुविंग ऍस्पिरेशन्स

 सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ही एक कैचीत पकडली गेलेली जमात असते. बाहेरच्या लोकांना वाटत असतं, यांना काय कमी आहे? सगळं रेडी प्लेट मध्ये तर मिळालं आहे. बोर्न विथ सिल्व्हर स्पून वगैरे. हे जर खरंच झालं असेल तर या दुसऱ्या पिढीच्या मनात कॉम्प्लेसन्सी येते आणि व्यवसायाची वृद्धी थांबते. आणि दुसरीकडे अशीही परिस्थिती असते की वडिलांच्या कार्यपद्धतीमुळे एक संस्कृती तयार झालेली असते, जी या नवीन पिढीला झेपत नाही. पहिल्या पिढीच्या उद्योजकाने तयार केलेले सहकारी मालकाच्या मुलाला किंवा मुलीला सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

पण उद्योग उभा केलेली पहिली पिढी आणि त्याच व्यवसायात उतरलेली त्यांची दुसरी पिढी यांच्यात समन्वय असेल तर अनेक वर्षांची लिगसी तयार होणारे उद्योग उभे राहतात हे एव्हाना आपल्याला रिलायन्स, बजाज, बिर्ला, महिंद्रा या उदाहरणावरून माहिती आहेच. अर्थात या लोकांनी दोन पिढ्यातील विचारांच्या तफावतीमुळे तयार होणारे प्रॉब्लेम्स हे प्रोफेशनल्स घेऊन सोडवले आहेतच. ही दूरदृष्टी छोटे उद्योग दाखवत नाहीत. किंबहुना त्यामुळेच ते छोटे राहतात. 

या पार्श्वभूमीवर मला एक पुस्तक हातात आलं, श्री दत्ता जोशी लिखित "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स", ज्यामध्ये सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर च्या तब्बल पंचवीस स्टोरीज आहेत. त्या कथांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 

एक जैन इरिगेशन सोडलं तर बाकी सगळ्या केसेस या लघु आणि मध्यम उद्योगांच्या आहेत. पण त्यातील बहुतेक उद्योग या एम एस एम ई तुन लार्ज उद्योगसमूहात जाण्याच्या सीमेवर आहेत. दुसरं मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर जोशींनी अनेक सो कॉल्ड औद्योगिकदृष्ट्या मागे असलेल्या म्हणजे धुळे, नांदेड, लातूर या शहरातील उद्योगांना पुस्तकात स्थान दिले आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे उद्योग त्यांनी कव्हर केले आहेत. त्यात माझं आवडतं इंजिनियरिंग आहेच, पण फूड इंडस्ट्री, फर्टिलायझर, कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर असे सर्व प्रकारच्या उद्योगाबद्दल पुस्तकात वाचायला मिळतं. 

मला या पुस्तकात खूप जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ही सर्व नवीन पिढी परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परतली आहे आणि कौटुंबिक व्यवसायाला अजून जोमाने पुढे नेत आहे. 

त्यात अनेक इंस्पायरिंग टेक अवेज आहेत. मग त्यात बिझिनेस लॉस मध्ये जातोय असं दिसल्यावर तो वेळेत बंद करायची कथा आहे, करोना मध्ये व्यवसायात कर्ज झाल्यावर त्यातून कसे बाहेर पडले ती गोष्ट आहे, व्यवसायातील प्रॉफिट हा फक्त स्वतःच्या नव्हे तर व्यवसाय वृद्धीसाठी कसा वापरला याचे धडे आहे. 

ज्यांना कुणाला "व्यवसाय" या करिअर बद्दल, प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यांनी प्रत्येकांनी हे पुस्तक वाचावं असं मी आवर्जून सांगेन. पुस्तक वाचनीय झालं आहे. अर्थात दत्ता जोशींचा या विषयात हातखंडा आहे. त्यांची तब्बल ३० एक पुस्तकं या विषयावर प्रकाशित झाली आहेत. 

फर्स्ट जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ला बऱ्याचदा प्रतिकुलतेतून व्यवसाय उभा करावा लागतो. पण फॅमिली मॅनेज बिझिनेस मध्ये सेकंड जनरेशन ला अनुकूलता नेहमी पूरक असेलच असे नाही तर कधी ती मारक पण असते. त्यावर कशी मात करायची याचा वस्तुपाठ म्हणजे "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स".