Tuesday 11 August 2015

कन्क्लुजन

मध्ये एक सिरीज लिहिली. अ…….अभियंत्याचा म्हणून. WA वर एका परिचित ग्रुप वर टाकली असता, मित्राने प्रश्न विचारला, का लिहिलं तू हे? आणि साधारण त्या प्रश्नाचा रोख असा होता की  स्वत:ला जास्त शहाणा समजतोस का? की लोकं वाचत आहेत म्हणून काहीही लिहित सुटायचं का? की तुझा वेळ जात नाही का? धंदा मंदीत आहे का? प्रश्न एकंच पण त्यातून अनेक अर्थ ध्वनित होत होते.

मी पण मग विचार केला, खरंच का लिहिलं आपण हे? एक उत्तर तर नक्कीच, दुसरं कोण लिहिणार, नाही का? आपल्या हातून आजवरच्या आयुष्यात तर असं काही नाही घडलं की दुसऱ्याने त्याची दखल घ्यावी. आणि आत्मचरित्र वैगेरे लिहिण्या इतका काही मी स्वत:च्या नजरेत मोठा नाही. मग आपली टिमकी आपणच वाजवावी. ढोल पण म्हणता येत नाही. तर लिहिलं यासाठीच की अत्यंत सरधोपट पणे आयुष्य जागून सुद्धा ती वाट बिकट वहिवाट आहे असं लोकांना वाटत गेलं. तर ती तशी नसते हे सांगण्यासाठी हा खटाटोप.

सगळ्यात पहिली गोष्ट अशी की नोकरी की बिझिनेस? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. किंवा माझे बरेच मित्र म्हणतात "तुमची काय बुवा मजा आहे, धंदेवाली मंडळी तुम्ही" मला स्वत:ला असं काही वाटत नाही. माझं एक साधं सोपं गणित आहे. तुम्ही नोकरी करताना जिथे काम करता, ती कंपनी स्वत:ची आहे असं समजून काम करता तेव्हा भविष्यात तुम्ही बिझिनेस चालू करता. आणि जेव्हा धंद्यात तुम्ही स्वत:ला मालक न समजता नोकरदार म्हणून काम करता तेव्हा तुमची कंपनी मोठी घोडदौड करते. "An employee has to work as if he is an employer and an employer has to work as if he is an employee". धंदा केला तर श्रीमंती येते, नाही असं नाही. पण त्याला एक खूप मोठी किंमत चुकवावी लागते. मग ती कधी कुटुंबाला कमी वेळ देण्याच्या रुपात तर कधी ढासळत्या तब्येतीत. मला स्वत:ला असं वाटतं की भौतिकतेच्या कसोटीवर मी आता जसा आहे तसाच नोकरीत असलो असतो. आता कुणी यावरून असा अर्थ काढला की मी धंदा व्यवस्थित करत नाही तर ठीक आहे. एक मोठा फरक म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. हे मात्र धंद्यात जास्त असतं. नक्कीच.

दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बिझिनेस मध्ये खूप रिस्क आहे असं म्हंटल जातं. असेलही कदाचित. हो, लोकं पी एफ काढतात, कुणी घर बँकेत गहाण ठेवतं, कुणी मार्केट मधून पैसे उचलतं. मी मात्र स्वत: असं काहीही केलं नाही. धंदा केला पण निवांत. बाकी खूप प्रेशर्स सहन केले , पण पैशाचं टेन्शन कधी ओढवून घेतलं नाही. म्हणजे भरपूर पैसे होते असं नाही, पण अंथरूण पाहून पाय पसरले हे खरं. त्यामुळे खाण्याचे वांदे कधी झाले नाहीत. प्रतिकूलता आली की कर्तृत्व फुलतं असं म्हणतात. माझंही कदाचित जितकं फुलायाला हवं तितकं नसेलही. काही मित्र म्हणतातही, तुला धंदा करता येत नाही. खरंही असेल ते. परिस्थितीने कधी चटके दिले नाहीत की पोटाला चिमटा काढला नाही. याचा अर्थ कष्टच केले नाहीत का? तर ते केले की. एम ८० वरून दिवसाला १०० किमी ची रपेट केली. सिक्स सिटर किंवा जीपड्यातून अर्ध ढुंगण बाहेर काढून २० एक किमी प्रवास केला. कधी पायी चाललो तर कधी ट्रकमधून. पण आपण फार काय स्ट्रगल करतोय असं कधी वाटलं नाही.  अर्थात वैभवी साथीला होती, पण ती सुद्धा तिची lab चालवत होती. बँकेचं लोन, पोरांचा पगार आणि सप्लायर्स चे पेमेंट हे वेळेत करण्याची सुबुद्धी दे हीच प्रार्थना मी नेहमी देवाजवळ करत आलो आहे, आणि देवाने मला कधीही निराश केलं नाही आहेे.

मुळात उद्योजक हे नाम नसून विशेषण आहे. उद्योजकता आहे म्हणजे एक गुण आहे. ज्या कंपनीच्या एम्प्लॉयीजमधे उद्योजकता असते ती कंपनी भरभराटीची होते. त्यामुळे "हे हात नोकरी मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी जन्माला आलेले आहेत" वैगेरे डायलॉग लोकं मारतात ते मला भंकस वाटतं. उद्योजकता फक्त मालकांची मक्तेदारी नसून ती कामगार आणि नोकरदार मंडळींची पण आहे.

हे आहे हे असं आहे.  मला हेच सांगायचं होतं की धंदा म्हणजे रिस्क, जोखिम वैगेरे म्हंटलं जातं. पण जेव्हढा त्याचा बागुलबुवा केला जातो तेवढं काही ते अवघड नाही. अनुभवांती दिशा ठरली अन त्या वाटेने इमानऐतबारे चालत गेलो की ती वाट कितीही खाचखळग्यांनी भरलेली असो, तिचं नंतर चांगल्या पायवाटेत आणि मग राजमार्गात रूपांतर होतं असा माझा अनुभव आहे. तुमचाही थोड्या फार फरकाने असाच असावा याबाबत शंका नाही. 

No comments:

Post a Comment