Tuesday 4 August 2015

Picture

आयुष्यातील पहिली ब्ल्यू फिल्म औरंगाबादला बघितली. १९८५ किंवा ८६.  अक्षरश: सोहळा होता. ५-६ जण होतो. सर्व वयोगटाचे. अगदी शेजारचे काका ही होते. ते बाबांचे मित्र. मला भिती वाटत होती, की त्यांनी बाबांना सांगितलं तर? बहुधा त्यांनाही भिती असावी, मी काकूंना सांगितलं तर? दोघांनी एकमेकांना टाळ्या देत ते तासभरच प्रकरण बघितलं. हॉस्टेल ला राहत होतो खरं तर. पण औरंगाबादेत नंतर काही "तसलं" बघायची इच्छा झाली नाही.

तिथून मग पुण्यनगरीत आलो. अशोकनगर ला एम एस इ बी कॉलनी त रहायचो. इंजिनियरिंग चा अभ्यास चालू असायचा. आमच्या काळी इंजिनियरिंग रात्री अभ्यास केल्यावरच सुटतं असा एक सार्वत्रिक समज होता. अशाच एके रात्री अभ्यासात गर्क असताना, म्हणजे पेंगत असताना, आवाज आला "ए राज्या चल, शेवटच्या बिल्डींगमध्ये ट्रिपल एक्स  लावली आहे येडया." पेंगत असलेलो मी ताडकन उठलो आणि तडक त्या बिल्डींगचा टेरेस गाठला. 

रात्रीचा एक वैगेरे वाजला असेल. आणि थाट काय वर्णावा. म्हणजे अगदी रीतसर अरेंजमेन्ट होती. समोर टी पॉय वर टी व्ही. समोर दहा बारा आमचेच मित्र. हे सगळं ठरवताना त्यांनी मला का कटवलं होतं हे अजून न सुटलेलं कोडं आहे. चेहऱ्यावरच्या सज्जनतेच्या मुखवट्याला लोकं तेव्हापासून भुलत आहेत. बघू किती दिवस अभिनय करता येतो ते. असो. टी व्ही  ची पोझिशन अशी होती की डोळ्यांना कमीतकमी व्यायाम व्हावा. समोर चालू असलेला भक्ती रस सर्वजण अत्यंत विनम्रतेने ग्रहण करत होते. खूप हळू आवाजात कुजबुज चालू होती. मी डावीकडच्या कोपऱ्यात जाऊन बसलो. बाजूचा दिलीप ओशाळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे बघून हसला. मी त्याला हळूच टाळी दिली. थियेटर मध्ये उशिरा पोहोचल्यावर आपण पहिला प्रश्न विचारायचो "किती वेळ झाला?" तेच दिलीप ला विचारलं. तो म्हणाला "संपत आला लेका. आता शेवटचा सीन" मी हिरमुसलो. 

शेवटचा जबरी सीन चालू होता. सगळ्यांच्या उत्कंठा अगदी शिगेला पोहोचल्या होत्या. सगळ्यांनी रोखलेले श्वास सोडले असतानाच आवाज आला "ए, अरे काय चालू आहे रे नालायक पोरानो" अचानक कुणीतरी लाईट लावले. पाहतो तर महेश्या आणि संज्याचे वडील. "कुठं आहेत रे भाड्यानो. हे असले उद्योग चालतात रे हरामखोरानो. घरात सांगतो जय संतोषी मा पिक्चर पहायचा नवीन टी व्ही वर, आणि इथे ही थेरं चालू आहेत" हे बोलत असताना महेशच्या कानफटात बसली पण होती. पोरं आवरा आवरी करत असताना मी सुमडीत निघून आलो होतो. तसंही मला पोरांनी हे करताना विश्वासात घेतलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे सीन पण शेवटचा च पाहायला मिळाला होता. 

मी हळूच घरी पोहोचलो. गुपचूप अंथरुणात झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबांची नजर चुकवत असतानाच त्यांनी विचारलं "काय काल तुम्ही पण दिवे लावलेत का टेरेसवर" मला अंधारात कुणी पाहिलं नव्हतं, असं मला वाटत होतं. काय झालं, हे विचारण्यापासून माझा अभिनयाचा कस लागला. बाबा काही न बोलता पेपर वाचत बसले. त्यांना कळलं की नाही हे ते जाईपर्यंत समजलं नाही. अशी कित्येक गुपितं मृत्यूबरोबर गाडली जात असतील नाही ?

दोन दिवसांनी महेश भेटला. म्हणाला "लै मारलं रे बापाने. ते ठीक आहे रे. पण बापाने पण पूर्ण सीन बघूनच आवाज टाकला. किती वेळ बघितला असेल काय माहित. फार वाटत असेल तर सीन चालू झाल्या झाल्या थांबवायचं ना. आपल्याला थांबवणारे लोकं आपल्यापेक्षा चालू आहेत. काय बोलतो?" अन टाळीसाठी हात पुढे केला. 

महेश कुठे आहे माहित नाही. त्याला  आजही मला टाळी दयावीशी वाटत आहे. 
*****************************************************************************

गोष्टीतला मजेचा  भाग सोडून दया. पण मला नाही वाटत समाज इतका कमकुवत आहे म्हणून. एखादी गोष्ट व्हल्गर आहे हे सापेक्ष आहे. आणि जिथे सापेक्षता आली तिथे वाद आला. ज्या साईट वर बंदी आली त्या मुळातच भंगार असाव्यात. इतक्या की त्यावर बंदी न घालताच या महासागरात गायब झाल्या असत्या. पण वाद ओढवून घ्यायची सवय आहे त्याला कोण काय करणार?

अजून एक असं  आहे बघा. योग शिकवणाऱ्या पतंजलीचा आपल्या इथे उदो उदो होतो. रोग आणि त्यावरचे उपाय सुचवणार्या चरक आणि सुश्रुत ऋषींना आपण डोक्यावर चढवतो. त्या न्यायाने भोग शिकवणाऱ्या वात्सायानाला आपले सरकार इतकं  सहजासहजी फाट्यावर मारणार नाहीत. काय बोलता?

तळटीप

- वाचण्याच्या नादात योग, रोग आणि भोग हे यमक तुमच्या लक्षात आलं नसेल म्हणून परत आठवण. यमक विशारद च्या दिशेने अजून एक पाऊल.

- कुठल्याही विकृत साईट पेक्षा जांबाज मधील डिम्पल कापडिया-अनिल कपूर चा सीन, सागर मधील डिम्पल-ऋषीचा प्रणय, बेटा मधील अनिल कपूरला माधुरी कडे बघून धक धक होणं आणि मिस्टर इंडिया मधील फ्रेममध्ये नसणाऱ्या अनिल कपूरला काटे नही कटते म्हणत प्रेमाची साद घालणाऱ्या श्रीदेवीने मला नेहमीच भंडावून सोडलं आहे. बाय द वे या सगळ्या लिंक्स जिवंत आहेत.  

No comments:

Post a Comment