Saturday 15 August 2015

भविष्य

भारत एक समृद्ध देश व्हावा हे आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. हो, मलाही तसंच वाटतं. पण आजची सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती पाहता अवघड तर वाटतं. पण हे मन खूप आशावादी आहे. मग मी विचार केला अन साधारण खालील पर्याय माझ्या मनात आले. या पैकी काही घडेल अन आपला  एक सशक्त आणि समृद्ध देश म्हणून नावारूपाला येईल. कुठलाही पर्याय घेतला तरी त्याचं मूळ लोकसंख्येशी जाऊन थांबतं. मग थोडक्यात लोकसंख्या कमी कशी होईल.

१. सध्या जे चालू आहे त्या पद्धतीने समाजाचं evolution होत राहील. एक दिवस असा येईल की तेव्हापासून लोकसंख्येची negative growth होईल. त्याच वेळेला पाण्याचं नियोजन होईल. सगळ्या देशात मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. इंडस्ट्री आणि शेती याचा योग्य समन्वय साधला जाईल. लोकं धर्म आपल्या घरात सांभाळतील आणि बाहेर धर्मावरून मारामाऱ्या होणार नाहीत. विकासाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे मुंबईची लोकसंख्या २० लाख होईल. मेट्रो सिटी असा काही प्रकार न राहता अनेक छोटया गावांची लोकसंख्या वाढेल.

२. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाची ठिणगी पडून मध्य दक्षिण आशिया त प्रचंड हाहाकार माजेल. अण्वस्त्रांचा मुबलक वापर होऊन भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. ५० कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल देशात प्रतिकुलतेची अनेक आव्हाने उभी राहतील. त्या आव्हानावर मात करत देश प्रगती करत राहील. आणि पुढील ५० वर्षात सशक्त देश म्हणून नावारूपाला येईल. (शेजारचा पाकिस्तान देश सुद्धा यातून शहाणपण शिकून राहण्यास योग्य देश होईल)

३. बोल तिरंग्या तुला देऊ कशी सलामी
    जातीय दंगलीत हात कापले दोन्ही …………. सतीश दराडे (शब्द पुढे मागे झाले असतील. माफी असावी)
भारतातील लोकं जातीधर्मावरून एकमेकांच्या जीवावर उठत जातील. एक दिवस असह्य होऊन देशात प्रचंड यादवी माजेल. पूर्ण देशात कत्तली होतील. देश अगदी होत्याचा नव्हता होईल आणि मग शून्यातून विश्व उभं राहील.

४. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे देशात निरनिराळ्या भागात दुष्काळ पडेल. बर्याच भागात वाळवंट तयार होईल. त्या भागातले लोकं पाण्याच्या शोधात दुसर्या प्रदेशात जातील. तिथले लोकल लोकं आणि माय्ग्रेटेड लोकांच्यात युद्ध होईल अन लोकं मृत्युमुखी पडून देशाची लोकसंख्या कमी होईल.

५. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत असे किंवा याही पेक्षा छोटे देश तयार होतील. त्या छोटया देशांच्या समूहाला Indian Union असं म्हंटल जाईल. युरो सारखं त्याचं चलन सारखं असेल. आणि मग या छोटया देशांची अस्थापना सुकर होऊन शांतता आणि समृद्धी येईल.

६. देशात एखादा हुकुमशहा जन्माला येईल. तो आणि आर्मी सगळ्या देशाला ताब्यात घेईल. प्रचंड हिंसाचार होईल. असंख्य लोकांना नाहीसं करण्यात येईल. लोकं उठाव करतील. हुकुमशहाला लोकं चिरडून टाकतील. आणि मग पुन्हा देश उभा राहील.

७. लोकं या देशातल्या अनागोंदीला कंटाळतील. आणि मग देश सोडून जगात जिथे जागा मिळेल तिथे इमिग्रेट होतील. जगभरात ठिकठिकाणी भारतीय दिसतील. हे होताना भारताची लोकसंख्या कमी होईल.

८. देशात ठिकठिकाणी भूकंप, पूर असे निसर्ग निर्मित संकटं येतील. मोठमोठी शहरं जमिनीवरून गायब होतील.

९. देशात कुठला तरी रोग आक्रमण करतील अन मग मुंग्यासारखी माणसं पटापटा मरत जातील. जो पर्यंत रोगाला आटोक्यात आणायची लस तयार होईल, मी निम्म्याहून अधिक देश त्या रोगाला बळी पडला असेल.

असं काहीतरी होईल आणि हा देश आजपासून ५० वर्षाने/१०० वर्षाने एक समृद्ध देश होईल.

बाकी माहित नाही, पण होईल खरं हे नक्की

भविष्य 

No comments:

Post a Comment