Tuesday, 24 May 2016

भाषा

माझे अमेरिकन मित्र आणि मी, यांच्यात काही शब्दावरून असा गोंधळ होतो की काही विचारता सोय नाही. काही वेळा जुळतंही बरोबर. माझं इंग्रजी तसं मराठी वळणाचं. त्यामुळे काही आपल्या म्हणी जेफ शी बोलताना तशाच भाषांतरित करतो. काही त्यांना आवडतात. "मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं" हा टीपीकली मराठी वाक्प्रचार. मी त्याचं एकदा सरळ भाषांतर केलं "In the meantime, lot of water has flown below the bridge" पहिल्यांदा वाटलं, आपली गल्ली चुकली की काय? पण जेफ ला ती म्हण आवडली आणि नंतरच्या संभाषणात ती वापरली सुद्धा.

एकदा मी "पोटात खड्डा पडला" हे इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आता खड्डयाला hole शब्द असेल हे मला जाणवलं पण नाही. मी आपलं stomach, digging, pit वगैरे शब्द वापरून काही तरी जुळवत होतो. तेवढ्यात जिम पटकन म्हणाला " A hole in the stomach" आणि माझी सुटका झाली.

माझी लग्नाची कहाणी सांगताना मी सांगितलं की माझं ९१ ला लग्न झालं पण त्याआधी दोन वर्ष माझं अफेयर चालू होतं. मी असं म्हणल्यावर जिम च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची माळ उभी राहिली. संवाद पुढे गेल्यावर असं कळलं की अमेरिकेत अफेयर, म्हणजे आपल्या भाषेत लफडं, हे एक्स्ट्रा मरायटल किंवा अजून पुढे जाऊन इंट्रा मरायटल असं असतं. प्रेमिकेबरोबर लग्नापूर्वी असलेल्या प्रेमाला "Dating" किंवा "courtship" असं म्हणतात. आपल्याकडे याला फारच सांस्कृतिक भाषेत प्रकरण म्हणतात, तिकडे "both are together" असं म्हणतात. गोष्ट सगळी उकलल्यावर माझ्या बद्दलचं जिम चं चांगलं मत बरकारार राहिलं.

अर्थात या बोलण्याच्या नादात त्यांच्याही काही म्हणी कळतात. अर्थात पहिल्या फटक्यात त्या नाही लक्षात येत. मग जेफ वा जिम त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतात. काही चांगली गोष्ट घडवून आणायची असेल तर एखादी न आवडणारी गोष्ट करावीच लागते. त्यासाठी जेफ एकदा म्हणाला "You have to break an egg, if you want to have an omelette"

भाषांची आदानप्रदान हा एक आनंददायी अनुभव असतो.

टाईमपास

माणसाचं रिटायरमेंट वय किती असावं? थोडा वादाचा मुद्दा आहे, नाही?. मला स्वतःला ५० ते ५५ मध्ये रिटायर व्हायला आवडेल. म्हणजे याचा अर्थ काम करणार नाही असा होतो का? तर नाही. याचा अर्थ इतकाच की पैसे कमावण्यासाठी काम करणं बंद करेल. किंवा पैसे कमावले तरी अगदी लागतील तितकेच.

लोकं कशी ६०-६५ आणि काही जण सत्तरीला पोहोचून सुद्धा कामाला जातात याचं मला आश्चर्य वाटतं. तसं जायला काही हरकत नाही. किंबहुना शिक्षणासारख्या व्यवसायात साठी नंतरच धार येत असावी. किंवा डॉक्टर, वकील या प्रोफेशन मध्ये सुद्धा वय वाढत जातं तसा अनुभव मिळत जातो. आणि लोकं जेव्हा आपल्या अनुभवाच्या शिदोरीचं गाठोडं जेव्हा दुसऱ्यासाठी उघडतात तेव्हा देणारा आणि घेणारा समृद्ध होतात. मला अशा लोकांबद्दल नितांत आदर वाटतो.

पण काही वयस्कर लोकांचं आणि अशी लोकं की ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर बऱ्याच लोकांचं भवितव्य अवलंबून असतं, त्यांचं लॉजिक कळत नाही. "या वयात कसं काय कामाला जाता?" असं विचारलं की ते म्हणतात "घरी बसून तरी काय करणार?. कामात असलो की टाईम पास होतो" या उत्तरावर माझा आक्षेप आहे. कामाला जाण्याचा उद्देश काही तरी वेगळं करून दाखवण्याचा किंवा आपला अनुभव दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरायचा नसून, टाईम पास करायचा असा होतो तेव्हा अशी वयस्कर मंडळी कामाच्या ठिकाणी तापदायक ठरतात. कामातून आनंद मिळतो अशी ज्यांची भावना असते त्यांचं असणं हे दुसऱ्यासाठी आनंददायी असतं. पण घरी बसून काय करणार या भावनेनं लोकं जेव्हा कामावर जातात तेव्हा हे इथं काय करणार ही भावना तिथल्या लोकांच्या मनात येतेच येते. साधारण अशा विचारसरणीचे लोकं कामावर जातात तेव्हा त्या कंपनीचं काय चालू आहे याचा त्यांना फारसा गम नसतो. त्यांचे आठ तास कसे भरले जातील यावर त्यांचा भर असतो. आणि मग त्यांच्या निर्णयप्रक्रियेवर बाकी लोकांची ग्रोथ ही अडखळते.

टाईम पास करायचा असेल तर बाकी बरेच अव्हेन्यू उपलब्ध आहेत. सोशल वर्क आहे, काही शासकीय उपक्रम आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या/सहली आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी दिवसातून दोन तास किंवा आठवड्यातून दोन दिवस गेलं तरीही हरकत नाही. तुम्ही काहीतरी बहुमूल्य काम करता आणि तुमची किंमत ही बरकारार राहते.

Friday, 20 May 2016

IMTMA

While most young and dynamic  mechanical and electronics  engineers struggle to choose between hard core  industries and software companies, I personally invite attention of these young force to machine tool industry.

An engineer who loves creativity, who has zeal to go that extra mile, who enjoys excelling in every process, machine tool industry is perfect fit.

High design expertise, artisan skills, enthusiasm to work with patience are some the key qualities that an engineer should possess who wants to work in machine tool industry. The satisfaction you get on seeing machine coming up is joyous process. And once it is completed, you are on cloud nine.

Indian Machine Tool Association, fondly called as IMTMA,  represents this industry in India. I do not have much experience to know how these type of associations work. But I can safely say that it can not be better than IMTMA. It has been instrumental in hand holding of small and medium industries to take them to new orbit. IMTMA is a perfect blend of big companies in this field and SMEs. It creates many networking platforms allowing CEOs, top executives to mingle with each other and exchange thoughts so that all move ahead.

IMTMA holds many courses to help industry to keep their knowledge updated on various aspects of machine tool. Their all three centers, Bangalore, Pune and Guragaon holds numerous training programs. Their finishing school, production school and design school are of long duration and help engineers to not only finer aspects but deeper knowledge on the subjects.

IMTMA conducts various sessions on defining vision for whole industry, they pass on happenings around the world to the industry and that help companies to benchmark, takes delegations to exhibitions allowing members to get in to JVs, technical tie ups, distributions network across globe. They closely work with government agencies to echo industry voice on right ears. Though not reality so far, but their recent efforts to put up Integrated Machine Tool Park is an excellent example how visionaries at IMTMA work in the good interest of industry.

I personally appeal to all related industries to come forward and be a member of this association and get benefitted of all the initiatives of IMTMA. It would not be out of context to invite young breed of engineers to join this wonderful machine tool industry and be part of Make in India mission.

To let you know the growth prospects of this industry let me put up vision of IMTMA to which members are committed to achieve.

"  “ We will be in the Top 5 Machine Tool Building Nations by 2020 Leveraging World Class R&D, Infrastructure, Systems and People Delivering Innovative Solutions and Services to Create ‘Value for Customers’ ”

Thursday, 19 May 2016

JRD

नुकतंच मी  The Greatest Company in the world: The Tata हे पुस्तक वाचून संपवलं. पुस्तकाच्या लेखकप्रमाणे मी ही टाटांनी प्रोफिटच्या पलीकडे जाऊन जे कमावलं, त्याने स्तिमित झालो आहे.  पण अगदी खरं सांगायचं तर गिरीश कुबेरांचं टाटायन हे साहित्यिक मूल्यांमध्ये आणि आतल्या तापशीलमध्ये जास्त उजवं ठरतं.  पीटर, जो या पुस्तकाचा लेखक आहे, त्याने फक्त टाटांची स्तुती केली आहे.

जेव्हा कधी मी टाटा फॅमिली बद्दल विचार करतो, तेव्हा सगळ्याच बद्दल आदर वाटतो. पण तरीही जे आर डी यांच्याबद्दल माझ्या मनात विशेष आदराची भावना आहे. त्यामागे कारण ही तसं आहे. माझ्यामते जे आर डी नी ज्या आव्हानांना सामना केला, ती परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. आणि त्यांच्या ४५ वर्षाच्या झळाळत्या कारकिर्दीची बरीच वर्षे या प्रतिकूलतेशी झगडण्यात गेली. ते १९३८ मध्ये टाटा ग्रुपचे प्रमुख झाले, आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या महायुध्दाला सुरुवात झाली. टाटा एयरलाइन्स हे त्यांच सगळ्यात आवडतं स्वप्न.देशभक्तीच्या नावाखाली भारत सरकारने तिचं राष्ट्रीयीकरण केलं अन ती एयर इंडिया झाली. नेहरूंना समाजवाद आणि भांडवलवाद याची कसरत करावी लागत असावी आणि त्यामुळे वरकरणी नेहरू जे आर डी चे मित्र दिसत असले तरी अनेक निर्णय हे नेहरूंनी टाटा ग्रुपच्या विरोधात घेतले. आणि नंतर तर लायसन्स राज आलं. शासनाच्या सगळ्या एजन्सीज खाजगी उद्योगाला दुश्मन मानू लागल्या. भारताच्या औद्योगिकी धोरणाला काळिमा फासणारी गोष्ट घडली अन ती म्हणजे जे आर डी ना अतिशय अपमानास्पद रीतीने एयर इंडिया च्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले. स्वत: च्या कल्पनाशक्ती वर साकारलेल्या अन तिचं पोषण केलेल्या, नावारूपाला आणलेल्या कंपनीचं पालकत्व जे आर डी कडून अतिशय निर्दयीपणे हिसकावून घेण्यात आलं. आणि मग आली आणीबाणी. अन या आणीबाणी नंतर खाजगी उद्योगच खच्चीकरण करणारं मोरारजी भाई आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं सरकार.

जे आर डींची कारकीर्द ही शासनाने उभ्या केलेल्या अडथळ्यांची अन खाच खळग्यांची शर्यत होती. एखादा उद्योग भरभराटीला आणणे तर दूरच पण टिकून राहणं हीच मोठी कसोटी होती. जे आर डींनी कंपन्या चालवल्याच नाही तर त्या नावारूपाला आणल्या. आपल्याच लोकांमधून अत्यंत नावाजलेले उद्योगधुरीण जन्माला घातले. दरबारीसेठ, सुमंत मुळगावकर, रुसी मोदी, अजित केरकर,  नानी पालखीवला, रतन टाटा अशी किती म्हणून नावं लिहायची.

जे आर डी नी जेव्हा उद्योगाची धुरा रतन टाटा यांच्यावर सोपवली तेव्हा भारतीय राजकारणावर अर्थमंत्री म्हणून श्री मनमोहन सिंग यांचा उदय झाला होता आणि उदारीकरणाचे वारे जोरात व्हायला लागले होते.

अर्थात हे सगळं म्हणताना टाटा ग्रुप मधील बाकी व्हिजनरीचं कर्तृत्व विसरता न येण्यासारखं. पण तरीही जे आर डी बद्दल प्रत्येक उद्योजकांच्या हृदयात एक विशेष आदराची भावना आहे हे निर्विवाद.

Tuesday, 17 May 2016

मॉर्निंग walk

मी कधी कधी मॉर्निंग walk ला जातो. आज ही गेलो. रामटेकडीच्या अलीकडे मला एक साधारण साठीचे गृहस्थ दिसले. मी त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून बघितलं. हो, मी कधी कधी प्रौढ पुरुषाच्या चेहऱ्याकडे ही निरखून बघतो. मला ते ओळखीचे वाटले. माझ्या आणि त्यांच्या कानात इयर फोन्स नसल्यामुळे आम्ही साहजिकच गप्पा मारायला चालू केल्या. ते पण पेशाने इंजिनियर. दोन रिक्षावाले एकमेकांना भेटल्यावर कसं, गिर्हाईक मंडळी, भाडेवाढ, मीटर मध्ये गोलमाल, आर टी ओ ला शिव्या बोलत असतात तसे इंजिनियर लोकांचे ही त्यांच्या क्षेत्रातले काही जिव्हाळ्याचे विषय असतात. ते आम्ही चघळू लागलो.

बोलता बोलता पाटील साहेबांनी मला सांगितलं, की ते तीन वर्षापूर्वी रिटायर झालेत.

इथपर्यंत सगळं ठीक चालू होतं. याच्या पुढचा प्रश्न त्यांनी जो विचारला, त्याने मी मुळापासून हादरलो. म्हणजे मागच्या आठवडयात बंगलोर एयरपोर्ट ला पस्तिशीतल्या एका स्त्रीने "Uncle, is this queue for Pune?" असं विचारल्यावर जितका डिप्रेशन मध्ये गेलो होतो साधारण तसाच अनुभव परत आला.

पाटलानी ते तीन वर्षापूर्वी रिटायर झाले आहेत असं सांगितल्यावर मला विचारलं

"तुम्हाला रिटायर होऊन किती वर्षं झालीत?"

त्या तरुणीने अंकल म्हणून जो माझा उद्धार केला त्याचं मळभ विमानात शेजारी बसलेल्या सुहास्यवदनेने मारलेल्या गप्पांमुळे दूर तरी झालं पण या पाटील साहेबांनी केलेल्या मानसिक धक्क्यातून सावरायला किती दिवस जातील हे देवच जाणे!  

Tuesday, 10 May 2016

एव्हरेस्ट

बऱ्याचदा यु पी, बिहार चे लोकं कसं जीव तोडून काम करतात आणि मराठी लोकं कसे आळशी आहेत असे स्टेटमेंट आपण वाचतो. त्यात परप्रांतीय लोकांचं कौतुक करताना तोंड थकत नाही. स्थानिक लोकांना आपण शिव्या देत राहतो.

मला असं वाटतं की जेव्हा कुणी परप्रांतात किंवा परदेशात जाऊन नशीब अजमावतात तेव्हा प्रश्न survival चा असतो. You are left with no choice than to slog and prove yourself. प्रतिकूलतेत कर्तृत्व झळाळून उठतं. आणि तसंही आपलं मैदान सोडून आपण दुसरीकडे का जातो? काही ठिकाणी रोजगार नसतो, दुष्काळाने जमीन काय माणस हीं खंगून गेली असतात, सामाजिक होरपळ असते, ग्रोथ च्या संधी नसतात. अशा वेळेला मग तिथेच राहून पिचून मरण्या पेक्षा दुसरी कडे जाऊन पंखाला।बळ देणारी सपोर्ट सिस्टम तर शोधता येते.

परदेशात आजकाल लोकं सहजगत्या जातात. पण २००० अगोदर मात्र वर उल्लेखलेल्या गोष्टीमुळे तर लोकं migrate झाली आहेत. आणि मग प्रस्थापित व्यवस्थेला अव्हेरून, मागे जाणारे दोर कापून जेव्हा दुसऱ्या प्रदेशात बस्तान बांधावं लागतं तेव्हा जिवाच्या आकांताने हात पाय मारावे लागतात. सुदैवाने काही देशात पंखांना बळ देणाऱ्या सपोर्ट सिस्टम असतात. अशा ठिकाणी मग यश मिळणं ही फॉर्मॅलिटी असते. याठिकाणी मी प्रयत्नांचं महत्व कमी करत नाही पण त्या त्या देशातील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती तुम्हाला कधी हात देते अन मिडल ईस्ट सारख्या अजून गर्तेत ढकलते ही. पण तो तुमचा चॉईस असतो.

तसं बघितलं तर सोन्याच्या पिंजऱ्यात बसून दररोज पेरूची फोड आणि मिरची खाणारा पोपट जेव्हा पिंजर्याचा दरवाजा मोडून आकाशात विहार करतो तेही उल्लेखनीय असते. स्वतः च्या उबदार घरट्यात एखादी चिमणी अंग थरथर करत अनुकूलतेला झटकते अन आकाशात झेप घेते तेही कौतुकास्पद. किंबहुना अनुकूलतेच्या आवरणाखाली निवांत पहुडलेलं असताना काहीतरी करून दाखवण्याची उमेद बाळगतात अशा मंडळींना दाद द्यावी वाटते.

थोडक्यात सांगायचं काय तर एव्हरेस्ट सर केल्यावर रोहक अभिनंदनास पात्र राहतो. त्यावेळेस चढणीची परिस्थिती अनुकूल की प्रतिकूल यावर फारशी चर्चा करू नये.

गंमत एकच. जीवनाशी दोन हात करण्याचा उद्देश हा एव्हरेस्ट चढण्या इतकाच उदात्त आणि उन्नत असायला हवा!

Friday, 6 May 2016

Sairat

नाही लिहायचं असं ठरवलं होतं, पण नाही जमलं. आज लिहूनच टाकतो. त्या पिक्चरबद्दल माझ्या जवळच्या मित्रांचा असा आक्षेप आहे की समाजात चुकीचे संदेश पोहोचताहेत. रिंकुचं वय, हिंस्त्रपणा वगैरे वगैरे. मला कळत नाही हे कुठल्या आधारावर लोकं बोलताहेत. नागराज सरांनी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे आणि त्याबर त्या मुलींने अत्यंत संयमित आणि ताकदीने भूमिका पडद्यावर साकारली आहे. किंबहुना पंधरा वर्षाच्या मुलीने वीस ते पंचवीस वयाची भूमिका साकारताना जी प्रतिभा प्रसवली आहे तिचं खुल्या मनाने कौतुक करायच्या ऐवजी आपण दोष शोधण्यात धन्यता मानतो हे आश्चर्यंच. एकच सांगतो रिंकुने पडदा व्यापून टाकला आहे.
मी नेहमीच म्हणत आलो आहे की आपली विचारसरणी हे आपलं अपब्रिंगींग कसं झालं यावर ठरतं. शिक्षणाबरोबरच काय सामाजिक परिस्थितून तुमचं आयुष्य सरलं यावर तुम्ही कसं जगता हे अवलंबून असतं. माझा मित्र खुल्ला माझ्यासमोर म्हणतो "स्टाफमधे मी माझ्याच जातीचे लोकं भरणार" मी त्याला आक्षेप घेत नाही, जरी मला पटत नसलं तरी. नागनाथपाराजवळ आमच्या ओळखीच्या मुलाला रूम पाहिजे होती. आडनावावरून कळत नव्हतं. आडनाव बदललं, रूम मिळाली. त्याचा भाऊ सातार्यात. त्याला बोललो, तु आडनाव बदल आणि मोठ्या भावाचं लाव. तर म्हणाला "हे आडनाव बरं पडतं. कुणी हिणवत नाही" माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं. तुम्ही बदलू शकता का? तर नाही. तुम्ही स्वत:ला बदलू शकता. आणि ते ही साधारण चाळिशीपर्यंत. मग नाही. चित्रपट तरूणाई साठी आहे. त्यांनी काही बोध घेतला तर घ्यावा. बाकी जी लोकं, चाळीशीनंतरची, या जातीत जन्माला आलो याचा अभिमान, आणि लाजही, बाळगतात त्यांनी या पिक्चरच्या वाटेला जाऊ नये.
माझा आंतरजातीय विवाह आहे. एक गोष्ट खात्रीने सांगतो, आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येक जोडप्याने हा पिक्चर बघितल्यावर आपल्या जोडीदाराला कडकडून मिठी मारली असेल. मी मारली. विधात्याचे आभार मानण्यासाठी की आपला शेवट परशा आणि आर्चीसारखा नाही झाला. त्यासाठी मेलंच पाहिजे असं कुठं आहे? जीवनाच्या मार्गावर हा जोड़ीदार बरोबर नसता तर ते मरणच नव्हे काय? आणि यासाठीही की अशा सामाजिक परिस्थितीत आपल्या दोघांचाही जन्म नाही झाला. पण शेवट असा नाही झाला तरी एकमेकांचे आभार मानण्यासाठी. कारण या प्रवासात मनावर अनेक ओरखडे उमटतात. आणि ते उमटले तरी जोडीदार उभा राहतो, ठामपणे आपल्या प्रेमाच्या शेजारी. जखमांची दाहकता कमी असेलही पण काही प्रमाणात का होईना, पण अशा मंडळींना कधीना कधी परशा आणि आर्ची बनावेच लागते. आणि म्हणूनच अर्चना परशाला सोडून जाते आणि रेल्वेत तिची जी घालमेल होते अन ती परत येते ह्या घालमेलीचा अर्थ कळायला त्या परिस्थितून जावं लागतं. (त्यावेळेस परशा पण तरसत असतो, पण परत लक्षात राहतो तो रिंकुचा अभिनय)
प्रेमात पडायचं वय हे साधारणपणे अठराएकोणीस असतं. रिंकुचं प्रत्यक्ष वय किती आहे ते विसरा, तिला प्रेमात पडताना योग्य वय दाखवलं आहे हे ध्यानात ठेवा. त्या जोडप्याचं आता बरं चालू आहे, हे मनावर ठसण्यासाठी चित्रपटाचा मधला भाग हा महत्वाचा आहे. स्ट्रगल संपून आता जीवनाच्या उभरत्या काळाचा आनंद घेण्यासाठी आता त्रिकोणी कुटुंब तयार झालं आहे. भीषण भूतकाळ सरून उज्वल भविष्याकडे वाटचाल चालू झाली आहे. आणि त्यानंतरही नियती घाला घालते.
चित्रपटात क्रौर्य नाही आहे, अगदी शेवट ही. आहे ती फक्त वास्तवता. भीषण, दाहक. काहीतरी मनाचे ग्रह करून, कुणाचं तरी ऐकून, वाचून, तुम्ही या चित्रपटाकडे पाठ फिरवत असाल तर मोठी चुक करत आहात. अर्थात तुम्हाला पटला नाही तरी ठीकच. अनेक भिन्न विचारांच्या लोकांमधे आपण प्रत्यक्षात बागडतोच की!
पुन्हा एकदा सांगतो, रिंकु राजगुरू रॉक्स. तिचा राष्ट्रीय पुरस्कार हा संयुक्तिक. शी डिझर्व्ज. बाकी नागराज सरांबद्दल मी पामर काय बोलणार. पडदाच बोलतो. पिक्चर संपल्यावर नाव येण्यामधे तीस सेकंद जातात. जीवघेणी आहेत ती. यातंच काय ते समजा.
पोस्ट लिहीणार नव्हतो, पण नाईलाज झाला.
🙏🙏
(रिंकु आणि नागराज सरांसाठी)
एका पोस्टवरच्या कॉमेंटवरून सुचलं की चांगला अर्थ काढायचा असेल, अंडरकरंट म्हणा हवं तर, पण आततायीपणे फक्त शारीरिक आकर्षणापोटी पाऊल उचलू नका, चुकून उचललं तर ते निभवायची हिम्मत ठेवा आणि केलेल्या चुकीची किंमत कुणाचा जीव घेऊन वसुल करण्यात पुरुषार्थ नाही आहे.