Friday 29 July 2016

Complescancy

फार वर्षांपूर्वी मला एका नातेवाईकांचा फोन आला होता. ते राहायचे औरंगाबादला. त्यांच्या मुलाला प्रोजेक्त करायचा होता कंपनीत. मी त्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले. ते म्हणाले "मी मुलाला विचारून सांगतो" मी म्हणालो "तुम्ही फोन नका करू. मुलाला माझा नंबर द्या अन फोन करायला सांगा. मी बोलतो अन काय आहे ते त्याला सांगतो" मुलाचा ही फोन आला नाही अन नातेवाईकांचा पण.

परवा ची गोष्ट. मित्राचा फोन आला. पाच महिन्याने मुलगा अमेरिकेला जाणार आहे, तो पर्यंत तुझ्या कंपनीत ट्रेनिंग दे. मी मुलाशी बोलतो म्हणून सांगितलं. मित्र मुलाला घेऊन आला. मी ऐकलं. त्याची आवड इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग ची. आणि राहायला सोलापूर रोडला, लोणी च्या आत. मी म्हणालो "तुझ्या भविष्याच्या दृष्टीने, ट्रेनिंग साठी तुला मास प्रोडक्शन ची कंपनी चांगली राहील. आणि माझी कंपनी रिपेयर बिझिनेस मध्ये. परत तुझ्या घरापासून चाळीस किमी लांब. मी योग्य त्या कंपनीत हडपसर मध्ये ट्रेनिंग अरेंज करतो" फोन झाले, मित्राच्या कंपनीत ट्रेनिंग साठी शब्द टाकला. पोरगा एक दिवस गेला. अन नंतर गायब.

माझा असा अनुभव आहे. पालक लोकांच्या आपल्या पोराबद्दल अवास्तव कल्पना असतात. मुलांनी आपली लाईन सेट केली असते आणि आपण आई बाप विनाकारण काळज्या करत असतो किंवा काळजी करतो हे दाखवत असतो. मुलं सुद्धा देखल्या देवा दंडवत करतात आणि त्यांना जे करायचं ते करतात. म्हणून मी आई वडिलांनी फोन केला तरी मुलांशी बोलण्याचा आग्रह धरतो.

बाकीच्यांचं काय सांगायचं. आमचे चिरंजीव मेकॅनिकल ला असून माझ्या कंपनीत अजून आले नाही आहेत. मला तर नेहमी प्रश्न पडतो की आपण जो बिझिनेस करतो त्यात स्वतः च्या पोराला आकृष्ट करत नाही तर बाकीच्या पोरांना काय ढेकळं करणार. आता प्रोजेकट चालू केला आहे फायनल चा. बहुधा जे मार्केट मध्ये दिवे लावतो त्याचा मिणमिणता का होईना प्रकाश पडतोय. कशामुळे ते देव च जाणे.

अजून एक निरीक्षण आहे. हा अनुभव शहरातले मुलं आणि त्यांचे आई वडील यांच्या बाबतीत येतो. ज्यांचे आई वडील इंजिनियरिंग किंवा तत्सम ट्रेंड शी संबंधित नाही त्यांचे कधी फोन येत नाहीत. ती पोरं येतात, काम करतात, पास होतात, पेढे देऊन जातात, नोकरीला लागतात आणि लाईफ बनवतात. शक्यतो ही मुलं आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती ही फार श्रीमंतीची असते असं ही नाही, किंबहुना ती नसतेच.  कुणी तुषार सोलापूर हुन, तर एखादा संतोष अहमद नगर च्या जवळ कुठल्या खेड्यातून. मला तर आजकाल असं नेहमीच वाटतं की भारताचं भविष्य यश मंडलिक सारख्या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मुलांपेक्षा या स्वबळावर वाट शोधत आलेल्या विक्रम सारख्या मुलांच्या हातात सुरक्षित आहे.

कदाचित शहरीकरणामुळे आलेली वेगवेगळ्या आकर्षणात ही मुलं इतकी मग्न असतात की या मुलांना ध्येय नीट दिसत नाहीत आणि सुखवस्तू पणा त्यांना complacent बनवतो, असं मला वाटतं.

No comments:

Post a Comment