Thursday 21 July 2016

उपरती

मी एक मॅनेजमेंट चा कोर्स जॉईन केला आहे. महिन्यातून एक सेशन असतं.  ते झालं की आम्हाला असाईनमेंट असतात ज्या एका महिन्यात पूर्ण करायच्या असतात. त्या क्लास मध्ये जे शिकवतात त्याचे मिनिट्स लिहायला आणि आम्ही महिनाभर असाईनमेंट मध्ये काही दिवे लावलेत का, हे बघायला एक मुलगी आहे, रीमा ठेवू आपण तिचं नाव.

रीमा ने एक व्हाट्स अप ग्रुप बनवला आहे. आमच्या असाईनमेंट्स चे अपडेट्स ती त्यावर टाकते. आणि आम्ही त्या केला की नाही याचा ही फॉलो अप घेते.

तिचा फोन आला की "काय कटकट आहे" वगैरे भाव आमच्या मनात येतात. कुणी तिचा फोन टाळतं. आम्ही कसेही वागलो तरी ती तिचं काम इमान ऐतबारे करते, न कंटाळता. वाईट न वाटू देता.

मागच्या आठवड्यात रीमाने ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोडली. काल तिने तो व्हाट्स अप ग्रुप ही सोडला. गंमत म्हणजे तिने ग्रुप सोडल्यापासून तिच्या आभार प्रदर्शनाचे सतत मेसेज ग्रुप वर येत आहेत. खरं तर ती ते वाचूही शकत नाही. रीमा ग्रुपमधून गेल्यापासून तिच्या कामाचं महत्व लोकांना कळतं आहे. ती असताना मात्र तिचं असणं लोकांना कदाचित त्रास वाटत असावं.

आयुष्यही आपण असंच जगतो, नाही? 

No comments:

Post a Comment