Sunday 18 September 2016

हो, असाच आहे मी

आमचा एक ग्रुप फॉर्म झाला होता. WA चा. तो ग्रुप बनवण्याची आयडिया एका माणसाची होती आणि मग बाकीचे माणसं तो जोडत गेला. ग्रुप ची संकल्पना त्याची, त्याने काही रुल्स बनवले. तो ग्रुप त्याच्या मनाप्रमाणे चालवायचा. त्याने काही मेंबर्स नाराज व्हायचे. आणि मग कंप्लेंट करायचे. आणि मला विचारायचे "तू कसं सहन करतो हे सगळं" मी त्यातल्या एकाला सांगितलं "हे बघ असं आहे, एकतर मी लीडर असतो नाही तर फॉलोअर. एकदा मी कुणाला फॉलो करायचं ठरवलं की मग मी फाटे फोडत नाही. त्याने जसं सांगितलं तसं करतो. मला जर आवडलं नाही तर मी तिथून सरळ बाहेर पडतो, पण त्या लीडर बद्दल माझी काही तक्रार नसते. आणि जेव्हा मी लीड करतो तेव्हा कुणी फालतू ची लुडबुड केलेली आवडत नाही. मी टीम मेंबर चं ऐकल्यासारखं करतो पण शेवटी माझ्या मनाप्रमाणे करतो".

ब्रॉडर स्केल वर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट च्या बाबतीत मी असाच व्ह्यू अंगीकारतो. सध्याचं शासन हे मला न झेपणारं आहे. पण मी दर दिवशी त्यांच्यावर आगपाखड करत नाही. कारण ते वांझोटं असतं असं माझं मत आहे. त्याला विरोध करायला मतपेटी हा एकमेव मार्ग आहे असं मला वाटतं. आरक्षणाबद्दल मला काहीही मत नाही आहे. शासक जो ठरवेल त्याला फॉलो करतो. ज्या गोष्टी बदलण्याची माझ्यात ताकद आहे त्यावर मी विचार करतो. ते फेमस वाक्य आहे "हे विधात्या, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याची मला ताकद दे, ज्या बदलू शकत नाही ते ऍक्सेप्ट करण्याची शक्ती दे, आणि या दोघातला बदल समजण्याची अक्कल दे" यावर माझा दृढ विश्वास आहे.

त्यामुळे मी दुसर्याने कसं वागायला पाहिजे ही अक्कल सहसा शिकवायला जात नाही. माझ्यात काय बदल घडवायचा ते पाहतो. कुठलेही सण साजरे करण्याची पद्धत आमूलाग्र पणे बदलण्याची गरज आहे. आणि हे ओळखून माझ्या पद्धतीत बदल केले आहेत. दुसर्याने ते करायलाच पाहिजे याबद्दल मी आग्रही नाही.

धर्म ही एक जीवन प्रणाली आहे असं मला वाटतं. गाईडलाईन्स, रुल नव्हे. त्याला तितकंच महत्व दिलं तर तो तुम्हाला सहिष्णू बनवतो. मानव्याला ते पूरक आहे असं मला वाटतं. धर्म  प्रणाली न राहता नियम म्हणून आला की ते आपल्यातल्या मानव्याला मारक होतं. त्या नियमांचा अतिरेक झाला की आपण दुसरी माणसं  मारायला लागतो.

माणसाच्या कर्मानुसार जाती व्यवस्था तयार झाली. कालानुरूप तिला काहीही महत्व नाही यावर माझा दृढ विश्वास बसतो आहे. त्यामुळे जातीबद्दल कुठलीही भावना माझ्या मनात नाही. अभिमानाची नाही आणि न्यूनत्वाची नाही. दुसऱ्याच्या नाही अन माझ्याही. तशी भावना ही माझ्यातल्या मानव्याला मारक आहे. तुरळक अपवाद वगळता मला जातीवरून कुणीही हिणवलं नाही आहे आणि ओवाळले पण नाही. माझ्याकडूनही अशी आगळीक झालेली आठवत नाही.

धर्माचं आचरण कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे. तो कसा सोडवला याचा डिंडोरा पिटण्याची मला गरज वाटत नाही.

इथं बऱ्याच ठिकाणी "मला असं वाटतं" "माझं मत" असं लिहिण्यात आलं आहे. दुसर्यांची मत अशीच असायला हवी हा अट्टाहास नाही.

बरेच दिवस या विषयाला वॉल वर थारा न देण्याचा प्रयत्न केला, पण आपसूक ओढला गेलो. त्या विषयावरची पुढची लिहिपर्यंत शेवटची पोस्ट.

No comments:

Post a Comment