Sunday 20 March 2016

क्रिकेट

आज सकाळी न्हाव्याच्या दुकानात संवाद चालू होता. "अच्छा हो गया कोई बादमे विकेट नही गयी. नही तो अपनी टीम बहुत प्रॉब्लेम मे आती। लास्टमे जीत ही गये हम. बहुत मजा आया. साब, आपने देखी की नही" मी नाही म्हंटल्यावर दोघं एकदम "अरे क्या साब, धमाल आयी. वो हार्दिक का कँच देखा नही. हमारे माँ को पसंद आया" पात्र: अजमल आणि रिझवान

*********************************************************************************


मी लहानपणी क्रिकेटवेडा होतो. खेळायला आणि पाहायला खूप आवडायचं. क्रिकेट खेळताना कुठल्याही एका क्षेत्रात निपुण नसताना मी शाळेत आणि पॉलीटेक्निकला वर्गाचा कर्णधार वगैरे झालो होतो. खरं तर हा अवगुण आयुष्याच्या बऱ्याच क्षेत्रात मदतीला धावून आला आहे. Jack of many, master of none.

शाळेत असताना मी अगदी ३०० पानांचा क्रिकेट इनसायक्लोपिडिया बनवला होता. त्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडूंचे फोटो आणि त्यांची माहिती लिहिली होती. अनेक रेकॉर्ड तोंडपाठ होते. १९८३ च्या विश्वचषक कपच्या फायनल ला आमच्या घरी टीव्ही नव्हता. पहिल्या मजल्यावर होता. आम्ही गेलेलं त्यांना फारसं आवडायचं नाही. प्रत्येक ओव्हर ला वर जायचं, दोन मिनिटं match पहायची आणि खाली येउन चुळबुळत बसायचं. असं करत तो थरार अनुभवला.

डिप्लोमा औरंगाबाद ला झाल्यावर पुण्याला आलो. नाही म्हणायला कॉलनीत क्रिकेट खेळायचो पण अशा अंगभूत गुणांचा विकास जिथे होतो त्या कॉलेज मध्ये मात्र सपशेल पिछाडी. पुण्यातल्या भपक्याला भीत मग माझ्यातले क्रिकेट, टेटे आणि बॅडमिंटन हे सगळेच खेळ दुरावत गेले.

इंटर कॉलेज क्रिकेट खेळणं वगैरे पुण्यात जरी झालं नाही तरी बघण्यात अजून स्वारस्य होतं. भारत पाकिस्तान ची वन डे नेहरू स्टेडीयम ला होती. एक तिकीट मिळालं होतं. मी गेलो. गेट वर तोबा गर्दी. गेट उघडल्या बरोबर, पाण्याचा लोंढा घुसावा तसे लोकं पळत सुटले. मी पायर्यांवर पाय घसरून पडलो. मला तुडवत लोकं पुढं गेले. मान वर काढली. गुदमरून मेलो नाही याबद्दल देवाचे आभार मानले.

पाकिस्तानने आपल्याला १२५ मधे उखडलं होतं. बहुतेक तौफिक अहमद होता ज्याने पाच विकेटस काढल्या होत्या. श्रीकांत की कुणाचा तरी कँच एका पाकिस्तानी फिल्डरने बॉर्डरला अफ़लातून पकडला होता. मी टाळ्या वाजवल्या. तर मागे डोक्यावर एकाने जोरात टपली मारली अन म्हणाला "काय रे भिकारचोट, टाळ्या काय वाजवतोस?" कँच चांगला घेतला म्हणून असं म्हणणार होतो. पण गप्प बसलो. रडत खडत आपण हारलो. कुणी जिंकलं म्हणून परत टाळ्या वाजवाव्या वाटत होत्या, पण चार सहा डोळे माझ्यावर रोखून होते बहुधा. त्यामुळे हा जो काय उन्माद चालू आहे, त्याची वाढ अनेक वर्षांपासून हळूहळू होत आली आहे.

साधारण ९७-९८ पर्यंत क्रिकेट फ़ॉलो करण्यात इंटरेस्ट होता. मग वयोपरत्वे कमी होत गेला. २०११ ची फायनल वगैरे काही मोजक्या मँचेस बघितल्या. बाकी काही मिस झालं तर जीवाला हळहळ वाटत नाही. आयपीएल ची तर मी एकही मँच टीव्हीवर बघितली नाही आहे. एक गहुंजेवर बघितली आणि सॉलीड पकलो.

अाता चालू असलेली अंतर्देशीय स्पर्धा चांगली वाटते. भारत कुठल्याही देशाच्या विरूद्ध जिंकला वा हारला तर सारख्याच पातळीचं आनंद किंवा दु:ख होतं. तो जिंकावा असं वाटत राहतं.

उर्वरित स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा.

आणि संघाच्या अतीव चाहत्यांना पण शुभेच्छा 

No comments:

Post a Comment