Friday, 4 July 2025

महाराष्ट्र शासन 

मुंबई 

संदर्भ: विकसित महाराष्ट्र 

महोदय, 

सगळ्यात प्रथम आपण नागरिकांकडून २०४७ सालापर्यंत विकसित महाराष्ट्र होण्यासाठी आपण सूचना मागवत आहात त्याबद्दल धन्यवाद. माझे विचार खाली देत आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यावर कार्यवाही होईल याची खात्री नाही, तरी नागरिक कर्तव्य पार करण्यासाठी हा खटाटोप करत आहे. 

१. सगळ्यात प्रथम शहरातील आणि एकूणच महाराष्ट्रातील रस्ते: एक काळ असा होता की इतर राज्यातील रस्त्यांपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खूप चांगले होते. पण आता परिस्थिती एकदम उलट झाली आहे. तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यातील चांगल्या रस्त्यांचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील अनेक शहरातील रस्ते मात्र उद्विग्न करणारे आहेत. जगभरातील रस्ते हे चांगल्या क्वालिटीचे असताना, भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील रस्ते हे अत्यंत घाणेरड्या स्थितीत आहेत हे खेदाने नमूद करावे वाटते. 

२. स्वच्छता आणि घन कचरा व्यवस्थापन: जगभरातील कोणतंही राष्ट्र हे भारतापेक्षा स्वच्छ आहे हे कुणीही सांगू शकेल. त्याबाबतची सामाजिक, राजकीय आणि नोकरशाहीची अनास्था ही अनाकलनीय आहे. रस्त्याने, नदीमध्ये, समुद्र किनाऱ्यावर दिसणारी यामुळे लाज वाटते. याची जबाबदारी ही सर्व समाजावर आहे पण त्याला शिस्त लावण्याची जबाबदारी मात्र नोकरशाही आणि शासनाची आहे असं मला वाटतं. 

३. पाणी उपलब्धता: चांगल्या गुणवत्तेचं पाणी मिळणं ही जनतेची बेसिक गरज आहे. गुणवत्ता सोडा पण मराठवाड्यात आजही दररोज पाणी उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाणी स्रोत आणि नद्यांचं पुनरज्जीवन करून पाणी टंचाई हा विषय चर्चेत यायला नको अशी सिस्टम बनवणं हे गरजेचं आहे. 

४. वीज उपलब्धता: मी एक लघु उद्योजक आहे. क्वालिटी वीज मिळत नसल्यामुळे आणि मिळणारी वीज वेळोवेळी खंडित झाल्यामुळे उद्योजकांचे प्रचंड नुकसान होते. 

५. कायदा आणि सुव्यवस्था: महाराष्ट्रातल्या अनेक शहरात कायदा आणि सुव्यवस्था याचा बोजवारा उडालेला आहे. बलात्कार, चोऱ्यामाऱ्या, खून असे मेजर गुन्हे तर घडतच आहेत पण वाहतूक व्यवस्थेबद्दल सुद्धा पोलिसांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. लोकांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ती जर पाळली जात नसेल तर तर कायद्याचा बडगा दाखवून बेशिस्त लोकांवर कारवाई करण्याचं काम हे शासनप्रणीत यंत्रणेचं आहे. 

६. सामाजिक सलोखा: गेल्या काही वर्षात धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर समाजात प्रचंड ध्रुवीकरण झालेलं दिसत आहे. काही विशिष्ट धर्माला लक्ष्य बनवून त्यांना वेगळं पाडण्याचे कट कारस्थान हे सातत्याने होत असते. समाजात पडणारी ही दरी लॉन्ग टर्म साठी धोकादायक आहे. दुभंगलेला समाज हा कधीही सशक्त राज्य किंवा राष्ट्र बनवू शकत नाही. धार्मिक ध्रुवीकरणाबरोबर जातिधिष्ठित राजकारणाला आणि पर्यायाने समाजकारणाला खतपाणी घातलं जात आहे. 

७. शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा: शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देताना जरी खाजगीकरण झालं असेल तरी शासन त्यातून पूर्ण स्वतःला वगळू शकत नाही. तसं झालं तर गरीब लोकांना या सुविधांचा लाभ घेणं अवघड होत जाईल. विकसित राज्यात किंवा देशात या सुविधांवर शासनाचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असतंच. 


Where the mind is without fear
and the head is held high;

Where knowledge is free;

Where the world has not been broken up
into fragments by narrow domestic walls;

Where words come out from the depth of truth;

Where tireless striving stretches its arms toward perfection;

Where the clear stream of reason has not lost its way
into the dreary desert sand of dead habit;

Where the mind is led forward by Thee
into ever-widening thought and action —

Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.

By Rabindranath Tagore




 

Sunday, 29 June 2025

 मध्ये अशीच एक पोस्ट वाचली की आजकाल फोन्स फक्त कामासाठी येतात, सहज असे फोन येत नाहीत. माझंही झालं आहे असं खरं. माझ्या कॉलेज चे आणि शाळेचे काही मित्र यांच्याशी कधीतरी माझा मूड झाला की फोन करतो. नाही म्हणायला फेसबुकच्या काही लोकांना पण माझे असे उगाच फोन झाले आहेत. पण प्रमाण फार कमी. 

पण आमच्या घरात दोघे जण आहेत, ज्यांचे त्यांच्या सुहृद लोकांशी असे सहज फोन चालू असतात. एक आई आणि दुसरी वैभवी. आईचं तर समजू शकतो मी. मागच्या पिढीची आहे ती, परत मी दिवसभर घरात नसतो. आजकाल नील पण नसतो. मग फोन वर बोलण्याशिवाय दुसरा विरंगुळा कुठला? 

पण वैभवी. ती डॉक्टर आहे. लॅब चालवते. पण तिचे दररोज असे कुठले ना कुठले सहज फोन चालू असतात. तिचे तीन ग्रुप आहेत. एक बी जे तल्या मैत्रिणींचा. चार जणी आहेत त्या. त्यांचा मूड झाला की चार जणी मिळून व्हाट्स अप कॉल करतात आणि अमाप गप्पा मारतात. 

दुसरा ग्रुप, चुलत बहिणींचा. तिथे त्या पाच जणी आहेत. तिथे पण ग्रुप कॉल चालू झाला की एक दीड तासाची निश्चिंती असते. 

तिसरा ग्रुप आहे मामे मावस भाऊ बहिणींचा. ९ जणांचा. तिथे परत मामे मावस बहिणींचा सब ग्रुप आहे. म्हणजे त्यात तीन भाऊ नाही आहेत. हा कहर ग्रुप आहे. प्रत्येकाच्या वाढदिवसानंतर त्यांचा तो व्हर्च्युअल साजरा होतो. मग त्यात ते सर्व गाणे म्हणतात, ज्याचा कुणाचा वाढदिवस आहे त्याच्या किंवा तिच्यासाठी. कुठलाही फॅमिली प्रोग्रॅम झाला की त्याबद्दल एक फोन होतो. आणि कार्यक्रमात केलेली मजा ते परत झूम कॉल करून अनुभवतात. 

या सगळ्या ग्रुप कॉल्स ची वेळ पण ठरली आहे. रात्री साडे नऊ. मग तो कधी एक तास, कधी दीड तर कधी अगदी दोन तास पण चालतो. बरं या ग्रुप कॉल शिवाय यातील प्रत्येकाशी परत दोन तीन दिवसातून वैयक्तिक फोन होतोच. 

आणि याशिवाय मग वैभवीची आई, बहीण, मुलगा यश यांच्या बरोबर अलमोस्ट दररोज, तर भाऊ अमोल, दीर उन्मेष, नव्याने नाते जोडलेल्या विहिणबाई, अजून काही बी जे च्या मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आठवड्यातून एखादा फोन होतोच होतो. 

गंमत म्हणजे तिच्या ग्रुप कॉल मध्ये बऱ्याचदा फक्त हसण्याचे आवाज येतात. शब्द काहीच ऐकू येत नाहीत. इथे फोन झाल्यावर, त्यातही ग्रुप कॉल नंतर ती डबल फ्रेश होते. 

असे आम्ही फोनच्या बाबतीतले दोघे दोन ध्रुव. कधी मला तिच्या या फोन्स चा राग पण येतो पण बहुतेकवेळा तिचा हेवा वाटतो. खुश राहण्यासाठी मला काहीतरी अफाट घडावं असं वाटतं, वैभवी मात्र अशा एखाद्या सहज केलेल्या फोनने सुद्धा खुश खुश होऊन जाते. 

Tuesday, 24 June 2025

 २०१७ साली जेव्हा अ..... अभियंत्याचा प्रकाशित झालं तेव्हा तीन समाजसेवी संस्थांना विनंती केली की त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्या विनंतीला मान देत श्री विजय फळणीकर यांचं आपलं घर (जे आता माझं ही घर आहे), श्री अशोक देशमाने यांचं स्नेहवन आणि सौ अंबिका टाकळकर यांची आरंभ. त्यांच्या कार्यक्रमातील सहभागाने प्रकाशन सोहळा अजून छान झाला. तिघांचं काम अफलातून आहे आणि उपस्थितांना खूप भावलं. 

आज कार्यक्रमाची थीम "उद्योजकता" आहे. कारण पुस्तकाच्या नावात, "An Engineers Journey to Entrepreneurship" ते अगदी ठळकपणे ते आलं आहे. मग मी विचार केला की यावेळी मला भावलेल्या तीन उद्योजकांना विनंती करावी की त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. माझ्या नम्र आवाहनाला मान देत मधुरा कॉम्प्रेसर चे बापू कदम, रॅपटेक इंजिनियरिंग चे नितीन बोऱ्हाडे आणि आमच्या क्षेत्रात स्त्री उद्योजिका कमी असतात आणि तरीही त्यात उतरून यशस्वी पणे मशीन शॉप चालवणाऱ्या मनीषा पाठक या तिघांचा छोटा सत्कार करणार आहोत. यामध्ये भावना फक्त उद्योजकतेला नमस्कार करणे हा आहे. 

आणि अर्थात श्री मनीष गुप्ता आणि श्री आनंद देशपांडे यांना ऐकणं ही एक पर्वणी असणार आहे. 

तुम्ही पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. 

स्थळ: एम इ एस ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड पुणे 

तारीख आणि वेळ: २५ जून २०२५,  संध्याकाळी ६:३० वाजता

Saturday, 21 June 2025

 व्यासपीठावरील मान्यवर डॉ  आनंद देशपांडे, माझे बिझिनेस मेंटॉर श्री मनीष गुप्ता, पुस्तकाचे अनुवादक माझा मित्र सदानंद बेंद्रे, प्रकाशिका प्रतिमा, माझे प्रेरणा स्थान डॉ वैभवी मंडलिक आणि उपस्थित माझे सर्व मित्रगण. 

खरंतर व्यासपीठावर उद्योजकतेच्या विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू बसलेले आहेत, त्यांच्यासमोर उद्योजकता या विषयावर मी काही बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. तसंही मला अनेक जण "डेली वेजेस चा एम डी" असं गंमतीत म्हणतात. त्यामुळे पुस्तक जरी माझ्या उद्योजकीय प्रवासावर लिहिलं असेल तरी उद्योजकता या विषयावर प्रमुख पाहुणे बोलतील. मी थोडी या पुस्तकाची स्टोरी सांगतो. 

२०१७ साली अ......अभियंत्यांचा प्रकाशित झाल्यावर त्याचा इंग्लिश अनुवाद करा असं बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. सोशल मीडियाची ही गंमत आता सर्वांना माहित आहे. कॉमेंट मध्ये कुणी "पुस्तक लिहा" असं लिहिलं की आपल्याला लगेच लेखक असल्याचा भास होऊ लागतो. मला तसा झाला आणि मी मराठी पुस्तक लिहिलं, पण परत फसणार नव्हतो अशी मनाशी गाठ बांधली होती. पण एका तरुणाने मला मेसेंजर वर अगदी कळकळीची विनंती केली की इंग्लिश अनुवाद करा, तेव्हा मी परत पाघळलो. म्हणजे तरुण असूनही पाघळलो हे कृपया लक्षात घ्यावं. आणि हा इंग्लिश अनुवाद करावा या विचाराने उचल खाल्ली. तेव्हा हे चॅट जीपीटी, ए आय वगैरे प्रकरण नसल्यामुळे तो अनुवाद कुणी करावा हा यक्षप्रश्न उभा राहिला. कारण मला वेळ नव्हता. वेळ नव्हता हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे. खरं कारण हे आहे की स्पोकन इंग्लिश बरं असलं तरी साहित्यिक इंग्लिश बद्दल आनंदच होता. साहित्यिक मराठी बद्दल पण आनंदच आहे, असं कुणीतरी बोलल्याचं ऐकू आलं मला. पण मग आमचे फेसबुकचे शशी थरूर, सदानंद ची आठवण आली. आजूबाजूला बायकांचा गराडा असणे हे सोडलं तर थरूर साहेब आणि सदानंद यांची इंग्लिश शब्दसंपदा माझ्यालेखी सारखीच आहे. 

त्याने काम हातात घेतलं, पण तब्येतीचा इश्यू झाल्यामुळे काम थोडं रेंगाळलं आणि दोन एक वर्षांनी मला ते बाड मिळालं. ते वाचल्यानंतर सदानंद चं मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे एक सांगतो तुम्हाला की हे पुस्तक म्हणजे भाषांतर नाही आहे तर भावानुवाद आहे. मराठी मनाचा भाव जसाच्या तसा इंग्लिश मध्ये उतरवणे हे थोडं अवघडच काम पण नंदूने ते काम लीलया केलं आहे. तसं असलं तरी एव्हाना माझा उत्साह पण मावळला होता.

दुसरी एक गंमत अशी होती की या पुस्तकातील बरेच लेख हे मी वयाच्या चाळीशीत लिहिले होते. आता पंचावन्न क्रॉस केल्यावर मलाच ते खूप बालिश वाटू लागले होते. पण या सगळ्या शंका कुशंकांना खारिज करत नंदू, गौरी आणि साकेतच्या प्रतिमा भांड यांनी हा अनुवाद प्रकशित करण्यात प्रोत्साहित केलं. तुमचे धन्यवाद.  

मी तयार झालोच होतो तेव्हा अजून एक गडबड झाली. काही दिवसांपूर्वी मी माझे कस्टमर ग्राईंडमास्तर चा सी इ ओ, समीर केळकर याने लिहिलेल्या गराज टू ग्लोबल या पुस्तकाच्या लॉन्च प्रसंगी त्याची मुलाखत घ्यायला औरंगाबाद ला गेलो होतो. तिथे सिनियर केळकर सरांनी आपल्या भाषणात म्हंटलं "मी समीर ला विचारलं, आपण असा काय तीर मारला की तू पुस्तक लिहितो आहेस" मी विचार केला की जवळपास २०० कोटी टर्नओव्हर     असलेल्या आणि ३० एक देशात हाय क्वालिटी मशिन्स एक्स्पोर्ट कंपनीचे फाउंडर म्हणत असतील की "असा काय आपण तीर मारला आहे" तर त्या न्यायाने मी तर धनुष्याकडे बघितलं पण नव्हतं. पण वैभवी म्हणाली की ऑल रेडी तू खूप चुका केल्या आहेस, ही पण करून टाक. 

थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर की पुस्तक नाही आवडलं तर त्याची जबाबदारी वैभवी, गौरी आणि सदानंद यांच्यावर आहे. पण मराठी पुस्तक जसं आवडलं तसं हे पण आवडेल अशी खात्री आहे. 

अ ..... अभियंत्याचा प्रकाशित होताना तीन समाजसेवी संस्थांच्या प्रेझेन्स मुळे त्या सोहळ्याला चार चांद लागले होते. फळणीकर सरांचं आपलं घर (जिथे मी आता सचिव पण आहे), अशोक देशमाने चं स्नेहवन आणि अंबिका टाकळकरचं आरंभ. या वेळेस मी थोडा वेगळा विचार केला. तीन उद्योजकांना विनंती केली की त्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन एक वेगळा आयाम द्यावा. तिघांशी पण माझी वैयक्तिक ओळख आहे. मनात विचार आल्या आल्या अनेक लोक मनात आली. कार्यक्रम नेटका व्हावा म्हणून त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या तिघांना आमंत्रित केलं. चिठया टाकल्या म्हणा हवं  तर. 

बाकी दोन प्रमुख पाहुण्यांबद्दल मी काय बोलणार? एक द्रोणाचार्य आहेत, ज्यांचे लेक्चर्स मागे कुठे तरी बसत, काही लिंक्ड इन पोस्ट, यु ट्यूब वरील मुलाखती बघत अनेक गोष्टी शिकतो आणि दुसरे तर खऱ्या अर्थाने बिझिनेस मेंटॉर आहेत. त्यांच्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन आलं आहे. 

एकाच आयुष्यात शून्यापासून दहा हजार कोटी टर्नओव्हर करणाऱ्या लोकांबद्दल फक्त मासिकात वाचून होतो. आज देशपांडे सरांबरोबर बोलायला मिळतं आहे, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन होत आहे यापेक्षा भाग्य काय मोठं असणार आहे? सरांना कदाचित लक्षात नसेल पण त्यांच्या वक्तशीरपणाचे आणि नवीन उद्योजकांना ते कसे प्रोत्साहित करतात याचे माझ्याकडे चार पाच किस्से आहेत. त्यातील एक कि ज्यात मी इन्व्हॉल्व्ह होतो, तो सांगितल्याशिवाय राहवत नाही आहे. काही वर्षांपूर्वी तेजश्री कांबळे ने माझी आकाशवाणी वर उद्योजकतेवर मुलाखत घेतली होती, ज्याची लिंक्ड इन वर टाकली होती. त्यावर देशपांडे सरांची कॉमेंट होती की "मराठीत उद्योजकतेवर इतक्या सोप्या भाषेत खूप कमी ऐकलं आहे. प्रत्येक मराठी उद्योजकाने ही मुलाखत ऐकावी" थोडी मी तिखट मिरची लावली असेल, पण अशा धरतीची कॉमेंट होती. मी सरांना मेसेज पाठवला की ही कॉमेंट मी बाकी सोशल मीडियावर मुलाखत लोकांनी ऐकावी म्हणून वापरू का? मला वाटलं होतं, सरांचा काही मेसेज येणार नाही. पण त्यांचा होकाराचा मेसेज आला आणि मग ती मुलाखत अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अजून दोन चार किस्से आहेत, पण वेळेअभावी थांबतो. सर, धन्यवाद तुम्ही हे निमंत्रण स्वीकारलं. खूप प्रिव्हिलेज्ड फील करतो आहे. 

एम जी सरांचं माझ्या आयुष्यात असलेल्या काँट्रीब्युशन बद्दल मी आतापर्यंत इतक्यांदा बोललो आहे की मला आता एम जी डिव्हीडंड वगैरे मागतील की काय अशी भीती वाटते. अर्थात अभी बोल ही देता हू सर, मी सुद्धा अर्ह समस्ती ला किंवा टीजी ओ बी ला इतके लोक पाठवले की सरांना पण भीती वाटते की मी त्यांच्याकडे कमिशन मागतो की काय? पण जोक्स अपार्ट, दुसऱ्या अँजिओप्लास्टी नंतर मी इतका अगोनी मध्ये गेलो होतो आणि तेव्हाच माझी एमजी सरांशी ओळख करून दिली गेली. आताही आव्हानं आहेतच पण त्याला दोन हाताने सामोरे जाण्याची मानसिकता बाळगून आहे आणि त्याचं श्रेय एम जी सरांना जातं. म्हणून मी पुस्तकात त्यांना डॉ मनीष गुप्ता संबोधलं होतं. काही कारणाने त्यांनी मला ते काढायला लावलं. पण माझ्यासाठी दोन कार्डिओलॉजिस्ट आहेत, एक डॉ हरदास आणि दुसरे एम जी सर. 

बाकी सगळ्यात शेवटी दोन कुटुंबं. एक सेटको आणि दुसरे मंडलिक परिवार. दोन्ही ठिकाणी अत्यंत सशक्त, कष्टाळू, माझं मनस्वीपण सांभाळणारे लोक काम करत आहेत. ते तसे आहेत, म्हणून हे सगळं घडत आहे. त्यामुळे सेटको टीमचे आणि मंडलिक परिवाराचे आभार. आणि सरते शेवटी या टेक्नॉलॉजी चे आभार कारण ती नसली असती तर मी कधी व्यक्त झालो नसतो आणि हे जे काही होतं आहे ते काहीच झालं नसतं. 

तुम्ही आज सगळे इथे आलात, नेहमीच तुम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. 

आता मी थांबतो, दोन उद्योजकतेच्या स्टॉलवर्ट्स ना आपल्याला ऐकायचं आहे. मी ही खूप उत्सुक आहे. धन्यवाद. 

Friday, 20 June 2025

Let me begin with a confession. Before meeting MG Sir, I firmly believed that no one could impress me with their life principles. I was convinced that my own philosophies on living were supreme and irreplaceable. However, that belief was challenged in February 2016 when I attended my first session of the 20th TGOB with MG Sir. Skeptical and ready to find flaws in his words, I was waiting for an opportunity to prove myself right. But alas! Not only in that first session but in every subsequent session, I found no reason to doubt him. Instead, I found myself drawn in, session after session.

By the time TGOB ended, I had become an ardent fan of MG Sir.

Like every Chrysalian, I must have heard him speak hundreds of times, yet his words never feel repetitive or stale. I am constantly amazed by his unwavering passion for sharing knowledge, regardless of the size of the audience—whether 10, 100, or even 1,000+. His energy never falters; he speaks with the same enthusiasm every single time.

One of his most admirable qualities is his relentless determination. A perfect example is the Kilimanjaro expedition. He encouraged the Chrysalis fraternity to join him on this journey. While we all initially agreed, almost everyone—including myself—ultimately backed out. Yet, that did not deter him. He, along with Rachna Ma’am and the Borade brothers, went ahead and conquered it.

Another unforgettable moment was how he handled a chaotic situation during our return from the My Life program. With 27 of us at risk of missing our train from Kathgodam to Delhi, he remained remarkably calm, ensuring that every one of us made it just in time. His composure and leadership in that moment were nothing short of inspiring.

Out of all his powerful speeches, two stand out in my memory. The first was on Koh Tao Island, a day before the Guinness World Record attempt. I have never witnessed a speech so fiery, yet so affirming. While many factors contributed to achieving the record, I firmly believe his words played a significant role in our success. The second was at my own book publishing ceremony—a speech filled with warmth, pride, wit, and humor. It was a moment I will always cherish.

MG Sir’s wisdom has transformed my mindset—not only in business but in my personal life as well. On his birthday, I wish him good health and a long, fulfilling life. More importantly, I assure him that I will do everything in my power to contribute to his vision of creating growth-hungry entrepreneurs.

©️ Rajesh Mandlik

Saturday, 14 June 2025

 काल मित्र गप्पा मारायला आला होता. फेसबुकवर मैत्री झाली तरी नंतर त्यापलीकडे अनेक लोकांशी दोस्ती झाली आहे, त्यापैकीच तो एक आहे. 

त्याने परत तोच विषय काढला की तुमच्या लिस्ट मध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक आणि तुमचेही मत न पटणारे लोक मित्र म्हणून कसे सांभाळता? परवा पुस्तक प्रकाशनाला सुद्धा वेगवगेळ्या विचारधारेचे लोक होते तेव्हा परत एकाने असाच काहीसा प्रश्न विचारला. त्याला जे सांगितलं आणि आधीही इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो. 

एखाद्याशी मैत्री करण्याचे आणि टिकवण्याचे माझे जे निकष आहेत, त्यामध्ये त्याचा धर्म, जात, राजकीय मत हे कुठेच बसत नाहीत. एकदा लिस्ट मध्ये आले आणि काही कारणाने माझ्या लक्षात आलं की यांची राजकीय मतं माझ्यापेक्षा वेगळी आहेत पण समाजामध्ये काम अतिशय इमानेइतबारे करतो. मग मला त्यांच्या स्वीकारार्ह तेचा टॉलरन्स बँड खूप मोठा होतो. तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम करता, आर्थिक स्थैर्य आणायचा प्रयत्न करत असाल, तुम्ही समाजाप्रती सहवेदनेचा, सह अनुभूतीचा भाव ठेवत असाल  तर मला त्यांची राजकीय मतं काहीही असतील तरी फरक पडत नाही. त्यांचं जॉब प्रोफाईल काहीही असेल तरी मला मैत्री त्याज्य नाही आहे. वैयक्तिक असणारं राजकीय मत हे कुणाच्या कार्यकर्तृत्वापेक्षा महत्वाचं असतं असं मला वाटत नाही. त्यामुळेच मित्रत्व स्वीकारताना मी व्यक्ती वजा राजकीय मत असं स्वीकारतो. 

हे असं असलं तरी वर टॉलरन्स बँड चा उल्लेख केला आहे. तो आहेच. तुमची जशी दैवतं आहेत तसे माझेही काही आदर्श आहेतच, दैवत एकही नाही. आणि त्यात इतिहासातली एकही व्यक्ती नाही. त्यांच्याकडून जे काही शिकायचं ते शिकून झालं आहे. माझे आदर्श या जित्या जागत्या व्यक्ती आहेत. त्यात व्यावसायिक आहेत, समाजसेवक आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, कलाकार आहेत. त्या लोकांवर एकूणात समाजात तिरस्कार पसरवणारी विखारी टोन मध्ये भाषा वापरली की मग मी त्यांना लिस्ट मधून मोकळं करतो. दुसरं अजून एक उडवण्याचं कारण एकदम वियर्ड आहे. मला जेव्हा लक्षात येतं की याच्या प्रतिक्रियेत विरोध नाही आहे तर मत्सर आहे, असूया आहे त्यांना पण अलविदा करतो. मग त्यात फेसबुकवर एकेकाळी जवळची मैत्री झाली आहे असे अनेक लोक आहेत. इतकंच नाही, तर मध्ये माझ्या अगदी जवळच्या वैयक्तिक मित्राला फेसबुक लिस्ट मधून मोकळं केलं. आणि त्या विषयावर  न बोलण्याचं भान आम्ही दोघेही राखून आहोत. 

वर उल्लेख केलेला टोन माझ्या साठी शब्दांपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यातून व्यक्त होणारे हावभाव, सूर हे जाणवतात. तुम्हाला ती अमूल माचोची ऍड आठवते. त्यातील शब्द व्हल्गर नव्हते, पण हावभाव अचकट विचकट होते. म्हणून त्यावर बंदी आली. फेसबुकच्या पोस्ट मधून, प्रतिक्रियेमधून ते कळतं. तुम्ही शब्दात लिहिलं नसेल तरी त्यामागचा अर्थ कळतो आणि तो बऱ्याचदा असाच विकट असतो. तो तसा नसणं यालाच सोशल मीडिया हायजिन म्हणतात. तो पाळला की मी संवाद साधू शकतो. 

अजून एक शेवटची गोष्ट. मी प्रत्यक्ष जीवनात आणि फेसबुकवर कान हलके ठेवले नाही आहेत. माझ्या कंपनीत काही माणसे चोऱ्या करतात असा अनेक जण माझ्यापाशी संशय व्यक्त करायचे. पण पुरावा मिळाल्याशिवाय ऐकीव माहितीवर कुणाला काढलं नाही. इथेही अनेक प्रथितयश लोकांबद्दल इकडून तिकडून काहीबाही ऐकायला मिळतं. माझ्याबद्दलही लोक बोलत असावीत. पण या ऐकीव माहितीवर मी कुणाबद्दलचं मत बदललं नाही. जेव्हा मला स्वतःला अनुभव आला, तेव्हाच मत बनवलं. 

एनीवे, मी मानव्य, मैत्री यात पावित्र्य राखण्यात विश्वास ठेवतो. कर्माचरण हे जास्तीत जास्त स्वच्छ कसं असेल यावर मनापासून काम करतो. जे आहे, ते असं आहे. 

Friday, 13 June 2025

एअर इंडिया

 व्यवसायासाठी माझा विमानप्रवास १९९५-९६ साली चालू झाला असला तरी ज्याला आपण फ्रिक्वेन्ट एअर ट्रॅव्हलर म्हणतो ते २००६ पासून चालू झालं. अर्थात त्यासाठी एअर डेक्कन, स्पाईस जेट, इंडिगो या नो फ्रील्स एअरलाईन्स ला धन्यवाद द्यायला हवेत. त्या काळात एअर इंडिया, जेट किंवा किंग फिशर या फुल सर्व्हिस कॅरिअर ने प्रवास करणं अवघडच होतं, कारण तिकिटांच्या किंमतीत बराच फरक असायचा. मला आठवत आहे त्या प्रमाणे मी पहिला एअर इंडिया चा प्रवास जवळपास २०१६ साली केला. त्यानंतरही एअर इंडिया ने प्रवास अगदीच क्वचितच केला. तिकीटाची किंमत हा तर इश्यू होताच पण त्याच्या बेकार सर्व्हिस चे किस्से पण खूप कानावर पडायचे. 

२०२२ ला टाटा ने एअर इंडियाला विकत घेतलं. अनेक भारतीयांप्रमाणे मलाही टाटा ब्रँड बद्दल ममत्व होतंच. आणि एव्हाना सर्वच एअरलाईनची प्राइसिंग स्पर्धेमुळे जवळपास आली होती. मग मी माझ्या विमान प्रवासासाठी एअर इंडिया ऑप्शन हिरीरीने घेऊ लागलो. सगळ्यात फायदा झाला मला, अमेरिकेच्या प्रवासात. सॅन फ्रान्सिस्को, न्यू यॉर्क आणि शिकागो ला त्यांची डायरेक्ट सर्व्हिस होती. बऱ्याच लोकांना पंधरा-सोळा तासांचा सलग विमानप्रवास आवडत नाही. मला आवडायचा. कदाचित बसने असे अनेक प्रवास केल्यामुळे सवय असावी. अंतर्देशीय प्रवासात पुणे-दिल्ली-पुणे मी आवर्जून एअर इंडिया घेतो. 

सुदैवाने, या सगळ्या प्रवासात मला तो एअर इंडिया चा कुप्रसिद्ध सर्व्हिस इश्यू कधी आला नाही. फक्त डिले मात्र असायचा, तो ही आंतरराष्ट्रीय प्रवासात. किंबहुना मला प्रत्येक प्रवासागणिक खूप सुधारणा जाणवायच्या. विमानात मिळणारे अन्न, स्वच्छता वगैरे गोष्टींमध्ये सुधारणा दिसत होती. मला आजकाल सारखं वाटत होतं की जे आर डी च्या सत्तरच्या दशकातील एअर इंडिया कि जि जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन पैकी एक होती, परत आता दिसेल.  

या पार्श्वभूमीवर कालचा ए आय १७१ चा अपघात खूपच धक्कादायक होता. प्रचंड दुःख झालं. त्या अपघाताची तीव्रता खूपच भयानक होती. २४१ विमानातले आणि हॉस्टेल मधील २०-२५ जीव आपण गमावले. त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात हा विचारांच्या पलीकडे आहे. मृतकांच्या नातेवाइकांच्या मनाची सहवेदना झाली तरी हृदय पिळवटून जातं. जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपण फार काही करू शकत नाही ही हतबलता पण त्रास देते. 

मला आशाच नव्हे तर खात्री आहे की या अपघाताच्या धक्क्यातून एअर इंडिया पण सावरेल. यानंतर ते विमानप्रवासाची सुरक्षा यावर काहीतरी ठोस उपाययोजना करतील. या अपघाताचे सुद्धा मूळ कारण ते शोधून काढतील आणि असं काही परत होण्याची शक्यता सुद्धा तयार होणार नाही अशा पद्धतीची कार्यप्रणाली तयार करतील. देश विदेशातील प्रवासी एअर इंडिया च्या विमानात प्रवेश करताना सुरक्षिततेची भावना घेऊन येतील असा विश्वास तयार करावा लागेल. त्यांनी निवडलेला सुधारणेचा मार्ग अजून ताकदीने ते फॉलो करतील आणि येणाऱ्या वर्षात तो सकारात्मक बदल आपल्याला दिसावा अशी मनोमन प्रार्थना करतो . 

पुन्हा एकदा या प्रवासात निधन पावलेले सर्व प्रवासी, हॉस्टेल मधील डॉक्टर यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नातेवाईकांना हा लॉस सहन करण्याचे धैर्य मिळो ही प्रार्थना. 

Friday, 6 June 2025

 तुम्हाला सगळ्यांना अ.......अभियंत्याचा चा इंग्लिश अनुवाद An Engineer's Journey to Entreprenueship च्या पुस्तक प्रकाशनासाठी निमंत्रित करताना खूप आनंद होतो आहे. 

या पुस्तक प्रकाशनासाठी श्री आनंद देशपांडे सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं मान्य केलं तेव्हा मी अक्षरश: सातव्या आसमान वर होतो. ज्याचं नाव हे पुण्यातच नव्हे तर देशात, आणि देशातच का जगात उद्योजकतेशी समानार्थी शब्द म्हणून घेतलं जातं, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या उद्योजकाच्या पुस्तक विमोचनाला येण्याचं मान्य केलं हा मेल पाहिल्यावर कृतज्ञतेची भावना सरसरत गेली.  

ज्याच्यामुळे उद्योजकता म्हणजे नक्की काय हे मला कळलं ते मनीष गुप्ता यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं हे अजून एक भाग्य.  

पुस्तक प्रकाशनाचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा या दोघांचे उद्योजकतेवरचे विचार हे जास्त प्रेरक असतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. 

अ...... अभियंत्याचा प्रकाशित होताना आपलं घर, स्नेहवन आणि आरंभ यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी तीन मला भावलेल्या उद्योजकांचा छोटा सत्कार यावेळेस करणार आहे. त्यामागे भावना ही अवॉर्ड वगैरे अशी नसून एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकांना केलेला सलाम इतकी साधी भावना आहे. 

विक एन्ड ला पुण्यात हॉल उपलब्ध नसतात, त्यामुळे बुधवार २५ जून हा वीक डे कार्यक्रमासाठी ठरवला आहे, मयूर कॉलनी कोथरूड येथील एम इ एस चा हॉल हे ठिकाण आहे, वेळ: संध्याकाळी ६:३० वाजता. 

दोन्ही पाहुणे हे वेळ पाळण्याबाबत प्रचंड दक्ष आहेत, त्यामुळे कार्यक्रम बरोबर ६:३० वाजता सुरू होईल. उद्योजकता, व्यवसाय याबद्दल ऐकायचे असेल तर जरूर कार्यक्रमाला या. काही कारणाने तुम्हाला जमणार नसेल तर तुमच्या तरुण मुलामुलींना पाठवा. तुमची निराशा होणार नाही याची खात्री देतो. 

अ.... अभियंताचा प्रकाशित होताना भरभरून प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्यावा ही विनंती. 

भेटू यात. २५ जून २०२५, संध्याकाळी ६ वाजता एम इ एस हॉल, मयूर कॉलनी पुणे ३८. 


Thursday, 22 May 2025

माझ्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा मी पण विचार केला की मुलीकडच्याकडून काही तरी हापसून घ्यावं. अगदी इनोव्हा नाही तर गेलाबाजार वॅगन आर तरी मागावी. जास्त नाही पण म्हंटलं दोन चार तोळे सोनं पोरीच्या अंगावर घाला अशी आई वडिलांना मागणी करावी आणि हुंड्यात म्हंटलं दोन चार लाख डिमांड करावेत. 

पण मग आम्हाला मुलगी भेटली, मुलीचे आईवडील भेटले. सगळं प्रकरणच इतकं सादगी चं होतं की माझ्या सगळ्या मागण्या मी गिळून टाकल्या. 

अच्छी सूरत को सवरने की जरूरत क्या है

सादगी भी तो कयामत की अदा होती है

असा सगळा माहोल होता. उच्चशिक्षित सून, जिच्या स्वभावात त्याचा मागमूस पण नाही, अतिशय मॉडेस्ट आणि हंबल असे तिचे आईवडील, कुटुंबाच्या सेवेत तत्पर असणारा सुनेचा भाऊ, आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेला नातेवाईकांचा गोतावळा. असा सगळा प्रकार. 

सगळा वेगळाच प्रकार झाला. मानपानाच्या बैठकीला आमच्या बाजूने तब्बल एक जण होता, तो म्हणजे मी, आणि त्यांच्याकडून दोघा जणांची गॅंग होती, ते म्हणजे मुलीचे आईवडील आणि पंधरा वीस मिनिटाच्या बैठकीत काय हवं नको ते बघणारा मुलीचा भाऊ. निम्मा वेळ तर आम्हाला काय नको हे बोलण्यातच गेला. लग्नाच्या प्रत्यक्ष खरेदीत "या गोष्टीचे पैसे आमच्याकडून होते, पण ते तुम्ही दिले" म्हणून मी काही पैसे त्यांना जी पे केले तर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी "नाही नाही, ते आम्हीच घ्यायचं होतं" म्हणत परत केले. 

असो. खूप वाईट वाटलं, महाराष्ट्रात जे काही घडलं ते वाचून. पोस्टचा बाज जरा साधा असला तरी दुःख अपार झालं आहे. खरंतर माफक अशी श्रीमंती आणि अमाप नात्यांची संपत्ती यातील गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित सांभाळलं तर आयुष्याचा स्वर्ग होतो. पण असं साधं सरळ सोपं आयुष्य सोडून लोक का विचका करून घेतात हा मोठा प्रश्नच आहे. 

Tuesday, 20 May 2025

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी संजयच्या फॅक्टरीत गेलो होतो. संजयने हे युनिट नुकतंच बनवलं होतं. मी कंपनीत पोहोचलो तेव्हा सीन जरा गरमागरमीचा होता. संजय ने त्यांच्या पॅन्ट्रीच्या इथून टॉयलेट साफ करण्याचा ब्रश, मॉप हातात घेतला होता, आणि तो टॉयलेटच्या दिशेने झपझप चालत होता. त्यांचा एच आर त्याच्या मागे "सर, मी मॅनेज करतो. नका तुम्ही असं करू" असं म्हणत धावत होता. 

मी आपलं काही इश्यू असेल म्हणून संजय च्या केबिन मध्ये बसून राहिलो. अर्ध्या एक तासात संजय तडकलेल्या चेहऱ्याने त्याच्या खुर्चीत येऊन बसला. माझ्या लक्षात आलं, काहीतरी बिनसलेलं आहे. संजय शांत झाल्यावर मी त्याला विचारलं कि काय झालं म्हणून. 

तर स्टोरी अशी होती. संजय ने युनिट नवीन बनवलं होतं. स्वच्छतेच्या बाबतीत संजय फार काटेकोर होता. नवीन युनिट मधील शॉपफ्लोअर वर वर्किंग असोसिएट्स साठी बनवलेले टॉयलेट्स त्याला हवे तसे क्लीन होत नव्हते. क्लिनिंग एजन्सी कडून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचं काम एच आर मॅनेजर चं होतं. ते क्लीन होत नाही आहेत, हे संजय ने एच आर मॅनेजर ला चार पाच वेळा निदर्शनात आणून दिलं होतं. जेव्हा मी गेलो त्या सकाळी परत संजय ला हवी तशी स्वच्छता दिसली नाही. संजयने सरळ टॉयलेट क्लिनिंग चं सामान उचललं आणि एजन्सी च्या लोकांना घेऊन गेला आणि त्याला तो एरिया जसा क्लीन हवा तसा करून दाखवला. 

मी समोर असताना त्याने एच आर मॅनेजर ला आणि क्लिनिंग एजन्सी च्या लोकांना केबिन मध्ये बोलावलं आणि सांगितलं "मला जसा क्लिनलीनेस हवा आणि तो कसा आणायचा ते मी दाखवून दिलं आहे. आता मला यापुढे जर ते स्वच्छ दिसलं नाही तर मग तुम्हाला माझ्या तोंडून संगीत ऐकावं लागेल आणि ते कानाला फार मधुर वाटणार नाही.  आणि एक सांगतो. इथे माझ्या ऑफिसच्या जवळ पण टॉयलेट बनवलं आहे, पण मी मात्र हे शॉप फ्लोअरचं वॉशरूम वापरणार. त्यामुळे तिथलं ऑडिट सारखं माझ्या नजरेतून होत राहील हे ध्यानात असू द्या."

या गोष्टीला आता जवळपास पाच वर्षे झालीत. आज संजयच्या कंपनीची स्वच्छता ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आजही संजय त्याच्या ऑफिसजवळ असलेलं टॉयलेट वापरत नाही तर शॉप फ्लोअर वर असोसिएट्स साठी जे वॉशरूम बनवले आहे तेच वापरतो आणि ते मला २०२० मध्ये जसं दिसलं तसंच आजही चकाचक दिसतं. 

स्वच्छता ठेवण्याबाबत एखाद्या आस्थापनेच्या नेत्याने कसं वागायला हवं याचा वस्तुपाठ संजयने मला त्याच्या वागणुकीतून दाखवून दिला. 

Monday, 19 May 2025

 हंगेरी चा माझा होस्ट मस्त माणूस होता. एकतर फॅमिली कल्चर अजूनही जिवंत वाटलं तिथं मला. रविवारी मी बुडापेस्टला पोहोचल्यावर संध्याकाळी लोकल साईट सिइंग आणि डिनर साठी तो त्याची बायको आणि दोन मुलांना, वय २८ आणि २५, असं सगळ्यांना घेऊन आला होता. आणि त्या सर्वांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. 

बुडापेस्ट शहर मला संपन्न वाटलं पण पाश्चिमात्य शहरात सहसा अंगावर येणारी श्रीमंती तिथं दिसली नाही. लोकसंख्या पण कमी असल्यामुळे रस्ते पण रुंदीला लहान आणि आपल्याइतके खड्डे वगैरे नसले तरी बऱ्यापैकी खडबडीत होते. एका कंपनीत गेलो तर तिथं अगदी मातीचा रस्ता होता. अनेक कार पण जुन्या, छोटे मोठे डेंट मार्क्स दिसणाऱ्या होत्या. मुख्य म्हणजे युरोप मध्ये तसंही अमेरिकेसारख्या अगडबंब कार नसतात. मारुती स्विफ्ट खूप पॉप्युलर कार वाटली मला बुडापेस्ट मध्ये.  अनेक बिल्डिंग आणि घरं सुद्धा मला आपल्यासारखी वाटली, बाहेरून मध्यमवर्गीय फील देणारी. 

मी हे जे सगळं लिहितो आहे ती साम्यस्थळं माझ्या होस्ट ला सांगत होतो. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि एकच डायलॉग मला ऐकवला "But we don't have filthy garbage on our roads and public places." 

माझी मान शरमेने खाली झुकली. खरंच सांगतो बुडापेस्ट काय किंवा मला आजकाल तैवान मध्ये नेहमी जिथं जावं लागतं ते तैचुंग काय, तिथंही गरिबी आहे, दाटीवाटीने असलेल्या इमारती आहेत. चाळी पेक्षा भयानक अशी घरं मी चीन मध्ये पण बघितली आहेत. पण आपल्याइतकी रस्त्यावर घाण आणि कचरा मी कुठेही बघितला नाही. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा शहरं स्वच्छ ठेवण्याचा नामी उपाय पण त्याबद्दलची आपल्या समाजाची आणि राजकारण्यांची उदासीनता ही उबग आणि लाज वाटावी अशी आहे.

मला एक प्रश्न नेहमी पडतो. या विषयाशी संबंधित आपले राजकारणी, ज्यात नगरसेवक, मंत्री लोक, आणि नोकरशाहीचे पदाधिकारी परदेशात जातात. कुणी अभ्यास दौरे काढून जातात, कुणी नातेवाईकांना भेटायला जात असतील, कुणी मौज मजा करायला जात असतील. यांच्या कुणाच्याही मनात असं येत नसेल का की माझा वॉर्ड, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश असा स्वच्छ असावा? गणपती मध्ये अष्टविनायक आणि नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनासाठी फुकट दौरे काढणाऱ्या नगरसेवकाला असं कधी वाटत नसेल का की माझा वॉर्ड चकाचक, अतिक्रमण मुक्त असायला हवा.? आणि खरं सांगतो, हे अनुभवयाला परदेशात पण जायची गरज नाही आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर, किंवा पंजाब मधील चंदिगढ सुद्धा दृष्ट लागेल इतकं स्वच्छ आहे. 

आणि यापेक्षाही दुर्दैव हे आहे की धार्मिक आणि जातीय राजकारणात विभागल्या गेलेल्या आपल्या समाजाची पण मती कुंठित झाली आहे. आम्हाला रस्त्यावर दिसणारी अस्वच्छता, सार्वजनिक जागेवर नोकरशाहीच्या मदतीने केलेल्या अतिक्रमणामुळे उभे राहिलेले प्रश्न, शहरात असणारे दरिद्री रस्ते यावर मोर्चे काढून प्रश्न विचारावे वाटत नाही. कारण आमचे राजकारणी आम्हाला जातीवरून मोर्चे नेण्यात व्यस्त करतात, आम्हाला जयंत्या, पुण्यतिथीला,  मिरवणुकीसाठी उन्मदित करतात. 

सामाजिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी खरंतर किती वाव आहे. राजकीय आणि नोकरशाहीने इच्छाशक्ती दाखवली तर चमत्कार करू शकतात याची असंख्य उदाहरणे आपणच पाहिली आहेत. पण याबाबतीत मात्र ती मृतावस्थेत आहे हे आपलं दुर्दैव. 

Monday, 12 May 2025

 मोठं कन्फ्युजन आहे. 

माझा यावेळचा दौरा मुंबई- बुडापेस्ट-फ्रँकफूर्ट-इस्तंबूल-मुंबई असा होता. १० मे रोजी माझं दुपारी अडीच वाजता फ्रँकफूर्ट-इस्तंबूल असं फ्लाईट होतं. त्याचं चेक इन करण्यासाठी मी ९ मे ला बसलो. तितक्यात यु ट्यूब वर एक्स्टर्नल मिनिस्ट्री चं ब्रिफिंग चालू होतं. त्यात  कर्नल कुरेशी सांगत होत्या की पाकिस्तान ने जे भारतावर ड्रोन हल्ले केले, त्या ड्रोन चं विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की हे ड्रोन तुर्कस्थान मध्ये बनवले आहेत. 

मी चेक इन करण्याऐवजी व्हाट्स अप उघडलं. इस्तंबूल मधील माझ्या होस्टला मेसेज पाठवला की मी तिकडे येणं कॅन्सल करतो आहे. त्यामागे कारण होतं. 

- जर मिनिस्ट्री सांगत आहे की पाकिस्तान ने वापरलेले ड्रोन हे टर्की मध्ये बनले आहेत तर ते त्यांच्याबरोबर चे राजनैतिक संबंध थांबवू शकतात. माझं टर्किश एअरलाईन चं रिटर्न तिकीट १७ मे चं होतं. पुढील ९ दिवसात काहीही होऊ शकत होतं. मला रिस्क घ्यायची नव्हती. आणि ज्या देशाचे ड्रोन मिलिटरी ऍक्शन मध्ये आपल्या देशाविरुद्ध वापरले तिथं जाणं काही मला फारसं संयुक्तिक वाटलं नाही. मी ट्रॅव्हल प्लॅन बदलून जर्मनीतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 

इथं मला प्रश्न पडला. टर्की ने ड्रोन बनवले आणि ते पाकिस्तान ने आपल्या विरुद्ध वापरले म्हणून माझी राष्ट्र भक्ती जागृत झाली आणि मी टर्की ला जाणं कॅन्सल केलं. पण पाकिस्तान ने तर आपल्या विरुद्ध एफ १६ वापरलं आणि इथे तर माझी अमेरिकन कंपनी बरोबर पार्टनर शिप आहे. मग हा दुटप्पी पणा आहे का? 

यापुढे जाऊन अजून एक गंमत सांगतो. जर्मनी मध्ये मला एका दुसऱ्या गावाला जायचं होतं. माझ्यासाठी जी कॅब बुक केली होती, तिचा मालक आणि चालक पाकिस्तानी होता. मी ती कॅब मात्र कॅन्सल नाही केली. 

टर्की ची ट्रिप कॅन्सल केल्यामुळे माझं जवळपास रु दीड लाख रुपयाचं नुकसान झालं. मी पाकिस्तानी मालकाची कॅब कॅन्सल करून दुसरी केली असती तर माझं शून्य नुकसान झालं असतं. 

धर्मधिष्ठित राजकारण करून सामान्य माणसांच्या मनात तिरस्काराची भावना तयार करणारी आणि त्यातून कृष्णकृत्य उद्युक्त करणारी राष्ट्रनीती,

आणि भांडवलशाहीचा आधार घेऊन दुसऱ्या देशाला स्वसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्रास्त्र पुरवणारे युद्धखोर देश

धर्माने शिकवलेल्या जीवन प्रणालीचा सर्व्हायवल साठी उपयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात यापैकी विरोध कुणाचा करायचा, का करायचा, कसा करायचा याबद्दल कन्फ्युजन आहे. मला असं कन्फ्युज असणं बरोबर की चूक हे पण माहित नाही. फक्त मला एक कळतं की कुठल्याही राष्ट्राच्या उन्नतीचं आणि विकासाचं अधिष्ठान हा कोणत्याही धार्मिक इझम शी निगडित नसावं तर कार्मिक इझम शी नातं जोडणारं असावं. मीच मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे. 


Friday, 25 April 2025

अख्ख जग डाव्या आणि उजव्या विचारसरणीत विभागलं गेलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. फक्त यात अजून सब कॅटेगरी आहेत. एक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट. तसेच मॉडरेट लेफ्ट आणि मॉडरेट राईट. जगातली, त्यातल्या त्यात भारतातील बहुसंख्य जनता ही सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट आणि मॉडेरेट राईट या टॉलरन्स झोन मध्ये बसत होती. आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम लेफ्ट आणि आठ दहा टक्के लोक एक्स्ट्रीम राईट या झोनच्या विचारसरणीचे आहेत. 

जो पर्यंत हे प्रमाण आहे की ८०% लोक हे सेंटर लाईन ते मॉडरेट लेफ्ट किंवा मॉडरेट राईट या झोन मध्ये आहेत तो पर्यंत देश हा सलोख्याने नांदेल. 

प्रॉब्लेम हा झाला आहे की गेल्या काही वर्षात मॉडरेट राईट विचारसरणीचे लोक हे एक्स्ट्रीम राईट कडे झुकत आहेत. आणि त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम मॉडरेटली लेफ्ट विचारसरणीचे लोक हे मॉडरेट राईट कडे चालले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. जेव्हा सेंटर लाईन च्या आजूबाजूला कमी आणि एक्स्ट्रीम लेफ्ट किंवा राईट मध्ये जग विभागले जाईल तेव्हा मात्र प्रॉब्लेम होणार आहे. 

कुठलाही दहशतवादी हल्ला हा धर्म प्रेरित असतो असा एक मतप्रवाह होत चालला आहे. (जसा नुकताच झालेला पहलगाम हल्ला इस्लामप्रेरित आहे असा स्ट्रॉंग मतप्रवाह आहे). आपण सर्व जण हे विसरत चाललो आहोत की धार्मिकतेला खतपाणी हे सरकारच घालत चाललं आहे. आपल्या धर्माबद्दल सर्वाना प्रेम असतं, आणि ते यौग्य आहे. शेवटी धर्मच आपल्याला जगण्याची जीवनप्रणाली शिकवतं. पण धर्माबद्दलच्या प्रेमाला पहिले अभिमानात, नंतर दुराभिमानात, मग गर्वात आणि शेवटी अंदाधुंद अधिकारात रूपांतरित काम पाकिस्तानातील सरकार त्यांच्या धर्माबाबत करत आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान करतं आहे. ही धर्मनीती आहे. जी सरकार राबवत आहे. हा धर्म नव्हे. This is Policy of religion and not religion.

या प्रोसेस मध्ये झालं हे आहे की आपण धर्मनितीला विरोध करण्याचं सोडून धर्मालाच विरोध करत चाललो आहोत. आणि या लपेट्यामध्ये भारतीय समाजाचा एक मोठा प्रवर्ग यात ओढला जातो आहे. एक लक्षात घ्यायला हवं की राजनीती ही धर्मनितीला ओव्हरपॉवर करणारी हवी. ना की उलटं. अटलबिहारी वाजपेयींनी कानपिचक्या देताना वापरलेला राजधर्म तेच सांगतो.  दहशतवादी हल्ला हा भारताची विकासनीती हाणून पाडण्यासाठी दुसऱ्या देशाच्या धर्मनितीने केला आहे हा नॅरेटिव्ह जास्त प्रस्थापित करण्याची गरज आहे. ना की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर. कारण आता भारताच्या विकासनीतीला खीळ जर काही घालू शकणार असेल ते धार्मिक ध्रुवीकरण. आपण तो डाव हाणून पाडण्यात आर्थिक आणि सामाजिक शहाणपण आहे. असं आहे की काश्मीर मध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांनी हिंदूंना मनापासून मदत केल्याचे अनेक दाखले दिसत आहेत. एका धर्माने दुसऱ्या धर्माला विरोधच करायचा असेल तर ते घडलं नसतं. 

आता कुणी म्हणेल की त्यांना त्यांची पर्यटन व्यवसायाची काळजी होती म्हणून मदत केली. मग मी पण तेच म्हणतोय की धर्मापेक्षा कर्म हे जास्त माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रभावीपणे उद्युक्त करतं. 

धर्म ही प्रणाली आहे, गाईडलाईन्स. तो जर नियम म्हणून थोपवाला की त्याचा अफगाणिस्तान होतो, पाकिस्तान होतो, सीरिया होतो, लिबिया होतो. तो जर प्रणाली म्हणून वापरला तर त्याचा स्वीडन होतो, ऑस्ट्रेलिया होतो, स्वित्झर्लंड,  न्यूझीलंड होतो. नागरिकत्वाचे नियम घटनेत लिहिलं आहे. 

तेव्हा सेंटरलाईन आसपास वावरणाऱ्या माझ्या मित्रांनो, आजही पण बहुसंख्य आहोत. एक्स्ट्रीमिस्ट लोक आजही अल्पसंख्यांक आहेत. तेव्हा सजगतेने जगू यात. मी आता यांच्याकडून मटेरियल घेणार नाही, वेटर म्हणून त्यांच्याकडून सर्व्हिस घेणार नाही, उबर ड्रायव्हर दुसऱ्या धर्माचा असेल तर कॅब करणार नाही ही  एक्स्ट्रीम राईट कडे जाणारी विचारसरणी सोडून देऊ, आणि बिहार निवडणुकांच्या आधी हल्ला घडवून आणला किंवा आपण हिंदुत्ववादी नाही असे सांगितल्यावर अतिरेक्यांनी मारलं नसतं या एक्स्ट्रीम लेफ्ट विचारसरणीला तिलांजली देऊ यात. 


Thursday, 10 April 2025

आमचा एक कस्टमर आहे. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो कस्टमर स्पिंडल उत्पादनाचं १००% काम आम्हाला द्यायचा. जवळपास दहा एक वर्ष आम्ही त्याचे सोल सप्लायर होतो. दहा एक वर्षात आम्ही त्याला पाचशे स्पिंडल सप्लाय केले असतील. असेच आमचे अनेक कस्टमर्स आहेत, जिथे आम्ही सॉलिड नाव कमावलं होतं. 

तीन एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या आमच्या ग्राहकाने एका स्पेशल स्पिंडल ची ऑर्डर दिली होती. त्याला बेअरिंग पण वेगळ्याच साईझची लागणार होती. ती बेअरींग सोर्स करण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं पण जगात कुठे ती मिळेना. डिलिव्हरी ची कमिटमेंट देऊन बसलो होतो. आणि ज्या मेकच्या बेअरिंग ची गरज होती ती काही मिळत नव्हती. 

इथे एक गडबड झाली. आमच्या पर्चेस ऑफिसर ने त्याची चीन मध्ये विचारणा केली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्याकडे होती. ज्या उत्पादकाची हवी होती तीच त्याला मिळाली. त्याने सुद्धा फार काही विचार न करता ती ऑर्डर केली. आणि मुख्य म्हणजे त्याने इंजिनीअरिंग डिपार्टमेंट ला विचारलं पण नाही ज्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं. 

आम्ही बेअरिंग इम्पोर्ट केली. स्पिंडल बनवला आणि ग्राहकाला सप्लाय केला. थोडा उशीर झाला होता, आणि त्याने कस्टमर नाराज पण होता. 

स्पिंडल सप्लाय केला खरा पण ज्या मशीन वर लावला त्यावर पंधरा दिवसातच ट्रायल चालू असताना तो फेल झाला. कस्टमर आमच्यावर बेफाम चिडला. फेल्युअर चं रूट कॉज शोधायला गेल्यावर कस्टमर ला माहित झालं की आम्ही चायना वरून बेअरिंग आणून वापरली आहे. ग्राहकाचा पारा मग तर खूपच चढला. त्याने मला चांगलंच सालटवून काढलं. कारण ओरिजिनल मेकची बेअरिंग असली तरी चीन वरून आणली म्हणजे ती डुप्लिकेट असण्याची जास्त शक्यता होती. (नंतर ती डुप्लिकेट होती हे सिद्ध पण झालं)

मी कस्टमरला सांगत होतो की "सर, चुकून झालं आहे आमच्या पर्चेस ऑफिसर कडून. तुमची डिलिव्हरी डिले होत होती, त्यामुळे त्याने चीन मध्ये ऑर्डर केली आणि तुमचा स्पिंडल वेळेत सप्लाय झाला." पण आता स्पिंडल फेल झाला होता. 

मी कस्टमर ला समजवायचा प्रयत्न करत होतो की दहा वर्षे आम्ही प्रॉडक्ट सप्लाय करतो आहे. एकदाही प्रॉब्लेम आला नाही आहे. पण तो काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हता. तो म्हणाला "मी तुम्हाला सप्लायर म्हणून ब्लॅक लिस्ट करतोय. And I will see to it that you will hear this music in the market"

एक मोठं अकौंट आम्ही लूज केलं होतं परत वर बदनामी वेगळी. मी मिटिंग घेतली आणि आमच्या लोकांना सांगितलं

"हे असं आहे. एक चांगला उत्पादक  म्हणून नाव कमवायला आपल्याला दहा वर्षे गेलीत, पण एका चुकीमुळे आपल्याला किती मोठी किंमत चुकवायला लागत आहे."

"पण अजून एक गोष्ट सांगतो की आपला उद्देश कुणाला फसवायचा नव्हता. आपण त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घेतले ते भले चुकले असतील. तरीही सांगतो की आपले मूळ सिद्धांत हे व्यवसायाच्या नैतिकतेला धरून आहेत. ग्राहकाने दिलेली धमकी नैमित्तिक आहे. मला खात्री आहे, प्रामाणिक नीतिमत्तेच्या रस्त्यावर चालत राहिलो तर हा ग्राहक आपल्याकडे परत येईल"

आज तो ग्राहक आमच्या पहिल्या पाच पैकी एक आहे. 


Monday, 3 March 2025

Believe me, peace is more precious than triumph".

 काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नील तेव्हा चौदा एक वर्षाचा होता. आम्ही दोघेच एक्स्प्रेस वे ने कारने चाललो होतो. मी आपलं बरोबर मधली लेन पकडून गाडी चालवत होतो. अचानक डावीकडच्या लेन मध्ये चालणाऱ्या एका महाकाय ट्रक ने आपला ट्रॅक बदलला आणि आमच्या लेन मध्ये घुसला. माझी कार ८० च्या स्पीड ने असेल. त्या ट्रक पासून वाचवण्यासाठी मला जीवाची धडपड करत, ब्रेक मारत कार कंट्रोल करावी लागली. हे करताना माझी कार पहिल्या लेन मध्ये थोडी टर्न झाली. मागून एक सुसाट वेगाने फोर्ड इंडिव्ह्युअर येत होती. तिलाही ब्रेक मारून स्पीड कमी करावा लागला. 

तो ट्रक बेदरकार पणे पुढे चालला गेला. मी त्याला ओव्हरटेक करत, तिसऱ्या लेनच्या पलीकडे असलेल्या मोकळ्या लेन मध्ये त्याला थांबवला. आणि उतरून त्या ट्रक ड्रायव्हर ला शिव्या देऊ लागलो. तो ट्रक सरळ इन्व्हेड करत माझ्या लेन मध्ये आला होता आणि अपघात होताना थोडक्यात वाचला होता. पहिल्यांदा आवाज चढवलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर नरमाई दाखवतो आहे असं वाटत असतानाच एक विचित्र घटना घडली. 

मागची फोर्ड  पुढे जाऊन थांबली आणि त्यातून एक आलिशान सूट घातलेला माणूस खाली उतरला आणि "तुला गाडी चालवता येत नाही का. मी तुला धडकलो असतो तर तुझ्या कारचा चुराडा झाला असता" वगैरे फर्ड्या इंग्लिश मध्ये मलाच झाडू लागला. मी त्याला आपलं माझ्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये "तुला कळतंय का काय बोलतोस. हा भला मोठा ट्रक माझ्या लेन मध्ये आडवा आला, म्हणून....." वगैरे व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होतो. तर अतिश्रीमंत माणूस अजूनच मोठ्या आवाजात माझ्या कार कडे बघत "तुम्हा गरीब लोकांना एक्स्प्रेस वे ला गाडी कशी चालवायची कळत नाही" वगैरे तत्सम काही बोलू लागला. तो ट्रक ड्रायव्हर राहिला बाजूला आणि त्या फोर्ड वाल्याचं आणि माझं भांडण चालू झालं. 

माझाही आवाज चढायला लागला तितक्यात एक हात माझ्या हाताला ओढू लागला. नील कार मधून उतरून माझ्याकडे आला आणि रडवेल्या चेहऱ्याने पाहत म्हणाला "पप्पा, जाऊ द्या ना. चला आपल्या कार मध्ये". ते बघून तो फोर्ड वाला माणूस काहीतरी बडबड करून निघून गेला, ट्रक ड्रायव्हर ने पण "सॉरी भाई" म्हणत ट्रक चालू केला. मी नील चा हात पकडून कार मध्ये येऊन बसलो. 

मी नील ला म्हणालो "का तू मला घेऊन आलास इकडे? चांगला झापला असता ना त्या मोठ्या कार वाल्याला". तर नील मला म्हणाला "त्याने काय झालं असतं? आणि आमच्या मॅम ने सांगितलं आहे No one wins in such argument but you loose your peace of mind."

आणि मग काचेतून बघत एक लाख मोलाचं वाक्य बोलला 

"Believe me, peace is more precious than triumph". 

Wednesday, 19 February 2025

एफ डब्ल्यू टी

फ्रिक्शन वेल्डिंग टेक्नॉलॉजीज (एफ डब्ल्यू टी) आणि सेटको चं नातं खूप जुनं. २००७-०८ चं. एफ डब्ल्यू टी ने त्यांचा एक स्पिंडल दुरुस्तीसाठी सेटको कडे आणला होता. त्याच सुमारास सेटको ने त्यांच्या पहिल्या मशीनचा स्पिंडल उत्पादन केला होता. 

एफ डब्ल्यू टी आणि सेटको या दोन कंपन्यांमध्ये खूप साधर्म्य आहे. दोन्ही व्यवसाय २००२ मध्ये चालू झाले होते. एफ डब्ल्यू टी सुरुवात लेबर चार्जेस वर फ्रिक्शन वेल्डिंग जॉब वर्क करत झाली होती. नंतरच्या काळात एफ डब्ल्यू टी मशीन उत्पादक म्हणून नावारूपाला आली. सेटको ने सुद्धा व्यवसायाची सुरुवात स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात केली आणि आता आघाडीचे    स्पिंडल उत्पादक म्हणून पाय रोवण्याची धडपड चालू आहे. आधी अल्ट्रा प्रिसीजन स्पिंडल असणाऱ्या व्यवसायाचे नाव सामंजस्य करारानंतर सेटको झालं तर एफ डब्ल्यू टी ने अमेरिकेच्याच एम टी आय बरोबर हातमिळवणी केली. दोन्ही व्यवसाय या स्ट्रॉंग मूळ सिद्धांतावर काम करतात आणि नफा हा त्यांच्या व्यवस्थापकीय पद्धतीचा परिपाक आहे असं मानतात. मग ते मनुष्यबळ व्यवस्थापन असो, पारदर्शकता असो, विश्वास असो वा ग्राहक केंद्रित सूत्र असो. 

वैयक्तिक पातळीवर मी एफ डब्ल्यू टी  चे संस्थापक श्री यतीन तांबे यांना मेंटर म्हणून बघतो. ते आमचे ग्राहक तर आहेतच पण अनेक प्रसंगी त्यांनी मित्रत्वाचं नातं फार जिव्हाळ्याने निभावलं आहे. व्यवसायात मला कधीही आव्हानात्मक परिस्थिती उभी राहिली तर मी यतीन सरांकडे हक्काने सल्ला मागण्यासाठी गेलो आणि त्यांनीही मला कधी निराश केलं नाही. सप्टेंबर २०१५ साली जेव्हा माझी दुसरी प्लास्टी झाली तेव्हा व्यावसायिक आयुष्याचा झोल निस्तरण्यासठी मी यतीन सरांकडे गेलो आणि त्यांनीच माझी मनीष गुप्ता सरांशी ओळख करून दिली ज्यांनी एकूणच व्यवसायाकडे बघण्याची नवीन दृष्टी दिली. 

आज, एफ डब्ल्यू टी  हा सेटको चा महत्वाचा ग्राहक आहे. त्यांच्या प्रत्येक मशीनचा स्पिंडल सेटको पुरवते. अर्थात हे घडताना यतीन सर आणि त्यांच्या टीमचा मनःपूर्वक सपोर्ट हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यतीन सरांनी खऱ्या अर्थाने आमचं हँड होल्डिंग केलं आणि सप्लायर पार्टनर म्हणून आम्हाला डेव्हलप केलं. 

काही दिवसांपूर्वी एफ डब्ल्यू टी त्यांच्या महत्वाच्या व्हेंडर्स चा सत्कार केला. त्यात सेटको चा पण समावेश होता. एकूणच यतीन सर आणि एफ डब्ल्यू टी च्या पूर्ण टीमप्रति आम्ही कृतज्ञ आहोत. 

हे अवॉर्ड घेण्यासाठी जरी मी स्टेज वर गेलो तरी त्या कौतुकाची खरी हकदार ही आमची उत्पादन टीम आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. 

Wednesday, 5 February 2025

मुलगा अतिशय प्रसिद्ध इंजिनियरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनियर झालेला. घरच्या व्यवसायात एक वर्ष हातभार लावला. मग परत एका चांगल्या कॉलेज मधून एम बी ए झाला. 

मला जॉब साठी फोन केला तेव्हा हा मेकॅनिकल इंजिनियर आणि एम बी ए मुलगा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मार्केटिंग इंटर्न म्हणून काम करत होता. त्याने फोन केल्यावर मी त्याला पहिले ही भानगड विचारली की मेकॅनिकल केल्यावर कन्स्ट्रक्शन कंपनीत का काम करतो आहेस? त्यावर त्याने कुठे जॉब मिळत नाही म्हणून जो मिळाला तो घेतला हे सांगितलं. 

मी म्हणालो, ते ही ठीक आहे, पण घरच्या व्यवसायाला का पुढे नेत नाही? तर म्हणाला की लहान आहे व्यवसाय आणि खूप चॅलेंजेस आहेत. 

मी म्हणालो, मी जॉबसाठी तुझा इंटरव्ह्यू घेईल पण त्या आधी घरचा व्यवसाय का पुढे नेऊ नाही शकत याची मला समाधानकारक उत्तरं दे. ती मिळाली तर मी पुढे जाणार नाही. 

फोन ठेवताना तो मुलगा म्हणाला "इतके इंटरव्ह्यू झाले माझे. पण व्यवसायात काय आव्हानं आहेत आणि तो पुढे का चालवत नाही यावर कुणी चर्चा केली नाही."

बहुतेक त्याच्या टोन मध्ये कौतुक असावं. पण त्याला बिचार्याला काय माहित की मी आणि माझा बिझिनेस पार्टनर वाघेला यांनी उभ्या केलेल्या बिझिनेस कडे आमची पुढची पिढी ढुंकूनही बघत नाही. आणि त्याचा बदला म्हणून ज्यांच्या घरात व्यवसाय आहे, ते जॉब मागायला आले की त्यांनी घरातल्या व्यवसायाला पुढे न्यावं यासाठी अर्ध्या एक तासाचं लेक्चर घेतो. 

पण खरंच सांगतो, माझ्या या प्रयत्नाला अजून एकदाही यश मिळालं नाही. हा तरी मुलगा इंटरव्ह्यू झाल्यावर घरी जाऊन आई वडिलांना "मी घरच्या व्यवसायात जॉईन होतो" असं सांगतो का हे बघायचं आहे. 

Sunday, 2 February 2025

जावे त्या देशा

 व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मित्रगण 

हृदयात धडकी भरावी असे अनेक मित्र समोर दिसत आहेत. 

सगळ्यात प्रथम जावे त्या देशा या पुस्तकाचा लेखक मंदार वाडेकर आणि प्रकाशक झंकार ऑडिओ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. फेसबुकवर लिखाण करून त्याचे पुस्तक छापणाऱ्यांची काही जण खिल्ली उडवतात. ते साहजिक पण आहे म्हणा. मी ही त्यापैकी एक आहे. कारण आम्ही या क्षेत्राची निवड केली नाही आहे, तर एक व्यासपीठ तयार झालं आहे, त्याचा वापर करून आपल्या छंदाला एक मूर्त स्वरूप मिळावं म्हणून हा खटाटोप आहे. त्यातून अर्थार्जन व्हावं हा बहुतांश लोकांचा उद्देश नसावा, माझाही नव्हता आणि मंदारचा पण नसावा. असं असूनही हा घाट घातला जातो. त्याचं साहित्यिक मूल्य काय आहे, लिखाणाचा दर्जा काय आहे यावर फारशी चर्चा करण्यात काही मतलब नाही कारण कला क्षेत्रातील लोक नसल्यामुळे लिखाणाचा रियाज नसतो. तर ती पातळी गाठणे हे अवघडच आहे. पण तरीही आपलं लिखाण हे कुठल्या ब्लॉग सर्व्हर वर ठेवण्याऐवजी तिचं लिखित स्वरूपात पुस्तक आणणे हे माझ्यालेखी कौतुकास्पद आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मंदार आणि प्रकाशकांचे अभिनंदन. 

मंदारची आणि माझी ओळख फेसबुकची. त्याचा एक तुफान विनोदी लेख माझ्या वाचनात आला. त्यावेळी त्याने त्याच्या ब्लॉगचा ऍड्रेस तिथे लिहिला होता. मग मी तिथे अजून काही लेख वाचले आणि त्याला मित्र विनंती पाठवली, ती त्याने स्वीकारली सुद्धा. ही गोष्ट साधारण २०१४ ची. आता जवळपास एक दशक झालं आमची ओळख होऊन. 

आज त्याने मला इथे प्रमुख अतिथी म्हणून का बोलावलं हा माझ्यासमोर प्रश्नच आहे. मी त्याला म्हंटले सुद्धा की एक मित्र म्हणून प्रेक्षकात बसतो मी, हे व्यासपीठ वगैरे जास्त होतं आहे. कारण लौकिकर्थाने आम्ही एकमेकांच्या पोस्टवर पडीक नसतो. बरं पुस्तकात त्याने उल्लेख केल्याप्रमाणे तो संघाचा माणूस आणि मी डाव्या विचाराचा पण सेंटर लाईन कडे असणारा. म्हणजे फेसबुकच्या भाषेत तटस्थ किंवा डबल ढोलकी वगैरे वगैरे. बर स्टेजवर अध्यक्ष म्हणून शेफाली मॅडम. म्हणजे या सगळ्या समीकरणात मी कुठेच बसत नव्हतो. म्हणजे मंदारच्या लिखाणाचा फॅन तेही काही विशिष्ट पोस्ट चा ही एक उपाधी सोडता माझ्याकडे दुसरं काही क्वालिफिकेशन नव्हतं. पण तरीही त्याने मला बोलावलं आणि इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. 

  आता पुस्तकाबद्दल जावे त्या देशा. सगळ्यांना माहिती आहे की आजकाल पुस्तक वाचण्याचं प्रमाण खूप कमी झाला आहे. कार्यक्रमात बोलायचं म्हणून मी मंदार कडून पुस्तक मागून घेतलं. म्हणजे पिक्चर न पाहता रिव्ह्यू लिहिणं किंवा कुठल्याही विषयावरती फारसा अभ्यास न करता मत प्रदर्शित करणं हे सोशल मीडिया वरती चालतं. पण तुमच्यासारखे बहुश्रुत लोक जेव्हा समोर बसलेले असतात तेव्हा आपलाही अभ्यास झालेला असावा असं मला वाटलं. त्यातही अजून एक गंमत झाली. मंदारने मला जे पुस्तकाची कॉपी पाठवली त्यामध्ये 240 व्या पानानंतर 245 पान आलं होतं. मंदारला मी सांगितल्यानंतर ही चूक फक्त माझ्याच पुस्तकात झाली होती. मला क्षणभर शंका आली की मंदारने मुद्दामून असं पुस्तक माझ्याकडे पाठवलं का मी खरंच वाचतोय का. ती चूक लक्षात आली नसती तर कदाचित मंदारने माझी चिरफाड करणारी पोस्ट टाकली असती का आणि मग त्याच्या कुठल्यातरी नागपूरचे मित्राने या ओव्हरटेड माणसाला का बोलवलं अशी कॉमेंट केली असती का हे सगळं माझ्या मनात येऊन गेलं. जोक्स  अपार्ट मला सांगायला आनंद वाटतोय की मंदारच्या पुस्तकाने मला परत जुना मीच भेटवला. 30 जानेवारीला रात्री पुस्तक वाचायला घेतल्यानंतर एक फेब्रुवारीला संध्याकाळी मी ते वाचून संपवलं होतं. म्हणजे मनात आणलं तर आजही पुस्तक पूर्वीसारखं मी एका बैठकीत संपवू शकतो हा विश्वास जावे त्या देशा या पुस्तकाने दिला याबद्दल मी मंदारचे आभार मानतो. 

पुस्तक दोन भागात आहे. पहिला भाग सावंतवाडी सांगली मुंबई दुबई सिंगापूर इथपर्यंत आहे आणि नंतरचा भाग हा अमेरिकेला समर्पित आहे. प्रवास हेच मुळात एक विद्यापीठ आहे असं माझं मत आहे. मंदारच्या पुस्तकाने ते अधोरेखित झालं आहे. फक्त मी जे प्रवासातून शिकतो आणि मंदार ज्या अँगल ने प्रवास करतो, त्यातील गोष्टी टिपतो यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 

 पुस्तक वाचल्यावर पहिली भावना मनात कुठली आली असेल तर ती म्हणजे मंदार बद्दल मत्सर. ही भावना तो अमेरिकेत राहतो, बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, डॅलस मध्ये त्याचं अलिशान घर आहे त्याच्याकडे फोर्ड एक्सप्लोरर आहे, हार्ले आहे म्हणून नाही तर मला त्याची असूया वाटली ते त्याच्या नॉलेजचा आवाका बघून. म्हणजे हा माणूस काय करत नाही? उत्तम लिहितो, कविता करतो, गातो, इंग्रजी पिक्चर बघतो, त्यातील डायलॉग लक्षात ठेवतो, त्याचं तुफान वाचन आहे, कलेचा आस्वाद घेतो.  अरे म्हणजे एखाद्या माणसात किती गुण असावेत. मला मंदार चा हेवा वाटला तो ह्या गोष्टींसाठी. जावे त्या देशा ही सिरीज मी वाचायला लागल्यावर मंदारला 22 एप्रिल 2023 ला मेसेज पाठवला तो खालील प्रमाणे 

"तुझी सध्याची सिरीज फारच दर्जेदार लिखाणाची मेजवानी आहे. त्यात तुझा नेहमीचा विनोदाचा बाद सोडून तुझ्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भ संवेदनशील बाजू त्या लिखाणाद्वारे समोर येत आहे ती अचंबित करणारी आहे. ज्या लिखाणाने खेळून ठेवलं असं फार कमी फेसबुकवर वाचायला मिळतं अशा काही मोजक्या लिखाणात तुझ्या या सिरीजचा समावेश करेल. तू तंत्रज्ञ आहेसच, हे लेख जपून ठेवावे हे मी सांगण्याची गरज नाही पण तरीही आग्रह धरतो. 

कॉमेंट द्वारे कौतुक करणे बाबतीत मी फार कंजूष आहे असा माझ्यावर आरोप केला जातो. पण तुझ्या पोस्टवर कॉमेंट करताना मी थकत नाही हे मला विशेष सांगावं वाटतं."

त्यानंतर कामाच्या गडबडीत माझे काही लेख वाचायचे राहून जायचे मग मी तो नाद सोडून दिला पण ते करताना मला वाटलं होतं की या लेखांचं नक्की पुस्तक येईल आणि तेव्हा मला सर्वच सलग वाचता येईल. आज माझं भाकीत खरं ठरलं याचा आनंद होतोय. 

या पुस्तकात मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. थोडसं ऐकायला कुणाला कसंतरीच वाटेल पण मंदारच्या हृदयामध्ये थोडा समाजवाद पण लपलेला आहे. तो अमेरिकेत राहतो, बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, म्हणजे तो मेंदू ने भांडवलशाहीचा पाईक आहे. पण हृदयात त्याच्या सोशॅलिझम आहे हे अनेक ठिकाणी जाणवतं. मी सुद्धा कॅपिटलिझम आणि सोशॅलिझम एकाच शरीरामध्ये घेऊन फिरणारा माणूस आहे. अतिशय क्षुद्र उदाहरण आहे माझं.  पण जेव्हा मंदार नेटिव्ह अमेरिकनस, तिथली ब्लॅक लोक यांच्या बद्दल, त्यांच्या मनस्थितीबद्दल, त्यांच्या सामाजिक परिस्थितीबद्दल अतिशय पोट तिडकीने लिहितो तेव्हा आम्ही दोघे एकाच नावेतले प्रवासी आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. हे पुस्तक इंग्रजीमध्ये बहुदा येणार नाही कारण ते आलं आणि त्याच्या अमेरिकन सुपीरियर्सनी वाचलं तर मंदार तिथं डिपोर्ट होईल अशी शंका माझ्या मनात साठवून गेली. 

आणि दुसरी गोष्ट मला भावली ती म्हणजे मंदारचं प्राणी आणि पक्षांबद्दल सप्रेम एकही प्राणी किंवा पक्षी त्याच्या प्रेमातून सुटला नाहीये. म्हणजे मग त्यात साप आहे, मासे आहे, खारुताई आहे, घोडे आहेत, अस्वल आहेत, मूस नावाचा प्राणी पण आहे. प्राण्यांना असणारं जगण्याचं स्वातंत्र्य, त्यावर मानवाने घातलेला घाला आणि त्यांच्याबद्दल असणारी आत्मीयता याबद्दल मंदारने वेगवेगळ्या लेखात फार मनापासून लिहिलं आहे. मंदारच्या व्यक्तिमत्त्वाची ही हळवी बाजू पहिल्यांदाच या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्यासमोर आले. 

लिहिण्याच्या फ्लो मध्ये अनेक लेखक, अभिनेते, चित्रपट, गाणे, गायक यांचे संदर्भ येतात ते सर्व अमेरिकन असल्यामुळे थोडी पंचाईत होते. म्हणजे एका लेखांमध्ये माडगूळकरांच्या बनगरवाडीचा उल्लेख आहे. ते रिलेटही होतं. पण ट्रूपाक, ज्युएल, ग्रीन डे अशा रॅपर,सिंगर किंवा अल्बम चे उल्लेख आले त्याबद्दल लक्षात येत नाही. जुन्या काळात पुस्तकांमध्ये एक शेवटी संदर्भसूची असायची. या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये हे जे लोक आहेत यांची माहिती जिथे मिळेल त्या वेबसाईटचा ऍड्रेस जर शेवटी संदर्भसूची मध्ये दिला तर आमच्या नॉलेजमध्ये अजून एक चांगली भर पडेल असं मला एक मनाला वाटून गेलं.  हेच मी जॉन रॉकफेलर किंवा तो एक श्रीमंत की ज्याचं मी नाव आता विसरलो. मी शोधायचा प्रयत्नही केला की ज्याने एक पूर्ण जंगल बसवलं  आहे त्यांचाही उल्लेख त्या संदर्भसूची मध्ये व्हावा 

मी जरी मराठवाड्यातील असलो तरी आता पुण्याचा पाणी गेले 40 वर्ष पितोय त्यामुळे पुस्तक ची फक्त स्तुतीच केली तर मला फारसं करमणार नाही म्हणून काही त्रुटी पण सांगू इच्छितो. 

सगळ्यात पहिले म्हणजे पुस्तकात फोटो का नाहीयेत हा प्रश्न मला पहिला पडला. कारण मंदार कडे एक भारी चा कॅमेरा आहे त्याच्याकडे फोटो काढण्याची कला ही असणार आहे.  आणि त्यांनी हे जे काही त्यांनी प्रवास वर्णन केलेलं आहे तिथे त्यांनी खूप फोटोही काढले असणार आहेत.  त्या फोटोंचा समावेश या पुस्तकात का नाहीये हे एक मला कळलेलं नाहीये . कारण तो येलो स्टोन, तिथला कारंजा,  किंवा जंगल,  तो टेक्सास मधला मोकळा रस्ता,  किंवा असंख्य दर्या,  किंवा ती क्षारयुक्त पांढूरकी जमीन इथले जर फोटो असल्यास ते तर अजून बहार आली असती.  मंदारच्या लिखाणाने ते सगळं डोळ्यासमोर येतं पण फोटो त्याला पूरक असल्यास ते मला असे एक वाटून गेलं 

आणि दुसरी ही तक्रार आहे की अनेक इंग्रजी शब्द ज्याला मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत त्यांचा वापर का नाही केला हे एक माझ्या मनाला चाटून गेलं. म्हणजे एका वाक्यामध्ये युज्वली हे देवनागरीत  लिहिले की ज्याला "सहसा" हा प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका वाक्यामध्ये जोजवणे हा अगदी मूळ मराठी शब्द की जो आज फारसा प्रचलित नाहीये पण त्या वाक्याच्या सुरुवातीला सोशल फॅब्रिक की ज्याला माझ्या मते सामाजिक वीण हा एक चांगला प्रतिशब्द उपलब्ध आहे तर हे का नाही वापरले ही एक छोटीशी माझे तक्रार समजू शकता. जी पुढच्या आवृत्तीमध्ये आपण दुरुस्त करू शकतो असं मला वाटलं 

 अर्थात पुस्तकाच्या एकूण कंटेंट समोर दुसरी सूचना तुम्ही टाळू शकता पण पहिल्या सूचनेचा जरूर विचार व्हावा असं माझं नम्र मत आहे. पुस्तक वाचताना मला बऱ्याचदा असं मनामध्ये आलं की अमेरिकेत फिरणाऱ्यांसाठी काही लेख तर अगदी पाठ्यपुस्तकासारखे आहेत फिरायला जायचं असेल तर त्याच्यातून अगदी नोट काढू शकतो आपण आणि पुस्तकाचा सुयोग्य वापर होऊ शकतो. 

 मंदार अजून काही देश फिरलेला आहे. माझ्या मते त्याची काही लेखही होते. व्हॅटकीन सिटी, ग्रीस, इजिप्त या देशातील पर्यटनाबद्दल त्याने लिहिलेलं मला आठवतं आहे.  कदाचित दुसऱ्या पुस्तकांसाठी हे सगळे लेख त्याने राखून ठेवलेत असं मला वाटतं. तेही पुस्तक त्याचं लवकर यावं.  त्याचे अनेक विनोदी लेख ही आहेत  त्याचेही पुस्तक यावं ह्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मंदार आणि प्रकाशकांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही माझे हे मनोगत ऐकून घेतलं धन्यवाद. 


Friday, 31 January 2025

it's okay

मी काही इंग्लिश गाण्याचा भोक्ता वगैरे नाही आहे. म्हणजे कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. अगदीच काही जुनी गाणी लक्षात येतात कारण त्याचं इंग्रजी कळतं. पण तरीही कधी ब्रिटन किंवा अमेरिकन गॉट टॅलेंट बघतो. त्यातील काही समजतं तर काही प्रेझेंटेशन मधील भावना पोहोचते. 

असंच एक गाणं मी अमेरिकन गॉट टॅलेंट मध्ये बघतो. किमान शंभर वेळा तरी मी ते पाहिलं असेल. आणि दर वेळेला ते गाणं ऐकताना, बघताना माझा घसा दुखतो. 

गाणं म्हणणारी एक तिशीतली युवती आहे, जेन तिचं नाव. गाणं म्हणताना ती नाईटबर्ड नाव वापरते. स्टेज वर ती बोलायला चालू करते आणि पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपलं दुःख लागलीच सांगत नाही. बहुतेकदा या कार्यक्रमात आपापल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळी बरोबर येतात. पण इथे ही जेन एकटीच आली आहे. ती ज्या पद्धतीने म्हणते की I am here by myself तेव्हा आपल्या हृदयात पण तुटतं.  बोलण्याच्या फ्लो मध्ये अगदी सहजतेने सांगून जाते की तिला कँसर आहे आणि आता सुद्धा तिच्या फुफ्फुस, मणका आणि लिव्हर मध्ये मेट्स आहेत. (इतके प्रॉब्लेम असूनही) तुझ्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय, हे म्हंटल्यावर ती सहजतेने म्हणते Its important that everyone knows I am so much more than the bad things happen to me. 

ती गाणं म्हणायला सुरु करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल येतं. आणि नंतर ती जे म्हणते, आपल्याला जाणवतं की ती फक्त तिच्यासाठी गाते आहे. गाण्याचे शब्द आणि तिचा अत्यंत तरल आवाज, हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन असतं. 

I moved to California in the summertime
I changed my name, thinkin' that it would change my mind
I thought that all my problems, they would stay behind
I was a stick of dynamite and it just was a matter of time, yeah

ती आपलं गाव सोडून उपचारासाठी कॅलिफोर्नियाला आली आहे. नावही तिने बदललं आहे. तिला वाटतं की माझे प्रश्न संपतील, पण नाही, तिला माहित झालं आहे की आता फक्त काही काळाची सोबत आहे.

It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright
It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright

आयुष्याची लढाई जरी हरावी लागली तरी ठीक आहे. आपल्याला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पराभवाचा सामना करावा लागतो, ते ही ठीकच आहे.

Oh dang, oh my, now I can't hide
Said I knew what I wanted, but I guess I lied

ती कबुली देते की मी आयुष्याकडून काय हवं ते मला माहित होतं असं मला वाटायचं पण बहुतेक मी स्वतःशी खोटं बोलत होते.

it's alright
To be lost sometimes

असं म्हणत आपल्या मुलायम आवाजात ती गाणं संपवते आणि त्या तीन चार हजार लोक असलेल्या हॉल मध्ये टाचणी आवाज करेल इतकी शांतता दोन सेकंदासाठी पसरते. नंतरच्या टाळ्यांपेक्षा ही शांतता तिच्या गाण्याला मिळालेली खरी पावती असते. सायमन कॉवेल सारखा इतर वेळेस धीरोदात्त जज सुद्धा मनातून हलतो. तो म्हणतो सुद्धा की तुझा संघर्ष ज्या सहजतेने सांगत गेलीस ते स्तिमित करणारं होतं. त्यावर ती जे उत्तर देते ते जीवन मृत्यू कोळून पिलेल्या एखाद्या तत्वज्ञापेक्षा कमी नसतं. ती म्हणते "You can't wait unless life is not hard anymore before you decide to be happy" आयुष्यात खुश राहण्याचा निर्णय घेण्यासाठी अजून कुठली परीक्षा घेण्याची मी कशासाठी वाट पाहू.

गाणं संपल्यावर ती बॅक स्टेज मध्ये येऊन म्हणते की मी जगण्याची २% शक्यता आहे. पण २% म्हणजे शून्य नाही. ही २% जगण्याची आशा पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.

सात एक मिनिटांचा हा व्हिडीओ संपल्यावर दोन मिनिटे मला काहीच बोलावंसं वाटत नाही. जेनच्या प्रश्नासमोर अत्यंत खुजे असणाऱ्या पण मला स्वतःला खूप मोठे वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी तयार होतो.

Friday, 17 January 2025

लेट गो

गिव्ह अप करणे आणि लेट गो करणे याचा मराठी अनुवाद एकच होतो "सोडून देणे". पण इंग्रजीचा शब्दाचा भावानुवाद केला तर अर्थ वेगळा आहे. गिव्ह अप करणे म्हणजे "हार मानून सोडून देणे" आणि लेट गो करणे म्हणजे "जे झालं ते झालं, पण मी दुसरा कुठला तरी मार्ग शोधेल, पण ज्याचा ध्यास आहे तो पूर्ण करेल" याची ग्वाही स्वतःला देणे. लेट गो करणे ही खरंतर तसं बघायला गेलं तर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचा गुण आहे. गिव्ह अप करणं कदाचित प्रोफेशनल ग्रोथ साठी चांगलं नाही आहे. 

लेट गो न करणे म्हणजे दोन गोष्टींवर आपण अडून राहतो. एकतर आपल्याला व्यक्तीवर अडकून बसतो किंवा आपल्याला वेळेचं प्रेशर असतं. 

लेट गो न करणे हा माझा स्वतःचा अवगुण होता. आता बऱ्यापैकी त्यावर कंट्रोल आणला आहे. एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे नाही झाली, वर सांगितल्याप्रमाणे, किंवा एखाद्या व्यक्तीकडून, की प्रचंड अस्वस्थ व्हायचो. अजूनही थोडा होतो. पण वयोमानानुसार किंवा अनुभव घेऊन आता थोडी अस्वस्थता कमी झाली आहे. माझी मिसेस, वैभवी ही लेट गो करण्याच्या गुणाचा एपिटोम आहे. माझी जिथे लेट गो करण्याची क्षमता संपते तिथे तिची चालू होते. मुख्य म्हणजे एखादी व्यक्तीने आपल्याबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला की काय घडलं याचा विचार करून डोकं कुरतडलं जायचं. किंवा एखादी गोष्ट एका ठराविक वेळेत नाही झाली की मला खूप त्रास व्हायचा. अगदी नुकताच असा त्रास एक प्लॉट विकण्याच्या प्रोसेस मध्ये झाला. पण शेवटी लेट गो केलं, गिव्ह अप नाही, आणि विचार केला की जेव्हा होईल तेव्हा होईल. मग माझी तडफड कमी झाली. पण त्याआधी खूप मानसिक डॅमेज झालं होतं.  "कुछ तो मजबूरिया होगी, कोई यूँ ही बेवफा नहीं होता" हे कुणा व्यक्तीबद्दलच नव्हे तर नियतीला उद्देशून पण म्हणू शकतो. आणि या मजबूरिया आपल्याला माहितीच पाहिजे हा अट्टाहास ठेवायला नको याची जाणीव झाली. 

या लेट गो प्रोसेस मध्ये "सोड ना यार, जे झालं ते झालं. काही तरी वेगळं आणि भारी होण्यासाठी हे घडत असेल" अशी भावना मनात येणं आणि मनाला रिलॅक्स करणं याची तुलना मी फक्त एका तळ्यात होती गाण्यामधल्या राजहंस आहे हे कळण्याच्या अवस्थेशी करू शकतो. "चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों " या गाण्यात साहिर म्हणूनच गेला आहे 

"तारुफ रोग बन जाये तो उसको भूलना बेहतर,  ताल्लुक बोझ बन जाये  तो उसको तोडना अच्छा, 

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा" 

खूप फटके खाऊन शिकलो की  परिस्थितीला निरोप देण्यात सुद्धा एक शान असावी. भविष्यात कधी भेटण्याची वेळ आली तेव्हा कालपटाचा धागा तुटत पुन्हा एकदा कॉफी मग एकत्र किंवा बियरचा ग्लास टिंग करत चियर्स म्हणण्याची मानसिकता हवी .  कधी परिस्थिती रिजेक्ट करते, कधी एखादी माशूका अलविदा म्हणते तर कधी एखादा मित्र नाकारतो, ते ग्रेसफुली स्वीकारायला शिकायला हवं.  

दुष्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे
अगर कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो

आता कुणालाही बांधून ठेवावंसं वाटत नाही. परिस्थितीला नाही, व्यक्तीला नाही, मित्रत्वाला नाही आणि दुश्मनीला तर नाहीच नाही. तसं केलं तर ते असुरक्षिततेच्या भावनेतून झालं की काय अशी स्वतः बद्दल शंका वाटते. आणि कुणाला "तू नही तो तो और सही, और नहीं तर और कही" असं म्हणत लेट गो केलं तर ९९% वेळा दोन्ही पार्टीचं भलंच होतं  हे एव्हाना अनुभवातून शिकलो आहे. ठीकठाक व्यक्तिमत्व, नॉलेज मिळवण्याची भूक, त्याचं स्किल्स मध्ये बदलण्याचा ऍटिट्यूड, आणि त्याला मूलभूत सिद्धांताची जोड असेल तर ही दुनिया कुणासाठी बेरहम राहत नाही. आणि माझं स्वतःचं म्हणाल तर भरपूर इनिंग खेळून झाल्या आहेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेत. 

हम भी दर्या है, हमे अपना हुनर मालूम है 
जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता बन जायेगा 

इंडस्ट्री मधे जवळपास ३५ वर्षे झालीत. परवा च एकाने प्रश्न विचारला की "लोकांनी तुमचं ऐकावं यासाठी तुम्ही वेगळं काय करता?" मी म्हणालो "काहीच करत नाही. फक्त फॉर्मल/इन्फॉर्मल संवादामध्ये आणि कृतीमध्ये समानशीलता पाळतो." त्यातून आयुष्य कधी यश देतं तर कधी अपयश देतं. अपयश आली  तरी जेता मीच असतो कारण मला तिथे अनुभव मिळालेला असतो. जावेद अख्तर लिहून गेलेच आहेत 

क्यो डरे जिंदगी में क्या होगा 

कुछ ना होगा तो तजुर्बा होगा 

असो. काही महिन्यापूर्वी डॉ विकास दिव्यकीर्ती यांचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा काही नोट्स काढल्या होत्या. त्याचा विस्तार झाला तो असा. 





Sunday, 12 January 2025

उच्च दर्जाचे इक्विपमेंट

नवीन वर्षाची सुरुवात मिश्र पद्धतीने झाली. काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही आव्हानं उभी राहिली. आव्हानामुळे तयार झालेल्या परिस्थितीला कसं तोंड दिलं ते स्थिरस्थावर झाल्यावर लिहीनच. आजची पोस्ट नवीन डेव्हलपमेंट बद्दल. थोडं तांत्रिक भाषा वापरून लिहिणार आहे. सांभाळून घ्या. 

आमच्या फिल्ड मध्ये मेट्रोलॉजी साठी आणि उत्पादनासाठी काही उच्च दर्जाचे इक्विपमेंट लागतात, पर्यायाने ती प्रचंड किमती पण असतात. अतिशय बेसिक लेव्हल ची मेट्रोलॉजी इक्विपमेंट आणि मशिन्स च्या मदतीने आम्ही व्यवसाय चालू तर केला, पण आता वेळ अशी आली की आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे उत्पादन करायचे असेल तर त्याच तोडीचे दोन्ही इक्विपमेंट घेणं हे गरजेचं झालं होतं. त्याच विचारधारेतून आम्ही मागच्या वर्षी पुण्यातील ऍक्युरेट कंपनीचं सी एम एम (को ओर्डीनेट मेझरमेन्ट मशीन) विकत घेतलं. त्यालाच पूरक असं राउंडनेस टेस्टर विकत घेणं ही आमच्या कामाची गरज होती. टेलर हॉब्सन नावाची एक जगप्रसिद्ध ब्रिटिश कंपनी हे मशीन बनवते. पण त्याची नवीन मशीन ची किंमत ही आम्हाला परवडणारी नव्हती. पण मशीन तर घ्यायचीच होती. 

मी यूज्ड मशीन च्या मार्केटचा धांडोळा घेतला. ऑगस्ट २०२३ पासून शोध घ्यायला चालू केलं. आणि शोधता शोधता एक मशीन स्वित्झर्लंड मध्ये एक वर्षाने ऑगस्ट २०२४ मध्ये सापडलं. इ मेल च्या माध्यमातून खूप चर्चा झाली. सेकन्ड हॅन्ड मशीन म्हणजे त्याच्या वर्किंग बद्दल साशंकता. शेवटी ऑर्डर द्यायच्या आधी एकतर स्वित्झर्लंड ला जाऊन किंवा ऑनलाईन डेमो द्यायचं ठरलं. म्युलर मशिन्स नावाच्या सेलर ने पण ते स्वीकारलं. यशस्वी ऑनलाईन डेमो नंतर आम्ही ते ऑर्डर केलं आणि डिसेंबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात कंपनीत आलं. आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना ते चालू पण झालं. 

आमच्या स्पिंडल क्षेत्रात पार्टस उत्पादनात ग्राइंडिंग प्रोसेस, ही शेवटची. ती अतिशय महत्वाची. कारण स्पिंडल चे प्रिसिजन हे त्यावर अवलंबून. या भागात सुद्धा आमच्याकडच्या सर्व मशिन्स एकतर मॅन्युअल किंवा फार तर सेमी ऑटोमॅटिक. दोन्ही प्रकारच्या मशिन्स मध्ये गुणवत्तेसाठी आम्ही झगडतो आणि उत्पादकतेबद्दल सुद्धा. याला पर्याय म्हणून काही युरोपच्या अतिशय उच्च दर्जाची गुणवत्ता असणाऱ्या मशिन्स उपलब्ध आहेत पण परत रडगाणं तेच. किंमत. त्या मशिन्स घेणं शक्यच नव्हतं. 

इथे मग आम्ही तैवान उत्पादित मशीन घेण्याचं ठरवलं. इ टेक नावाच्या नवीन मशीन वर शिक्कामोर्तब केलं. ती मशीन सुद्धा डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात आली. आणि नवीन वर्षात तिचेही कमिशनिंग पूर्ण होईल. 

या दोन्ही मशिन्समुळे आमची उत्पादन आणि गुणवत्ता क्षमता मध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहोतच, पण उत्पादनक्षेत्रात सुद्धा ती पोझिशन साध्य करण्याचा मनसुबा आहे. या आणि येणाऱ्या मशिन्स च्या मदतीने ते साध्य करू याचा विश्वास वाटतो. 

अजून एका चांगल्या उपक्रमाबद्दल पुढच्या पोस्टमध्ये. धन्यवाद.