Thursday 24 September 2015

सोशल मिडिया

सोशल मिडिया चा वापर जपून करायला पाहिजे हे जे सारखं म्हंटल जातं त्यात नक्कीच तथ्य आहे. आणि मग पोलिस किंवा शासन जेव्हा आवाहन करतं की आणीबाणीच्या परिस्थितीत सोशल मिडिया चा वापर टाळा ते संयुक्तिक ही वाटतं.

फेसबुकवर ऑफिसला जायच्या आधी एखादा तास बसलं आणि त्यातल्या त्यात एखादा महाराष्ट्र भूषण सारखा पेटता मुद्दा असला की असं वाटतं की काय भयानक परिस्थिती झाली आहे भारताची. धर्माची भांडणं आहेत, दोन जातीचं एकमेकांशी पटत नाही आहे. कसं होणार या देशाचं? वान्देच वांदे. आणि मग त्यातून माझ्याकडूनच एखादी पोस्ट लिहिली जाते की भारतात यादवी होईल, एकमेकांना मारतील वैगेरे.
इथे काही बायकांच्या पोस्ट वाचतो की पुरुष किती स्त्री लंपट आहेत, सारखे इन बॉक्स मध्ये येउन त्रास देतात. कधी कधी अशा पोस्टचा  इतका अतिरेक होतो की मला माझ्याबद्दल च  डौट यायला लागतो, च्यायला आपण पण असेच आहोत का, पुरुषत्व अशा पद्धतीने गाजवणारे.

मी ऑफिसला येतो. इरफान, सलीम आणि रियाझला हाय, हेलो करतो. ही पोरं कोल्हापूर भागातली. इरफान मुरगुडचा, रियाझ किणीचा आणि सलीम हुबळी. माझ्या कंपनीचा ऑरेंज, तसं म्हंटला तर भगवा रंगाचा टी शर्ट आहे. मस्त घालतात ही पोरं. कुणाच्याही मनात येत नाही, आयला हा भगवा रंग आहे मी कसा घालू टी शर्ट. रियाझ तर इतका भोळा आहे की पूजेला कुंकू वैगेरे बिनदिक्कत लावतो. रविवारी तर लालबागच्या गणपतीला  ही जाऊन आला म्हणे तो.  बाकी दोघंही थोडया फार फरकाने तसेच आहेत.

बाकी कंपनीत जातीची तर अशी सरमिसळ आहे की ज्याचं नाव ते. पाटील, रेणुसे, तेलंग, कुलकर्णी, रणधीर, परदेशी, विसपुते, ताकवले, सूर्यवंशी, गलांडे, बेंद्रे, वाकुडे, देडगावकर, भागवत, शिंदे, बिहारचा अमन, माझा पार्टनर वाघेला अशी विविध जातीधर्माच्या लोकांची मांदियाळी आहे. आज तेरा वर्ष झाली कंपनी चालवतो आहे पण कधी जातीधर्मावरून कुणी आगळीक केलेली मला आठवत नाही. सगळे एका टेबल वर जेवायला बसतात, हसीमजाक करत जेवण करतात, एकत्र काम करतात आणि घरी जातात.

दोन लेडीज ही काम करतात. इतके वर्षं तर एकंच जण होती इतक्या सगळ्या पुरुष जमातीत. जोडीला अजून एक जॉईन झाली आहे. पण एकंच जण होती तेव्हा तिलाही असुरक्षित वाटलं असेल असं वाटत नाही. एकतर जास्त उशीरा पर्यंत मी त्यांना थांबू देत नाही. आणि मुळात कुणी भंकसगिरी करत नाही त्यांच्याशी. दिवसभर त्यांच्या बरोबर काम केल्यावर त्या जाताना जेव्हा "बाय" म्हणतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कंपनीतल्या आणि एकंदरीतच पुरुष जमातीबद्दल विश्वास दिसतो. तेव्हा मग फेसबुकवर बायकांच्या पुरुषांच्या लंपट गिरीच्या  पोस्ट वाचून आलेलं न्यूनत्व दूर होतं आणि वाटतं आपण जितके स्वत:ला सकाळी चालू समजत होतो तितके नाही आहोत.

ऑफिस मधून परत निघतो. कार मध्ये बसून फोन होतात. शाहनवाझ शी बोलतो, नाशिकहून कधी चव्हाण, तर ठाण्याहून सोनावणे बोलतो. नगरचे कानवडे, जाधव कधी गप्पा मारतात. अधून मधून देशपांडे, राजवाडे, पत्की बोलतात

घरी पोहोचलो की माझ्या जातीत न जन्मलेली बायको प्रेमाने खाऊ पिऊ घालते, सध्या थोडी आजारी असलेल्या क्षितीजाला तिच्या जातीत न जन्मलेला तिचा नवरा शहाळं आणतो, मलेशियाला गेलेली ब्राह्मण पूनम तिच्या जातीत न जन्मलेल्या नवरा शंतनूशी फोनवर गुलूगुलू गप्पा मारते, पुस्तकाच्या बिझिनेसमधून वकीलीत उतरलेल्या पंजाबी संदीपशी त्याची हिंदू बायको राधिका क्रिमीनल केसबद्दल तावातावाने भांडते, रूपगर्विता चारू बरोबर तिचा तामिळी नवरा शिवकुमार पंचवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर काल लग्न झाल्यासारखं संध्याकाळी फिरत असतो

एकंदरीत काय, बरं चालू आहे.  कधी कधी वास्तवातले प्रॉब्लेम विसरण्यासाठी फेसबुक चा सहारा घेतो. पण सोशल मिडियात बागडून आल्यावर  मनावर चढलेलं मळभ दूर करायला वास्तव जगच मदत करतं.

अगदीच स्पष्ट सांगायचं तर, फेसबुकवर जसं दिसतं त्यापेक्षा जग खूप चांगलं आहे. 

No comments:

Post a Comment