Friday 18 September 2015

इच्छाशक्ती

मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मदतीची हाक ही अत्यंत संयुक्तिक आहे. निसर्गाच्या आसमानी संकटापुढे गावच्या गावं अक्षरश: हतबल झाली आहेत. गेली तीन चार वर्षं पावसानं या प्रदेशाकडे पाठ फिरवली आहे.

मला याठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जी आपण मदत जमा करत आहोत ती तात्पुरती आणि तुटपुंजी आहे. आपल्याला सगळ्यांनाच यापुढे जाऊन कामं करणं गरजेचं आहे. राजकारण्यांनी आपल्या सगळ्यांना वापरून तोंडाला पानं पुसली आहेत. आजच्या तरूणांच्या मनात इतकं विष पेरलं आहे की आजचा तरूण शासनाने समाजोपयोगी असलेल्या योजनांकडे अंगभूत द्वेषापायी एकतर विरोध करतो किंवा दुर्लक्ष करतो.

हे असं करण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत शाश्वत व्यवस्थेकडे नेण्याचं काम जर अॅक्टिव्ह तरूणांनी हाती घेतलं तर त्याला व्यापक धोरणांची जोड दिली तर येणार्या पिढीच्या चेहर्यावर हास्य फुलेल यात शंका नाही.

मराठवाड्यात प्रचलित उद्योग येणं अवघड आहे हे सर्वमान्य झाले आहे. अशा उद्योगाच्या मागे लागण्याचं काही कारण नाही. शेती हाच उद्योग पकडला तर जलसंवर्धन या एका गोष्टीवर कसून काम झालं तर स्वर्ग दूर नाही. गावागावात स्वच्छतेचं महत्व देताना सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटवर जर काम झालं तर सोने पे सुहागा. मी जेव्हा म्हणालो की शासनाच्या चांगल्या योजनेची विरोधापायी खिल्ली उडवतो, स्वच्छ भारत त्याचं उत्तम उदाहरण आहे.

आणि या व्यतिरिक्त मग ह्युमन रिसोर्स ची सप्लाय चेन तयार करणे वैगेरे गोष्टी येतात.

आशिष, सौरभ, सूरज, मोहसीन विचार करा. काही हजार रूपयाची मदत करूच पण ते सोल्युशन नव्हे. जरा मोठ्या स्केलवर काम करू, मराठवाड्यातील बाहेर जाणारे लोंढे बंद करू. राजकीय विचारधारा बाजूला ठेवू. कुठल्याही राजकीय विचारशक्तीपेक्षा समाजाला वर काढण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. 

No comments:

Post a Comment