Tuesday 29 September 2015

पंजाब

पंजाबात गेला आहात का तुम्ही. ज्यांच्या घरी तुम्ही जाल तिथे चहाच्या अगोदर एक ताट फिरतं त्यात एकतर काजू, बदाम असे वाटीत मांडून ठेवले असतील. नाहीतर मग काजू असलेले गुड डे सारखे बिस्कीट किंवा मग ओरियो वा डार्क फँटसी सारखे जे मी दुकानाच्या शोकेस मधे फक्त बघू शकतो असे बिस्कीट मांडून ठेवले असतात. पारले जी किंवा मारी पंजाबात फक्त डॉक्टर ने प्रसिक्रिप्शनवर लिहून दिले तर खात असावेत. हे नाही तर मग हलदीरामचे वेगवेगळे चिवड्यांचे प्रकार वाटीत मांडून ठेवतात. त्याचा बकाणा मारून झाला की मग एक टंपास भरून चहा येतो. आपल्यासारखा मराठी माणूस इतकं रैमटवल्यावर गारेगार पडून जातो. यात मग कधी समोसे असतात किंवा कचोरी. एवढं सगळं झाल्यावर मग सरदारजी जेव्हा म्हणतात "चलो अब खाना खाते है" तेव्हा मला भोवळ यायची बाकी राहते.

दोनच महिन्यापूर्वी लुधियानाला ज्यांच्याकडे असा पाहुणचार झोडला असे दोन सरदारजी मनजीतसिंग आणि बलविंदरसिंग परवा कंपनीत आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांच्या पाहुणचाराला स्मरून चहा सांगितला. कोपर्यावरचा शंकर्या चहा किटलीत घेऊन आला. आणि मग तो पुण्यातला ३० मिली आणि ६० मिली या कुप्रसिद्ध मापाच्या मधला ४५ मिली चा पंख्याच्या वार्याने उडणार्या प्लास्टिकचा कप समोर ठेवत त्यात किटलीने चहा ओतला. मी ही ऐटीत दोघा सरदारजीना सांगितले "लिजीए चाय" तर दोघे सरदारजी एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसू लागले. मी म्हंटलं "मनजीतजी, क्या हुआ?" तर मनजीतजी हसत म्हणाले "ओय राजेशजी, ये क्या दिया आपने। इससे तो मेरी मुँछे भी गिली ना होगी"

मी खजील झालो. ते गेल्यावर माणसाला तडक मार्केटमधे पाठवून क्रॉकरी मागवून घेतली अन रीतसर कपात चहा बनवायला लागलो.

या एकदा चहाला कंपनीत. टी बॅग्ज देतो. हो आणि एका ऐवजी दोन टी बॅग्ज घ्यायला काही हरकत नसते. नाहीतर परत एखादा सरदारजी सुनवायचा "राजेशजी, इससे अच्छा तो ये होता के गरम पानीही पिला देते" 

No comments:

Post a Comment