Thursday 6 October 2016

सचिन पाठक

काल दिवसभर मनावर एक मळभ साचलं होतं. काय करणार मित्रा, सकाळीच तू गेल्याचा फोन आला. तुला निरोप दिल्यावर चेहऱ्यावर उसनं हसू आणत दिवस ऑफिस मध्ये घालवला. संध्याकाळी घरी आल्यावर नील ने नेहमीप्रमाणे मिठी मारली. मी जरा जास्तच वेळ त्याला धरून ठेवलं होतं. रात्री पोझिटिव्हीटी उधार घेत व्हीटेरी ची पोस्ट टाकली. थोडं धैर्य गोळा केलं आणि झोपलो. मग मात्र तुझं जाणं रंग दाखवायला लागलं.  रात्रभर तळमळत बसलो. तुझ्या जाण्याने अनेक आठवणी फसफसून वर आल्या.

नाही म्हणजे वय वाढत चाललं तसं जवळच्यांचे मृत्यू पचवत चाललो आहे. पण तुझा मात्र चाळिशीतला बाय बाय चटका लावून गेला मित्रा. तसं लौकिकार्थाने आपण गेल्या बारा तेरा वर्षात सात ते आठ वेळाच भेटलो असू. त्या भेटीतल्या मोजक्या गप्पा, आश्वासक हास्य अन एखादी गळाभेट इतकीच काय ती माझ्या जवळची पुंजी. पण तरीही रात्री कळवळलो, अनेकदा. माझ्या अत्यंत आवडत्या कुटुंबावर नियतीने केलेला हा दुसरा घाव मलाही घायाळ करून गेला. मन विदीर्ण झालं.

आमच्यासारखे किती जण असतात, छातीत दुखतं, पाठ दुखते, पाय दुखतात, वर्षभर सर्दी असते. पण तरीही आम्ही असतो, रडत खडत का होईना जगतो. आणि तू त्या आश्वासक हास्याचा मालक, आजारी पडतोस काय आणि आज नसतो काय! सगळंच विचित्र.

हे असं होतं खरं. कार्यबहुल्य, कम्युनिकेशन गॅप असल्या तोंडदेखल्या कारणाने तुझ्याशी घट्ट मैत्री करणं या जन्मात राहिलं यारा. याची चुटपुट मला आता आयुष्यभर लागून राहील.

दोस्ता, तुला मन:पूर्वक श्रद्धांजली

No comments:

Post a Comment