Thursday 21 December 2017

इंटरेस्टिंग व्हिडियो

देवदत्त पटनायक यांचा एक खूप इंटरेस्टिंग व्हिडियो पाहिला. त्याचं शब्दरूप करण्याचा प्रयत्न करतोय.

आपण जेव्हा बिझिनेस करतो, तो कुठेतरी पोहोचण्यासाठी. ज्याला आपण प्रॉमिस लँड म्हणतो. पुराणात अशा तीन प्रॉमिस लँड सापडतात. स्वर्ग, कैलास पर्वत आणि वैकुंठ.

स्वर्गाचा अधिपती इंद्र आहे. स्वर्गात आर्थिक सुबत्ता आहे, पण कायम असुरक्षितता असते. कुणी राजा प्रबळ झाला की इंद्र लागलीच घाबरतो, कुणी तप केलं की त्याची पळता भुई थोडी होते, कुणी ऋषी तपश्चर्या करू लागले की इंद्र लागलीच रंभा नाहीतर उर्वशीला ते भंग करायला पाठवतो. थोडक्यात स्वर्गात आर्थिक सुबत्ता आहे पण मानसिक स्थैर्य नाही आहे. इथे इंद्राला पहिले त्याची भूक मिरवायची पडली असते.

कैलास पर्वत जे शंकराचं निवासस्थान आहे. शंकराचा प्रचलित फोटो बघितला तर लक्षात येईल, की  तिथे मोर आहे, शंकराच्या गळ्यात साप आहे, गणपतीचा उंदीर आहे, नंदीबैल आहे आणि पार्वतीचा वाहक सिंह पण आहे. मोर सापाला खाऊ शकतो, साप उंदराला खाऊ शकतो, सिंह बैलाला खाऊ शकतो. पण कुणी कुणाला खात नाही आहे. सर्वानी आपल्या भूकेवर विजय मिळवला आहे. आणि पार्वती शंकराला नेहमी सांगते की  तुम्ही जरी भूकेवर विजय मिळवला तरी तुम्ही बाकी लोकांचा विचार करायला पाहिजे.

तिसरी प्रॉमिस लँड म्हणजे वैकुंठ आहे. जिथे प्रीमियर विष्णू असतो. तो निवांत पहुडला आहे. आजूबाजूला संपन्नता आहे आणि प्रचंड स्थैर्य आहे. विष्णूला सुद्धा नेहमी पृथ्वीवरच्या लोकांची पडलेली असते. त्यांचं भलं होणं यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. मग तो कधी वराह बनतो, कधी मासा बनतो, कधी कृष्णाच्या रूपात येतो तर कधी गरीब माणसाच्या रूपात. स्वतःच्या भुकेआधी त्याला समोरच्या माणसाची भूक मिटवण्याची काळजी असते.
___________________________________________________________________________________________

माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याची भूक तीन प्रकारानी डिफाइन करता येते.

१. माणसाला आजची भूक तर मिटवायची असतेच, पण उद्याची, परवाची, एक वर्षानंतरची, मरेपर्यंत भुकेची सोय करायची असते. इतकंच काय, पण त्याला मेल्यांनतरची पण सोय करून ठेवायची इच्छा असते.

२. दुसरं असं  की आपली भूक मिटवायला अन्न तर लागतं पण आपल्याला त्याबरोबर स्टेटस ची पण भूक असते. प्रॉपर्टी लागते, कार लागते, पॉवर लागते. बरं ती प्रॉपर्टी आपल्यापुरतीच नाही तर आपल्या मुलांसाठीची पण करायची असते आणि शक्य झालं तर नातवासाठी सुद्धा.

३. आणि तिसरी गोष्ट आपण सेन्सिटिव्ह असतो. मनात आणलं तर आपण दुसऱ्याच्या भुकेची काळजी घेऊ शकतो. ती घेतो की  नाही ही गोष्ट वेगळी. लहानपणापासून आपल्याला शिकवलं असतं की आपलं पोट भरल्याशिवाय दुसऱ्याच्या भुकेची काळजी घेता येत नाही. आधी स्वार्थ मग परमार्थ. हे असलं तरी आपण दुसऱ्याचा विचार करू शकतो हे नक्की. ज्याला इंग्रजीत आपण एम्पथी म्हणतो.

__________________________________________________________________________________________

थोडक्यात काय, तर स्वर्गात पहिले माझी भूक मिटली पाहिजे हा भाव असतो.
कैलास पर्वतावर हा एकुणात स्वतःच्या भूकेवर विजय मिळवला असतो.
आणि वैकुंठात पहिले समोरच्याच्या भुकेची काळजी घेतली जाते. वैकुंठाचा अधिपती आधी इतरांचा विचार करतो.

____________________________________________________________________________________________

व्यवसाय करण्याची तीन सूत्र आहेत.

तुमची बिलीफ सिस्टम
ज्यातून तुमचं बिहेवियर ठरतं
आणि त्यातून बिझिनेस करण्याची पद्धत जन्माला येते.

आता तुमची बिलीफ सिस्टम बिझिनेस हेड म्हणून तुम्ही स्वतःची भूक आधी मिटवत असाल तर तुम्ही इंद्र आहात, जर तुम्ही स्वतःच्या भुकेवर विजय मिळवला असेल तर शंकर आहात आणि जर दुसऱ्याच्या भुकेचा विचार तुमच्या आधी करत असाल तर विष्णू आहात.

आणि एक लक्षात ठेवाल, मंदिरात पूजा एकतर शंकराची केली जाते नाहीतर विष्णूची. इंद्राची नाही.

आणि एम्प्लॉयीज ने पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुख स्वर्गात नाही तर वैकुंठात आहे.

No comments:

Post a Comment