Thursday 21 December 2017

प्रायश्चित्त

बऱ्याचदा मित्र सुचवतात की एखादी घटना तू पूर्ण उलगडून सांगत नाही. त्यामुळे जो रिझल्ट मिळाला त्यामागील खऱ्या ऍक्शन्स कळत नाही. पण अनेक कारणांसाठी मी त्या नाही सांगू शकत नाही. पूर्ण पत्ते ओपन कसे करू शकणार? आपल्या सगळ्याच गोष्टी सांगत सुटल्या तर त्या तुमच्या विरोधात काम करू शकतात अशी एक इंग्रजी म्हण आहे.

त्या ओपन न करण्या मागे एक वेगळी किनार आहे.

या गोष्टीत काही दुःख, अपमान लपलेले असतात. आणि हे माझे झालेले नाहीतर मी दुसऱ्याबद्दल केलेले. इतकंच काय तर काही चुका अन काही गुन्हेही. हे सगळं माझं पर्सनल आहे. ती दुःख, अपमान, चुका, गुन्हे माझ्याच बरोबर संपतील. कुणालाही कळणार नाहीत.

आपल्याला असं वाटतं की आज जे आपण आहोत ते योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे किंवा आपण काही चांगली कामं करतो म्हणून. असेलही तसं कदाचित. पण मी ज्यांना दुःख दिलं, अपमान केले त्या व्यक्ती माझ्या विरोधात व्यक्त झाल्या नाही हे ही त्यामागचं कारण असू शकतं. किंबहुना आहेच.

आयुष्यात ज्या काही म्हणून चुका केल्या, काही गुन्हे ही केले, जाणतेपणी, अजाणतेपणी,  त्या, त्यावेळेला उघडकीला आल्या नाही हे नशीब. ते जर जगाला कळलं असतं तर आयुष्यातून उठलो असतो. जी लोकं आज फुलं उधळत आहेत त्यांनी त्यावेळेस तोंडात शेण घातलं असतं.

कोणत्याही यशस्वी गोष्टीमागे छोटा वा मोठा गुन्हा लपलेला असतो असं इंग्रजीत म्हणतात ते उगाच नाही.

त्यामुळे आज जर चांगलं जगण्याचा चॉईस मिळत असेल तर तो गत आयुष्यात माझ्या चुकांवर पांघरूण घालण्याचा चॉईस काही लोकांनी वा जगनियंत्याने केला होता, त्यामुळे आहे हे निर्विवाद सत्य आहे.

या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे. तशा चुका, गुन्हे उर्वरित आयुष्यात करायच्या नाहीत हे ठरवलं आहे.

त्या गोष्टींचं प्रायश्चित्त भोगता येत नसल्यामुळे त्याशिवाय दुसरा चॉईस तरी काय आहे?

No comments:

Post a Comment