Thursday 21 December 2017

आभार अन धन्यवाद

काय लिहू, किती लिहू, कशी सुरुवात करू यातच काल रात्रीपासून अडकलो आहे. शेवटी विचार केला मानसिक गोंधळानेच सुरुवात करू.

सगळ्यात प्रथम काल कार्यक्रमास उपस्थित असणार्यांचे मनःपूर्वक आभार. खरं सांगायचं तर मलाच वाटले नव्हते इतका मोठा मित्र परिवार जमेल असं. पुण्यातूनच नव्हे तर अनेक दूरदूर गावातून आलेल्या मित्रांचा वावर बघून मी विस्मयचकित तर झालोच आहे, पण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे. फेसबुक जे आजकाल बऱ्याच विवादास्पद गोष्टींसाठी बदनाम झालं आहे त्याच फेसबुकच्या चावडीवर पिटलेल्या माझ्या दवंडीला तुम्ही जी ओ दिली तिने मी अक्षरशः भारावून गेलो आहे.

सकाळी जो मुसळधार पाऊस पडत होता त्याने वाटलं की कार्यक्रमाचा विचका होणार. कुणी येणारच नाही. पण तितक्यात मीरा ताईंनी ओळी लिहिल्या की पाऊसच पुस्तकाच्या स्वागताला आला. माझं टेन्शनच गेलं. आणि खरं सांगतो. रात्री मला वाटलं, बरं झालं पाऊस आला. त्यामुळे तरी काही जण येऊ नाही शकले नाहीतर मिस मॅनेजमेंट साठी शिव्याच खाव्या लागल्या असत्या.

सगळ्यात मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की  इतक्या दूरवरून आलेल्या मित्रांना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. ते पुस्तकावर सही घेण्याचं प्रकरण तसं बघायला गेलं तर किचकट आहे. त्यात अडकलो अन सगळा घोळ झाला. त्याबद्दल माझ्या बाहेर गावाहून आलेल्या मित्रांची तहे दिलसे माफी मागतो.

इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करायची माझी पहिलीच वेळ. त्यात काही चुका झाल्या. सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्केलक्राफ्टचा, ज्यांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवलं आहे त्याचा सत्कार राहिला. मुख्य म्हणजे सचिन दायमे अन त्याच्या टीमनेच सगळा इव्हेन्ट मॅनेज केला होता. माझ्या कंपनीचा उल्लेख मनोगतात लिहूनही करायचा राहिला. नील आणि यशला प्रकाशनावेळी स्टेज वर बोलवायचं राहून गेलं. त्यांची पण माफी मागतो.

बाकी मनीष गुप्ता सर, मिलिंद सरवटे सर यांची भाषणं जोरकस झाली अन उद्योजकतेच्या ध्यासाला बळकटी देणारी होती. मीरा ताईंच्या खुसखुशीत भाषणाने "मी परभणीकर" यावर शिक्कामोर्तब झाले. मास्टर ऑफ सेरेमनी अण्णांनी बेअरिंग मस्त सांभाळलं. सानिका अन मंगेशने को होस्टच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या.

एकंदरीत हा अडीच तासाचा सोहळा तुम्हा सगळ्यांच्या सहभागाने यादगार झाला. आयुष्यभराचं संचित मिळालं मला. ते १५० क्षण माझ्या आठवणींच्या कुपीत आता बंदिस्त झाले आहेत. त्या आनंदोत्सवात मी आता किती काळ डुंबत राहील कोण जाणे. कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून पार्किंगचा अत्यंत व्हॅलीड प्रॉब्लेम घेऊन एक पुणेकर काजळाची तीट लावून गेला.

शुभेच्छा अन अभिनंदनाने वॉल ओसंडून वाहत आहे. व्हाट्स अप वर, मेसेंजर मध्ये, एस एम एस मध्ये खूप मेसेजेस आले आहेत. त्यामुळे अगदी जगन्मित्र वगैरे असल्याचा फील येतोय. काल लागलीच पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्यामुळे उत्तरं द्यायची आहेत. आजपासून दिल्लीत आहे. पहाटेच पुणे एअरपोर्टवर जरा निवांत आहे. पुस्तकातील अनेक मजकुराप्रमाणे ही आभाराची पोस्ट विमानतळावर लिहावी हा भारी योगायोग आहे.

पुनश्च आभार अन धन्यवाद.

No comments:

Post a Comment