Thursday 21 December 2017

"हॅपी इंडिपेंडन्स डे"

सकाळी झेंडावंदन करण्यासाठी नीलच्या शाळेत चाललो होतो. नील ने कार मध्ये विचारलं

"पण ते टिळकांचे फ्रेंड असं का म्हणत होते की आपल्याला इतक्या लवकर फ्रीडम नको"

मी म्हणालो "कोण, आगरकर"

नील "तेच ते"

मी सांगितलं "अरे, आगरकरांना असं वाटत होतं की सामाजिक दृष्ट्या अजून आपण सुदृढ नाही आहोत. तेव्हा आधी समाजमन बदलू आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर एक प्रगल्भ समाज देशाला व्यवस्थित पुढे नेईल"

नील ने विचारलं "अच्छा, पण तुम्हाला कुणाचं बरोबर वाटतं"

मी म्हणालो "मला टिळक बरोबर वाटतात. कारण इंग्रज आपल्या देशाला लुटत होते. तोंडदेखली लोकोपयोगी गोष्टी जरी बनवत असतील तरी सांपत्तिकदृष्ट्या आपला देश गरीब होत होता. इथल्या व्यापारातून पैसे इंग्लंड मध्ये जात होते. आपला देश देशधडीला लागला होता. आणि ते थांबायचं असेल तर देशातून इंग्रज हद्दपार होणे याशिवाय काही पर्याय नव्हता"

टिळक बरोबर वाटतात असं म्हंटल्यावर त्याचा पुढचा प्रश्न "का" हे ताडून मी सांगितलं. हम्म म्हणत तो कारच्या बाहेर बघत राहिला. दोन मिनिटाने म्हणाला

"अभिषेक म्हणत होता की गांधीजींनी भगतसिंगना वाचवलं नाही म्हणून. खरं आहे का ते"

मी सांगितलं "हे असेलही अन नसेलही. तितका माझा अभ्यास नाही. असा विचार ऐकीव माहितीने करू नये. त्यासाठी मोठा झालास की डॉक्युमेंट शोध आणि मग मत बनव. त्या काळातील देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा उद्देश इतका उदात्त होता की त्यासाठी विविध लोकांनी जे मार्ग निवडले ते बरोबर की चूक यावर आज काथ्याकूट करण्यात काही मतलब नाही. मग ते मवाळ असो वा जहाल. आणि तो इतिहास झाला.

त्याचा अभ्यास तितका करावा ज्याने आपल्या आकलनशक्तीचा विकास होईल. पण इतिहासाला भूत बनवून आपल्या मानगुटीवर बसवू नये. तुझं, समाजाचं अन देशाचं स्थान हे वर्तमान अन भविष्यकाळावर जोखलं जातं. तेव्हा तू त्यावर लक्ष दे."

मी ड्रायव्हिंग करत बोलत होतो. अन शाळेचं गेट आलं. मी डावीकडे बघितलं तेव्हा नील भान हरपून माझ्याकडे बघत होता. शाळा आल्याची आठवण करून दिली त्याला.

उतरताना तो म्हणाला

"हॅपी इंडिपेंडन्स डे"

नीलला हाय फाय देत मी वॉर मेमोरियल सेंटर ला तिरंग्याला सलाम करण्यासाठी गाडी वळवली.

No comments:

Post a Comment